Saturday, 28 November 2020

शहीद जवान यश देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार राज्य शासनाच्यावतीने कुटूबियांना एक कोटी रूपयांची मदत जाहीर

 
























 

            जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 28 -  ‘शहीद यश देशमुख अमर रहे’ च्या जयघोषात इन्फन्ट्री बटालियन 101 मध्ये कार्यरत असलेले शहीद जवान यश दिंगबर देशमुख यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12 वाजता त्यांच्या मूळगावी पिंपळगाव,  ता. चाळीसगाव, जि. जळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

            गुरुवार 26 नोव्हेंबर, 2020 रोजी दुपारी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात यश देशमुख यांना वीरगती प्राप्त झाली होती. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पिंपळगाव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

            यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, राज्याचे कृषी व सैनिक  कल्याण मंत्री दादाजी भुसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजित राऊत,  अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राहुल पाटील, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर आदींसह अधिकारी, देशमुख कुटुंबीयांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            शहीद यश देशमुख यांच्या पार्थिवास सैन्य दलाच्या जवानांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. राज्य शासनाच्या वतीने सैनिक कल्याण मंत्री श्री. भुसे, पालकमंत्री श्री. पाटील यांच्यासह खासदार श्री. पाटील, आमदार श्री. चव्हाण यांनी, तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी श्री. राऊत, पोलीस दलाच्यावतीने श्री. गोरे, सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने श्री. पाटील, उपविभागीय अधिकारी श्री. साताळकर यांनी व लष्कराच्यावतीनेही पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

            सैनिक कल्याण मंत्री श्री. भुसे म्हणाले, दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात यश देशमुख शहीद झाले. त्यांच्या कुटुंबीयाप्रती राज्य शासनाच्या सहवेदना असून यश यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्या वतीने एक कोटी रुपयांची मदत करण्यात येईल. पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शहीद यश देशमुख यांच्या कार्याची दखल घेण्यात येईल. शहीद देशमुख यांच्या गावाच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे सांगितले. खासदार श्री. पाटील म्हणाले, की जवान यश देशमुख यांनी देशाच्या संरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची नोंद इतिहासात होईल. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही तसेच त्यांचे यशोथित स्मारक उभारण्यात येईल, असे आमदार श्री. चव्हाण यांनी श्रध्दांजली वाहताना सांगितले. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच संतोष देशमुख यांनी श्रध्दांजली वाहिली.

            तत्पूर्वी सकाळी नऊ वाजता यश यांचे पार्थिव घरी आणण्यात आले. कुटूबिय व नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर  फुलांनी सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर त्यांना पोलिस दल, सैन्य दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर यश देशमुख यांच्या पार्थिवास त्यांचे लहान बंधू पंकज यांनी अग्नीडाग दिला. शहीद यश यांच्यामागे आई- वडील दिगंबर देशमुख, सुरेखाबाई देशमुख, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.

00000

Friday, 27 November 2020

रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तन सुटणार 5 डिसेंबरला पहिले आवर्तन सोडण्यात येणार - पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

 

            जळगाव (जिमाका) दि. 27 - रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तन सोडण्यात येणार असून पहिले आवर्तन 5 डिसेंबरला सोडण्यात येईल. अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

            येथीलअजिंठा विश्रामगृहात गिरणा कालवा सल्लागार समीतीच्या बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस आमदार चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता आनंद मोरे, गिरणा पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एम. एस.आमले, कार्यकारी अभियंता धर्मेद्रकुमार बेहरे, सल्लागार समीतीचे सदस्य प्रशांत पवार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, दत्तु ठाकूर, पाचोरा, भडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी, मालेगाव महानगरपालिका, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे व नाशिक, अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रतिनिधी यांचेसह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            गिरणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या तीन आवर्तनामुळे रब्बी हंगामास मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून गिरणा प्रकल्पामुळे 23905 तर पांझण प्रकल्पामुळे 3642 असे एकूण 27 हजार 544 हेक्टर क्षेत्र भिजणार आहे. शेतकऱ्यांना गव्हाणी पेरणी करावयाची असल्याने पहिले आवर्तन तातडीने सोडण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्यामुळे पाटबंधारे विभागाने येत्या 5 डिसेबरला पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना गव्हाच्या पेरणीला मोठी मदत होणार आहे. तर त्यानंतर पुढील आवश्यकता लक्षात घेऊन दोन आवर्तन सोडावे असा आग्रह पालकमंत्री यांनी घेतल्याने याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम बहरणार

            गिरणा धरण सलग दुसऱ्यावर्षी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन सोडण्याचा निर्णय पालकमंत्री यांनी घेतला. त्यामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम बहरणार आहे. गिरणा धरणावर एकूण 69 हजार 350 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्यात जळगाव जिल्ह्यातील 57 हजार 209 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते.

