Friday, 31 January 2025

मराठीतील अभिजात साहित्य पुढच्या पिढीकडे नेण्याकरिता कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करावा- मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस मराठीजनांच्या प्रचंड उत्साहात तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा ‘साहित्य भूषण’ पुरस्कार देऊन सन्मान

 





            पुणे, दि. 31: तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत आणि देशातून, राज्यातून, परदेशातून आलेल्या साहित्यिक, मराठीप्रेमींच्या प्रचंड उत्साहात उद्घाटन झाले.

            आजच्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या युगात मराठीतील आपले अभिजात साहित्य पुढच्या पिढीकरिता कसे नेता येईल यादृष्टीने चॅट-जीपीटी सारखे एखादे ‘स्मॉल लँग्वेज मॉडेल’ तयार करण्यासाठी मराठी भाषा विभागाने पुढाकार घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

            फर्ग्यूसन महाविद्यालय येथे संमेलनाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्यमंचात झालेल्या या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, बापूसाहेब पठारे, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर आदी उपस्थित होते.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यांचे मनापासून आभार मानतो, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, हा दर्जा देण्याचे भाग्य लाभले असा उल्लेख श्री. मोदी यांनी केला आहे. प्रमाण मराठीच्या माहेरघरी आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले संमेलन होत आहे ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पुढील महिन्यात पहिल्यांदा दिल्लीला अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे, ही देखील आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.

            वयाच्या चौथ्या वर्षी साहित्याच्या निर्मितीला सुरूवात करुन अजूनही वयाच्या 93 व्या वर्षी सर्व प्रकारचे साहित्य निर्माण केलेल्या सृजनशील साहित्यिक पद्मश्री मंगेश कर्णिक यांना या संमेलनाचा पहिला साहित्यभूषण पुरस्कार देताना आनंद होत आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

            या संमेलनाला महाराष्ट्रातून, इतर राज्यातून, परदेशातून मराठीप्रेमी, साहित्यिक आले असून मराठी भाषा विभागाने खऱ्या अर्थाने हे संमेलन वैश्विक अशा दर्जाचे केले आहे. जगाच्या पाठीवर एकही देश असा नाही जिथे मराठी माणूस पोचलेला नाही. दाओस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम येथे गेलो असता तेथील एका चिमुरड्याने ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे सुंदर म्हणून दाखवले हे पाहून अभिमान वाटला की मराठी माणूस इतक्या वर्षापासून परदेशात गेला तरी माय मराठी त्याच्यापासून दुरावली नाही, आणि ती पुढच्या पिढीकडे पोहोचविण्यासाठी प्रयत्न करतो आहे.

            भाषा ही भावना व्यक्त करण्याचे साधन, संपर्काचे साधन असते आणि केवळ अभिव्यक्ती नाही तर अभिव्यक्तीतून सृजन करण्याचे देखील साधन असते. म्हणूनच आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे राज मान्यता मिळाली आहे. मराठी भाषा ही अभिजात होतीच, प्राचीन भाषा होतीच परंतु कुठल्याही भाषेला राज मान्यता मिळणे देखील महत्त्वाचे असते. मोगलांनी या देशाची राजभाषा फारसी केली होती; त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी आज्ञापत्र काढून स्वराज्याची भाषा मराठी भाषा करुन मराठीला राजमान्यता देण्याची खऱ्या अर्थाने सुरूवात केली.

            मराठीची मुळे खोलवर गेलेली आहे. आपली मराठी भाषा काही किलोमीटरवर बदलते पण प्रत्येक ठिकाणी तिची गोडी वाढतच जाते. किंबहुना मराठीच्या बोलीभाषांत निर्माण झालेले साहित्य, त्याचे प्रकार व बोलीभाषातील काव्य आदींची गोडी वेगळीच असून मनाला अतिशय मनाला भावनारे असल्याचे पहायला मिळते.

            मराठी माणूस हा कधीही स्वार्थी राहिला नाही. पानिपतच्या लढाईत मराठे हे आपले साम्राज्य वाढवण्याकरता नव्हे तर भारताचे रक्षण करण्याकरता गेले होते. त्यावेळी मराठ्यांनी दिल्ली जिंकल्यानंतर अहमदशहा अब्दालीने तहाचा लखोटा दिला होता की पंजाब, सिंध आणि मुलतान दिल्यास उर्वरित संपूर्ण भारत हा मराठ्यांचा राहील. पण मराठ्यांनी संपूर्ण अटकेपर्यंतचा भारत हे हिंदवी स्वराज्य, मराठ्यांचा राज्य आहे आणि हा आमचा भारत देश आहे अशी भूमिका घेतली आणि ते पानिपतमध्ये लढले. ही ताकद, क्षमता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यात तयार केली होती.

            छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच वैश्विक विचार संत ज्ञानेश्वरांनी, संत तुकोबारायांनी आपल्याला दिला होता तो वैश्विक विचार मराठी माणूस हा नेहमी आपल्या जीवनामध्ये जगलेला आहे. या विचारामुळे खऱ्या अर्थाने मराठी माणूस हा जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी देखील त्या ठिकाणी एक प्रकारे गुणवत्ता आणतो, त्या ठिकाणच्या व्यवस्था अधिक चांगल्या करण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच आज मराठी माणसाची कीर्ती ही जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहे.

            संत ज्ञानेश्वरांची विश्वात्मक मराठी असेल, तुकोबारायांचे अभंग असो, संत चोखा मेळा यांचा सामाजिक समतेचा संदेश, संत नामदेव, एकनाथ महाराज, जनाबाई, बहिणाबाई यांच्या रचनातून सामान्य माणसाला जगण्याचा जो मिळालेला अधिकार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचू शकल्या त्याचे कारण माय मराठी ही आपल्या सगळ्यांमध्ये एक दुवा म्हणून काम करत होती.

            लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हा जो नारा दिला किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या प्रकारे क्रांतिकारकांमध्ये स्फूरण दिले. दादासाहेब फाळके यांनी सिने सृष्टीची निर्मिती केली, गान कोकिळा लता मंगेशकर किंवा सचिन तेंडुलकर आदी अनेक नावांची मांदियाळी आहे की ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर मराठी असल्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना येतो. या संमेलनाच्या माध्यमातून जगभरातल्या मराठी माणसाला हीच मराठीची परंपरा पुढे नेण्याचीच नव्हे तर जगभरात मराठी जगवायची, टिकवायची, समृद्ध करायची आहे अशा प्रकारची साद देखील घालत आहोत.

