Tuesday, 14 July 2020

पाल येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फत सुरु झालेल्या ‘आयडीएम स्कूल फॉर बनाना’ या उपक्रमात शेतक-यांनी सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन


           जळगांव, दि. 14 (जिमाका वृत्तसेवा) :- जळगाव जिल्ह्यातील केळी पट्टयात विषाणुजन्य रोगाने शिरकाव केल्याने केळी उत्पादक संकटात येताना दिसत आहेत. जिल्ह्यातील महत्वाचे पिक म्हणून केळी या पिकाकडे बधितले जाते. रावेर तालुक्यातील चिनावल, कुंभारखेडे, रोझोदा, सावखेडा, उटखेडा, वाघोदा आणि विवरे या गावात मोठ्या प्रमाणावर विषाणूजन्य रोगाची लागण झालेली दिसून आली आहे. सध्या ह्या रोगामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान टाळता येवू न शकणारे आहे. म्हणून वेळीच जर रोगाला अटकाव करणा-या बाबी किंवा नियत्रणाविषयी जाणून घेतले, केळी बागेचे व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे. केळीवरील विषाणूजन्य या रोगाला हरण्या किंवा इंफेकेशियस क्लोरोसिस किंवा कुकुंबर मोझ्यक व्हायरस असे म्हणतात. मागील काही वर्षात सी एम व्ही रोग मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गुजरात, महाराष्ट्रात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि तामिळनाडूत आढळून आलेला आहे.
        रोगाची लक्षणे- रोगाची लागण होताच नवीन पानावर शिरा पांढ-या पिवळया दिसतात पानांच्या शिरा जाड होतात व अरुंद पाने होण्यास सुरुवात होते. हरित द्रव्याचा नाश होणे हे प्रमुख लक्षण होय. पानातील शिरांमधील हरितद्रव्य नाहीसे होवून कालांतराने पेशी मृत होतात. पानांच्या खालच्या बाजूला तेलकट रेषा दिसू लागतात पानांवरील पिवळया रेषा काही काळाने तांबडया व करडया होतात. रोगाची लागण तीव्र असेल तर पोगासड होते. रोगग्रस्त झाडाचे घड वेडेवाकडे व निकृष्ट येतात, झाडाची पूर्ण वाढ झाली तरी झाड गुणवत्तापूर्ण घड निर्माण करु शकत नाही.
            असा होतो रोगाचा प्रसार- या रोगाचा प्राथमिक प्रसार कंदमार्फत तसेच रोगग्रस्त कंदापासून केलेल्या उतीसंवर्धित रोपांपासून होतो. तसेच इंफेकेशियस क्लोरोसिस विषाणूचे वहन मुख्यत: कापूस पिकावरील मावा, फुल किडे, पांढरी माशी, मका व चवळी वरील मावा व्दारे वहन होते. कुकुंबर मोझ्यक व्हायरस ची काकडी वर्गीय पिके, मिरची मका, सोयबीन ऊस, तणे व निसर्गातील जवळ जवळ 810 पिकांवर जोपासना होते. व्हायरसमुळे होणा-या रोगाचे समूळ उच्च्टन करणे शक्य नसले तरी खालीलप्रमाणे उपाय योजना केल्या तर सी एम व्ही रोग आटोक्यात आणता येवू शकेल.
            सर्वप्रथम केळी लागवडीसाठी रोगमुक्त बागेतील कंद निवडावेत, लागवड पूर्वी कंद प्रक्रिया करावी व विषाणू निर्देशांक तपासलेल्या प्रमाणित केलेल्या ऊती संवर्धित रोपांची लागवड करावी, बाग तणमुक्त ठेवावी कारण तणे रोगाची जोपासना करतात तसेच चिवाईची भाजी पूर्णपणे काढावी,  प्रादुर्भाव ग्रस्त झाडे मुळास कट उपटून दूर ठिकाणी जाळून किंवा गाडून टाकावीत तसेच बागेचे 2 ते 3 वेळेस 4 ते 5 दिवसाच्या अंतराने निरीक्षण करुन रोग ग्रस्त झाडांची  विल्हेवाट लावावी, कापूस, मका, टरबूज, ऊस मिरची, वांगी व काकडी वर्गीय पिकांची केळी बागे शेजारी लागवड करु नये, मावा या वाहक किडीच्या नियत्रण करण्यासाठी असिफेट 75 एस पी 10 मिली किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8 एस एल 5 मिली किंवा थायोमिथोक्झीम 25 डब्लू जी 2 ग्रॅम प्रती 10 लिटर मिसळून फवारणी करावी, सी.एम. व्ही रोग आटोक्यात आणण्यासाठी संसर्ग रोध उपायांची (Quarantine measures ) सक्ती करावी. पाल येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फत सुरु झालेल्या आय डी एम स्कूल फॉर बनाना या उपक्रमात शेतक-यांनी सहभाग घ्यावा. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment