Thursday, 15 October 2020

प्रधानमंत्री पिक विमा योजना-2020 काढणी पश्चात नुकसान जोखिम संदर्भात करावयाची कार्यपध्दती

 जळगाव, दि. 15 (जिमाका) - प्रधानमंत्री पिक विमा योजनेतर्गत शेतक-यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान (Localized Calamities) व नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान (Post Harvest Losses) इत्यादी बाबींकरीता विमा संरक्षण दिले जाते.

राज्यातील काही जिल्ह|यांमध्ये माहे ऑक्टोबरमध्ये पाऊस झाल्याने पिकांचे काढणीनंतर नुकसान होण्याची शक्यता आहे. हंगाम कालावधीत अधिसुचित क्षेत्रातील शेतात पिक कापणी करुन सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकांसाठीच, कापणी पासून जास्तीत जास्त 2 आठवडयांपर्यंत (14 दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसापासून नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे.

काढणीपश्चात नुकसान जोखिम अंतर्गत नुकसान भरपाईचे निकष

अधिसुचित विमा क्षेत्रात अधिसुचित पिक घेणाऱ्या व पूर्वसुचना दिलेल्या शेतकऱ्यांसाठी सदर तरतुद वैयक्तिक स्तरावर लागु राहील. जास्तीतजास्त दायित्व हे अधिसुचित पिकाच्या बाधित क्षेत्राच्या विमा संरक्षित रक्कमेएवढे राहील. या बाबीअंतर्गत जोखिमचा धोका घडेपर्यंत पिकाच्या लागवडीसाठी झालेल्या निविष्ठा खर्चाच्या प्रमाणात नुकसान भरपाई विमा संरक्षित रकमेच्या अधीन राहील.

 पीक नुकसानीची माहिती कळविण्याची पध्दत

शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत याबाबतची पुर्वसुचना Crop Insurance App अथवा टोल फ्री क्रमांकाद्वारे विमा संबंधीत व कृषि विभागास द्यावी. सर्वप्रथम प्राधान्याने Crop Insurance App या मोबाईलॲपद्वारे पुर्वसुचना देण्यात यावी. मोबाईल ॲपद्वारे शक्य न झाल्यास संबंधित विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर सुचना देण्यात यावी, अथवा सदर आपत्तीची माहिती बँक/कृषि विभाग यांना द्यावी. तसेच सदरची माहिती संबंधित बँक/विभागाकडून संबंधित विमा कंपनीस तात्काळ पुढील 48 तासात पाठवण्यात येईल. इतर नोंदणी स्त्रोतांकडून प्राप्त पुर्व सुचनांची नोंद संबंधित कार्यालयाने विमा कंपनीने राष्ट्रीय पिक विमा पोर्टलवर करावी.

नुकसान भरपाई निश्चित करणेसाठी सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे

 नुकसान भरपाईबाबत पुर्वसुचना मोबाईल ॲपद्वारे कळविली नसल्यास शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह (शेतकऱ्याचे नाव, बाधित सर्व्हे नंबर व पीकनिहाय बाधित क्षेत्र, पोर्टलवरील शेतकरी अर्ज क्रमांक, मोबाईल नं., KCC A/c No. (कर्जदार शेतकऱ्यांसाठी), बचत खाते नं. (बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी), विमाहप्ता भरल्याचा पुरावा विमा कंपनीस विहित कालावधीत सादर करणे आवश्यक आहे.

शेतकरी परिपुर्ण माहितीसह विहित नमुन्यातील अर्ज सादर करू न शकल्यास उपलब्ध माहितीच्या आधारे अर्ज सादर करू शकतील. परंतु अर्जातील उर्वरीत माहिती 7 दिवसांच्या आत विमा कंपनीस सादर करणे आवश्यक राहील. पीक नुकसानीचा पुरावा म्हणून Crop Insurance App या मोबाईल ॲपद्वारे नुकसानग्रस्त क्षेत्राचे छायाचित्रे विमा कंपनीस पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पीक नुकसानीची पुर्वसुचना देण्यासाठीचे "Crop Insurance App"हे मोबाईल ॲप Google Play Store वरुन download करावे.

पीक नुकसानीचे सर्वेक्षण संयुक्त समितीमार्फत करण्यात येईल, ज्यात विमा कंपनीचा शासन प्रतिनिधी आणि संबंधित शेतकरी यांचा समावेश राहील. संयुक्त समितीने विहीत प्रमाणात केलेल्या नमूना सर्वेक्षणाचे आधारे विमा कंपनीमार्फत नुकसानीचे प्रमाण ठरविण्यात येईल.  काढणी पश्चात जोखिम करीता, जर बाधित क्षेत्र हे अधिसुचित विमा क्षेत्राच्या 25 टक्के पर्यंत असेल तर वैयक्तिक स्तरावर व 25 टक्के पेक्षा जास्त असेल तर अधिसुचित क्षेत्रातील सर्व पात्र शेतकऱी (विमा योजनेत सहभागी झालेले व पिकाचे नुकसान विहित वेळेत पूर्वसूचना दिलेले) नुकसान भरपाईस पात्र होतील.

खरीप हंगाम-2020 मध्ये जळगाव जिल्ह्यासाठी अंमलबजावणी करणारी विमा कंपनी भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि. ही असून टोल फ्री क्रमांक 18001037712 असा आहे. काढणी पश्चात जोखिम अंतर्गत उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करणेबाबत जिल्हा प्रशासन व सर्व संबंधित विमा कंपनींना सुचना देण्यात आल्या असून विमा कंपनीमार्फत सर्वेक्षणासाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. असे कृषि उपसंचालक (माहिती) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment