जळगाव (जिमाका वृत्त सेवा) दि. 1 - गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पर्यावरण, सामाजिक सलोखा यांसारख्या विविध विषयांवर आधारित देखावा व सजावट करणाऱ्या उत्कृष्ट मंडळांना राज्य शासनाच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी उत्कृष्ट सजावटी करणाऱ्या गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या ईमेलवर 2 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील पहिल्या तीन उत्कृष्ट गणेश मंडळांना प्रथम पुरस्कार 5 लाख रुपये, द्वितीय 2 लाख 50 हजार रुपये व तृतीय 1 लाख रुपये पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर देखील पुरस्कार दिले जाणार आहेत. यासाठी गणेश मंडळांनी पर्यावरण पूरक सजावट, ध्वनीप्रदूषणरहित वातावरण, पाणी बचत, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा, समाज प्रबोधन विषयावर देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीतील देखावा, रक्तदान शिबिर, वैद्यकीय सेवा शिबिर, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य व सामाजिक कार्य, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्यासाठी शैक्षणिक, आरोग्य व सामाजिक आदींबाबत केलेले कार्य, पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक खेळाच्या स्पर्धा आदीबाबत देखावे व कार्यक्रमाचे आयोजन केलेले असावे.
स्पर्धेतील उत्कृष्ट मंडळाची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीमार्फत निवड करण्यात येणार आहे. समितीमध्ये शासकीय व शासनमान्य कला महाविद्यालयाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी व पोलिस अधिकारी सदस्य म्हणून असणार आहेत. सहभागासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही, असे शासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
******
No comments:
Post a Comment