            तर गिरणा धरणातून मालेगाव महानगरपालिका, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा नगरपालिका, मजीप्राच्या 2 योजना यात मालेगाव तालुक्यातील 25 गावे व नांदगाव तालुक्यातील 56 खेडी योजना त्याचबरोबर चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल तालुक्यातील 154 गावांना पिण्यासाठी पाणी पुरविण्यात येते. यानुसार हे पाणी वगळून सिंचनासाठी आवर्तन सोडण्याबाबत तसेच सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी वसुली व थकबाकीबाबतही बैठकीत चर्चा झाली.

            गिरणा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवानी रब्बी हंगामासाठी पाणी हवे असल्यास तत्काळ त्या त्या शाखांकडे फार्म भरण्याबाबत सहकार्य करावे. त्यामुळे पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन करता येईल. असे आवाहन धर्मेद्रकुमार बेहरे, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे जळगाव यांनी केले आहे.

00000

जी.डी.सी.ॲड ए परिक्षेचे गुणपत्रक 15 डिसेंबरपूर्वी घेऊन जाण्याचे आवाहन

             जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि.27 - जळगाव केंद्रावर माहे मे-2019 मध्ये घेण्यात आलेल्या जी.डी.सी ॲन्ड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल सचिव, जी.डी. सी.ॲड ए परिक्षा बोर्ड, व्दारा- सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी जाहीर केला आहे. या परिक्षार्थीना निकालाचे वाटप 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर, 2020 या कालावधीत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांचे कार्यालयाकडून करण्यात येणार आहे.

            तरी परिक्षार्थीनी माहे मे-2019 मध्ये जळगाव केंद्रावर जी.डी.सी ॲन्ड ए व सहाकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा दिलेली आहे. अशा परिक्षार्थीनी निकालाचे गुणपत्रक/प्रमाणपत्र 15 डिसेंबर, 2020 पूर्वी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव प्रशासकीय इमारत, टप्पा क्र. 3 पहिला माळा, आकाशवाणी चौकाजवळ, जळगाव यांचे कार्यालयाशी संपर्क साधून प्राप्त करुन घ्यावेत. जे परिक्षार्थी दिनांक 15 डिसेंबर, 2020 पर्यत सदर निकालाचे गुणपत्रक / प्रमाणपत्र प्राप्त करुण घेणार नाहीत. अशा परिक्षार्थींना निकालाचे गुणपत्रक/प्रमाणपत्र दिनांक 16 डिसेंबर, 2020 नंतर पोष्टाव्दारे पाठविण्यात येईल. असे संतोष बिडवई, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी कळविले आहे.

००००

वन स्टॉप सेंटर हक्काच्या जागेत कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न करा - महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर

 


            जळगाव, (जिमाका) दि. 27 - पीडीत महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत वन स्टॉप सेंटर सुरु करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात या सेंटरच्या बांधकामासाठी प्रशासनाने जागा उपलब्ध करुन दिली आहे. सदर सेंटरच्या बांधकामासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळवून बांधकाम लवकरात लवकर सुरु होईल यासाठी प्रयतन करावेत. अशा सुचना राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी दिले.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंत्री ॲङ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली कोविड आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस बैठकीस आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंडे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार, विभागीय उपायुक्त चंद्रकांत पगारे, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, ॲड संदिप पाटील यांचेसह नोडल अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री ॲड ठाकूर पुढे म्हणाल्या की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने आवश्यक ते नियोजन करावे. शाळा सुरु झाल्यानंतर मुलांची सुरक्षितता जपण्याच्या सुचनांही त्यांनी दिल्यात. त्याचबरोबर पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. यासाठी सोनोग्राफी सेंटरच्या तपासण्या वाढविल्या पाहिजेत. महिला व बाल हक्क संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. महिलांवर अत्याचार होणार नाही यासाठी त्यांच्या संरक्षण व सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. सायबर क्राईममुळे फसवणुक झालेल्या महिलांना न्याय मिळवून द्यावा. खाजगी आस्थापनेत बाल कामगार ठेवले जाणार नाही याची काळजी घ्यावी, महिलांच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा, महिला व बाल विकास आणि पोलीस विभागाने महिलांचे समुपदेशन करावे. याकरीता जिल्ह्यातील वन स्टॉप सेंटरद्वारे अधिक प्रभावीपणे काम होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.   

