Tuesday, 29 April 2025

"आपला सहायक" सेवा आता WhatsApp वर उपलब्ध; सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जळगाव यांचा अभिनव उपक्रम

             जळगाव दि. 29 ( जिमाका वृत्तसेवा ):  नागरिकांना विविध सेवा सुलभ, पारदर्शक व त्वरित मिळाव्यात यासाठी समाज कल्याण विभाग, जळगाव यांनी नवा उपक्रम हाती घेतला आहे. सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण) योगेश पाटील यांच्या पुढाकाराने "आपला सहायक" ही सेवा आता WhatsApp वर सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या सेवेचे लोकार्पण करण्यात आले.

              नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, ही सेवा नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर बनवण्यात आली असून, WhatsApp च्या माध्यमातून विविध शासकीय सेवा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. नागरिक खालील सुविधा सहज घेऊ शकतात.

            "आपला सहायक " सेवा 9423184767 या WhatsApp क्रमांकावर उपलब्ध आहे. ही सेवा २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस कार्यरत राहणार असून, नागरिकांच्या कामकाजात गती व पारदर्शकता आणण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.

00000000000

जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे १ मे रोजी उद्घाटन

         जळगाव दि. 29 ( जिमाका वृत्तसेवा ): – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयचा शुभारंभ १ मे २०२५ रोजी सकाळी १०.१५ वाजता करण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

             जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सामाजिक न्याय भवन, वित्त व महा मंडळ येथून कार्यान्वित होणार असून दिव्यांग व्यक्तींना एकत्रित सेवा-सुविधा उपलब्ध होणार आहेत. जिल्हास्तरीय कार्यालये स्वतंत्रपणे सुरु करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागातील कार्यरत वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता यांच्याकडे त्यांच्या पदाचा कार्यभार सांभाळून "जिल्हा दिव्याग सक्षमीकरण अधिकारी" या पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरत्या स्वरुपात दिव्यांग कल्याण विभागाच्या दि. 15 एप्रिल, 2025 च्या कार्यालयीन आदेशान्वये सोपविण्यात आला आहे. त्यानुसार जळगाव जिल्हयाकरीता समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, दिव्यांग कल्याण विभागातील कार्यरत वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता माधुरी भागवत यांच्याकडे "जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी" या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. १०० दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले असून, दिव्यांग व्यक्तींसाठी उपयुक्त निर्णय आणि सेवा एका ठिकाणी उपलब्ध होतील.

              या कार्यालयाच्या स्थापनेमुळे दिव्यांग व्यक्तींसाठी शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य, पुनर्वसन व अन्य सवलतींचा लाभ अधिक सुलभपणे मिळणार आहे. विविध शासकीय यंत्रणा आणि समाजकल्याण विभागाच्या समन्वयातून दिव्यांगांसाठी आवश्यक सेवा सुलभ केल्या जाणार आहेत.

                                                                             0000000000

महाबीजचा ४९ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न; सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण!

             जळगाव दि. 29 ( जिमाका वृत्तसेवा ):  महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला (महाबीज) ने सोमवार, २८ एप्रिल, २०२५ रोजी आपला ४९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. महाबीज मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमात महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या वाटचालीचा जल्लोष करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर होते.

            या विशेष कार्यक्रमाला अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह (भा.पो.से.) आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख आणि बीज प्रमाणीकरण यंत्रणा, अकोलाचे संचालक डॉ. अंकुशराव माने यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

                   कार्यक्रमाची सुरुवात महाबीज मुख्यालयात वृक्षारोपण करून झाली. यानंतर मागील दोन वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणारे बिजोत्पादक, शेतकरी, महाबीज विक्रेते आणि महाबीजचे अधिकारी-कर्मचारी यांना ‘महाबीज गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाव्यवस्थापक डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी महाबीजच्या ४९ वर्षांच्या प्रवासातील कर्मचाऱ्यांच्या तीन पिढ्यांचा संगम आणि भविष्यातील वाटचाल यावर विस्तृत माहिती दिली. महाबीजचे संचालक डॉ. रणजीत सपकाळ यांनी सोयाबीन पिकाला पर्याय शोधण्याची आणि संत्रा व इतर फळपिकांच्या संशोधनावर लक्ष केंद्रित करून नवीन वाण विकसित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ संचालक वल्लभराव देशमुख यांनी महाबीजच्या स्थापनेपासूनचा इतिहास सांगून चिया सीड्स, हळद आणि राजमा या पिकांचे वाण उपलब्ध करण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगितले आणि ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची आशा व्यक्त केली.

                         बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे संचालक डॉ. अंकुशराव माने यांनी बीज प्रमाणीकरणामध्ये महाबीज अधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल प्रशंसा केली. त्यांनी ‘साथी’ पोर्टलची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगितले. संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी विद्यापीठांचा महाबीजसोबतचा दीर्घ सहवास आणि हवामानाला अनुकूल वाणांचे संशोधन करून शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढवता येईल यावर विचार व्यक्त केले. त्यांनी जैविक खतांचा वापर करून जमिनीचे आरोग्य सुधारण्याची गरज असल्याचेही सांगितले.

                जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी महाबीजने आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी वाजवी दरात गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून दिले, ही कौतुकास्पद बाब असल्याचे म्हटले. बियाणे वाटप करताना कोणतीही अडचण आल्यास पोलीस विभागाकडून पूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

               अध्यक्षीय भाषणात व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांनी महाबीजला लाभलेल्या मागील अध्यक्षांचे आणि व्यवस्थापकीय संचालकांचे स्मरण केले. त्यांनी १९८० ते १९८४ या काळात तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक विश्वासराव धूमाळ यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे महाबीजचे कार्य राज्यभर विस्तारले, असे सांगितले. सुवर्ण महोत्सव विशेषांकासाठी परिश्रम घेणाऱ्या टीमचे कौतुक करत त्यांनी पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महाबीज आणि शेतकऱ्यांसाठी वर्षभर सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे कार्यक्रम आयोजित केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर बळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन जितेंद्र सरोदे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

00000000000

जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नागरिकांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ चा लाभ घेण्याचे आवाहन

             जळगाव दि. 29 ( जिमाका वृत्तसेवा ): महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे दिल्या जाणा-या सेवा पारदर्शक व कालबध्द पध्दतीने देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ पारित करण्यात आलेल्या एकूण ०१ ते ११५ सेवांबाबत नागरिकांना माहिती होवून सर्व सेवानुसार कामकाज करणे सोयीचे व वेळेत पूर्ण करण्यात व्हावे याकरीता सेवांचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी केले आहे.

000000000000

महाबीजचा ४९ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न; सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण!

         जळगाव दि. 29 ( जिमाका वृत्तसेवा ): : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला (महाबीज) ने सोमवार, २८ एप्रिल, २०२५ रोजी आपला ४९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. महाबीज मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमात महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या वाटचालीचा जल्लोष करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर होते.

            या विशेष कार्यक्रमाला अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह (भा.पो.से.) आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख आणि बीज प्रमाणीकरण यंत्रणा, अकोलाचे संचालक डॉ. अंकुशराव माने यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

                   कार्यक्रमाची सुरुवात महाबीज मुख्यालयात वृक्षारोपण करून झाली. यानंतर मागील दोन वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणारे बिजोत्पादक, शेतकरी, महाबीज विक्रेते आणि महाबीजचे अधिकारी-कर्मचारी यांना ‘महाबीज गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाव्यवस्थापक डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी महाबीजच्या ४९ वर्षांच्या प्रवासातील कर्मचाऱ्यांच्या तीन पिढ्यांचा संगम आणि भविष्यातील वाटचाल यावर विस्तृत माहिती दिली. महाबीजचे संचालक डॉ. रणजीत सपकाळ यांनी सोयाबीन पिकाला पर्याय शोधण्याची आणि संत्रा व इतर फळपिकांच्या संशोधनावर लक्ष केंद्रित करून नवीन वाण विकसित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ संचालक वल्लभराव देशमुख यांनी महाबीजच्या स्थापनेपासूनचा इतिहास सांगून चिया सीड्स, हळद आणि राजमा या पिकांचे वाण उपलब्ध करण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगितले आणि ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची आशा व्यक्त केली.

                         बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे संचालक डॉ. अंकुशराव माने यांनी बीज प्रमाणीकरणामध्ये महाबीज अधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल प्रशंसा केली. त्यांनी ‘साथी’ पोर्टलची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगितले. संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी विद्यापीठांचा महाबीजसोबतचा दीर्घ सहवास आणि हवामानाला अनुकूल वाणांचे संशोधन करून शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढवता येईल यावर विचार व्यक्त केले. त्यांनी जैविक खतांचा वापर करून जमिनीचे आरोग्य सुधारण्याची गरज असल्याचेही सांगितले.

                जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी महाबीजने आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी वाजवी दरात गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून दिले, ही कौतुकास्पद बाब असल्याचे म्हटले. बियाणे वाटप करताना कोणतीही अडचण आल्यास पोलीस विभागाकडून पूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

               अध्यक्षीय भाषणात व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांनी महाबीजला लाभलेल्या मागील अध्यक्षांचे आणि व्यवस्थापकीय संचालकांचे स्मरण केले. त्यांनी १९८० ते १९८४ या काळात तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक विश्वासराव धूमाळ यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे महाबीजचे कार्य राज्यभर विस्तारले, असे सांगितले. सुवर्ण महोत्सव विशेषांकासाठी परिश्रम घेणाऱ्या टीमचे कौतुक करत त्यांनी पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महाबीज आणि शेतकऱ्यांसाठी वर्षभर सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे कार्यक्रम आयोजित केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर बळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन जितेंद्र सरोदे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

00000000000

Monday, 28 April 2025

शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो विभाग त्यांच्या सेवा ऑनलाईन करणार नाहीत त्यांना दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपयांचा दंड आकारणार

 मुंबई,दि.28:  - महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. १५ ऑगस्ट पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करा.शासनाचा विभाग १५ ऑगस्टपर्यंत   जो विभाग त्यांच्या सेवा ऑनलाईन करणार नाहीत त्या विभागाला दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपयांचा दंड  आकारला जाईल. शासनाकडून कोणत्या सेवा नागरिकांना दिल्या जातात याची शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना या विषयाबाबत माहिती व्हावी यासाठी या अधिनियमाचा अभ्यासात समावेश करण्यासाठी कार्यवाही करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केल्या.