            आज देशाच्या पाठीवर ज्या रंगभूमींनी खऱ्या अर्थाने नाट्य संस्कृती टिकवली आहे. त्याच्यामध्ये पहिले नाव आपल्या मराठी रंगभूमीचा आम्हाला घ्यावं लागेल. हे जे काही सगळे आपल्या मराठी माणसाने जतन करून, संवर्धन करून ठेवले आहेत ते पुढे नेण्याकरता आपण सर्वजन या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. त्यासाठी आजच्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात या तंत्रज्ञानाचा उपयोग हा आपल्या प्रचार आणि प्रचारासाठी करायचा असतो. असा प्रयत्न मराठीला ज्ञान भाषेमध्ये परिवर्तित करण्याचा करत असताना स्मॉल लँग्वेज मॉडेल तयार करुन आपले अभिजात साहित्य पुढील पिढीला तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपलब्ध होईल असा प्रयत्न मराठी भाषा विभागाने करावा.

            इंग्लंड मधील मराठी मंडळाला त्या ठिकाणी जागेच्या संदर्भात आवश्यक ती मदत येत्या पंधरा दिवसांमध्ये निश्चितच देण्यात येईल. तसेच दिल्लीतली मराठी शाळा देखील अव्याहत चालल्या पाहिजेत याकरितादेखील महाराष्ट्र शासन आवश्यक ती मदत करेल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

            उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'मराठी तितुका मेळवावा...' असे सांगणाऱ्या या विश्व मराठी संमेलनाचे हे तिसरे वर्ष आहे. माझी भाषा अभिजात आहे, ही भावनाच अभिमान निर्माण करणारी आहे. आपली भाषा प्राचीन आहे, आजही प्रचलित आहे. माझ्या मराठी भाषेत उत्तम साहित्य निर्माण होतं, हे पुराव्यानिशी आपण सिद्ध केले. त्यानंतरच हा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. हे विश्व मराठी संमेलन म्हणजे पुस्तक आणि पुस्तकांचे निर्माते यांचाच हा महाकुंभमेळा आहे, असेही ते म्हणाले.

            मराठी भाषेला जवळपास २ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचे आपण केंद्राला सिद्ध करून दिले. त्यासाठी साहित्य परिषदेने एक मोठा पुरावा केंद्राला सादर केला होता. जुन्नर तालुक्यातला नाणेघाटातील लेणीमध्ये दगडी भिंतींवर कोरलेला सातवाहन शिलालेख हा तो मौल्यवान पुरावा असून तो आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महत्त्वाचा ठरला, असे श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

            फेब्रुवारीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत असताना विश्व मराठी संमेलन कशाला अशी टीका काही ठिकाणी होताना दिसते. तर दोन्हीही सोहळे शुद्ध मराठी भाषेचेच आहेत. दोन्हीकडे मराठीचेच वारकरी जमणार आहेत. दोन्हीकडे मराठीचाच गजर होणार आहे, असेही ते म्हणाले.

            या विश्व संमेलनात तब्बल २२ देशांतून तीनशे मराठीप्रेमी आलेले आहेत. आज तीनशे आहेत, पुढच्या वर्षी हाच आकडा वाढेल. ही मराठी १९३ देशात पोहोचायला हवी हे आमचे स्वप्न आहे. या स्वप्नाला प्रयत्नांची जोड दिली तरच ते साकार होईल. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानातून आता विश्वात्मके देवे अशी साद घातली. नामदेवांना ७०० वर्षापूर्वी मराठीच्या विश्वव्यापी परिणामाची जाणीव होती, असेदेखील ते म्हणाले.

            वैश्विक भाषा किंवा विश्वाची भाषा म्हणजे जी भाषा सर्वांना जोडते, जात पात धर्माच्या पलिकडची माणुसकी शिकवते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते. हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेत ठासून भरले आहेत. जगात सात हजार भाषा आहेत. एकट्या भारतात १२१ भाषा आहेत. जवळपास वीस हजार बोलीभाषा आपल्या देशातच बोलल्या जातात. या सगळ्या भाषांशी मराठीनं आपलं नातं जोडलं पाहिजे. तेव्हाच माझी अभिजात मराठी वैश्विक मराठी होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

            मराठी सर्वार्थाने समृद्ध भाषा आहे. आता ती ज्ञानभाषा व्हायला हवी. आज तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होतंय. जग कृत्रिम बुद्धिमत्तेचं म्हणजे एआयचं आहे. आता संवादाची भाषाही तंत्रज्ञान ठरवतंय. त्यामुळे आपल्या समोरचं आव्हान मोठे आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून उच्च शिक्षणावर भर दिला आहे. पण, त्यात अनेक अडचणी आहेत. विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण, संगणक अशा अनेक विषयांत मराठीत उत्तम पुस्तके नाहीतच. विज्ञानाच्या विषय, अभियांत्रिकीसह सर्व विषयांत मराठीतून सोपी पुस्तके येणे गरजेचे आहे. मराठी ही नुसती ज्ञानभाषा नाही तर व्यवहार्य भाषा व्हायला हवी. रोजगारासाठी म्हणजे अर्थार्जनासाठी आवश्यक भाषा व्हायला हवी. त्यासाठी आपल्या सर्वांना मिळून ठोस प्रयत्न करावे लागतील. हे प्रयत्न महाराष्ट्र धर्म वाढवण्याइतकेच महत्त्वाचे आहेत, असेही श्री. शिंदे म्हणाले.

            परदेशात उच्च पदांवर मराठी मुले जास्तीत जास्त दिसावी. हीच मुले मराठी आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचे राजदूत बनतील. त्यांनी तिथे मराठी संस्कृतीचा झेंडा उंच रोवावा ही अपेक्षा आहे. आज इथे साहित्यावर जरूर चर्चा व्हावी पण इथल्या कर्तृत्ववान मराठी जणांनी मराठी विश्व कसे बळकट होईल याचा विचार करायचा आहे, असेही ते म्हणाले. 

