जळगांव,
दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) - शेतीपीकांना पुरक
म्हणून शेतावर वृक्ष लागवडीखालील क्षेत्र वाढविणे. या मुख्य उद्देशाने राष्ट्रीय
शाश्वत शेती अभियानांतर्गत वनशेती उपअभियान 2020-21 राबविण्यात येत आहे. त्यानुसार
बांधावरील लागवड, कमी घनतेची लागवड, जास्त घनतेची लागवड या बाबींसाठी योजनेतर्गत
लाभ देण्यात येणार आहे.
वृक्ष लागवडीच्या
उपक्रमांमध्ये सातत्य ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी उपरोक्त बाबींचा लाभ
घेणा-या लाभार्थींना चार वर्षासाठी वर्षनिहाय 40: 20: 20: 20 याप्रमाणे अनुदान
देण्यात येईल. जसे बांधावरील लागवड या बाबीसाठी जास्तीत जास्त रु. 70/- प्रति रोप
खर्चाचे मर्यादेत रु. 35/- अनुदान चार वर्षात या प्रमाणात विभागून दिले जाईल. साग,
बांबु यासारख्या वनिकी पिकांबरोबरच सिताफळ, चिंच, बोर, जांभुळ यासारख्या फळपिकांची
देखील लागवड योजनेंतर्गत करता येणार आहे.
बांधावरील लागवडीप्रमाणेच
आंतरपीक/पट्टा पध्दत/विरळ वृक्ष लागवड करुन शेतजमिनीवर कमी घनतेची तसेच पडीक
जमीनीवरही लागवड करता येणार आहे. सलग लागवड/पट्टयामधील लागवड/केळी, पपई यासारख्या
पिकांचे बांधावर वारा प्रतिबंधक वृक्षांची जास्त घनतेची लागवड करता येणार आहे.
तसेच या योजनेत लागवडीसाठी प्रति लाभार्थी कमीत कमी व जास्तीत जास्त क्षेत्र
मर्यादा राहणार नाही.
तरी
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या
तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि
सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी
ठाकुर व कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
0000
No comments:
Post a Comment