                 सह्याद्री अतिथीगृह येथे सामान्य प्रशासन विभाग (प्रशासकीय नावीन्यता, उत्कृष्टता व सुशासन) व महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची "दशकपूर्ती" आणि "प्रथम सेवा हक्क दिन निमित्त राज्यस्तरीय  सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव,ब्रँड अँबेसिडर पद्मश्री शंकर महादेवन, सोनाली कुलकर्णी, माजी राज्य सेवा हक्क मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रीय,राज्य सेवा हक्क कोकणचे आयुक्त बलदेव सिंह, पुणेचे राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यासह प्रशासनातील ज्येष्ठ  वरिष्ठ सनदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत सध्या हजार पेक्षा जास्त सेवा या कायद्याच्या अंतर्गत अधिसूचित केल्या  आहेत. जवळपास ५८३ सेवा ऑनलाइन दिलेल्या आहेत. अजून 300 सेवा या ऑनलाइन  आणायच्या आहेत तर  125 सेवा ऑनलाइन आहेत पण त्या कॉमन पोर्टलवर उपलब्ध नाहीत आणि म्हणून शासनाच्या सर्व विभागांना 15 ऑगस्ट पर्यंत सर्व सेवा ऑनलाईन करा.१५ ऑगस्ट पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करा.जो शासनाचा विभाग १५ ऑगस्ट पर्यंत झाली नाही त्या विभागातील प्रत्येक सेवेकरिता दर दिवशी प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड  आकारला जाईल असेही ते म्हणाले.

      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूलभूत अधिकार आपल्या संविधानात समाविष्ट केले  हे मूलभूत अधिकार अधिकार सर्वांना मिळाले पाहिजेत.गेल्या दहा वर्षात तंत्रज्ञानाच्या गतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आहे आणि म्हणून या  सेवा अधिक गतिमान पद्धतीने करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.मंत्रालयात चेहरा पडताळणी ॲपमुळे देखील निम्मी गर्दी कमी झाली आहे. जीवनामध्ये इज ऑफ लिविंग आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.शासनाची सर्व सेवा व्हॉटसॲप वर तसेच सर्व माहिती संकेतस्थळावरती उपलब्ध झाल्यास अनेक तक्रारी कमी होवून लोकांचे जीवनमान सुसह्य होईल असेही ते म्हणाले.

             लोकसेवा हा केवळ कायदा नाही तर ती एक उदात्त भावना : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

     उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकशाहीत लोकांसाठी कर्तव्य भावनेने काम करायचे असते. लोकसेवा हा केवळ कायदा नाही तर ती एक उदात्त भावना आहे असं आपण म्हणतो या वाक्याला लोकसेवा हक्क आयोगाने खरा अर्थ मिळवून दिला आहे.हा कायदा म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीची गंगोत्री आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम वर्धा,यवतमाळ आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी  यांनी त्यांच्या जिल्ह्यात राबवले त्यांचा आताच सत्कार करण्यात आला.अशाच प्रकारे इतर जिल्ह्यातही काम केले जावे.खर तर जिथे समाजाला त्यांचे सर्व हक्क आणि अधिकार त्यांना सेवा दिल्या जातात तिथे प्रगती अटळ असते.हा कायदा  प्रशासन व नागरिकांमधला विश्वासाचा एक पूल आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून सर्वसामान्य जनतेच्या सक्षमीकरणाचा  हा पाया अधिक मजबूत होईल आणि या अधिनियमच्या माध्यमातून लोकांना तात्काळ सेवा मिळतील असेही ते म्हणाले.

       महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमच्या माध्यमातून अधिक सेवा देणार : मुख्य सचिव सुजाता सौनिक

      मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्याकी,अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला ऑनलाईन सेवा देण्यासाठी आयोग नक्कीच प्रभावी अंमलबजावणी करेल. मायक्रोसॉफ्ट सोबत देखील आपण यासाठी करार केला आहे.महाराष्ट्र डिजिटल गव्हर्नन्स मध्ये देशासाठी एक आदर्श मॉडेल ठरेल असेही त्या म्हणाल्या.

यावेळी वर्ध्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा सेवादूत प्रकल्पाची सुरुवात केल्याबद्दल,यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी अभिप्राय कक्ष सुरू केल्याबद्दल कोल्हापूर चे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प सुरू केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमचे ब्रँड अँबेसिडर म्हणून पद्मश्री शंकर महादेवन, सोनाली कुलकर्णी यांना यावेळी घोषित करण्यात आले.

यावेळी राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी आयोगाची गेल्या दहा वर्षातील वाटचालीचा आढावा घेतला.या कायद्याच्या जनजागृतीसाटी आयोग नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार असून भविष्यात आयोगाने हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी दिली. पुणेचे राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी आभार मानले.

                                    0000000000000

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा 28 ते 1 मे पर्यंतचा जळगाव जिल्हा दौरा

             जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा ):- केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा दिनांक 28 एप्रिल  ते  1 मे 2025 दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा खालील प्रमाणे-

                     सोमवार, दिनांक 28 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 06.45  वाजता  छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून मोटारीने मुक्ताईनगरकडे रवाना. 09.45 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.

                     मंगळवार, दिनांक 29 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 01 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासस्थानी शासकीय काम. दुपारी 2 ते 4वाजेपर्यंत राखीव. संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासस्थानी स्थानिक लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी बैठक. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.

               बुधवार , दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासस्थानी स्थानिक लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी बैठक. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत राखीव. संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासस्थानी शासकीय काम. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.

