Friday, 31 July 2020

एकजुट व एकदिलाने संसर्गाची साखळी तोडून कोरोनावर मात करुया - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

  जळगाव, दि. 31 (जिमाका) - जळगाव जिल्हावासियांनी स्वयंशिस्तीचे पालन करत एकजुटीने, एकदिलाने कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडून त्यावर मात करायची आहे. त्यासाठी सर्वांनी ‘शासनाचे दूत’ म्हणून प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जळगावकरांना केले.
 
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्री. राऊत यांनी आज जळगावकरांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. जळगावकरांचाही मोठ्या प्रमाणात या लाईव्हप्रसंगी प्रतिसाद मिळाला. संवादाच्या सुरूवातीस श्री. राऊत यांनी जळगावातील कोविड योद्धे प्रयत्नांची पराकाष्टा करीत या युद्धात रात्रंदिवस काम करत आहेत. या यंत्रणांचे मनोबल उंचावणे आपणा सर्वांसाठीच महत्त्वाचे आहे. प्रशासनातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी पूर्ण क्षमतेने कार्य करत आहे. परंतु काम करताना होणाऱ्या चुका प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचे कार्यही नागरिकांनी करावे, त्याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांनी प्रशासनासोबत येऊन प्रशासनास सहकार्य करावे, चुका असतील त्या कळवाव्यात, नागरिकांच्या सूचनांची तत्काळ दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे श्री. राऊत म्हणाले.

‘मीच माझा रक्षक’ म्हणून काम करावे

  लॉकडाऊन, कर्फ्यूने परिस्थिती नियंत्रणात येईलही, परंतु नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळत मास्कचा वापर करणे, वारंवार हात साबणाने धुणे, शारीरिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा वापर करावा. तसेच स्वयंशिस्तीने सामाजिक जीवनात आपली जबाबदारी ओळखून समाजात जनजागृती तर करावीच, याचबरोबर ‘मीच माझा रक्षक’ माणून आपली स्वत:ची व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावे, असे आवाहनही श्री. राऊत यांनी केले.

येता कणकण तापाची, तपासणी करा कोरोनाची

  जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. परंतु प्रशासन पूर्ण क्षमतेने या रुग्णांच्या सोयी सुविधा, उपचार याबाबत पूर्णत: प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ही आपल्या जिल्ह्यासाठी समाधानाची व दिलासादायक बाब असली तरी नागरीकांनी कोरोना सदृश्य लक्षणे जाणवताच त्वरीत आपली तपासणी करुन घ्यावी. रॅपिड ॲटीजेन टेस्टमुळे दोन तासात तपासणी अहवाल मिळतो. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन न जाता आपली तपासणी करुन घ्यावी.

कोरोनाची लस आपल्याच हातात

  या संवादातील कोरोनाची लस कधी येणार ? या प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले की, कोरोनाची सर्वात मोठी लस आपल्याच हातात आहे ती म्हणजे आपला मास्क होय. आता आपण मिशन बिगिनच्या तिसऱ्या टप्प्याकडे जात आहोत. या टप्प्यात अनेक बाबीं सुरु होणार आहे. त्यामुळे रस्त्यांवर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशावेळी प्रत्येक नागरीकाने आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. कोरोनाला हरविण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असून नागरीकांनी बाहेर पडतांना मास्क वापरला पाहिजे. सोशल डिस्टिन्सिंगचे पालन केले पाहिजे.

मृत्यू दर कमी करण्यावर भर

  जळगाव जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या अनुभवावरून जळगाव महापालिका, अमळनेर, भुसवाळ, चोपडा व रावेर या भागात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रसारावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने पूर्णत: कंबर कसलेली आहे. जिल्ह्याचा यापूर्वीचा मृत्यू दर हा 13 टक्के होता, आता हाच दर 4.66 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मृत्यू दर आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न सुरूच ठेवलेले आहेत. विशेषत: यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट या ‘ट्रीपल टी’ चा अवलंब करण्यात येत आहे. संक्रमित व संशयित लोक लवकर शोधून त्यांचेवर त्वरीत उपचार उपलब्ध करुन दिल्याने जिल्ह्यातील मृत्युदर कमी करण्यात आपल्याला यश मिळाले आहे. नागरीकांना आपल्याला कोणताही त्रास होत असेल तर सांगितले पाहिजे. कुणीही आपल्या जुन्या आजारांची माहिती लपवू नये. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढवा

  जो व्यक्ती सुदृढ आहे तो कधीही आजारी पडत नाही. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे अहे. शासनाने तसेच आयुष मंत्रालयाने सांगितलेला आयुर्वेदिक काढा, अर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्या, योग्य आहार, व्यायाम, झोप यांचा अवलंब जीवनशैलीत करावा, असे सांगून श्री. राऊत म्हणाले की. आपण जिल्ह्यातील नागरीकांना 15 लाखापेक्षा अधिक अर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप केले आहे.

लोकसहभागाचा जळगाव पॅटर्न देशभर नावाजला

  कोरोनाच्या महामारीला हरविण्यासाठी अवघे जळगावकर एकवटले आहे. कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी आपले योगदान दिले आहे. त्यामुळेच अवघ्या एका महिन्यात जिल्ह्यात लोकसहभागातून 600 ऑक्सिजनयुक्त बेड तयार झाले आहे. जिल्ह्याच्या या लोकसहभागाच्या जळगाव पॅटर्नचे देशभरातून कौतूक होत आहे. याबद्दल जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींचे व मदत करणाऱ्यांचे धन्यवाद मानले.

स्वयंशिस्त पाळा

  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अद्याप काही बाबी सुरु करण्यास शासनाची परवानगी नसली तरी ऑनलाईन शिक्षणाला परवानगी दिलेली आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंग पाळून मोकळ्या जागेत व्यायाम करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरीकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, जे नागरीक शासनाच्या नियमांचे पालन करीत नाही, विनाकारण फिरत आहेत. त्यांचेवर पोलीस विभागाने कारवाया केल्या आहेत, गुन्हेही दाखल केले आहेत. पण अशी परिस्थिती उद्भवु नये म्हणून प्रत्येकाने स्वयंशिस्त लाऊन घेणे महत्वाचे असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यक्रमाच्या समारोपात म्हणाले.

00000

Thursday, 30 July 2020

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 50 हजार कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅबचे घेतले नमुने


*       7016 रुग्ण बरे होऊन घरी गेले
पैकी 37 हजार 599 तपासणी अहवाल निगेटिव्ह तर 10 हजार 591 अहवाल आले पॉझिटिव्ह.
रॅपिड ॲटिंजेन टेस्टद्वारे केल्या 7809 व्यक्तींच्या तपासण्या

