Friday, 24 July 2020

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातंर्गत वनशेती उपअभियानात सहभागी होणेबाबात


       जळगांव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) - शेतीपीकांना पुरक म्हणून शेतावर वृक्ष लागवडीखालील क्षेत्र वाढविणे. या मुख्य उद्देशाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत वनशेती उपअभियान 2020-21 राबविण्यात येत आहे. त्यानुसार बांधावरील लागवड, कमी घनतेची लागवड, जास्त घनतेची लागवड या बाबींसाठी योजनेतर्गत लाभ देण्यात येणार आहे.
            वृक्ष लागवडीच्या उपक्रमांमध्ये सातत्य ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी उपरोक्त बाबींचा लाभ घेणा-या लाभार्थींना चार वर्षासाठी वर्षनिहाय 40: 20: 20: 20 याप्रमाणे अनुदान देण्यात येईल. जसे बांधावरील लागवड या बाबीसाठी जास्तीत जास्त रु. 70/- प्रति रोप खर्चाचे मर्यादेत रु. 35/- अनुदान चार वर्षात या प्रमाणात विभागून दिले जाईल. साग, बांबु यासारख्या वनिकी पिकांबरोबरच सिताफळ, चिंच, बोर, जांभुळ यासारख्या फळपिकांची देखील लागवड योजनेंतर्गत करता येणार आहे.
            बांधावरील लागवडीप्रमाणेच आंतरपीक/पट्टा पध्दत/विरळ वृक्ष लागवड करुन शेतजमिनीवर कमी घनतेची तसेच पडीक जमीनीवरही लागवड करता येणार आहे. सलग लागवड/पट्टयामधील लागवड/केळी, पपई यासारख्या पिकांचे बांधावर वारा प्रतिबंधक वृक्षांची जास्त घनतेची लागवड करता येणार आहे. तसेच या योजनेत लागवडीसाठी प्रति लाभार्थी कमीत कमी व जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा राहणार नाही.
            तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर व कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
0000

No comments:

Post a Comment