               गुरुवार, दिनांक 01 मे 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 02 वाजेपर्यंत राखीव. संध्याकाळी 4 वाजता मुक्ताईनगर येथून येथून मोटारीन छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान. रात्री 07.30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे आगमन.

००००००००००

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत १८ कोटींहून अधिक रकमेचे विद्यावेतन वितरित

 जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा ): मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण (CMYKPY) योजनेंतर्गत १८ कोटी ८८ लाख ७३ हजार ९६६ रुपयांचे विद्यावेतन वितरित करण्यात आले आहे. या योजनेत एकूण ४,९६५ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला असून २१३ आस्थापनांचा समावेश आहे.

योजनेत ऑगस्ट ते डिसेंबर या महिन्यादरम्यान वितरित करण्यात आलेल्या विद्यावेतनाची माहिती खालीलप्रमाणे आहे:

 * ऑगस्ट: ४०६ प्रशिक्षणार्थ्यांना १२,२६,०६४.१२ रुपये.

 * सप्टेंबर: ४०३० प्रशिक्षणार्थ्यांना २,२८,१३,४००.५८ रुपये.

 * ऑक्टोबर: ४५११ प्रशिक्षणार्थ्यांना ७,०७,८०६.४३ रुपये.

 * नोव्हेंबर: ४४२२ प्रशिक्षणार्थ्यांना ४,०९,३४४,००.१ रुपये.

 * डिसेंबर: ४३४१ प्रशिक्षणार्थ्यांना ३,९९,०७,६७७.९३ रुपये.

या योजनेमुळे राज्यातील युवकांना प्रशिक्षण मिळण्यास आणि त्यांच्या कौशल्य विकासास मदत होत आहे.

००००००००००

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा – २०२५

             जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा ) महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुब्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे. परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तेव्हा इच्छुक उमेदवारांनी सदर संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन आयुक्ता अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

      
                                                                                  ००००००००

जागतिक मधमाशी दिनानिमित्त मधु मित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा ) - जागतिक मधमाशी दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळकडुन लाभ घेतलेल्या यशस्वी मधुपालक/उद्योजक यांना मधु मित्र पुरस्कार देवुन गौरविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून लाभ घेतलेल्या यशस्वी मधुपालक / उद्योजक यांच्याकडुन दिनांक. ०२ मे २०२५ पर्यंत २ प्रतित अर्ज व फोटो सहित अर्ज मागविण्यात येत आहे.

                        महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुख्य कार्यालय, मुंबई यांचे वतिने मंडळाचे सभापती यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाचे मध संचालनालय, शासकिय बंगला नं. ५, मु. पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा येथे २० मे २०२५ रोजी जागतिक मधमाशी दिनानिमित्त यशस्वी मधुपालक यांना मधु मित्र पुरस्कार देवुन गौरविण्यांत येणार आहेत. तरी यशस्वी मधुपालक यांनी विहित नमुन्यातील अर्ज हा जिल्हा कार्यालय, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत स. ११ ते ५ वाजेपर्यंत मिळतील. अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र एल. चव्हाण यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

००००००००

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात 7 अर्ज प्राप्त

         जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा ) - समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी / अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी राबविण्यात येतो.

           त्यानुषंगाने जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन दिनांक २१ एप्रिल २०२५ सोमवार रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या लोकशाही दिनात सात अर्जदारांचे अर्ज प्राप्त झालेले असून, त्यापैकी 5 अर्ज हे उपनिबंधक कार्यालयाचे, । अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय व 1 अर्ज संजय गांधी योजना यांच्या कार्यालयाचे होते. हे अर्ज संबधित कार्यालयाकडे कार्यवाही करण्याकरिता पाठविण्यात आले आहे.

००००००००००

Thursday, 24 April 2025

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन; अंतिम तारीख ३१ जुलै २०२५

              जळगाव दि. 24 ( जिमाका ) - केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे दिला जाणारा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.  5 वर्षापेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या शिक्षण, कला, सांस्कृतीक कार्य, खेळ नाविन्यपुर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.

           या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार ३१ जुलै २०२५ पर्यंत https://awards.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

             ज्या मुलांचे वय 5 वर्षापेक्षा अधिक व 31 जुलै 2025 रोजी 18 वर्षापेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतीक, कार्य खेळ नाविन्यपुर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेली आहे त्यांचे प्रस्ताव या संकेतस्थळावर स्वतः मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज दिनांक 01 एप्रिल 2025 पासून ते दिनांक 31 जुलै 2025 पर्यंत स्विकारण्यात येणार आहे.

          जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी जिल्ह्यातील अशा प्रकारच्या जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे.

                                                                  ००००००००००

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे २८ एप्रिल रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

              जळगाव दि. 24 ( जिमाका )-  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने 100 दिवसाचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय जळगाव या कार्यालयाशी संबधित असलेल्या नागरीकांच्या  अडीअडचणी, प्रश्न, समस्या इत्यादी जाणून घेवून त्यांचे नियमानुसार निराकरण करण्यासाठी २८ एप्रिल 2025 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

                सहायक आयुक्त, समाज कल्याण जळगाव, डॉ. बाबासाहेव आंबेडकर सामाजिक न्याय भवन मायादेवी मंदौरा समोर महाबळ रोड जळगाव येथे  सकाळी ११.०० ते दु.१.०० या वेळेत लोकशाही दिन आयोजित करण्यात आलेला आहे.  अशी माहिती योगेश साटील सहायक आयुक्त, समाज कल्याण जळगाव यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.