  जळगाव, (जिमाका) दि. 30 - जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर उपाययोजना करण्यासाठी आतापर्यंत (29 जुलैपर्यंत) 49 हजार 457 कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 37 हजार 599 तपासणी अहवाल निगेटिव्ह तर 10 हजार 591 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिवाय इतर अहवालाची संख्या 637 असून अद्याप 706 अहवाल प्रलंबित असल्याची आहे. एकूण करण्यात आलेल्या तपासण्यांपैकी 7809 तपासण्या या रॅपिड ॲटिजेंन टेस्टद्वारे करण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
  जिल्ह्यात संशयित म्हणून तपासणी करण्यात आलेल्या 49457 व्यक्तींपैंकी 10591 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात केलेल्या तपासण्यांपैकी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचा दर हा 21.41 इतका आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 7016 रुग्णांची कोरोनावर मात
  जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66 टक्क्यांपर्यंत गेले आहे. बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 7016 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये जळगाव शहर 1828, जळगाव ग्रामीण 235, भुसावळ 589, अमळनेर 488, चोपडा 471, पाचोरा 226, भडगाव 348, धरणगाव 348, यावल 339, एरंडोल 347, जामनेर 322, रावेर 483, पारोळा 363, चाळीसगाव 171, मुक्ताईनगर 258, बोदवड 171, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या 29 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या 3082 ॲक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
  जिल्ह्यात सध्या ॲक्टीव्ह असलेल्या 3082 कोरोना बाधित रुग्णांपैकी कोविड केअर सेंटरमध्ये 2003, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 360, तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल मध्ये 548 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये जळगाव शहर 770, जळगाव ग्रामीण 226, भुसावळ 221, अमळनेर 160, चोपडा 227, पाचोरा 124, भडगाव 52, धरणगाव 109, यावल 76, एरंडोल 134, जामनेर 359, रावेर 154, पारोळा 85, चाळीसगाव 246, मुक्ताईनगर 65, बोदवड 62, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 12 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आढळले 10 हजार 591 बाधित रुग्ण
  जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 हजार 591 इतकी झाली आहे. यामध्ये जळगाव शहर 2692, जळगाव ग्रामीण 492, भुसावळ 870, अमळनेर 689, चोपडा 725, पाचोरा 373, भडगाव 412, धरणगाव 481, यावल 449, एरंडोल 497, जामनेर 715, रावेर 683, पारोळा 455, चाळीसगाव 445, मुक्ताईनगर 333, बोदवड 239, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या 41 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात 1898 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला भागाचे निर्जतुकीकरण करणे तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यासाठी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 1898 ठिकाणे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 685, शहरी भागातील 601 तर जळगाव महापालिका क्षेत्रातील 612 ठिकाणांचा समावेश आहे.
प्रतिबंधित क्षेत्राच्या सर्व्हेक्षणास 3117 टिम कार्यरत, 8 लाख 4 हजार 656 लोकसंख्येचे सर्व्हेक्षण पूर्ण
  कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर घोषित करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्राचे सर्व्हेक्षणासाठी जिल्ह्यात 3117 टिम कार्यरत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 1040, शहरी भागातील 1129 तर जळगाव महापालिका क्षेत्रातील 948 टिम घरोघरी जाऊन तसेच नागरीकांची तपासणी करीत आहेत. या टिमच्या माध्यमातून जिल्हाभरात आतापर्यंत 1 लाख 78 हजार 448 घरांचे तर 8 लाख 4 हजार 656 लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यापैकी 2 लाख 81 हजार 693 लोकसंख्या ग्रामीण भागातील तर उर्वरित लोकसंख्या नगरपालिका, नगरपंचायत व महापालिका क्षेत्रातील आहे.
जिल्ह्याचा मृत्युदर 4.65 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश
जिल्ह्यात आतापर्यंत 493 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. यापैकी 414 मृत्यु म्हणजेच 84 टक्के मृत्यु हे 50 वर्षावरील वयोगटातील आहेत. तर एकूण मृत्युपैकी 273 मृत्यु हे जुने आजार, विविध व्याधी असल्याने झाले आहे. बाधित रुग्णांपैकी विचार केला असता जिल्ह्याचा मृत्युदर हा 4.65 टक्के इतका असून तो अजून कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरु असल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले.
               जिल्ह्यात सध्या संशयित रुग्ण शोध मोहिम सुरु असल्याने नागरिकांनी आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे. तसेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. लॉकडाऊनचे पालन करावे व घरातच सुरक्षित रहावे. अनावश्यक गर्दी टाळावी. सुरक्षित अंतर राखावे. मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
00000

महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये रविवारीही राखी टपालासाठी खास वितरण व्यवस्था

जळगांव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) - येत्या सोमवारी (3 ऑगस्ट रोजी) रक्षाबंधन हा सण असल्याने महाराष्ट्र पोस्टल सर्कलने रविवार 2 ऑगस्ट, 2020 रोजी सर्व वितरण पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे. दरवर्षी राखी टपाल हाताळण्यासाठी टपाल विभाग विशेष काळजी घेतो. यावर्षीदेखील राखी टपाल सेवा महाराष्ट्र राज्य पोस्टल सर्कलमधील पोस्ट ऑफिसवर बुक करावेत. असे आवाहन पु. बा. सेलूकर, अधीक्षक डाकघर, जळगाव डाक विभाग, जळगाव यांनी केले आहे. 
  राखी टपालाची प्राधान्यक्रमानुसार बुकिंग प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था महाराष्ट्रातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात आली आहे. राखी टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी राखी टपाल सेंटर, मुंबई व नवी मुंबई येथेही सुरु करण्यात आली आहे.
  कोविड काळात शहरात राहणा-या भावांना विविध निर्बंधांमुळे रक्षाबंधन सणासाठी बहिणीची भेट घेता येणार नाही. अथवा अनेक भाऊ-बहिणी कन्टेंमेंट झोन किंवा प्रतिबंधात्मक इमारतींमध्ये राहत असतील. ही बाब लक्षात घेऊन पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन व वितरण याला सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर या काळात स्पीड पोस्ट सेवेचाही नागरीक वापर करु शकतील. असेही अधीक्षक डाकघर, जळगाव डाक विभाग पु. बा. सेलूकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 
00000

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 31 जुलै रोजी साधणार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरीकांशी संवाद


  जळगाव, (जिमाका) दि 30 - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे.  या प्रयत्नांना आपल्या जळगाव जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व जनतेने समर्थ साथ दिली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात काही प्रश्न असू शकतात याची जिल्हा प्रशासनाला कल्पना आहे. लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, जळगावच्यावतीने फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी दिली आहे. 
  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शुक्रवार, दि. 31 जुलै, 2020 रोजी दुपारी 12:00 वाजता जनतेशी LIVE स्वरूपात संवाद साधून जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. 
  हा संवाद https://www.facebook.com/CollectorateJalgaon या फेसबुक पेजवरून साधणार आहेत. तेव्हा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना विषाणू व त्यासंबंधी जिल्ह्यातील परिस्थितीबाबत त्यांच्या मनातील शंका, समस्या, प्रश्न  या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडावेत. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी केले 
000000

Wednesday, 29 July 2020

हतनुर धरणाचे चोवीस दरवाजे पूर्ण उघडले नदीपात्रात 52 हजार 995 व्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु



·         हतनूर धरणाचे 24 दरवाजे पूर्ण, वाघूर धरणाचे 8 दरवाजे 0.1 मीटरने, बहुळा धरणाचे 2 दरवाजे 0.1 मीटरने तर बोरी धरणाचे 3 दरवाजे 0.15 मीटरने उघडले.
·         जिल्ह्यातील 13 मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरुळ सुकी, अग्नावती, हिवरा, तोंडापूर या सहा प्रकल्पांमध्ये 100 टक्के उपयुक्त साठा तर पाच प्रकल्पांमध्ये 65 टक्केच्यावर उपयुक्त साठा.
·         हतनूर धरणात 1.66 टीएमसी, गिरणा 8.35 टीएमसी, तर वाघूर धरणात 7.73 टीएमसी याप्रमाणे 17.74 टीएमसी इतका उपयुक्त साठा.
·         मध्यम प्रकल्पांमध्ये 154.96 दलघमी म्हणजेच 5.47 टीएमसी इतका उपयुक्त साठा
·         96 लघु प्रकल्पात 66.42 दलघमी म्हणजेच 2.35 टीएमसी इतका उपयुक्त साठा
जळगाव, (जिमाका) दि. 30 - जिल्ह्यातील धरण परिसरात गेल्या काही दिवासांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत चांगल्या प्रकारे वाढ होत असून अनेक मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये 17.74 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हतनूर धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे चोवीस गेट पूर्ण उघडण्यात आले असून धरणातून आज 52 हजार 995 व्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहे. अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम प्रकल्प आहे. तर 96 लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा 1427.51 दलघमी म्हणजेच 50.40 टीएमसी इतका आहे. 
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 1027.10 दलघमी म्हणजेच 36.26 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 502.54 दलघमी म्हणजेच 17.74 टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात 1.66 टीएमसी, गिरणा 8.35 टीएमसी, तर वाघूर धरणात 7.73 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. वाघूर धरणाच्या क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस झाल्याने धरणाचे 8 दरवाजे 0.1 मीटरने उघडण्यात आले असून धरणातून 2534 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 203.91 दलघमी म्हणजेच 7.20 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 154.96 दलघमी म्हणजेच 5.47 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. तर जिल्ह्यातील 96 लघु प्रकल्पात 66.42 दलघमी म्हणजेच 2.35 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.
            जिल्ह्यातील तेरा मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरुळ, सुकी, अग्नावती, हिवरा, तोंडापूर या सहा प्रकल्पांमध्ये 100 टक्के उपयुक्त साठा तर मोर 65.21 टक्के, बहुळा 63.28 टक्के, गुळ 78.30 टक्के, बोरी 80.53 टक्के, मन्याड 64.20 टक्के उपयुक्त साठा आहे. तर अंजनी 37.54 टक्के व भोकरबारी धरणात 5.68 टक्के उपयुक्त साठा असून बहुळा धरणाचे 2 दरवाजे 0.1 मीटरने तर बोरी धरणाचे 3 दरवाजे 0.15 मीटरने उघडले.
0000