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, आपला महाराष्ट्राभिमान हा फक्त, चांद्यापासून बांद्यापर्यंत, महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमांपुरता मर्यादीत नाही. देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात ज्या-ज्या ठिकाणी मराठी माणसांनी झेंडा रोवला, ज्या-ज्या ठिकाणी मराठी माणसाने पाऊलखुणा उमटवल्या. इतिहासातल्या आणि वर्तमानातल्या, त्या पाऊलखुणांचा आपल्या सर्वांना आणि महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे.

            ते पुढे म्हणाले, आपण जेव्हा मराठे म्हणतो, त्यावेळी मराठा ही संकल्पना जातीपुरती मर्यादित नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. मराठी भाषा, मराठी बोली बोलणाऱ्या, सह्याद्रीच्या वाऱ्यांशी, महाराष्ट्राच्या मातीशी नातं असलेल्या, अठरापगड जाती, धर्म, भाषा, पंथाच्या लोकांना एकत्रित आणून मराठा किंवा मराठे ही संकल्पना अस्तित्वात आली, हे लक्षात घेतलं पाहिजे.

            ‘विश्व मराठी साहित्य संमेलन साहित्यभूषण पुरस्कार’ प्रदान करुन त्यांचा सन्मान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन श्री. पवार म्हणाले, मधुमंगेश कर्णिक हे मराठी साहित्यविश्वाशी गेली 75 वर्षांहून अधिक काळ, एकरुप झालेले त्यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा साहित्यिक प्रवास आज 2025 मध्ये येऊन पोहचला आहे. मराठी साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येकाला मधु मंगेश कर्णिक यांनी आपले केले आहे, अशा शब्दात श्री. पवार यांनी त्यांचा गौरव केला.

            तिसरे मराठी विश्व संमेलन पुण्यात होत आहे. यापुढील संमेलने छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आदी ठिकाणीही व्हावीत; परंतु, पुढील पाच वर्षातील एक तरी मराठी विश्व संमेलन परदेशात घेऊयात. त्यासाठी मराठी भाषा विभागाने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

            संमेलनातील तीन दिवसात कला, साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रातल्या ज्येष्ठ दिग्गज मंडळी आणि नवोदित मंडळींच्या सहभागामुळे, जून्या-नव्या पिढीमध्ये संवादाचा पूल बांधण्याचं काम संमेलनाच्या माध्यमातून होत आहे. मराठी साहित्यापलिकडची मंडळी या संमेलनात येणार आहेत. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, राजकारण, समाजकारण,  कला, क्रीडा, संस्कृती अशा सगळ्या क्षेत्रातल्या, कर्तृत्ववान मंडळींना याठिकाणी भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी आपल्या तरुण पिढीला मिळणार आहे.

            मराठी माणसाच्या मनात, कुठेतरी कोपऱ्यात, एक न्यूनगंड असतो. तो काढून टाकण्याचं काम हे विश्व मराठी संमेलन करेल, अशी खात्री आहे. मराठी साहित्य संमेलन, मराठी विश्व संमेलन किंवा मराठी माणसाच्या अस्मितेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही होत असेल, तर त्यामागे उभं राहण्याची भूमिका महाराष्ट्र शासन ती निश्चितपणे घेईल.

            जगाच्या इतिहासात रयतेचे राज्य स्थापन करणारे पहिले राजे, छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रात जन्माला आले. देशातली पहिली मुलींची शाळा महाराष्ट्रात सुरु झाली. बहुजनांच्या दारात शिक्षणाची गंगा नेण्याचं काम, शाहू, फुले, आंबेडकर या महामानवांनी महाराष्ट्रात केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच नेतृत्व महाराष्ट्राने केले. याच महामानवांच्या विचारांचा, कार्याचा वारसा पुढे नेण्याचे काम आपल्याला करायचं आहे. त्यासाठी भावी पिढीच्या मनात विचारांची पायाभरणी करण्याचं काम, या विश्व मराठी संमेलनातून व्हावे, अशी अपेक्षाही श्री. पवार यांनी व्यक्त केली.

            मंत्री सामंत म्हणाले, मराठीवर प्रेम करणाऱ्या साहित्यिक लोकांनी मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून खूप मोठी चळवळ केली. त्याला यश आले. पुण्याला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखले जाते, मराठीसाठी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती म्हणून पुणे येथे हे तिसरे संमेलन व्हावे अशी आमची भूमिका होती. हा शासनाचा कार्यक्रम असला तरी सर्व पुणेकरांनी हा कार्यक्रम उचलून धरला. मराठी भाषेचे संवर्धन, जतन झाले पाहिजे आणि प्रचार व प्रसार झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

            मराठी भाषा आहे तशी टिकविणे, मराठीची अस्मिता टिकविणे आणि मराठी भाषेवरील आक्रमणाचा आक्रमक पद्धतीने प्रतिकार करण्याची युवा पिढीची जबाबदारी आहे. हे करताना ज्यांनी ज्यांनी मराठी भाषा लिहिली, वाढवली त्या सर्वांचा आदर्श दीपस्तभांप्रमाणे स्वत:समोर ठेवला पाहिजे. यामुळे विश्व मराठी संमेलनातील पहिला साहित्यभूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांनी देण्यात येत असल्याचे श्री. सामंत म्हणाले.

            रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड हे कवि केशवसुतांचे जन्मगाव त्यांचे स्मारक उभारुन श्री. कर्णिक यांनी जगभरात प्रसिद्ध केले. ते पुढील वर्षी पुस्तकांचे गाव करण्यात येईल व त्याला आवश्यक तो निधी देण्यात येईल. याशिवाय मराठी वाढविणारी, मराठीला ताकत देणारा, सातासमुद्रापार नेणारी महनीय व्यक्ती ज्या गावात जन्माला आली असेल अशी राज्यातील गावे शोधून त्यांचा समावेश पुस्तकांचे गाव, कवितांचे गाव योजनेत करण्यात येईल, असेही ते म्हणाले. मराठीला भाषेला आणि मराठी माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्यास त्याविरुद्ध कडक कायदा व्हावा, अशी भूमिकादेखील श्री. सामंत यांनी मांडली.