00000000000

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा 24 एप्रिल रोजीचा जळगाव जिल्हा दौरा

              जळगाव दि. 24 ( जिमाका ) - राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

         गुरूवार, दिनांक 24 एप्रिल, 2025, रात्री 08.40 जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन. रात्री 08.50 वाजता जळगाव येथून शासकीय वाहनाने धरणगाव जि. जळगाव कडे प्रयाण. रात्री 09.20 वाजता पाळधी ता. धरणगांव जि. जळगांव येथे आगमन व राखीव.

0000000000

 

जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात CPF प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

             जळगाव, दि. 24(जिमका)- जळगाव येथील महिला व बाल रुग्णालय मोहाडी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय हृदय व फुफ्फुसाचे पुनर्जीवन (CPF)  कौशल्यचे प्रशिक्षण शिबिर  यशस्वीरित्या पार पडले. वाढत्या हृदयविकाराच्या घटना आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना त्वरित वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

                    या शिबिरात रुग्णालयातील डॉक्टर आणि तज्ञांच्या टीमने कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित प्रथमोपचार कसा करावा (सीपीआर - कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) आणि Hands-on CPR देण्याची प्रात्यक्षिक माहिती दिली. अचानक हृदयविकार, बुडणे, गुदमरल्यामुळे, विजेचा धक्का, औषधांचा अतीवापर यामुळे झालेल्या दुष्परिणामा करिता CPR दिले जाते.  प्रशिक्षणामध्ये कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन या महत्वाच्या वैद्यकीय प्रक्रियेचे प्रशिक्षण घेतले.

                या प्रशिक्षण शिबिरात डॉ. व्ही. आर. पाटील, डॉ. एम. डी. शिरसाठ, डॉ. किशोर इंगळे, डॉ. अविनाश पाटील, डॉ. प्रशांत इंगळे, डॉ. सुनील पाटील, डॉ. महेंद्र राजपूत, डॉ. धीरज जाधव, डॉ. संदीप पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, सिस्टर इंचार्ज, तसेच सीपीआरमधील परिचारिका, वॉर्ड बॉय आणि इतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

                 वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण बळीराम सोनवणे यांनी सर्व प्रशिक्षक प्रशिक्षणार्थी यांचे आभार मानले. ISA व ISCCM ह्या संस्थांनी यात पुढाकार घेऊन आम्हाला डमी बाहुला (mannequin) ची उपलब्धता करून दिली व प्रशिक्षण वर्ग उपलब्धते बाबत देखील डॉ. किरण बळीराम सोनवणे यांनी आभार मानले.

0000000000

Wednesday, 23 April 2025

पहलगाम हल्ला: मृत पर्यटकांच्या नातेवाईकांशी, अडकलेल्या पर्यटकांसाठी आणि राज्य प्रशासनाशी महाराष्ट्र सदन सतत संपर्कात

         नवी दिल्ली, 23 : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सहा महाराष्ट्रीयन पर्यटकांच्या पार्थिवांची सुखरूप व्यवस्था आणि जखमींच्या मदतीसाठी, महाराष्ट्र सदन सक्रियपणे कार्यरत आहे. जम्मू-कश्मीर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतांपैकी चार पार्थिव मुंबईला, तर दोन पार्थिव पुण्याला दिल्लीमार्गे पाठवण्यात येणार आहेत. पार्थिवांबरोबर असलेल्या नातेवाईकांशी महाराष्ट्र सदन येथील राजशिष्टाचार विभागातील अधिकारी सतत संपर्कात आहेत.

            या हल्ल्यात जखमी झालेले चार पर्यटक सुखरूप असून, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे. तसेच, जम्मू-कश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या इतर पर्यटकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 308 पर्यटकांशी संपर्क साधला गेला आहे. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून या पर्यटकांच्या निवास आणि पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात येत आहे.

             महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, सर्वोतोपरी मदत आणि समन्वयासाठी कटिबद्ध असल्याचे  सांगितले आहे.

000000000

 

समूह विकास कार्यक्रमांतर्गत अंमलबजावणी यंत्रणा निवडीसाठी निविदा सादर करण्याचे आवाहन

             जळगाव, दि. 23(जिमका)-   राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या मार्गदर्शनाखाली Multi-commodity high value cluster आणि Peri-urban vegetable cluster करीता अंमलबजावणी यंत्रणा (IA) निवडण्यासाठी इच्छुक संस्थांकडून Expression of Interest (EOI) मागविण्यात येत आहेत.

            फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम 2021 पासून प्रायोगिक तत्वावर सुरु असून, 2025 च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार Multi-commodity high value clusters आणि Peri-urban Vegetable clusters या दोन नवीन संकल्पनांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा उद्देश प्रमुख शहरांजवळ भाजीपाला उत्पादनासाठी क्लस्टर्स विकसित करणे, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था आणि नवउद्योजक संस्था यांना भाजीपाला संकलन, साठवणूक आणि विपणन वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे, तसेच देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठेत स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी कृषी मूल्य साखळीतील अडचणी दूर करणे, पायाभूत सुविधांचा विकास करणे हा आहे.

