Thursday, 29 October 2020

मुंबई येथे डाक अदालतीचे आयोजन 9 नोव्हेंबरपर्यंत तक्रारी पाठविण्याचे आवाहन

         जळगाव (जिमाका) दि. 29 - पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवडयांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींच्या निराकरणासाठी चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय, जी. पी. ओ. बिल्डिंग, दुसरा माळा, मुंबई येथे दि. 17 डिसेंबर, 2020 रोजी दुपारी साडेअकरा वाजता डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.

            सदर डाक अदालतमध्ये टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बॅंक, मनीऑर्डर या संदर्भातील तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह करावा. डाकसेवेबाबची तक्रार दोन प्रतीत श्री. एच.एम.मंजेश, सहाय्यक निदेशक (तक्रार) तथा सचिव डाक अदालत, चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय, जी.पी.ओ. बिल्डिंग, दुसरा माळा, मुंबई 400001 यांच्या नावे 9 नोव्हेंबर, 2020 पर्यंत पाठवावे. असे आवाहन अधिक्षक डाकघर, जळगाव डाक विभाग, जळगाव यांनी केले आहे.

०००

हतनूर कालव्यावर उपसा सिंचनाने पाण्याचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

       जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) - हतनूर मोठा प्रकल्पावरील जलाशय, हतनूर कालवा कि.मी 0 ते 92 पर्यत व तापी नदी, सुकी, अभोरा, तोंडापुर  या प्रकल्पावरील कालव्याच्या वितरिकेवर प्रवाही, जलाशय, नदी नाले व कालव्यावर उपसा सिंचनाने पाण्याचा लाभ घेणा-या सर्व लाभधारकांना कळविण्यात येते की, यावर्षी सन 2020-2021 मध्ये रब्बी हंगामात सिंचनासाठी उपलब्ध पाणी साठ्यानुसार दि 15 ऑक्टोबर, 2020 ते 28 फेब्रुवारी, 2021 या मुदतीकरीता रब्बी हंगामातील दादर, हरबरा, अन्नधान्य, चा-याची पिके यासाठी खालील अटीचे अधिन राहून सिंचनास पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे.

          अर्ज नमुना क्र. 7 वर मागणी भरुन पाणी अर्ज दि. 31 डिसेंबर, 2020 पर्यंत आपल्या भागातील शाखाधिकारी यांचे शाखा कार्यालयात कार्यालयीन वेळेत, पोष्टाने अगर प्रत्यक्ष देण्याचे करावे. यानंतर पाणी अर्जाची मुदत वाढविली जाणार आहे. नविन उपलब्ध होणा-या पाणी साठ्यानुसारच पाणी अर्ज मंजुरीचा विचार केला जाईल. रब्बी हंगाम 2019-2020 पर्यंत थकबाकी पुर्ण भरावी, थकबाकीदारांना मंजूरी दिली जाणार नाही. शेतक-यांनी आपआपली शेतचारी दुरुस्त करुन स्वच्छ ठेवावी, मागणी क्षेत्र 20 आर च्या पटीत व सलग असावे, मागणी क्षेत्रात पाटमोट संबध नसावा, मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जावर सव्वापट आकारणी करण्यात येईल, प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजुरी मिळाली असे समजण्यात येवू नये, मंजुर क्षेत्रास व मंजुर पिकांनाच पाणी घ्यावे लागेल, काही अपरीहार्य कारणाने मंजुर पिकासाठी पाणी पुरवठा न करता आल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास त्यास जलसंपदा विभाग जबाबदार  राहणार नाही व नुकसान भरपाई दिली जाणार नाही. पाणी अर्ज देतांना 7/12 उतारा अथवा खाते पुस्तिका संबंधीत पाट शाखेत दाखवावी लागेल, पाणी अर्ज स्वीकारण्याची मुदत 31 डिसेंबर, 2020 नंतर वाढविली जाणार नाही. उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करुन अधिक उत्पन्न घ्यावे. मंजुरी ही पाटबंधारे अधिनियम महाराष्ट्र राज्य 1976 व प्रचलित शासन नियमांच्या तरतुदीच्या अधिन राहील, प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रास मंजुरी दिली जाईल. असे कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००

तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री स्टॉलसाठी परवानगी घेणे आवशयक

        जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) - उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव कार्यालयामार्फत दिपावली सणानिमित्त तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री परवाना दिला जाणार आहे. तात्पुरत्या फटका परवाना घेण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात खालील कागदपत्रे 9 नोव्हेंबर, 2020 पावेतो सादर करावीत. असे आवाहन प्रसाद मते, उपविभागीय अधिकारी, जळगाव यांनी केले आहे