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता 7 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


जळगांव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) - सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या 10 वी, 12 वी,  पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये सरासरी 60% गुण  किंवा त्यापेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झाले आहे. अशा जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थीना महामंडळाकडून जेष्ठता व गुणक्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यास उपलब्ध निधीच्या अधीन राहुन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.
  त्यानुसार 7 ऑगस्ट, 2020 च्या आत संपुर्ण कागदपत्रानिशी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जळगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, मायादेवी नगर स्टॉप समोर, हतनुर कॉलनी, जळगाव  येथे संपर्क साधावा. येताना सोबत खालीलप्रमाणे मुळ कागदपत्रे दोन प्रतीत आणावीत.
  दोन फोटो, मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकिटसह व जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इत्यादी कागदपत्रासह कार्यालयात संपर्क साधावा. असे ताराचंद कसबे, जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0000

पाणी पुरवठा विभागातील तालुकास्तरावरील समुह व गट समुह समन्वयकांच्या सेवा 30 सप्टेंबरपर्यंत सुरु ठेवण्यास मुदतवाढ पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांचा माहिती

तालुका पातळीवर 351 गट समन्वयक व 899 समुह समन्वयकांना होणार लाभ
  जळगाव, (जिमाका) दि. 29 - पाणी पुरवठा विभागातंर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन येथील कंत्राटी सल्लागार कर्मचारी तसेच तालुका स्तरावरील समुह समन्वयक व गट समुह समन्वयकांच्या सेवा 30 सप्टेंबरपर्यंत सुरु ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील तालुका पातळीवरील 351 गट समन्वयक व 899 समुह समन्वयकांना लाभ होणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.
  राज्य मंत्रीमंडळाच्या आज व्हीसीद्वारे झालेल्या बैठकीनंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकारांशी बोलत होते. ना. पाटील पुढे म्हणाले की, जल जीवन मिशन अंतर्गत तालुका पातळीवर 351 गट समन्वयक व 899 समुह समन्वयकांची पदे स्वच्छ भारत मिशनच्या कामासाठी दि. 6 जुलै, 2011 च्या शासन निर्णयान्वये निर्माण करण्यात आली होती. या पदांचे मानधन व भत्ते राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या सहाय्य निधीमधून करण्यात येत आहे. तथापी, जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सुचनांनुसार गट समन्वयक व समूह समन्वयक या पदांसाठी निधीची उपलब्धता नसल्याने या पदांच्या सेवा 31 जुलै, 2020 रोजी समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
  परंतु ग्रामीण भागासाठी या पदांची आवश्यकता लक्षात घेऊन या पदांना मुदतवाढ मिळावी, याकरीता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन पाणीपुरवठा व स्वचछता मंत्री ना. पाटील या पदांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जळगाव शहरातील मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय
  कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेचा समावेश रेड झोन मध्ये असल्याने जळगाव शहरातील मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने बंद ठेवणेबाबत आदेशीत करण्यात आलेले आहे. सदरची दुकाने सुरु करण्याबाबतचा विषय पालकमंत्री यांनी आज झालेलया राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला असता यावर शासन नियमांचे पालन करुन योग्य तो निर्णय घ्यावा असे बैठकीत सांगण्यात आल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. त्यानुसार याबाबत पालकमंत्री, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त हे चर्चा करुन लवकरच निर्णय घेणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी आज मुंबईत बैठक
  जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणा-या तापी नदीवरील भोकर येथे मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्प, पाडळसे, ता. अमळनेर, या योजनेसाठी निधी उपलब्ध होणे, जिल्ह्यातील पद्यमालय-2 उपसा सिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध होणेबाबत पालकमंत्र्यांनी सतत पाठपुराव केल्याने या विषयांवर चर्चा करण्यासाठी राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांच्या मुंबई येथील दालनात बुधवार, 30 जुलै, 2020 रोजी बैठक आयोजित केली असून या बैठकीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण, या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधीसह विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या युरिया खताचा 74 टक्के पुरवठा जिल्ह्याला झाला असून उर्वरित पुरवठा येत्या आठवडाभरात उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासू देणार नाही असे सांगून जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यास आवश्यक असणारी साधनसामुग्री, औषधे विशेषत: ॲन्टीजन कीट, फेवीपॅरावीर, रेमीडेसीविअर, टॉसीलीझुमॅप, पीपीई किट, एन 95 मास्कची मागणी करण्यात आली आहे. ही सर्व औषधेही लवकरात लवकर उपलब्ध होतील अशी माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
00000