            पात्र लाभार्थी: शेतकरी उत्पादक संघटना (FPOs/FPCs) आणि त्यांच्या फेडरेशन, सहकारी संस्था/सोसायट्या, भागीदारी संस्था, कंपन्या किंवा त्यांचे संयोजन असलेल्या कायदेशीर संस्था अंमलबजावणी संस्था (IAs) म्हणून पात्र असतील.

            Multi-commodity high value clusters: यात पूर्व उत्पादन आणि उत्पादन, कापणीनंतरचे व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन, लॉजिस्टिक्स, मार्केटिंग आणि ब्रँडिंग असे तीन व्हर्टीकल असतील. क्लस्टरमध्ये प्रमुख फलोत्पादन पीक असणे आवश्यक आहे.

            निवडीचे निकष: क्लस्टरचा समावेश असलेली जमीन ही शक्य तितक्या प्रमाणात सलग असावी. जर जमीन क्षेत्र संलग्न नसेल तर कमाल दोन ठिकाणांमधील अंतर डोंगराळ भागात असल्यास 50 किमी आणि सर्वसाधारण भागात असल्यास 80 किमी पेक्षा जास्त नसावे. किमान वार्षिक Farm gate Value = 100.00 कोटी

            Peri-urban Vegetable clusters: यात पेरी-अर्बन उत्पादन आणि काढणीपश्चात व्यवस्थापन आणि वितरण असे दोन व्हर्टीकल असतील. टोमॅटो, कांदा, बटाटा आणि इतर भाजीपाला पिके यात समाविष्ट असतील.

            यात विहित वेळेत अंमलबजावणी पूर्ण केल्यास 5% अतिरिक्त निधी प्रोत्साहन म्हणून दिला जाणार आहे. बांधकाम खर्चाची मर्यादा प्रकल्प खर्चाच्या 30% पेक्षा जास्त नसावी.

                    इच्छुक अर्जदारांनी सविस्तर माहिती आणि पात्रता निकषांसाठी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या https://nhb.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरावा. पहिला टप्पा 15 मे 2025 पर्यंत

असणार आहे.

           या संदर्भात Pre-bid conference / stake holders consultation  मीटिंग दिनांक 06 मे 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, प्लॉट नं. 85, सेक्टर -18, गुरूग्राम येथे ऑनलाईन व हायब्रीड पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. अडचणी असल्यास दिनांक 02 मे 2025 पर्यंत clusters.nhb@gov.in या ईमेलवर कळवाव्यात. अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करण्यास इच्छुक अर्जदारांनी https://www.nhb.gov.in/OnlineApplication/Online_Registration_Intermediate_Page.aspx या वेबसाईटवर अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी https://nhb.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक डॉ. के.पी. मोते यांनी दिली आहे.

0000000000

कृषी निविष्ठांच्या उपलब्धता तक्रार निवारणासाठी कक्ष स्थापन

             जळगाव, दि. 23(जिमका)-  खरीप हंगाम २०२४ मध्ये बियाणे, खते, कीटकनाशके निविष्ठा उपलब्धता व निविष्ठांच्या गुणवत्ता बाबत तक्रारींचे निराकरण करण्याकरिता शेतकऱ्यांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी यांची रजिस्टर मध्ये नोंद घेण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील किंवा तालुक्यातील कृषी संबंधित समस्यांसाठी योग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे अधिक सोपे होणार आहे.

           जिल्हा परिषदेने याबाबत माहिती सार्वजनिक केली आहे. यामध्ये तालुका कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी), सहाय्यक कृषी अधिकारी आणि मोहळ अधिकाऱ्यांची नावे, पद आणि संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. जळगाव जिल्हा परिषद येथे विजय दत्तू पवार (९४२३४८२२७४), मोहीम अधिकारी आणि  राहुल अनिल महाजन (९६०४८४९४४४), कृषि अधिकारी, अभिमान किशोर माळी (९४२२२३५८१३) हे जिल्हा कृषि अधिकारी (सा.) म्हणून कार्यरत आहेत.

          पंचायत समिती, जळगाव येथे धीरज कडू बढे (९६२३३५३८५०), विस्तार अधिकारी (कृषि) आणि सुनील दांडगे (८८०६०३५१७४), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, भुसावळ येथे कपिल सुरवाडे (९९६०३५१९७५), विस्तार अधिकारी (कृषि) आणि ज्ञानेश्वर जयंकर (९७६५२८२८३६), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, यावल येथे धीरज कडू बढे (९६२३३५३८५०), विस्तार अधिकारी (कृषि) आणि गोकुळ तुकाराम सोनवणे (९१७२३८९४९९), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, रावेर येथे लक्ष्मण पाटील (८८३०२३३७०५), कृषि अधिकारी आणि  भूषण पाटील (७२१८९१९२४८), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, मुक्ताईनगर येथे संजोग भारती (९५२७१५२७५४), विस्तार अधिकारी (कृषि) आणि हिरालाल वाघ (८८३०३७३८८५), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, बोदवड येथे प्रदीप धांडे (९४२३७७०६०६), कृषि अधिकारी कार्यरत आहेत. पंचायत समिती, पाचोरा येथे मारोती भालेराव (७५८८०५२१००), कृषि अधिकारी आणि गिरीश कोकणी (९८५०७२७०३५), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, भडगाव येथे ईश्वर देशमुख (७५८८५७९६७०), विस्तार अधिकारी (कृषि) आणि दीपक निकुंभ (९४२२२३२११८), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहे. पंचायत समिती, चाळीसगाव येथे प्रदीप महाजन (९३०७४०७०४०), कृषि अधिकारी आणि गौरव पोखरणा (९८८१६८१३३१), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, जामनेर येथे राजु ढेपले (९४०३८०६६७६) कृषि अधिकारी व जयेश शिरसाठ (७०२००६९१५९), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत

                 अमळनेर येथे देवेंद्र ठाकूर (८६६८२६३९९२), कृषि अधिकारी व अमोल भदाणे (८६९८३५८९६८), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, चोपडा येथे किरण उत्तम पाटील (९४२३४५२२६०), विस्तार अधिकारी (कृषि) व प्रदीप जगन्नाथ अहिरे (९४२०३२५२४२), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, पारोळा येथे दिनेश प्रकाश कोते (९४२१७५०८१५), विस्तार अधिकारी (कृषि) व संदीप सुपडू पाटील (७५८८८१५८४२), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत.  पंचायत समिती, एरंडोल येथे भारत शामराव मोरे (८२०८२४८००५), कृषि अधिकारी व रूपचंद कौतिक पटाईत (८४०८८२०८४४), विस्तार अधिकारी (कृषि)  कार्यरत आहेत. पंचायत समिती, धरणगाव येथे सुनिल प्रभाकर मोरे (९४२०२१४९५६), कृषि अधिकारी तसेच  योगेंद्र अहिरे (७५८८६८६२१०), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. 

          या संपर्क माहितीमुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळवणे, कृषी मार्गदर्शन घेणे, तसेच पिकांवरील रोग व किडींच्या नियंत्रणासाठी योग्य सल्ला मिळवणे शक्य होणार आहे.

              तक्रार निवारण कक्ष हे खरीप हंगाम २०२४ साठी दिनांक १५ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत व रब्बी हंगामासाठी १५ सप्टेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीसाठी सकाळी १०.०० ते सायंकाळी ०७.०० पर्यंत कार्यरत राहणार आहे. संपर्क यादी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात तसेच संबंधित पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध आहे.

00000000000

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी 'राज्य आपत्ती व्यवस्थापन'च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन संपर्क क्रमांक:- 022-22027990

         मुंबई, दि. 23 : पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि  त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे.

            या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24x7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई येथे आज आणण्यात येणार आहेत. आज दुपारी श्रीनगर येथून महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील मृतदेह विमानाने मुंबई विमानतळावर येणार आहेत. तेथून हे मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत. यासाठीची सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आणि राज्यातील त्यांचे नातेवाईक यांनी मदतीसाठी 022-22027990 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे.

काश्मीरमधील संपर्क क्रमांक:

            श्रीनगर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना आपत्कालिन परिस्थिती संपर्क साधता यावा यासाठी श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात २४x७ मदत कक्ष / आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

१) दूरध्वनी : 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543

२) व्हॉट्सअॅप : 7006058623, 7780805144, 7780938397

000000000000

Monday, 21 April 2025

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान 2023-24 अंतर्गत "दाखल्यांची शाळा" उपक्रमास राज्यस्तरीय गौरव▪ खिरोदा प्र. मंडळ अधिकारी जनार्दन बंगाळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान

 

        जळगाव दि. 21 ( जिमाका वृत्तसेवा ) राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान 2023-24 अंतर्गत रावेर तालुक्यातील खिरोदा प्र. येथील मंडळ अधिकारी श्री. जनार्दन दत्तात्रय बंगाळे यांना "दाखल्यांची शाळा" या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुंबई येथे पार पडलेल्या विशेष समारंभात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा गौरव प्रदान करण्यात आला. यावेळी कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा तसेच राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांची उपस्थिती होती.

"दाखल्यांची शाळा" ही संकल्पना ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय दाखले सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावेत यासाठी राबविण्यात आली. या उपक्रमामुळे शासकीय कार्यालयांची प्रतिमा जनमानसात अधिक सकारात्मक झाली असून नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

            ग्रामीण भागात नवकल्पनांद्वारे परिवर्तन घडवणाऱ्या श्री. जनार्दन बंगाळे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा प्रशासनाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून , त्यांचे कार्य इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

000000000

 


एरंडोल नगरपरिषदेच्या "पुस्तकांचा बगीचा" उपक्रमाला राज्यस्तरीय पुरस्कार राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान २०२३-२४ अंतर्गत गौरव

 

            जळगाव, दि. २१ (जिमाका वृत्तसेवा) – मुंबई येथे पार पडलेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान २०२३-२४ च्या राज्यस्तरीय समारंभात एरंडोल नगरपरिषदेच्या "पुस्तकांचा बगीचा" या उपक्रमास राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार तत्कालीन मुख्याधिकारी श्री. विकास नवले व सद्यस्थितीत कार्यरत मुख्याधिकारी श्री. अमोल बागुल यांनी स्वीकारला.

            समारंभास राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा तसेच राज्याचे मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

            "पुस्तकांचा बगीचा" या उपक्रमाच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या बागेमध्ये वाचनासाठी अनुकूल व प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यात आले असून, नागरिकांमध्ये वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.