       अर्जदाराचा अर्ज व फोटो (अर्जात मोबाईल नंबर नमुद करावा) चलन, ज्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री करावयाची आहे त्या जागेचा 7/12 उतारा किंवा सिटी सर्व्हे चा उतारा, ग्रामपंचायतीचा मिळकत उतारा, जागा मालकाचे संमतीपत्र, ग्रामपंचायतीचे हद्दीत असल्यास ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला, नगरपालीका हद्दीत असल्यास नगरपालिकेचा अंतिम नाहरकत दाखला, महानगर पालीका हद्दीत असल्यास महानगर पालिका जळगाव यांचा अंतिम नाहरकत दाखला, ज्या जागेवर फटाके विक्री करावयाची आहे ती जागा ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते त्या पोलीस स्टेशनचा नाहरकत दाखला, फटाके विक्री परवाना संबधीचे नियम, अटी व शर्तीचे पालन करीत असल्यासंबधीचे प्रतिज्ञापत्र, मागील वर्षाची तात्पुरता परवान्याची छायांकीत प्रत, तात्पुरता फटाका परवानाधारक यांचा अर्ज व यासह नमुद कागदपत्रे कार्यालयास सादर केल्यानंतरच चलन पास करुन परवाना दिला जाईल, याकरीता जळगाव व जामनेर तालुक्याच्या सर्व फटाका विक्रेत्यांना आवाहन करण्यात येते की, कोणीही विनापरवाना (बेकायदेशीर) फटाका विक्री केंद्र सुरु केल्यास त्यांचेवर कठोर दंडात्मक कारवाई करणेत येईल. असे श्री. मते, उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव भाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर

        जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) - राज्याचे गृह मंत्री ना. अनिल देशमुख हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. 

       रविवार, दिनांक 1 नोव्हेंबर, 2020 रोजी दुपारी 13.30 वाजता शहादा येथून हेलीकॉप्टरने अमळनेरकडे प्रयाण. दुपारी 14.15 वा. अमळनेर हॅलीपॅड येथे आगमन व आमदार श्री. अनिल भाईदास पाटील यांचे निवासस्थानाकडे प्रयाण व राखीव. दुपारी 15.00 ते 15.45 वाजेपर्यंत अमळनेर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व सन्मानीय लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 15.50 वा. अमळनेर नगरपरीषद येथील जिजाऊ महिला व्यायाम शाळा व सवित्रीबाई फुले अभ्यासिकेचे उद्घाटन तद्नंतर अमळनेर हेलीपॅडकडे प्रयाण. दुपारी 16.15 वा. हेलीकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.

00000

Wednesday, 28 October 2020

बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृती दलाची बैठक संपन्न शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

             जळगाव, (जिमाका) दि. 28 - मुलगी शिकली तर समाज शिकेल ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शाळा बाह्य मुलींचे सर्व्हेक्षण करुन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत. अशा सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिल्यात.

            बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातंर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा कृति दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्ह्यात मुलींची संख्या वाढण्यासाठी प्रशासनातर्फे नागरीकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आवश्यक असून त्यासाठी आवश्यक  त्या उपाययोजना आखाव्यात. मुलींना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी विशेषत: आदिवासी भागातील किशोरवयीन मुलींची आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी करुन त्यांच्यातील हिमोग्लोबीन तपासावे. तसेच महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी पोलीस विभागाने दक्षता घ्यावी. महिलांची छळवणूक होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास अशा तक्रारींवर तत्काळ कारवाई करावी. वन स्टॉप सेंटरमार्फत महिलांचे समुपदेशन करावे, त्याचबरोबर जिल्ह्यातील महिलांना व मुलींना एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना, माझी कन्या भाग्यश्री, अस्मिता योजना, मनोधैर्य योजना, सुकन्या समृध्दी योजना, मातृत्व वंदन योजनांचा लाभाबरोबरच इतर योजनांचाही लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी संबंधितांना सांगितले.

            तसेच महिलांच्या अडचण सोडविण्यासाठी त्यांनी 181 या क्रमांकांवर संपर्क साधावा. सन 2011 च्या जनगणनेनुसार सध्या देशात मुलींचा जन्मदर दर हजारी 914 तर राज्याचा दर 894 इतका आहे. तर जळगाव जिल्ह्यात मुलींचे गुणोत्तर 920 इतके आहे. सध्या हे प्रमाण वाढले असून यात अजून वाढ होण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्यासाठी कृति आराखडा तयार करण्यात येत असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. परदेशी यांनी बैठकीत सांगितले. 

00000

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत अनुदानावर बियाणे उपलब्ध शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन

             जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत कृषि विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी हरभरा, ज्वारी, मका या पीकांचे बियाणे अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

            या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना हरभरा राजविजय-202, फुले विक्रम, हरभरा दिग्वीजय, हरभरा जॅकी-9218, रब्बी ज्वारी फुले सुचित्रा, मका बायो 9544 या वाण अनुदानावर मिळणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम तत्वावर अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. याकरीता आधारकार्ड आणि 7/12 उतारा, एका लाभार्थ्यास एका हंगामात एकदाच लाभ मिळेल, बियाणे विक्रेतास्तरावरुन वाटप होणार आहे, या योजनेसाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकरीच बियाणे मिळण्यास पात्र राहतील असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.

