Tuesday, 21 August 2018

जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये 14.18 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा


·         हतनुर धरणात 40.59, गिरणा धरणात 38.98, वाघूर धरणात 37.76 टक्के उपयुक्त साठा
·         हतनुर धरणाचे आठ गेट पूर्ण उघडल्याने 45468 व्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु
जळगाव, दि. 21 - जिल्ह्यात गेल्या काही दिवासांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये 14.18 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हतनूर धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे आठ गेट पूर्ण उघडले असून धरणातून आज 45468 व्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहे. अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम प्रकल्प आहे. तर 96 लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा 1427.51 दलघमी म्हणजेच 50.40 टीएमसी इतका आहे. 
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 1027.10 दलघमी म्हणजेच 36.26 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 401.45 दलघमी म्हणजेच 14.18 टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात 3.65 टीएमसी, गिरणा 7.21 टीएमसी, तर वाघूर धरणात 3.31 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. वाघूर धरणाच्या क्षेत्रात गेल्यावर्षी 21 ऑगस्टपर्यंत 294 मिमी पाऊस पडला होता. तर यावर्षी आजपर्यंत 366 मिमी पाऊस पडल्याने जळगाव शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे. गेल्या चोवीस तासात हतनूर धरण क्षेत्रात 20 मिमी, गिरणा धरण क्षेत्रात 25 मिमी तर वाघूर धरण क्षेत्रात 36 मिमी इतका पाऊस पडल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 203.91 दलघमी म्हणजेच 7.20 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 65.40 दलघमी म्हणजेच 2.31 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील मंगरुळ व सुकी या मध्यम प्रकल्पांच्या सांडव्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
000

No comments:

Post a Comment