            या उल्लेखनीय कार्याबद्दल एरंडोल नगरपरिषदेचे जिल्हा प्रशासनातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

00000000


पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा

          जळगाव दि - 21( जिमाका ) : - राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

         सोमवार, दिनांक 21 एप्रिल, 2025 रोजी रात्री 8.00 वाजता पाळधी ता. धरणगांव जि. जळगांव येथून शासकीय वाहनाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण, रात्री 8.20 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व राखीव, रात्री 8.50 वाजता जळगाव येथून विमानाने मुंबई कडे प्रयाण.

०००००००००००

जळगाव जिल्ह्यात तुर खरेदीच्या ऑनलाईन शेतकरीसाठी नोंदणी मुदतवाढ!

             जळगाव दि-21 (जिमका):- केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराने (हमीभाव) नाफेड अंतर्गत २०२४-२५ हंगामातील तूर खरेदीसाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शेतकरी ३० एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करू शकतात.

                जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव अशा एकूण १६ खरेदी केंद्रांवर ही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.

                तुर खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी अंतिम तारीख ३० एप्रिल २०२५  आहे. तर खरेदीचा कालावधी १३ फेब्रुवारी २०२५ ते १३ मे २०२५ दरम्यान असणार आहे. तुर हमीभाव ७५५० रुपये प्रति क्विंटल इतका आहे.

             शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, बँक पासबुक, ऑनलाइन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा आणि ८ अ ही कागदपत्रे घेऊन जवळच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय संचालक मंत्री संजय वामनराव सावकारे, उपाध्यक्ष रोहितदादा दिलीपराव निकम, संचालक संजय मुरलीधर पवार आणि प्र. जिल्हा पणन अधिकारी एस.एस. मेने यांनी केले आहे.

0000000000

बेकायदेशीरपणे चालणाऱ्या बाल देखरेख संस्थांवर कारवाईचा इशारा; नागरिकांना मदतीचे आवाहन

             जळगाव, दि. 21(जिमका)- पुणे जिल्हयातील आळंदी व ठाणे जिल्हयातील खडवली येथे बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविले जात असलेबाबतच्या बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत. वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यानुसार तसेच संस्थांमध्ये बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवण्यात येवून त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक शोषणाच्या घटना घडत असल्याबाबतच्या बातम्या प्रसिध्द झाल्या बाबत निदर्शनास येत आहे. महिला व बाल विकास आयुक्तालयाने याची गंभीर दखल घेतली असून अशा संस्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

             किशोर न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 आणि महाराष्ट्र किशोर न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, 2018 चे हे स्पष्ट उल्लंघन आहे. या कायद्यानुसार, कोणतीही व्यक्ती किंवा संस्था बाल देखरेख संस्था चालवण्यासाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे.

या संदर्भात महिला व बाल विकास आयुक्त, श्रीमती नयना अर्जुन गुंडे यांनी जाहीर निवेदन प्रसिद्ध केले आहे. ज्या व्यक्ती किंवा संस्था नोंदणी न करता बाल देखरेख संस्था चालवतील, त्यांना एक वर्षांपर्यंत कारावास किंवा एक लाख रुपयांपेक्षा कमी नसलेला दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

          आपल्या आसपासच्या परिसरामध्ये अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्हयातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 या वर संपर्क साधुन बालकांवरील शारिरीक तसेच लैगिक अपराधास प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे असे जाहिर आवाहन श्रीमती नयना अर्जुन गुंडे यांनी केलेले आहे.

0000000000


 

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचे जळगाव विमानतळावर स्वागत




            जळगाव, दि. 21 एप्रिल – मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आज दुपारी 4.10 वाजता विशेष विमानाने जळगाव विमानतळावर दाखल झाले. त्यांचे स्वागत करण्यासाठी जळगावचे आमदार राजूमामा भोळे, जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गजेंद्र पाटोळे, तसेच पोलीस विभागाच्यावतीने अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते उपस्थित होते.

            मुख्यमंत्री यादव यांचे औपचारिक स्वागत झाल्यानंतर त्यांनी पुढील प्रवासासाठी जळगाव विमानतळावरून हेलिकॉप्टरने बुरहानपूरकडे ( मध्यप्रदेश ) प्रस्थान केले.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी वेळेआधीच पूर्ण केली होती.

000000000

 

Thursday, 17 April 2025

ना. संजय सावकारे, मंत्री, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा

             जळगाव दि - 17( जिमाका ) :  ना. संजय सावकारे, मंत्री, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढिल शुक्रवार, दिनांक 18 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 06. 45  वाजता महानगरी एक्सप्रेसने भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण, सकाळी 7.15   वाजता भुसावळ निवासस्थान येथे आगमन व राखीव.

000000000

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा

          जळगाव दि - 17( जिमाका ) : - राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

         गुरुवार, दिनांक 17 मार्च, 2025 रोजी रात्री 8.40 वाजता निझामुद्दीन एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन, रात्री 8.50 वाजता जळगाव येथून  शासकिय वाहनाने पाळधी ता. धरणगांव जि. जळगांवकडे प्रयाण. रात्री 9.20 वाजता पाळधी ता. धरणगांव जि. जळगांव येथे आगमन व राखीव.

                                                                      ०००००००००००

२१ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

             जळगाव, दि. 17  (जिमाका)- जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या 21 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी दिली आहे.

                   समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी राबविण्यात येतो.

                 या अनुषंगाने येत्या 21  एप्रिल रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व गरजू महिलांनी वेळेत जिल्हाधिकारी यांच्या दालनात उपस्थीत राहण्याचे आवाहन माहिती महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

                                                                     00000000000