Monday, 27 July 2020

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमातंर्गत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न आपत्ती येण्यापूर्वीचे नियोजन व प्रशिक्षण आपत्तीप्रसंगी उपयुक्त ठरते - जिल्हाधिकारी


 

            जळगाव, (जिमाका) दि. 27 - कोणतीही आपत्ती येण्यापूर्वीचे नियोजन व प्रशिक्षण त्या आपत्तीप्रसंगी उपयुक्त ठरते, अशावेळी प्रशासनासोबत स्थानिकांचा सहभागही महत्वाचा ठरतो. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातंर्गत 27 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत जळगांव, चोपडा, अमळनेर, पाचोरा, रावेर, भुसावळ, यावल या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे पथकाच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका प्रतिनिधी, पूर प्रसंगी बचाव करणारे पट्टीचे पोहोणारे, सर्पमित्र, स्वयंसेवक, मनपा अग्निशमन विभाग, आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या धर्तीवर जिल्हा आपत्ती निवारण पथक (DDRF) ची निर्मिती व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या निर्देशाने आज जिल्हा नियोजन भवन येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
            या कार्यशाळेचे उद्धाटनाच्या प्रथम सत्रात जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपविभागीय अधिकारी दीपमाला चौरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिह रावळ, Sdrf टिम लीडर पो.नि.कैलास पवार, होमगार्ड सेकंड इन कमांडचे हेमंत मुदलियार, वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, अर्जुना संस्था अध्यक्ष नंदकिशोर पंड्या, नेहरू युवा केंद्र जिल्हा समन्वयक, रेडक्रॉस आपत्ती व्यवस्थापन विभागाचे श्री चौधरी व ए जी महाजन आदि उपस्थित होते,
            उद्घाटनानंतर SDRF च्या पथकाने आग, भूकंप, पूर, रस्ते अपघात, वीज पडणे याप्रसंगी काय खबरदारी घेतली पाहिजे. संकटात सापडलेल्या जनतेला कशाप्रकारे सुरक्षित बाहेर काढावे, त्यासाठी कोणते सुरक्षा उपकरणे वापरावीत यावर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. दुपारच्या सत्रात मेहरून तलाव येथे बुडणाऱ्या नागरिकांचा बचाव कशा पद्धतीने करावा या बाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
            या प्रशिक्षण शिबिरात अर्जुना संस्था, भुसावळ, वन्यजीव संरक्षण संस्थेची जीवरक्षक टीम, जळगांव, मनपा अग्निशमन दल, रेडक्रॉस, नेहरू युवा केंद्र, NSS स्वयंसेवक, आव्हान ग्रुप, मेहरून येथील प्रशिक्षित पट्टीचे पोहणारे बचाव पथक यांनी जिल्हा आपत्ती प्राधिकरण आणि राज्य आपत्ती प्राधिकरण यांच्या नेतृत्वाखाली सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत प्रशिक्षण पूर्ण केले.
            मंगळवार, दिनांक 28 जुलै रोजी अमळनेर येथे याचप्रकारे प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, लवकरच जळगांव जिल्ह्यात DDRF पथकाची निर्मिती करण्यात येणार असून यात प्रशिक्षित जीवरक्षक, वन्यजीव अभ्यासक, सर्पमित्र, पट्टीचे पोहणारे, प्रथमोपचार तज्ञ, अशा स्वयंसेवकांचा सहभाग असेल. हे पथक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत कार्य करेल असे नरवीरसिह रावळ यांनी सांगितले.
                                                                              00000