            यावेळी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी महिला व बाल विकास विभागाच्या उपक्रमांना सर्वातोपरी सहकार्य करण्यात येत असल्याचे सांगितले यासाठी दरमहा आढावा बैठक घेण्यात येते. महिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पोलीस विभागामार्फत‍ स्वतंत्र पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मुंडे यांनी दिली. तर अधिष्ठाता डॉ. रामानंद व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी कोरोनाची सद्य:परिस्थिती याबाबतची माहिती बैठकीत दिली.

            बैठकीच्या सुरुवातीस श्रीनगर येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश देशमुख यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

000000

राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीसांना पात्रतेनुसार पदोन्नती देणार -महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर

 







            जळगाव, (जिमाका) दि-. 27 - कोरोनाच्या काळात खऱ्या अर्थाने कोरोना योध्दे म्हणून काम करणाऱ्या राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना पात्रतेनुसार पदोन्नती देणार असल्याचे माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी दिली.

            येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंत्री ॲड ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बाल विकास विभागाची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील आमदार शिरीष चौधरी ,आमदार लताताई सोनवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महिला व बाल कल्याण समिती सभापती ज्योतीताई पाटील, जि. प. गटनेते प्रभाकर सोनवणे, विभागीय उपायुक्त चंद्रकांत पगारे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

            मंत्री ॲड ठाकूर पुढे म्हणाल्या की, बालकांचे संरक्षण होण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम बाल संरक्षण समिती गठीत करणे आवश्यक आहे. तसेच ग्राम बाल संरक्षण केंद्र स्थापन करावे. प्रत्येक गावात सुसज्ज अशा अंगणवाड्या असाव्यात याकरीता जिल्हा परिषदेच्या सेस व जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून अंगणवाडीचे बांधकाम करण्यात यावेत. तसेच याठिकाणी मुलांना पिण्याचे स्वच्छ पाणी व शौचालयाची व्यवस्था असणे आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात राज्य शासनाच्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांचे मानधन वेळेवर दिले पाहिजे. जिल्ह्यातील महिला व बालकांचा विकास व्हावा, त्यांचे संरक्षण व्हावे याकरीता प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास भवन उभारण्यात येणार आहे. त्याकरीता तातडीने जागा उपलब्ध करुन घ्यावी.  यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून 3 टक्के निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विभागास मिळणाऱ्या निधीचा वापर योग्य पध्दतीने करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.  जिल्ह्यात जास्तीत जास्त अंगणवाड्या आयएसओ मानांकित करण्यात याव्यात तसेच स्मार्ट अंगणवाड्याची संख्या वाढवावी. महिलांच्या संरक्षणास व समुपदेशनास प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागास दिले.

            यावेळी मंत्री ॲड ठाकूर यांनी महिला अत्याचाराच्या घटना, कुमारी मातांचे प्रमाण, मुलींचे गुणोत्तर, पीसीपीएनडीसी कायदा, पुरक पोषण आहार योजना, कुपोषित बालकांचे प्रमाण, माझी कन्या भाग्यश्री योजना, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना एकरक्कमी लाभ प्रकरणे, अंगणवाडी इमारत बांधकामाची स्थिती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना आदिंचा आढावा घेतला.

            जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी श्री. आर. आर. तडवी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी विभागाचा आढावा सादर केला.

            यावेळी मंत्री ॲड ठाकूर यांच्या हस्ते बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानातंर्गत तयार करण्यात आलेल्या ‘डिजिटल डॉल’ चे उद्घाटन करण्यात आले. तसेच माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे, अनाथ मुलांना प्रमाणपत्राचे, तेजस्वी फायनान्स कार्यक्रमातंर्गत कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या महिलांना मदतीचे धनादेशाचे वितरण प्रातिनिधीतक स्वरुपात करण्यात आले. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने बिसमिल्ला स्वयंसहाय्यता बचत गट, मेहरुण, धनलक्षमी महिला बचत गट, बांभोरी यांना मंजूर केलेल्या कर्जाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

            जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित होऊन चार अंगणवाडी सेविकांच्या मृत्यू झाला. यावेळी त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

            या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे तसेच महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच लाभार्थ्यांचे कुटूंबिय उपस्थित होते.

00000