00000

भु-विकास बँकेच्या कर्जदारांना थकबाकी फेडण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ कर्जदारांनी लाभ घेण्याचे सहकार विभागाचे आवाहन

        जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) - भु-विकास बँकेच्या थकबाकीदार सभासदांकरीता शासन निर्णय दिनांक 24 जुलै, 2015 नुसार एकरक्कमी कर्ज परतफेड (ओ.टी.एस) योजना लागू केलेली होती.  दिनांक 20 ऑक्टोबर, 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार या योजनेतंर्गत कर्ज परतफेडीसाठी दिनांक 31 मार्च, 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानंतर सक्तीच्या वसुलीव्दारे जमीनलिलाव करुन वसुलीची कार्यवाही केली  जाणार आहे. असे अवसायक, जळगाव जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक ली., जळगाव तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

       जळगाव जिल्हा भु-विकास बँकेचे जिल्ह्यातंर्गत 176 सभासदांनी या योजनेचा लाभ घेतल्यास जळगाव जिल्ह्यातील बँकेच्या सभासदांना 1 कोटी 67 लाख वसुल भरावा लागेल. यामध्ये शेतक-यांना 5 कोटी 85 लाख रुपयांच्या व्याजमाफीचा लाभ मिळणार आहे. शासनाने जाहीर केलेल्या एकरक्कमी कर्ज परतफेड योजनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात सभासदांना लाभ मिळत असल्यामुळे जास्तीत जास्त कर्जदार सभासदांनी 31 मार्च, 2021 च्या आत कर्जाची परतफेड करावी. अन्यथा बँकेमार्फत सक्तीच्या वसुलीव्दारे कार्यवाही करण्यात येईल.

       तरी शासनाने जाहीर केलेल्या एकरक्कमी परतफेड योजनेचा लाभ घेवून आपले शेतजमीनी वरील बँकेचा बोजा कमी करुन घेण्याचे आवाहन श्री. स.सु. बिडवई, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी केले आहे.

00000

शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

       जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) - शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम-2021 करीता 100 किलो बियाणे प्रती हेक्टर याप्रमाणात आलेल्या उत्पादनातुन सोयाबीन बियाणे म्हणून राखून ठेवावे. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

सोयाबिन पिकाची सद्य:स्थितीत काढणी व मळणी सुरु असुन आलेल्या उत्पादनातुन चांगल्या प्रतीचे सोयाबिन बियाणे राखुन ठेवून ते पुढील खरीप हंगामात बियाणे म्हणून वापर करावा. साठवणुक करतांना सोयाबिन बियाणे गोणीची थप्पीची उंची 7 फुटापेक्षा जास्त ठेऊ नये. सोयाबिन बियाणाचे कवच नाजुक असल्यामुळे त्याची कमीत कमी हाताळणी करावी. पुढील हंगामासाठी घरचे बियाणे राखुन ठेवल्याने शेतकरी बांधवांना बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही. असेही श्री. ठाकूर यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

                                                                            00000

Tuesday, 27 October 2020

लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत 2 नोव्हेंबरपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

 

          जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) - महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ॲन्टी करप्शन ब्युरो) जळगाव युनिटतर्फे 27 ऑक्टोबर ते दिनांक 2 नोव्हेंबर,2020 या कालावधीत भ्रष्टाचार आणि अधिकारांच्या दुरुपयोगाविरोधात जनजागृती करण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबर, 2020 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त हा सप्ताह साजरा करण्यात येत असून या आठवडा दक्षता जागृती सप्ताह म्हणून ओळखला जातो. सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार आणि भ्रष्ट पध्दती नष्ट करण्यासाठी जागरुकता मोहिम राबविण्याचा या सप्ताहाचा हेतू आहे.

          जागरुकता मोहिमेदरम्यान, ॲन्टी करप्शन ब्युरो विभागाचे कार्य, भ्रष्टचाराविरोधी कायद्याची माहिती आणि सर्वसामान्य नागरीकाने आपले शासकीय काम करुन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची लाच देण्याची आवश्यकता नाही. परंतु काहीवेळेस सर्वसामान्य नागरीकांना असे वाटते की, सरकारी कार्यालयातील काम फक्त लाच दिल्यावरच कार्यान्वित होते. या धारणेला बदलण्याची गरज आहे. प्रत्येक नागरीक सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार नष्ट करण्यास मदत करु शकतात. भ्रष्टाचारासंबधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. असे आवाहन जी.  एम.  ठाकूर, पोलीस उप अधिक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

          जळगाव जिल्ह्यात या सप्ताहात श्री सुनिल कडासने, पोलीस अधिक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, नाशिक परिक्षेत्र नाशिक, श्री. निलेश सोनवणे, अप्पर पोलीस अधीक्षक व श्री. दिनकर पिगळे, पोलीस उप अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली दक्षता जनजागृती  सप्ताहातंर्गत भ्रष्टाचाराविरोधात जागरुकता करण्यात येणार आहे.

          नागरीकांनी  लोकसेवकाबद्दल आपली काही तक्रार असल्यास  टोल फ्री क्रमांक -1064, दुरध्वनी क्रमांक 0257-2235477, मोबाईल क्रमांक-9607556556 अथवा dvspacbjalgain@gmail.com या ई मेलवर करण्याचे आवाहनही श्री. ठाकूर यांनी केले आहे.