कोरोना व पावसाळ्याच्या पार्श्वभूीवर नागरीकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा घेतला आढावा




            जळगाव, (जिमाका) दि. 27 - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु आहे. त्यातच पावसाळाही सुरु झाला आहे. पावसाळ्यातील दुषित पाण्यामुळे होणारी रोगराई टाळण्यासाठी नागरीकांना स्वच्छ पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यातील नागरीकांना स्वच्छ पिण्याचे पाणी वेळेवर व पुरेशा प्रमाणात मिळेल याची दक्षता घ्यावी. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेत.
            जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची आढावा घेण्यासाठी येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, जळगाव पंचायत समितीचे सभापती नंदलाल पाटील, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सुनंदा नरवाडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता निकम, उपअभियंता बी. जे. पाटील, ए. बी. किंरगे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, विविध गावांचे सरपंच आदि उपस्थित होते.
            पालकमंत्री पुढे म्हणाले की, पाळधी खुर्द व बुद्रक या गावांना पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईनचे सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. या योजनेचे अंदाजपत्रक तातडीने तयार करावे. आव्हाने गावाच्या आजूबाजूला असणाऱ्या सत्यमपार्क, रोहणवाडी, हरीओमनगर या भागासाठी स्वतंत्र योजना तयार करता येईल का याचा अंदाज घेण्यात यावा. विदगावसाठी नवीन पाण्याची टाकी बांधण्याचे अंदाजपत्रक तयार करावे, तरसोदला पाणीपुरवठा करण्यासाठी मन्यारखेडे येथून पाणीपुरवठा करता येईल किंवा कसे याबाबतचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. पुढील काम लवकरात लवकर करावे. त्याचप्रमाणे आसोदा येथे नवीन पाईपलाईन करावी. शिरसोली येथील पाण्याची टाकी जुनी व नादुरुस्त झाल्याने नवीन टाकी तयार करावी. याबाबतचे अंदाजपत्रक तयार करतांना नवीन नियमाप्रमाणे प्रती नागरीक प्रती दिवसासाठी 55 लिटर पाणी याप्रमाणे करण्यात यावे. त्याचबरोबर नशीराबाद येथील पाणीपुरवठ्याची तपासणी करुन घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिलेत.

सप्टेंबर अखेरपर्यत वाघनगराला वाघूर धरणावरुन पाणीपुरवठा सुरु होणार
            जळगाव शहरातील वाघनगर भागातील नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा. याबाबत नागरीक वारंवार तक्रारी करीत असल्याचे पालकमंत्री आणि आमदार सुरेश भोळे यांनी बैठकीत सांगितले असता वाघनगरसाठी वाघूर धरणावरील जॅकवेलचे व जलशुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे.  पाईपलाईनचे फक्त 500 मीटरचे काम अपूर्ण आहे. येत्या सप्टेंबर अखेरपर्यत वाघनगराला वाघूर धरणावरुन पाणीपुरवठा सुरु होईल. अशी ग्वाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता बी. जे. पाटील यांनी बैठकीत दिली. 
            यावेळी पालकमंत्री यांनी पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम तसेच सन 2018-19 व 19-20 मध्ये कार्यारंभ आदेश दिलेल्या 219 कामांचा तालुकानिहाय व योजनानिहाय आढावा घेतला.
000000

