जळगाव दि. 29 ( जिमाका वृत्तसेवा ): महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला (महाबीज) ने सोमवार, २८ एप्रिल, २०२५ रोजी आपला ४९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. महाबीज मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमात महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या वाटचालीचा जल्लोष करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर होते.
या
विशेष कार्यक्रमाला अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह (भा.पो.से.) आणि
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांची
प्रमुख उपस्थिती होती. तसेच, महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख आणि बीज प्रमाणीकरण
यंत्रणा, अकोलाचे संचालक डॉ. अंकुशराव माने यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात महाबीज
मुख्यालयात वृक्षारोपण करून झाली. यानंतर मागील दोन वर्षात उल्लेखनीय कामगिरी
करणारे बिजोत्पादक, शेतकरी, महाबीज विक्रेते आणि महाबीजचे अधिकारी-कर्मचारी यांना
‘महाबीज गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक करताना महाव्यवस्थापक डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी महाबीजच्या ४९
वर्षांच्या प्रवासातील कर्मचाऱ्यांच्या तीन पिढ्यांचा संगम आणि भविष्यातील वाटचाल
यावर विस्तृत माहिती दिली. महाबीजचे संचालक डॉ. रणजीत सपकाळ यांनी सोयाबीन पिकाला
पर्याय शोधण्याची आणि संत्रा व इतर फळपिकांच्या संशोधनावर लक्ष केंद्रित करून नवीन
वाण विकसित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ संचालक वल्लभराव देशमुख यांनी
महाबीजच्या स्थापनेपासूनचा इतिहास सांगून चिया सीड्स, हळद आणि राजमा या पिकांचे
वाण उपलब्ध करण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगितले आणि ते जास्तीत जास्त
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची आशा व्यक्त केली.
बीज प्रमाणीकरण
यंत्रणेचे संचालक डॉ. अंकुशराव माने यांनी बीज प्रमाणीकरणामध्ये महाबीज
अधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल प्रशंसा केली. त्यांनी ‘साथी’
पोर्टलची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगितले.
संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी विद्यापीठांचा महाबीजसोबतचा दीर्घ सहवास आणि
हवामानाला अनुकूल वाणांचे संशोधन करून शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढवता येईल यावर
विचार व्यक्त केले. त्यांनी जैविक खतांचा वापर करून जमिनीचे आरोग्य सुधारण्याची
गरज असल्याचेही सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह
यांनी महाबीजने आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी वाजवी दरात गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध
करून दिले, ही कौतुकास्पद बाब असल्याचे म्हटले. बियाणे वाटप करताना कोणतीही अडचण
आल्यास पोलीस विभागाकडून पूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
अध्यक्षीय भाषणात व्यवस्थापकीय
संचालक योगेश कुंभेजकर यांनी महाबीजला लाभलेल्या मागील अध्यक्षांचे आणि
व्यवस्थापकीय संचालकांचे स्मरण केले. त्यांनी १९८० ते १९८४ या काळात तत्कालीन
व्यवस्थापकीय संचालक विश्वासराव धूमाळ यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे महाबीजचे
कार्य राज्यभर विस्तारले, असे सांगितले. सुवर्ण महोत्सव विशेषांकासाठी परिश्रम
घेणाऱ्या टीमचे कौतुक करत त्यांनी पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महाबीज आणि शेतकऱ्यांसाठी वर्षभर सकारात्मक
ऊर्जा निर्माण करणारे कार्यक्रम आयोजित केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर
बळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन जितेंद्र सरोदे यांनी केले. पसायदानाने
कार्यक्रमाची सांगता झाली.
00000000000
No comments:
Post a Comment