            श्रीमती पाटणकर- म्हैसकर यांनी प्रास्ताविकात सांगितले, हे साहित्य संमेलन साहित्यापुरते मर्यादिन न राहता ‘मराठी- 360’ या संकल्पनेनुसार मराठीच्या सर्व पैलूंवर काम करण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. मराठी भाषेचा अभिजात दर्जा सतत वृद्धींगत होत जाईल यासाठी मराठी भाषा विभाग सातत्याने प्रयत्न करेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

            अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमात अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे, सदस्य डॉ. सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, रवींद्र शोभणे, संजय नहार यांचा सत्कार करण्यात आला.

            कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ साहित्यिक, नवोदित साहित्यिक, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. तत्पूर्वी बालगंधर्व रंगमंदिरापासून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

०००००००००००


अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न सुरक्षा आणि स्वच्छता या विषयावर १ दिवसीय कार्यशाळा संपन्न व्यावसायिकांना अन्न परवाण्यासाठी अर्ज करण्याचे सहायक आयुक्तांचे आवाहन



             जळगाव दि.31 ( जिमाका )- अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव कार्यालयामार्फत 30 जानेवारी रोजी सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव व सहायक आयुक्त्, समाज कल्याण, जळगाव विभागाच्या अधिपत्या खालील कार्यरत असणाऱ्या सर्व अनुदानित वसतिगृहे तसेच निवासी शाळा यामध्ये देण्यात येणा-या भोजन आहार यांच्या गुणवत्ता नियंत्रण करण्याकरिता त्या सर्व वसतिगृहे व शाळा यांना अन्न व औषध विभाग महाराष्ट्र शासन अन्न सुरक्षा आणि स्वच्छता या विषयावर १ दिवसीय कार्यशाळा ए.टी.आर.  लॅबोरेटरी येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेअंतर्गत सर्व प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण कीट भारत सरकार मार्फत प्रमाणपत्र देण्यात आले.

         यावेळी  सं.कृ. सं.कृ., सहायक आयुक्त (अन्न) यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करताना विनापरवाना अन्न व्यवसाय करणे कायदयानुसार गुन्हा असून १० लाखापर्यंत दंडाचे कायदयात प्रावधान आहे, विनापरवाना अन्न व्यवसाय करणा-यांविरुद्ध कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी सर्व अन्न व्यावसायिकांनी परवाना/नोंदणी करावी. तसेच ज्या अन्न व्यावसायिकांकडे परवाना आहे, त्यांनी मुदतीच्या पूर्वी ऑनलाईन नूतनीकरण करुन घ्यावे. अन्यथा रुपये ६०००/- इतका दंड असून मुदत संपल्यानंतर परवाना रद्द होत असून व्यवसाय विना परवाना गृहित धरुन त्यांच्या विरुदध कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येते असे सांगितले.

         तसेच अन्न परवाना व नोंदणीसाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांच्या https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. ज्यांची वार्षिक उलाढाल १२ लाखाच्या आत असेल अशा दुकानांनी अन्न नोंदणी करणे व ज्यांची वार्षिक उलाढाल १२ लाख किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा अन्न व्यावसायिकांनी अन्न परवानासाठी अर्ज करावा. असे आवाहन या कार्यशाळेत केले.

         या कार्यक्रमास व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव कार्यालयाचे सहायक आयुक्त (अन्न) सं.कृ. कांबळे, अन्न सुरक्षा श.म. पवार, स.न.बारी, वरिष्ठ लिपीक हे उपस्थित होते.

0000000000

राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी अर्ज करण्याचे क्रीडा आयुक्तांचे आवाहन

         जळगाव दि.31 ( जिमाका )- राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग / संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे. त्यांनी केलेल्या सामाजित कार्याला प्रोत्साहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याच्या युवा धोरणा अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य युवा पुरस्कार देण्यात येतात.

            सन २०२३-२४ या वर्षात्त राज्यस्तरावर राज्य युवा पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रिय विभागस्तर नुसार प्रत्येक विभागातील १ युवक, १ युवती व १ नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहेत. युवक-युवती यांना रोख रु.५०,०००/- संस्थेस रु. १,००,०००/- तसेच गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप राहणार आहे.

            राज्य युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणा-या संस्था यांनी गत तीन वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे मुल्यांकन विचारात घेण्यात येणार असून राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी अर्ज दि१५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक राहणार आहे.

            अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील जास्तीत जास्त युवा व युवा विकासाचे कार्य करणा-या संस्था यांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी केलेले आहे.

000000000

जळगाव जिल्हा प्रशासन गिलियन बॅरे सिंड्रोम नियंत्रणासाठी सज्ज; प्रशासनाने तयारीसाठी घेतली कार्यशाळा

 




            जळगाव दि. 31 ( जिमाका ) - गिलियन बॅरे सिंड्रोम (GBS) तसेच अन्य आरोग्य संकटांवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

            जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, GBS वर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी ठोस कृती आराखडा तयार करून, उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर करावा. मनुष्यबळाची कमतरता असली तरी नियोजनबद्ध काम केल्यास आरोग्याशी संबंधित संकटांवर यशस्वीरित्या मात करता येईल.

            डॉ. सचिन भायेकर यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन करताना, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सेवा प्रभावी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मनावर घेतले, तर सकारात्मक बदल घडवता येईल, असे सांगितले.

            कार्यशाळेत 77 प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना GBS संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यात लक्षणे, उपचार, सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत मार्गदर्शन झाले. जिल्ह्यात औषधसाठा पुरेसा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच ग्राम पातळीवर पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण व तपासणी नियमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संशयित रुग्ण आढळल्यास त्वरित संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले.

            GBS नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार असून, जनजागृतीसाठी तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मार्गदर्शन कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. "स्वच्छता, शुद्ध पाणी, योग्य आहार आणि सुदृढ जीवनशैली हीच GBS नियंत्रणाची गुरुकिल्ली आहे," असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

०००००००००


राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी आर्थिक मागासांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घ्यावा – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील







        जळगाव दि. 31 ( जिमाका ) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू लाभार्थ्यांपर्यंत आर्थिक लाभ पोहोचावा यासाठी राष्ट्रीयकृत बँका व सहकारी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.

         शुक्रवार, 31 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात आयोजित बँक प्रतिनिधींच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार,लीड बँक व्यवस्थापक प्रणव झा, कौशल्य विकास सहआयुक्त संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.