धरणगावात 100 खाटांचे अद्ययावत उपजिल्हा रूग्णालय उभारणार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील





मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अत्याधुनिक रूग्णवाहिकेचे लोकार्पण
       जळगाव, (जिमाका) दि. 27 - धरणगाव येथे लवकरच अद्ययावत उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात येणार असून येथे 100 ऑक्सीजनयुक्त खाटांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येईल. अशी महत्वपूर्ण घोषणा आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली.
            मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धरणगाव येथे आयोजित अत्याधुनीक कार्डियाक रूग्णवाहिकेचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज धरणगावात कार्डियाक रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात धरणगाव ग्रामीण रूग्णालयाच्या बळकटीकरणासाठी सढळ हाताने मदत करणार्‍या दात्यांचा गौरव पालकमंत्र्यांचा हस्ते  करण्यात आला.          
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गुलाबराव वाघ म्हणाले की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अविरत प्रयत्नांमुळे धरणगावात चांगल्या प्रकारची वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे. येथे अगदी 4 वर्षाच्या बालकापासून ते 84 वर्षाच्या वृध्दापर्यंतच्या रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, एका रूग्णाला जळगावच्या जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्याची वेळ आली तेव्हा रूग्णवाहिका वेळेत उपलब्ध न होवू शकल्याने येथे अद्ययावत रूग्णवाहिका नागरिकांसाठी ना.गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या आमदार निधीतून उपलब्ध करून दिली आहे. तर काही दिवसांपूर्वीच स्वर्गरथाचे लोकार्पणही करण्यात आले असल्याने धरणगावकरांच्या सेवेत दोन सुविधा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पूर्ण केल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले.            
            याप्रसंगी आपल्या मनोगतात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, धरणगावात स्वर्गरथ आणि रूग्णवाहिका यांची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. शहरात आधी शिवसेनेची एक आणि 108 क्रमांकाची शासकीय एक अशा दोन रुग्णवाहिका असून आता अत्याधुनिक कार्डियाक रूग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. याच्या मदतीने गंभीर रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मदत होणार आहे. धरणगावात अत्याधुनीक असे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात येणार असून येथे 100 बेडची व्यवस्था असेल. जेणेकरून धरणगावातील रूग्णांना इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश दिले. तसेच येथील ग्रामीण रूग्णालयासाठी एनआरएचएमच्या माध्यमातून एक कोटी निधीतून नवीन इमारत बांधली जाणार आहे. ग्रामीण रुग्णालयात साहित्य सामग्रीसाठी देखील ७० लाखांना निधी प्रदान करण्यात आला असून लवकरच साहित्य उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. तर शहराजवळ एम.आय.डी.सी. उभारण्याचा मानस असून शहराच्या आगामी 30 वर्षांची लोकसंख्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा योजनेचे नियोजन सुरू आहे.
            मतदारसंघातील कान्या- कोपर्‍यात उत्तम दर्जाचे रस्ते तयार असल्याचे ना. पाटील म्हणाले. धरणगाव शहर हे मोठ्या बाजारपेठेचे शहर म्हणून उदयास यावे यासाठी आपले प्रयत्न असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी सांगितले. यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, गुलाबराव वाघ व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून कार्डियाक या आधुनिक रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
            कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन एस चव्हाण, प्रांताधिकारी विनय गोसावी, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश  चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौधरी, संजय पाटील, राजेंद्र महाजन, पी. एम. पाटील, उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन, गटनेते पप्पू भावे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, पोलीस निरीक्षक पवन देसले, यांच्यासह आजी माजी नगरसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाबराव वाघ यांनी केले. सूत्रसंचालन पी. एम. पाटील व अभिजीत पाटील यांनी केले. तर आभार विनोद रोकडे यांनी मानले.
0000