Tuesday, 14 August 2018

जनसेवा हीच ईश्वरसेवा माणून सर्वसामान्यांची सेवा करा - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर




            जळगाव, दि. 14 - ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा’ या संत तुकाराम महाराजांच्या उपदेशपर अभंगाचा सार ओळखून महसुल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनसेवा हीच ईश्वरसेवा माणून सर्वसामान्यांची सेवा करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
            येथील जिल्हा नियोजन भवनात महसुल दिन कार्यक्रमानिमित्त महसुल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव समारंभ जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी (महसुल) अभिजीत भांडे पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद भामरे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, राजेंद्र कचरे, तहसीलदार मंदार कुलकर्णी आदि उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर पुढे म्हणाले की, सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. या युगात काम करतांना आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरा. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करा. गोरगरीब व सर्वसामान्य जनता यांच्या कामास प्राधान्य द्या. महसुल विभागाचे कामाचे स्वरुप बघता कामाबरोबरच स्वत:चे शारीरिक व मानसिक स्वास्थ जपण्याचा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला. तसेच आज चांगले काम केलेल्यांचा गौरव झाल्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटूंबाचीही मान उंचावली आहे. कुटूंबाने साथ दिल्यामुळेच गौरवार्थी चांगले काम करु शकले असेही ते म्हणाले.
माहेरी आल्यासारखे वाटते -  आयुक्त चंद्रकांत डांगे
            ब्रिटीश काळापासूनच महसुल विभाग हा शासनाचा कणा राहिला आहे. महसुल विभागात काम केल्याचे नेहमी समाधान मिळते. असे सांगून महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी गडचिरोली जिल्ह्यात महसुल विभागात काम करीत असतानाचे त्यांचे अनुभव कथन केले. तसेच महसुल दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आल्यामुळे माहेरी (स्वत:च्या विभागात) आल्यासारखे वाटत असल्याचेही त्यांनी आर्वजून सांगितले.
            ‘जीवन से पहले, जीवन के साथ और जीवन के बाद’ ही महसुल विभागाची संकल्पना असल्याचे सांगून अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी गेल्या वर्षभरात महसुल विभागाने केलेल्या गौरवपूर्ण कामांचा आढावा आपल्या मार्गदर्शनात घेतला. उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात महसुल विभागाच्यावतीने राजस्व अभियानातंर्गत गेल्या वर्षभरात 4 लाख 53 हजार विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे 4 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून नुकसानग्रस्तांना 277 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. संजय गांधी निराधार योजनेतंर्गत जिल्ह्यातील 1 लाख 47 हजार लाभार्थ्यांना 158 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर 1 लाख 37 हजार अंत्योदय योजनेचे व 22 लाख 63 हजार प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना दरमहा धान्याचे वाटप करण्यात येते. जिल्ह्याला देण्यात आलेल्या 132 कोटी रुपये महसुल वसुलीच्या उद्दिष्टापोटी विभागाने 134 कोटी रुपयांची वसुली पूर्ण केली आहे. जिल्ह्यात संगणकीकृत सातबाराचे 98 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगून श्री. गाडीलकर यांनी सर्वांनी आपल्या विभागाचा लौकीक वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके यांनी महसुल दिनाची भूमिका विशद केली. महसुल विभागामुळे समाजापर्यंत पोहोचण्याची संधी मिळते तसेच चांगल्या कामाची नेहमीच पावती मिळत असते त्यामुळे आपली नोकरी प्रामाणिकपणे करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी आपल्या मनोगतात केले. याप्रसंगी पाचोऱ्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, भडगावचे तहसीलदार श्री. वाघ यांनीही आपले विचार मांडले.
 महसुल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
            महसुल दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून महसुल विभागाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महसुल विभागाच्या 50 पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी यांनी रक्तदान करुन लोकाभिमुख प्रशासनाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासली. याबद्दल रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने जिल्हाधिकारी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
            कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी गेल्या वर्षभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सत्कारार्थी अधिकारी, कर्मचारी
            अभिजीत भांडे पाटील, उपजिल्हाधिकरी (महसूल शाखा), जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, दिपक गिरसे, तहसिलदार, चोपडा, नानासाहेब आगळे, नायब तहसिलदार, चाळीसगाव, सतिश निकम, नायब तहसिलदार, भुसावळ, नरविरसिंह प्रविणसिंह रावळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, श्रीमती निशा चव्हाण, अव्वल कारकुन, यावल, राहूल सोनवणे, अव्वल कारकून, भुसपांदन कार्यालय, जळगाव, जयंत दिक्षीत, अव्वल कारकुन, पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, सुयोग कुलकर्णी, अव्वल कारकुन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, भारत भगत, स्वीय सहाय्यक, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, आर.के.साळुंखे, मंडळ अधिकारी, चोपडा, रविंद्र पाटील, मंडळ अधिकारी, यावल, विनोद कुमावत, मंडळ अधिकारी, पाचोरा, लिपिक संवर्गात एन. एन. मुजावर, अमळनेर, शकंर ढवळे, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, सुनिल पवार, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, राहूल नवगिरे, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, तलाठी संवर्गात धनराज मुंडे, तहसिल कार्यालय, मुक्ताईनगर, श्रीमती वृशाली सोनवणे, तहसिल कार्यालय, चाळीसगाव, निशीकांत पाटील, तहसिल कार्यालय, पारोळा, बी. टी. नरसाळे, बोदवड, भरत परधी, तहसिल कार्यालय, एरंडोल, अतुल वडस्कर, तहसिल कार्यालय, जामनेर, वाहनचालक ए. ए. मिर्झा, तहसिल कार्यालय, चाळीसगाव, शिपाई संवर्गात गजानन टोगंळे, तहसिल कार्यालय, मुक्ताईनगर, देविदास सुरळके, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, गुलाब पाटील, तहसिल कार्यालय, पाचोरा, शेख नुर शेख लाल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, नवनाथ सदाफुले, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, सुरेश महाले, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, कोतवाल संवर्गात नारायण सोनवणे, तहसिल कार्यालय, धरणगाव, रमाकांत सपकाळे, तहसील कार्यालय, भुसावळ, रविंद्र श्रीरामे, तहसिल कार्यालय, रावेर यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विलास मोरे यांनी केले.
000

No comments:

Post a Comment