बँकांनी अधिकाधिक लाभार्थ्यांना कर्ज द्यावे

        अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध जातींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने राज्यभरात जातनिहाय महामंडळे स्थापन करण्यात आली आहेत. या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांना कर्जाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते.

नरेंद्र पाटील म्हणाले की, जळगाव जिल्हा हा लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा असल्याने येथे लाभार्थ्यांची संख्या वाढणे गरजेचे आहे. बँकांनी अधिकाधिक प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देऊन लाभार्थ्यांना आर्थिक सक्षम करावे व त्यांना नवनवीन व्यवसाय संधी उपलब्ध करून द्याव्यात.

       राज्यातील व जळगाव जिल्ह्यातील अनेक सहकारी बँका महामंडळाच्या माध्यमातून कर्जाचा पुरवठा करण्यासाठी उत्कृष्ट कार्य करीत आहेत. राष्ट्रीयकृत बँकांनी देखील या गोष्टीची दखल घेऊन लाभार्थ्यांना अधिकाधिक मदत करावी.

       जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महामंडळाच्या कर्ज वाटपाचा आढावा घेत राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना कर्ज देण्याचे आवाहन केले.या बैठकीस जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००००००

Thursday, 30 January 2025

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

       मुंबई, दि. 30 : राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसाठी 4066 नव्या आधार किटचे वाटप 10 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज दिली

         नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड नूतनीकरण करणे, पत्ता बदलणे अशा विविध सेवा देणारी ई सेंटर राज्यभर सुरू असून यासाठी लागणारी 3,873 आधार कार्ड किट सन 2014 साली जिल्हाधिकारी कार्यालयाना उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यापैकी सुमारे 2,558 किट सध्या वापरात असून 1,315 किट नादुरुस्त झाल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 2,567 नव्या किटची मागणी करण्यात आली होती. याबाबत ग्रामीण भागातून आलेल्या मागण्या लक्षात घेऊन राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.शेलार यांनी आज मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. नव्याने 4066 किट उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीनंतर घोषित केला. 

      येत्या 10 फेब्रुवारी पासून ही नवीन किट उपलब्ध करून देण्यात येणार असून सध्या यु.आय.डी.आय. टेस्टिंगची प्रक्रिया सुरू आहे.

      दरम्यान, नव्याने किट उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या जिल्ह्यांमध्ये अहिल्यानगरला 34 अकोला 78, अमरावती 109, छत्रपती संभाजीनगर 134, बीड 58, भंडारदरा 23, बुलढाणा 124, चंद्रपूर 74, धुळे 113, गडचिरोली 44, गोंदिया 48, हिंगोली 88, जळगाव 167 ,जालना 104, कोल्हापूर 188, लातूर 271, मुंबई शहर 103, मुंबई उपनगर 122, नागपूर 91, नांदेड 112, नंदुरबार 90, नाशिक 49, उस्मानाबाद 73 आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांना 153, परभणी 55, पुणे 338, रायगड 63, रत्नागिरी 59, सांगली 130, सातारा 132, सिंधुदुर्ग 160, सोलापूर 146, ठाणे 400, वर्धा 50, वाशिम 100, यवतमाळ 83 किट उपलब्ध होणार आहेत.

                                                                       0000000000

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

             जळगाव दि.30 ( जिमाका )- वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा यांचा  जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            शुक्रवार, दिनांक 31 जानेवारी, 2025 सायंकाळी 5.00 वाजता शासकीय विश्रामगृह, भंडारा येथून शासकीय मोटारीने भुसावळकडे प्रयाण.

०००००००००

वाळू धोरणावर 3 फेब्रुवारी रोजी अल्प बचत भवन मध्ये खुली चर्चा; नागरिकांना होता येणार सहभागी

             जळगाव, दि. 30 (जिमाका) – जिल्ह्यातील वाळू उपसा आणि त्यासंदर्भातील धोरणांवर चर्चा करण्यासाठी 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता अल्प बचत भवन, जळगाव येथे खुली चर्चा आयोजित करण्यात आली आहे. या चर्चेत नागरिक, पर्यावरणप्रेमी, वाळू उपसा व्यावसायिक, स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी आणि अन्य संबंधित घटक सहभागी होऊ शकतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

            वाळू उपसा आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखण्याच्या दृष्टीने ही चर्चा महत्त्वाची ठरणार आहे. शासनाच्या वाळू धोरणात सुधारणा, नियमावलीतील अंमलबजावणी, स्थानिक समस्यांवर तोडगा आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांवर या चर्चेत भर दिला जाणार आहे.

            या चर्चेत सर्वसामान्य नागरिकांना आपले मत मांडण्याची संधी मिळणार असून, प्रशासनाकडूनही धोरणात्मक भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिक, वाळू उपसा व्यावसायिक आणि संबंधित हितधारकांनी चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

००००००००००

१० वी व १२ वी परिक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता रद्द होणार

         जळगाव, दि. 30 (जिमाका) -  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा दि. ११ फेब्रुवारी ते दि. १८ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे तर  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते दि. १७ मार्च या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

                  सर्व परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तीची नियुक्ती केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा/ उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यामधून करण्याची कार्यवाही करण्यात यावी हे १७ जानेवारी रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते.

                 मात्र या निर्णयाच्या संदर्भात  लोकप्रतिनिधी, विविध शिक्षक संघटना व संस्थाचालक संघटना यांनी हरकती घेतलेल्या आहेत, त्यामुळे या निर्णयात अंशतः बदल करण्यात येत असून फेब्रुवारी-मार्च २०२५ व्या उत्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे.

             कोरोना काळातील सन २०२१ च सन २०२२ या दोन परीक्षा वगळून मागील ५ वर्षाच्या म्हणजेच फेबुवारी-मार्च २०१८, २०१९, २०२०, २०२३ व २०२४ या परीक्षामध्ये ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आलेली आहेत अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी सबंधित व्यक्तीची नियुक्ती केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्यात येणार आहे.

              फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या इ. १० वी व इ. १२ वी परीक्षामध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्हयात इ. १० वी व इ. १२ वीची परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकते प्रमाणे नियोजन करण्याची मुभा राहणार आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सदस्य सचिव दक्षता समिती, विभागीय मंडळे यांनी मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांच्या सहकायनि परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहील तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर भरारी पथकांच्या भेटी होतील याचे नियोजन केले जाणार आहे.

