Wednesday, 29 July 2020

पाणी पुरवठा विभागातील तालुकास्तरावरील समुह व गट समुह समन्वयकांच्या सेवा 30 सप्टेंबरपर्यंत सुरु ठेवण्यास मुदतवाढ पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांचा माहिती

तालुका पातळीवर 351 गट समन्वयक व 899 समुह समन्वयकांना होणार लाभ
  जळगाव, (जिमाका) दि. 29 - पाणी पुरवठा विभागातंर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन येथील कंत्राटी सल्लागार कर्मचारी तसेच तालुका स्तरावरील समुह समन्वयक व गट समुह समन्वयकांच्या सेवा 30 सप्टेंबरपर्यंत सुरु ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील तालुका पातळीवरील 351 गट समन्वयक व 899 समुह समन्वयकांना लाभ होणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.
  राज्य मंत्रीमंडळाच्या आज व्हीसीद्वारे झालेल्या बैठकीनंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकारांशी बोलत होते. ना. पाटील पुढे म्हणाले की, जल जीवन मिशन अंतर्गत तालुका पातळीवर 351 गट समन्वयक व 899 समुह समन्वयकांची पदे स्वच्छ भारत मिशनच्या कामासाठी दि. 6 जुलै, 2011 च्या शासन निर्णयान्वये निर्माण करण्यात आली होती. या पदांचे मानधन व भत्ते राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या सहाय्य निधीमधून करण्यात येत आहे. तथापी, जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सुचनांनुसार गट समन्वयक व समूह समन्वयक या पदांसाठी निधीची उपलब्धता नसल्याने या पदांच्या सेवा 31 जुलै, 2020 रोजी समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
  परंतु ग्रामीण भागासाठी या पदांची आवश्यकता लक्षात घेऊन या पदांना मुदतवाढ मिळावी, याकरीता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन पाणीपुरवठा व स्वचछता मंत्री ना. पाटील या पदांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जळगाव शहरातील मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय
  कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेचा समावेश रेड झोन मध्ये असल्याने जळगाव शहरातील मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने बंद ठेवणेबाबत आदेशीत करण्यात आलेले आहे. सदरची दुकाने सुरु करण्याबाबतचा विषय पालकमंत्री यांनी आज झालेलया राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला असता यावर शासन नियमांचे पालन करुन योग्य तो निर्णय घ्यावा असे बैठकीत सांगण्यात आल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. त्यानुसार याबाबत पालकमंत्री, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त हे चर्चा करुन लवकरच निर्णय घेणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी आज मुंबईत बैठक
  जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणा-या तापी नदीवरील भोकर येथे मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्प, पाडळसे, ता. अमळनेर, या योजनेसाठी निधी उपलब्ध होणे, जिल्ह्यातील पद्यमालय-2 उपसा सिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध होणेबाबत पालकमंत्र्यांनी सतत पाठपुराव केल्याने या विषयांवर चर्चा करण्यासाठी राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांच्या मुंबई येथील दालनात बुधवार, 30 जुलै, 2020 रोजी बैठक आयोजित केली असून या बैठकीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण, या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधीसह विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या युरिया खताचा 74 टक्के पुरवठा जिल्ह्याला झाला असून उर्वरित पुरवठा येत्या आठवडाभरात उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासू देणार नाही असे सांगून जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यास आवश्यक असणारी साधनसामुग्री, औषधे विशेषत: ॲन्टीजन कीट, फेवीपॅरावीर, रेमीडेसीविअर, टॉसीलीझुमॅप, पीपीई किट, एन 95 मास्कची मागणी करण्यात आली आहे. ही सर्व औषधेही लवकरात लवकर उपलब्ध होतील अशी माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
00000

No comments:

Post a Comment