0000

निधी खर्च होणार असेल तरच मागणी करा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश



            जळगाव (जिमाका) दि. 27 - कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत आहे. अशा परिस्थितीत यंत्रणांनी त्यांना विविध विविध कामांसाठी मंजूर केलेला निधी मार्च 2021 पर्यंत खर्च होणार असेल तरच निधीची मागणी करावी. विहित वेळेत निधी खर्च न झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

            जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा नियोजन भवनात पार पडली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, आदिवासी विकास विभाग, यावल प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे आदि उपस्थित होते. 

             जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले की, राज्य शासनाच्या निर्देशानुसार नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देता येणार नसल्याने ज्या योजनांवर विहित कालावधीत खर्च होणार नाही त्या कामांचे प्रस्ताव रद्द करा. स्पीलमधील कामे पूर्ण होणार असतील तरच निधीची मागणी करा.  जी कामे पूर्ण होणार नसतील त्याची यादी 10 नोव्हेंबरपूर्वी नियोजन विभागास कळवावी. जेणेकरुन सदरचा निधी इतर विकास कामांसाठी उपलबध करुन देता येईल.प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांचे अतिरिक्त्‍ दायित्व निर्माण होणार नाही याची सर्व संबंधित विभागांनी दक्ष्‍ाता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. मंजूर निधीतून शिक्षण, आरोगयाच्या योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. त्याचबरोबर ज्या कामांची मुदत ठरलेली आहे त्यापूर्वी ती नादुरुस्त्‍ झाल्यास ती कंत्राटदारांकडूनच दुरुस्त करुन घ्यावी. त्यासाठी पुन्हा नव्याने प्रस्ताव आल्यास सबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

             जिल्ह्याचा सर्वसाधारण वार्षिक योजनेचा आराखडा 375 कोटी रुपयांचा असून त्यापेकी 123 कोटी 75 लाख रुपयांचा निधी बीडीएसवर उपलब्ध झाला असून 26 कोटी 83 लाख 68 हजार रुपयांचा निधी यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोविडचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणांना आतापर्यंत 44 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली असून 20 कोटी 20 लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. शिवाय आमदार निधीतूनही जिल्हा शल्य चिकित्सक यांना 2 कोटी 61 लाख जिल्हा आरोग्य अधिकारी यांना 1 कोटी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी बैठकीत दिली.    

            या बैठकीत विविध विभागांना दिलेल्या प्रशासकीय मान्यता, निधी वितरण, सध्या सुरु असलेली कामे, अपूर्ण कामे, सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला त्याचबरोबर सर्व विभागांनी सन 2021-22 चा प्रारुप आराखडा तयार करतांना मुलभूत सुविधांची कामे सुचविण्याबाबत सुचनाही जिल्हाधिकारी यांनी दिली.

या बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

00000

जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यायामशाळा सुरु करण्यास परवानगी

             जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) - राज्य शासनाच्या व सार्वजनिक आरोग्य विभागाकडील दिनांक 23 ऑक्टोबर, 2020 च्या परिपत्रकानुसार यापूर्वी नमूद तरतुदी शिथिल करण्यात आला आहेत. या परिपत्रकाच्या अधिन राहून दिनांक 25 ऑक्टोबर, 2020 पासून जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित ( Containment Zone) क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले क्षेत्र वगळून व भविष्यात वेळोवेळी प्रतिबंधित ( Containment Zone) क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणारे क्षेत्र वगळून उर्वरीत क्षेत्रात व्यायामशाळा ( Gymnasiums)  सुरु करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. असे आदेश अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अधक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी निर्गमित केले आहे.

            कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावली (SOPs) नुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश यापुढेही लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असेही श्री. राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

00000

विक्रेत्यांनी मास्कची विक्री किंमत दर्शनी भागावर लावणे बंधनकारक

             जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) - कोविड-19 साथरोगापुर्वी व कोविड-19 साथरोगानंतर हॅन्ड सॅनीटायझर व नोज मास्क ( 2 प्लाय, 3 प्लाय व एन 95) यांच्या किंमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. दिनांक 30 जून, 2020 नंतर केंद्र शासनाचेही यांच्या किंमतीवरील नियंत्रण संपुष्टात आल्याने तर किमतीत अधिकच वाढ झाल्याचे दिसून आले असून याचा भुर्दड सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे.

            साथरोग आटोक्यात आणण्यासाठी याचा उपयोग आवश्यक असल्याने हॅन्ड सॅनीटायझर व नोज मास्क (2 प्लाय, 3 प्लाय व एन 95) यांच्या किमती नियंत्रणात ठेवणे जनहितार्थ आवश्यक होते.  त्यासाठी शासन निर्णयानुसार हॅन्ड सॅनीटायझर व नोज मास्क (2 प्लाय, 3 प्लाय व एन 95) यांचे दर निश्चित करणेसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. उत्पादकाची उत्पादन किंमत, त्यावरील नफा तसेच प्रत्येकी वितरक व विक्रेता यांचा नफा गृहीत धरुन समितीने दर्जानुसार मास्कचे अधिकतम विक्री मुल्य 19 रुपयांपासून 127 रुपयांपर्यंत निश्चित केले आहे.