००००००००००

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली डीएलसीसीची बैठक संपन्न महिला बचत गटांना 500 कोटी रुपयांचे कर्ज वितरण उद्दिष्ट ; बँकांनी महिलांना वैयक्तिक कर्ज द्यावे – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद




             जळगाव, दि. 30 (जिमाका) – जिल्ह्यातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळावे आणि त्यांची आर्थिक प्रगती साधावी यासाठी 500 कोटी रुपयांचे कर्ज उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिला उद्योजकांना वैयक्तिक कर्ज देण्यासाठीही बँकांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून "लखपती दीदी" उपक्रमाला गती मिळेल, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बँक अधिकाऱ्यांना सांगितले.

            जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय समन्वय समिती (DLCC) ची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्राच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

            बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजीव लोखंडे, जिल्हा लीड बँक व्यवस्थापक प्रणवकुमार झा, तसेच जिल्ह्यातील विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

          पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी वेळेत परतफेड करावी, जेणेकरून पुढील हंगामासाठी त्यांना कर्ज सहज मिळू शकेल, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

         या बैठकीत जिल्ह्यातील आर्थिक परिस्थितीचा आढावा घेताना विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये –

 ठेवी आणि कर्ज वाटपातील तफावत

 नाबार्ड कर्ज सहाय्य

 क्रेडिट-डिपॉझिट रेशो

 किसान क्रेडिट कार्ड वाटप

 पीक कर्ज वितरण

 वार्षिक पत आराखडा (ACP)

 महिला बचत गट आणि वैयक्तिक कर्ज सुविधा

कर्ज वितरण व उद्दिष्टपूर्तीबाबत सूचना

 पीक कर्ज वाटप: बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज सहज उपलब्ध करून द्यावे.

 वार्षिक पत आराखड्याअंतर्गत (ACP) नियोजन: ठरवलेल्या उद्दिष्टांनुसार कर्ज वितरण व्हावे.

लघु व मध्यम उद्योगांना मदत: उद्योग आणि बँक यांच्यात समन्वय राखण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या मदतीने विशेष बैठक घेण्यात यावी.

 भांडवली मदत: लघु व मध्यम उद्योगांना भांडवली सहाय्य मिळावे यासाठी बँकांनी सक्रिय भूमिका घ्यावी.

००००००००००

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ५ फेब्रुवारी रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय आयोजन

             जळगाव, दि. 30 (जिमाका) -  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय, जळगाव यांच्या संयुक्त विदयमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जळगाव शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय करण्यात आले आहेत. येत्या ५ फेब्रुवारी, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

             नोकरी करु इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असुन सर्वसाधारण १०वी, १२ वी / सर्व शाखेतील पदवीधारक / आ.टी.आय सर्व ट्रेड/ बी.ई/ बी.सी.ए/एम.बी.ए तसेच सर्व डिग्री धारक पात्रता धारकासाठी ५०० पेक्षा जास्त रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.  

              या मेळाव्यात जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील जैन फॉर्म फ्रेश, युवा शक्ती, नाशिक, धुत ट्रान्समिशन,            छ. संभाजीनगर, हिताची अॅस्टींमो ब्रेक सि.प्रा.लि. जळगाव, किरण मशिन टुल्स, जळगाव, गुजरात अंबुजा, चाळीसगाव, फ्युबर टेक्स, जळगाव, टी. डब्लयु.जे, जळगाव, उत्कर्ष स्मॉल बँक, जळगाव, प्रतिभा प्लास्टिक, जळगाव, मानराज मोटर्स, जळगाव असे नामांकित आस्थापनाकडुन ऑनलॉईन पद्धतीने रिक्तपदे कळविण्यात आले आहेत.

           या मेळाव्याची लाभ घेण्याकरीता उमेदवारांनी  https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर लॉग-इन करुन रिक्तपदांसाठी अपलॉय करावे, तसेच ज्या उमेदवारांनी नाव नोदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांसह मेळाव्यास मुलाखतीच्या दिवशी हजर राहावे.

          याबाबत काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ०९.४५ ते संध्या.०६.१५ या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा असे आवाहन यांनी केले आहे.

००००००००००

थकित कर्ज वसुलीकरिता ओबीसी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार एकरक्कमी परतावा (OTS) योजना

         जळगाव, दि. 30 (जिमाका) -  महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरजू लोकांना स्वंयरोजगारासी कर्ज वितरीत करण्यात आले आहे. कर्ज घेतलेल्या लाभार्थीना कर्ज परतफेडीसाठी विहित मुदत देण्यात येते. विहित मुदत संपल्यानंतर  देखिल बऱ्याच लाभार्थीनी महामंडळाकडे शिल्लक रकमेची परतफेड अद्याप केलेली नाही. थकीत कर्ज वसुलीसाठी सर्व वैधानिक प्रयत्न महामंडळाकडून करण्यात येत आहेत.

         ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (OTS) योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीनी सदर योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

०००००००००

Wednesday, 29 January 2025

गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS)ची सद्यस्थिती व पुर्वतयारी प्रशिक्षण कार्यशाळेचे 31 जानेवारी रोजी आयोजन

              जळगाव दि. 29 ( जिमाका )- जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण द्वारा गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) ची सद्यस्थिती व पुर्वतयारी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 31 जानेवारी रोजी नियोजन भवन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव पार पडणार आहे.

            या कार्यशाळेत जीबीएसचा परिचय आणि साथीचे रोग या विषयावर डॉ. पराजी बाचेवार, प्राध्यापक, जनरल मेडिसिन, जीएमसी, जळगाव मार्गदर्शन करतील.  जीबीएसचे इटिओपॅथोजेनेसिस, क्लिनिकल वैशिष्ट्ये आणि प्रकार या विषयावर डॉ. गोपाळ घोलप, न्यूरोलॉजिस्ट, जीएमसी, जळगाव हे तर बालरोग लोकसंख्येमध्ये जीबीएसचे क्लिनिकल सादरीकरणे यावर डॉ. कौस्तुभ चौधरी, बालरोगतज्ञ, जीएमसी, जळगाव मार्गदर्शन करणार आहेत. 

            जीबीएसचे निदान, विभेदक निदान, मूल्यांकन आणि उपचार यावर डॉ अभिजित पिल्लई, न्यूरोलॉजिस्ट, जीएमसी, जळगाव मार्गदर्शन करणार आहेत.   जीबीएससाठी उच्च दर्जाचे उपचार या विषयावर डॉ. अमित भंगाळे, नेफ्रोलॉजिस्ट आणि सहाय्यक प्राध्यापक, जीएमसी, जळगाव व जीबीएसच्या गुंतागुंत यावर डॉ. सायली पाटील, सहाय्यक प्राध्यापक, जनरल मेडिसिन, जीएमसी, जळगाव आणि जीबीएससाठी प्रतिबंधात्मक धोरणे यावर डॉ. व्ही. व्ही. पुजारी, प्राध्यापक, श्वसन चिकित्सा, जीएमसी, जळगाव या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे वेळापत्रक तात्पुरते आहे आणि जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या सूचनांनुसार बदल होऊ शकतात. त्यासोबतच सर्व प्रेक्षकांच्या सोयीसाठी सत्र इंग्रजी आणि मराठी भाषेत वापरण्यात येणार आहे.

००००००००००

मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे व्याख्यान संपन्न




        जळगाव, दि. 29 (जिमाका) – मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात "मराठी भाषा: उगम आणि भाषा संवर्धन" या विषयावर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले.

              कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय विभागाचे कार्यालय अधिक्षक राजेंद्र कांबळे होते. विद्यार्थ्यांसह अधीक्षक, कर्मचाऱ्यांची  उपस्थिती होती.

             युवराज पाटील यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, मराठी भाषेचा उगम महाराष्ट्री प्राकृत भाषेतून झाला. भारतभर प्रचलित असलेल्या प्राकृत भाषांची लिपी ब्राम्ही होती. पुढे या लिपीचा विकास होत जाऊन देवनागरी लिपीचा उपयोग वाढला. यावेळी त्यांनी "गाथा सप्तशती" या राजा हाल यांनी संपादित केलेल्या प्राचीन ग्रंथाचा उल्लेख करत, त्यातून मराठी भाषेच्या प्राचीनतेवर प्रकाश टाकला. तसेच "विवेकसिंधू," "ज्ञानेश्वरी," "लीळाचरित्र" यांसारख्या ग्रंथांचे दाखले देऊन मराठी भाषा समृद्ध कशी झाली, याचे विवेचन केले.

            मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे तिच्या संवर्धनाला आणखी चालना मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या भविष्यासंबंधी तसेच शासनाच्या भाषा धोरणाविषयी प्रश्न विचारले. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी त्यांच्या शंका स्पष्ट करून मराठी भाषेच्या जतन आणि वृद्धीसाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले.

             कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे अधीक्षक राजेंद्र कांबळे यांनी केले. त्यांनी मराठी भाषा संवर्धन सप्ताहामागील शासनाची भूमिका आणि उद्दिष्टे स्पष्ट केली.

             कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागाच्या वतीने श्री अरुण वाणी वरिष्ठ लिपिक,श्रीमती वैशाली पाटील गृहपाल मुलींचे शासकीय वसतिगृह जळगाव,  श्री बाळू बोरसे मुलांचे शासकीय वस्तीग्रह ते हजर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जितेंद्र धनगर तालुका समन्वयक यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती वैशाली पाटील गृहपाल मुलींचे शासकीय वस्तीग्रह जळगाव यांनी केले. कार्यक्रमास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीग्रह जळगाव, गुणवंत मुलांचे शासकीय वस्तीग्रह जळगाव, तसेच मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलीचे शासकीय वस्तीग्रह जळगाव येथील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती वैशाली पाटील, श्री एस आर पाटील, श्री बाळु बोरसे, श्री दीपक सोनवणे यांनी परिश्रम घेतले

००००००००


 

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

             जळगाव दि. 29 ( जिमाका ) - वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा यांचा  जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            बुधवार, दिनांक 29 जानेवारी, 2025 रोजी रात्री 11.05 वाजता भुसावळ रेल्वे स्टेशन येथून विदर्भ एक्सप्रेस ने मुंबई (CSMT) कडे प्रयाण.

००००००००००

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा 29 जानेवारीचा जळगाव जिल्हा दौरा

             जळगाव दि. 29 ( जिमाका )- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा  जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            बुधवार, दिनांक 29 जानेवारी, 2025 रोजी सायंकाळी 06.15 वाजता मुंबई विमानतळ येथून विमानाने जळगावकडे प्रयाण. रात्री 07.35 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व खाजगी वाहनाने पाळधी कडे प्रयाण. रात्री 08.00 वाजता पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.

०००००००००

अनुसूचित जमाती प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृती / फ्रीशीप योजनेंतर्गत अटींची पुर्तता करुन 31 जानेवारी पर्यंत ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन

         जळगाव, दिनांक 29 जानेवारी (जिमाका वृत्त ):  ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करताना आधार नोंदणी न  केल्याने महाडीबीटी प्रणालीवर अर्ज नामंजूर झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे आधार प्रमाणपत्र सादर करून ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत प्रकल्प अधिकारी कार्यालयात शिष्यवृत्ती/फ्रीशीपकरिता 31 जानेवारी पर्यंतच्या मुदतीत ऑफलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत.

            तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केला होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे महाडीबीटी प्रणालीवर महाडीबीटी एडमीन कडून अर्ज नामंजूर झाले आहेत.  अशा विद्यार्थ्यांना देखील ऑफलाईन अर्ज सादर करता येणार आहे. मात्र त्यांना कोणत्या कारणांमुळे ऑनलाईन अर्ज रिजेक्ट झाला त्याची कारणमीमांसा व त्याबाबतच्या पूर्ततेसह ऑफलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना महाडीबीटीवरील नामंजूर झालेल्या अर्जांचा क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. सदर अर्ज क्रमांक  नमूद नसेल अशा अर्जांचा  शिष्यवृत्तीकरिता विचार करण्यात नाही.

               ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निकषांमध्ये बसत नसल्यामुळे (उदा. उत्पन्न मर्यादा, जात पडताळणी प्रमाणपत्र इ.) महाविद्यालय स्तरावरुन अथवा प्रकल्प अधिकारी स्तरावरुन नामंजूर झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज सादर करता येणार नाहीत.