            शासन निर्णयानुसार या विविध दर्जाच्या मास्कची विहित केलेली अधिकतम विक्री मुल्य मर्यादा साथरोग कायदा अंमलात असेपर्यत लागु राहील. सदर अधिकतम विक्री मुल्य मर्यादा राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या/वितरक/किरकोळ विक्रेते यांना लागु राहील. राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या/वितरक/किरकोळ विक्रेते यांनी मास्कचा दर्जा व त्याची निर्धारीत कमाल विक्री किंमत जनतेस दिसेल, अशा ठिकाणी दर्शनीय भागावर लावणे आवश्यक आहे.

याबाबत काही तक्रार आल्यास किंवा तपासणी दरम्यान वर नमुद सुचना दर्शनीय भागास आढळून न आल्यास कोवीड साथरोग कायदा व औषधे व सौदर्य प्रसाधने कायद्यातंर्गत कडक कारवाई करण्यात येईल.  याची सर्व मास्क उत्पादक कंपन्या/वितरक/किरकोळ विक्रेते यांनी नोंद घ्यावी. असे अ. मा. माणिकराव, औषध निरीक्षक, सहाय्यक आयुक्त कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

दिव्यांग संशोधन समित्यांवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

        जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) - राज्य सल्लागार मंडळ व दिव्यांग संशोधन समितीची स्थापना करण्याच्यादृष्टीने या मंडळ/समित्यांचे पुर्नगठन करण्याकरिता दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत नामवंत व तज्ज्ञ व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती व दिव्यांगाच्या स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधीत्व करणारे दिव्यांग पदाधिकारी व सदस्य यांचे नियुक्तीकरिता प्रस्ताव मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य सल्लागार मंडळाकरिता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील 66 च्या उपकलम 2 मधील (ई) अन्वये नियुक्तीकरिता सदस्यांची नावे, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक तसेच त्यांची संक्षिप्त माहिती व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देण्यात यावी. असे विजय रायसिंग, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी कळविले आहे.

00000

प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांना वाटपासाठी नोव्हेंबर महिन्याचे नियतन मंजूर

             जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) - पणन हंगाम 2019-20 (रब्बी) अंतर्गत खरेदी केलेले भरडधान्य (मका) सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. सदरचे भरडधान्य गव्हाचे परिमाण कमी करुन त्याच प्रमाणात भरडधान्य (मका) वाटप करण्याच्या सुचना आहेत.

            त्यानुषगाने माहे नोव्हेंबर 2020 च्या नियतनात भरडधान्य (मका) प्राधान्य कुटूंब योजना लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राधान्य कुटूंब योजना प्रति लाभार्थी गहू 1 कि.ग्रॅ. 2 रु. प्रति किग्रॅ. दराने, मका 2 कि.ग्रॅ 1 रु. प्रति कि. ग्रॅ. दराने, तांदुळ 2 कि.ग्रॅ. 3 रु प्रति कि. ग्रॅ. या दराने प्रति सदस्य वितरीत करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना वाटपासाठी नोव्हेंबर महिन्याचे नियतन मंजूर

         जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) - पणन हंगाम 2019-20 (रब्बी) अंतर्गत खरेदी केलेले भरडधान्य (ज्वारी व मका) सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार भरडधान्य गव्हाचे परिमाण कमी करुन त्याच प्रमाणात भरडधान्य (ज्वारी व मका) वाटप करण्याच्या सुचना आहेत.

            त्यानुषगाने माहे नोव्हेंबर 2020 च्या नियतनात भरडधान्य (ज्वारी व मका) अंत्योदय अन्न योजना कार्डधारकांना वितरीत करण्यात येणार आहे. त्यानुसार अंत्योदय योजना कार्डधारकांसाठी गहू 10 कि.ग्रॅ.2 रु. प्रति किग्रॅ.दराने, ज्वारी 5 कि.ग्रॅ 1 रु. प्रति कि. ग्रॅ.दराने,  मका 10 कि.ग्रॅ. 1 रु प्रति कि. ग्रॅ. दराने व तांदुळ 10 कि.ग्रॅ. 3 रु प्रति कि. ग्रॅम या दराने प्रतिकार्ड वितरीत करण्या येणार आहे. याचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

००००

ईद-ए-मिलाद साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सुचना

         जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) - कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा ईद- ए-मिलाद (मिलादुन नबी) जुलूस साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी दिनांक 30 ऑक्टोबर, 2020 रोजी ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) (चंद्रदर्शनावर अवलंबून) साजरी होणार आहे. त्याअनुषंगाने मार्गदर्शक सुचना जाहिर करण्यात येत असून त्याचे सर्वांनी पालन करावे. असे आवाहन अभिजीत राऊत, जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

            कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) हा सण इतर धार्मिक सणांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच साजरा करण्यात यावा. राज्य शासनातर्फे सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) मिरवणूकीला एका ट्रकसह 10 इसमास परवानगी देण्यात येत आहे. प्रवचनाचा कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावा, त्याचे केबल टि.व्ही. फेसबुक इत्यादी माध्यमातून थेट प्रक्षेपणाव्दारे इतरांना पाहण्याची व्यवस्था करावी, प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये कोणतीही शिथीलता देण्यात येणार नाही. मिरवणुकीच्या दरम्यान मिरवणुकीच्या स्वागतासाठी मंडप बांधावयाचे असल्यास शासनाच्या नियमानुसार संबंधीत महापालिका, पोलीस व स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमाचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. मंडपामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती नसावी. ईद ए मिलाद (मिलादुन नबी) निमित्त मुस्लिम वस्तीत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणार्थ पाण्याचे तात्पुरते सबील (पाणपोई) लावण्यात येतात. सबील (पाणपोई) बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्याठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तीनी उपस्थित राहू नये. सदर ठिकाणी सीलबद पाण्याच्या बाटलीचे वाटप करण्यात यावे. सबील (पाणपोई) च्या ठिकाणी स्वच्छता राखावी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.

कोविड-19 या विषाणूच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) अन्वये मिरवणूकी दरम्यान रस्त्यावर पाचपेक्षा जास्त व्यक्तीनी एकत्र येवू नये, शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन हा सण घरी राहून साधेपणाने साजरा करावा, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे, सोसायटीमधील नागरीकांनी देखील एकत्रीत जमून सण साजरे करु नये, कोविड-19 च्या परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे असे उपक्रम राबविण्यात यावेत व या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी,

            कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैदयकीय शिक्षण विभाग तसेच संबंधीत महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील, तसेच या परिपत्रकानंतर व प्रतिकात्मक स्वरुपातील मिरवणूक सुरु होण्याच्या मध्यल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, जळगाव जिल्ह्यात  ईद ए मिलाद (मिलादुन नबी) मिरवणूका वरील नमूद केलेल्या शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पोलीस प्रशासनाची पुर्व परवानगी घेऊन प्रतिकात्मक स्वरुपात काढण्यात याव्यात. असेही श्री. राऊत, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन आयोजन

             जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बीटीआरआय, आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने दि. 28 ते 30 ऑक्टोबर, 2020 या कालावधीत कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाईन पध्दतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

            उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा प्लेस्टोअरमधून mahaswayam ॲप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावे. असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

            उमेवारांनी या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी  www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. किंवा प्लेस्टोअरमधून महास्वयंम ॲप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावे. Employment पेजवरील Job Seeker हा पर्याय निवडून आपला नोंदणी /आधार क्रमांक व पासवर्डने साईनइन/लॉगईन करावे, आपल्या होमपेज वरील जॉबफेयर हा पर्याय निवडा, जळगाव जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करा, रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जळगाव ऑनलाईन जॉबफेयर दि. 28 ते 30 ऑक्टोंबर, 2020 या ओळीतील ॲक्शन मेनूतील दुस-या बटनावर क्लिक करा, आय ॲग्री हा पर्याय निवडा, पात्रतेनुसार मॅचीग झालेल्या विविध कंपन्यांच्या रिक्त पदांसाठी अप्लाय बटनावर क्लिक करा, 

            याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत 0257-2239605 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या सुवर्णसंधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

Monday, 26 October 2020

जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावर ट्रामा केअर सेंटर उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

            जळगाव (जिमाका) दि. 26 - रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरीकांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावर एरंडोल अथवा पारोळा याठिकाणी ट्रामा केअर सेंटर उभारण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागास तातडीने प्रस्ताव सादर करावा. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेत.

            जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे निर्देश दिलेत. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सी. एम. सिन्हा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक देविदास कुणगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनग्रा, उप अभियंता श्रीमती स्वाती भिरुड यांचेसह महापालिका, एसटी आदि विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, मोठ्या आस्थापना, एमआयडीसीमधील उद्योग, बँका, विद्यापीठ, महाविद्यालयात विविध कामासाठी येणारे नागरीक, विद्यार्थी यांना नो हेल्मेट, नो एंन्ट्री हे तत्व अवलंबण्याच्या सुचना द्याव्यात. यासाठी या सर्व आस्थापनांना तसे लेखी निर्देश देण्यात यावेत. त्याचबरोबर एसटी महामंडळाच्या बसेस ह्या थांब्यावर न थांबता इतरत्र थांबतात त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा यापुढे बसेस ह्या थांब्यावरच थांबविण्याच्या सुचना देण्यात आल्यात. महामार्गावर ओव्हरटेक करताना अनेक अपघात होतात याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने अपघाताची स्थळे दर्शविणारे फलक रस्त्यांवर तात्काळ लावण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत.

            मागीलवर्षीपेक्षा यावर्षी जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण 23 टक्क्यांनी घटले आहे. ऑगस्ट -2019 पर्यंत जिल्ह्यात 589 अपघातात 308 व्यक्तींचा मृत्यु झाला होता तर 593 व्यक्ती जखमी झाल्या होत्या. ऑगस्ट-2020 मध्ये 453 अपघात झाले असून यात 301 व्यक्तींचा मृत्यु झाला आहे तर 332 व्यक्ती जखमी झाल्या आहेत.  जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत 106 अपघात झाले आहे. सर्वाधिक 12 अपघात हे पारोळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाले आहे तर त्यानंतर चाळीसगाव ग्रामीण 11, मेहुणबारे, जळगाव एमआयडीसी हद्दीत प्रत्येकी 10 अपघात झाले असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी बैठकीत दिली.

            झालेल्या अपघातांच्या ठिकाणांचे निरिक्षण करुन वारंवार एकाच ठिकाणी अपघात होत असतील तर ते ठिकाण ब्लॅक स्पॉट ठरविण्यासाठी त्यांची संयुक्तपणे पाहणी करण्याच्या सुचनाही बैठकीत देण्यात आल्यात. तरसोद-चिखली रस्त्यांचे काम गतीने सुरु असून फागणे-नशिराबाद रस्त्याचे कामही वेगाने पूर्ण करावेत. काम सुरु असतांना वाहनचालकांसाठी आवश्यक त्या सुचना, चिन्हे रस्त्यावर लावण्याचे निर्देशही देण्यात आले. महानगरपालिका हद्दीतील रसत्याच्या मधोमध अथवा कडेला असलेल्या इलेक्ट्रिक पोल स्थलांतर करणे, सदोष वाहनांवर कारवाई करणे, त्याचबरोबर जळगाव-धुळे रस्त्यांवरील खड्डे राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्वरीत भरण्यात यावेत. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्यांवर झाडांच्या फांद्या वाढल्यामुळे अपघात होतात यावरही कार्यवाही करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी बैठकीत देण्यात आल्यात.

00000

Wednesday, 21 October 2020

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत मिळणार तीन हजारात साठ हजार रुपयांचे विमा संरक्षण

             जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) - नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. ही उद्दिष्ट्ये समोर ठेवून रब्बी हंगाम 2020-21 मध्ये जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन (Area Approach) राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

            पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक आहे, नुकसान भरपाई कृषि आयुक्तालयामार्फत पीक उत्पादनाच्या अंदाजासाठी घेतलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या उत्पादकतेच्या सरासरी आकडेवारीवर आधारित असेल, जोखीमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. 

            या योजनेत सहभागासाठी रब्बी ज्वारी 30 नोव्हेंबर, गहु बागायती, हरभरा व रब्बी कांदासाठी 15 डिसेंबर, 2020, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूगसाठी 31 मार्च, 2021 ही सहभागाची अंतिम तारीख आहे. कर्जदार शेतकरी यांनी योजनेत सहभागी न होण्याची व विमा हप्ता कर्ज रक्कमेतुन वजावट करुन विमा कंपनीकडे वर्ग न करण्याची सूचना बँकेला देण्याची अंतिम मुदत ही नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस आधीपर्यंत आहे.

            सर्व अन्नधान्य व गळित धान्य पिकांसाठी संरक्षित रक्कमेच्या 1.5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते आणि कांदा पिकासाठी संरक्षित रक्कमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल त्या दराने विमा हप्ता आकारला जाईल. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के इतका राहील.

            बागायती गहूसाठी विमा संरक्षित रक्कम 30 हजार रुपये असून शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम 450 रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. बागायती व जिरायती ज्वारीसाठी विमा संरक्षित रक्कम 24 हजार रुपये तर शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम 360 रुपये प्रति हेक्टर, हरभरा पिकासाठी विमा संरक्षित रक्‌कम  27 हजार रुपये, शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम 405 रुपये प्रति हेक्टर, उन्हाळी भुईमुगसाठी विमा संरक्षित रक्कम 35 हजार रुपये, शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम 525 रुपये प्रति हेक्टर, रब्बी कांदासाठी विमा संरक्षित रक्कम 60 हजार रुपये तर शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम 3 हजार रुपये प्रति हेक्टर इतकी आहे.

            जिल्ह्यात रब्बी हंगाम 2020-21 मध्ये सदरची योजना भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कंपनी लि. मिलेनियम स्टार 309, 310, 111 बिल्डींग, ढोले पाटील मार्ग, रुबी हॉल क्लिनिकजवळ, पुणे, महाराष्ट्र-411 001 टोल फ्री क्र - 1800 103 7712 यांचेमार्फत राबविण्यात येत आहे.

            रब्बी हंगाम 2020-21 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांनी सहभागी होण्यासाठी जवळच्या बँकेत, आपले सरकार सेवा केंद्र, जे. डी. सी. सी. बँक यांचेशी संपर्क करुन सहभाग नोंदवावा. अथवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर स्वत: सहभाग नोंदविण्याची सुविधा आहे. कर्जदार शेतक-यांचा हप्ता संबंधित बँकेव्दारे भरला जाऊन सहभाग नोंदविला जातो.

             अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँक, आपले सरकार सेवा केंद्र, तालुका कृषि अधिकारी कार्यालय (सर्व तालुके), उपविभागीय कृषि अधिकारी, जळगाव/पाचोरा/अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव, आकाशवाणी शेजारी, प्रशासकीय इमारत येथे संपर्क साधावा. असे आवाहन संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी अर्ज करण्यास 2 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

         जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) - राष्ट्रीय कृषी विकास योजना सन 2020-21 अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना राबविण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेतंर्गत रोपवाटिकेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक शेतक-यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या योजनेत टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिकेची उभारणी करायची असून यामध्ये 3.25 मी. उंचीचे Fiat type शेडनेटगृह उभारणी प्लॉस्टिक टनेल, पॉवर नॅपसॅक स्प्रेअर व प्लॉस्टिक क्रेटस इत्यादी घटकांतर्गत मार्गदर्शक सूचनेप्रमाणे 50 टक्के प्रमाणे  2 लाख 30 हजार रुपये अनुदान देय राहणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक असलेल्या शेतक-यांना अर्ज करणेसाठी दिनांक 2 नोव्हेंबर, 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार शेतक-यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचेकडे ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

        लाभार्थी निवडीचे निकष - अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे, रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करतांना अर्जदाराने अर्जासोबत स्वत: 7/12 उतारा, 8-अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, इत्यादी कागदपत्रे सादर करावीत. प्राप्त लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थी निवडीच्या प्राधान्यक्रमानुसार तालुकास्तरावर सोडत पध्दतीने लाभार्थी निवड करण्यात येईल. महिला कृषी पदविकाधारकांना प्रथम प्राधान्य राहिल, महिला गट/महिला शेतकरी व्दितीय प्राधान्य राहिल, भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्पभुधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहिल.

            योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील कृषी सहाय्य्क/कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

जिल्ह्यात 19 भरडधान्य खरेदी केंद्र मंजूर 1 नोव्हेंबरपासून आधारभूत किंमतीनुसार होणार खरेदी

         जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) - खरीप पणन हंगाम 2020-21 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य (ज्वारी/मका/बाजरी) खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यात 19 भरडधान्य खरेदी केंद्र मंजुर केले आहे. या योजनेतंर्गत दिनांक 1 नोव्हेंबर, 2020 ते 31 डिसेंबर, 2020 या कालावधीत आधारभूत किंमतीत व भरडधान्याच्या गुणवत्ता व दर्जानुसार खरेदी करण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.

        संकरीत ज्वारीसाठी आधारभूत किंमत व शेतक-यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर हा 2620 रुपये इतका आहे. मालदांडी ज्वारीसाठी 2640 रुपये, बाजरीसाठी 2150 रुपये, मकासाठी 1850 रुपये इतका आहे.

            भरडधान्य खरेदीकरीता जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जळगाव यांचेकडील तालुकानिहाय खरेदी केंद्रांचा तपशील जळगाव-जळगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ. लि. जळगाव, जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सह संस्था मर्या, अमळनेर-अमळनेर तालुका शेतकी सहकारी संघ लि, पारोळा-पारोळा तालुका शेतकरी सहकारी संघ लि, चोपडा-चोपडा तालुका शेतकरी सहकारी संघ लि, धरणगाव-अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ लि, एरंडोल-एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघ लि, यावल-कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी. संघ लि, रावेर-रावेर तालुका शेतकरी सहकारी संघ. लि, मुक्ताईनगर-मुक्ताईनगर तालुका शेतकरी सहकारी संघ लि, बोदवड-बोदवड को. ऑप. खरेदी विक्री युनि.लि, भुसावळ- भुसावळ तालुका शेतकरी सहकारी संघ लि, जामनेर-जामनेर तालुका शेतकरी सहकारी संघ.लि, पाचोरा- शेतकरी सहकारी संघ लि. पाचोरा, भडगाव-शेतकरी सहकारी संघ लि. भडगाव, चाळीसगाव- शेतकरी सहकारी. संघ लि. भडगाव, शेंदुर्णी-शेंदुर्णी सहकारी खरेदी विक्री जिनिंग प्रेसिंग सोसा लि. याप्रमाणे 17 केंद्र आहेत. तर आदिवासी विकास महामंडळ मर्या. प्रादेशिक कार्यालय नंदुरबार यांचेमार्फत यावल-आदिवासी विकास विविध कार्यकारी सहकारी संस्था, हरीपुरा, ता यावल व चोपडा-आदिवासी विकास विविध कार्यकारी सहकारी संस्था, कर्जाणा, ता. चोपडा याप्रमाणे दोन केंद्र मंजूर आहेत.

            याप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील एकूण 19 भरडधान्य खरेदी केंद्रासाठी उप अभिकर्त्या संस्थांना मंजुरी देण्यात आली आहे. शासनाकडून वेळोवेळी आलेल्या निर्देशानुसार भरडधान्याची खरेदी केली जाईल. अधिक तपशीलासाठी संबंधित खरेदी केंद्राशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                     00000