                जे विद्यार्थी काही विशिष्ट कारणांमुळे महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरु शकले नाहीत अथवा अर्जाची नोंदणी करुनही ज्यांचे अर्ज मंजूर होऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना कारणमीमांसासह ऑफलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. तथापि, या प्रकरणी विद्यार्थ्यांनी नमूद केलेली कारणमीमांसा समर्पक असल्यास शिष्यवृत्ती देय ठरणार आहे व याबाबतचा अंतिम निर्णय शासनाचा असणार आहे. ऑफलाईन अर्ज सादर करताना महाडीबीटी प्रणालीवर लागू असलेले सर्व निकष संबंधित विद्यार्थ्यांना लागू राहतील त्याचप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे नोंदविणे आवश्यक असणार आहे. (उदा. उत्पन्न मर्यादा, जात पडताळणी प्रमाण, कॅप राऊंड प्रमाणपत्र इ.).

            ज्या अभ्यासक्रमाचे मॅपिंग त्या त्या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती / फ्रीशीपसाठी महाडीबीटी प्रणालीवर करण्यात आले आहेत. असेच अभ्यासक्रम शिष्यवृत्ती/फ्रीशीपचे ऑफलाईन अर्जाकरिता लागू राहतील. महाडीबीटी प्रणालीवर त्या त्या शैक्षणिक वर्षांत मॅपिंग न झालेल्या अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती/फ्रीशीपच्या ऑफलाईन पध्दतीने सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच एकाच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर होणार नाहीत याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे.  याप्रकरणी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचे प्रतिज्ञापत्र संबंधित विद्यार्थ्यांने द्यावे. या प्रकरणी दोन्ही प्रकारात विद्यार्थ्यांने अर्ज सादर केलेला असल्याची बाब निष्पण्ण झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

              सन 2018-19 ते 2023-24 या वर्षात ज्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर नोंदणीकृत अर्जांची मंजूरी करण्यास अडचणी आल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहेत.  शिष्यवृत्ती देण्यामागे केवळ होतकरु व गुणवंत विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये असा मुख्य उद्देश असल्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत प्रकल्प अधिकारी कार्यालयास शिष्यवृत्ती/फ्रीशीपकरिता ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 31 जानेवारी 2025 असेल.

         दिनांक 31 जानेवारी 2025 नंतर येणाऱ्या कोणत्याही अर्जांना शासनाकडून मंजूरी देण्यात येणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी व अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल जि. जळगांव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहे.

                यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परीसर, जी. एस. ग्राऊंड शेजारी, जळगाव येथे संपर्क साधावा.

0000000000

नर्सिंग GNM, ANM पात्रता धारकांना इस्राईलमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी; उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, दिनांक 29 जानेवारी (जिमाका वृत्त ): कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यत्ता विभागांतर्गत जिल्ह्यातील युवक युवतींना इस्राईल मधील नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहाय्यक (होम बेस केअर गिव्हर) या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जास्तीत जास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी http://maharashtrainternational.com/job.aspx या अधिकृत संकेतस्थळावर आपली माहिती भरावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगावचे सहायक आयुक्त  संदीप ज्ञा. गायकवाड यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

               २५ ते ४५ वर्षे वयोगटातील इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणारे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरणार आहेत. उमेदवारांकडे घरगुती सहाय्यक सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र (ऑन जॉब ट्रेनिंग सह) असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवाइफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण, जीडीए/एएनएम/जीएनएम/बीएससी नर्सिंग / पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

                 इस्राईल मध्ये नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नियुक्तीचे वाटप, आरोग्य तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन व मदत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून केली जाणार आहे. मेडिकल विमा, राहण्याची आणि जेवणाची सोयही करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना १ लाख ३१ हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.

0000000000

जिल्हाधिकारी कार्यालयात 3 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

         जळगाव, दिनांक 29 जानेवारी (जिमाका वृत्त ): दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक  3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली आहे.

           तरी नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनांक अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळालेले नसेल अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन 3 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

0000000000

Tuesday, 28 January 2025

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ताण- तणाव निवारणासाठी ऑनलाईन समुपदेशक उपलब्ध ; विभागाने त्यांचे संपर्क क्रमांक केले जारी

         जळगाव, दि. 28 (जिमाका) -  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा येत्या फेब्रुवारी व  मार्च महिन्यात सुरु होणार आहेत. या परिक्षेच्या कालावधीत परीक्षेचा व अभ्यासाचा ताण आणि परीक्षेची भिती यामुळे विद्यार्थी दडपणाखाली येवून नकारात्मक विचार करतात व कधी-कधी टोकाची भुमिका घेतात.

              विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे व त्यांनी निकोप वातावरणात परीक्षा द्यावी म्हणून विभागीय मंडळ स्तरावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येत असते. विद्यार्थ्यांच्या ताण-तणाव विषयक समस्यांचे शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यार्थी व पालक यांना यथायोग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी व ताण-तणावामुळे विद्यार्थ्यांनी टोकाची भुमिका घेवू नये यासाठी समुपदेशनासाठी व अनिष्ट घटना टाळण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर खालील समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            ज्या विद्यार्थी / पालकांना काही ताण-तणाव / समस्या असल्यास त्यांनी समुपदेशकांकडे ताण-तणाव/समस्या मांडल्यास त्यांना समुपदेशकांमार्फत योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे. नियुक्ती करण्यात आलेल्या समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहे.

नाशिक

श्री. किरण रामगीर बावा ९४२३१८४१४१

श्री. अरूण बंडू जायभावे ९६५७५०१७७३

धुळे

श्री. नंदकिशोर उध्दवराव बागुल ९४२०८५२५३१

श्री. लक्ष्मीकांत बापुराव २ पाटील ८६९८०१२७७७

जळगाव

 श्री. दयानंद रघुनाथ महाजन ७७६८०८२१०५, ९३७०६१४९५९

 श्री.किरण प्रकाश सनेर ९०२८९१०७८५, ९५४५०२५४५०

नंदुरबार

श्री. राजेंद्र सुकदेव माळी ९४०४७४९८००

श्री.अशोकभटामहाले ९४२१६१८१३                                                                                                                                                                                  

       ही सुविधा दिनांक ११ फेब्रुवारी ते १८ मार्च पर्यंत सुरू राहणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव एम.एस. देसले यांनी दिली आहे.

000000000