Friday, 28 February 2025

महावितरण आणि पुरवठा विभागांनी समन्वय ठेवून तात्काळ पाणीपुरवठा योजनांच्या वीज जोडणी पूर्ण कराव्यात – पालकमंत्री गुलाबराव पाटील


             जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा ) – महावितरण आणि पाणी पुरवठा विभागांनी समन्वय ठेवून तात्काळ पाणीपुरवठा योजनांच्या वीज जोडणीची तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

जिल्हा नियोजन भवनमध्ये महावितरण आणि पाणी पुरवठा विभागाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, महावितरणचे अधिक्षक अभियंता अनिल महाजन, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भोगावडे, मजीप्रा चे निकम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

  महावितरण विभागाचा अहवाल

             महावितरण विभागाला गेल्या पाच वर्षांत 1,520 ट्रान्सफार्मर आणि अनुषंगिक कामांसाठी 111.41 कोटींचा निधी वितरित केला आहे. मात्र, वाढत्या मागणीमुळे अधिक ट्रान्सफार्मर बसविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या निधीतून तालुकानिहाय कामे मंजूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पाणीपुरवठा योजनांमध्ये वीज जोडणीचा अडथळा

            जिल्हा परिषदेच्या 462 पाणीपुरवठा योजना वीज जोडणीअभावी अद्याप अपूर्ण आहेत. यातील 281 योजनांचे अंदाजपत्रक तातडीने तयार करून सादर करावे, असे आदेश पालकमंत्री यांनी दिले. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 11 ठिकाणी पाण्याचे स्रोत आणि 18 ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

शंभर दिवसांत 100% नळजोडणीचे उद्दिष्ट

            यावेळी पालकमंत्र्यांनी कार्यकारी अभियंता श्री भोगवाडे यांनी 100 दिवस अभियानांतर्गत घरगुती नळ जोडणी 100% पूर्ण करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देऊन तसेच पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महावितरण अधिक्षक अभियंता यांनी समन्वय साधून वीज जोडणीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत असे निर्देश दिले.

सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यास गती

            मेडा (MEDA)  विभागाने मंजूर केलेल्या 25 सौर प्रकल्पांपैकी 18 प्रकल्प भौतिकदृष्ट्या पूर्ण झाले असले तरी, संबंधित शासकीय कार्यालयांनी वीज बिल न भरल्यामुळे नेट मीटरिंग प्रक्रियेत अडथळा आला आहे. त्यामुळे बिहाइंड द मीटर (Behind the Meter) प्रणाली लावून हे प्रकल्प त्वरित कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. महावितरण, मेढा आणि पाणीपुरवठा विभागाने समन्वय साधून 20 मार्चपर्यंत ही कामे पूर्ण करावीत, असे आदेश देण्यात आले.

            पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना समन्वय ठेवून वीज जोडणीच्या प्रक्रियेला वेग द्यावा असे आदेश दिले. जिल्ह्यातील जलस्रोतांचा योग्य वापर करून, सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून आणि तांत्रिक अडथळे दूर करून नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

000000000


तरसोद रेल्वे पुलाच्या बांधकामाला वेग : सहा दिवसांचे नियोजन

 










जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा ) जळगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 (जुना 6) वरील तरसोद येथील रेल्वे मार्गावर पूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या सहा दिवसांत दररोज सकाळी 9.30 ते 11 या वेळेत हे काम हाती घेण्यात येणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून या कामाची आखणी करण्यात आली असून, सुमारे 225 कुशल व अकुशल कामगार यासाठी कार्यरत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे स्थानिक प्रकल्प संचालक शिवाजी पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजीव लोखंडे, तसेच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी हे या कामावर सतत लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे कामाचा वेळोवेळी आढावा घेत असून नियोजित कालावधीत काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. या पुलामुळे महामार्गावरील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून, भविष्यात नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

  येथे काम करणाऱ्या कर्मचारी यांच्या आरोग्याच्या बाबतीत सर्व प्रकारची काळजी घेतली जात असून तिथे एक सुसज्ज रुग्णवाहिकाही ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

                                                                      00000000000

जळगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सरसोद येथील रेल्वे मार्गावर पूल बांधण्याचे काम सुरु झाले आहे.. त्याचे छायाचित्र

 














जळगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सरसोद येथील रेल्वे मार्गावर पूल बांधण्याचे काम सुरु झाले आहे.. त्याचे छायाचित्र

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी (राज्यमंत्री दर्जा) यांचा 2 मार्च रोजीचा जळगाव जिल्हा दौरा

             जळगाव, दिनांक  28 (जिमाका वृत्त ):  जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, व सदस्य, राज्य अल्पसंख्यक आयोग अध्यक्ष ललित गांधी(राज्यमंत्री दर्जा) यांचा 2 मार्च रोजीचा जळगाव जिल्हा दौरा पुढिलप्रमाणे-

          दुपारी ०२.०० वाजता वाहनाद्वारे धुळे येथून जळगावकडे रवाना. दुपारी ०४.०० वाजता जळगाव येथे आगमन, दुपारी ०४.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे जैन पदाधिकारी व उ‌द्योजकांसोबत बैठक वाहनाद्वारे सायं. ०५.३० वाजता जळगावहून गोव्याकडे रवाना.

00000000000

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा

            जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा )- केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा दिनांक 02 ते 03 मार्च 2025 दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे

          रविवार, दिनांक 02 मार्च, 2025 रोजी सकाळी 07 वाजता नवजीवन एक्स्प्रेस भुसावळ स्टेशन आगमन. सकाळी 07.30 वाजता भुसावळ जंक्शन येथून मोटारीने रवाना. सकाळी 08.00 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन रवाना. सकाळी 10.00 तास ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 1.00 ते दुपारी 4.00 मुक्ताईनगर येथे निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत बैठक. मुक्ताईनगर येथे मुक्काम.

            सोमवार, दिनांक 03 मार्च, 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता मुक्ताईनगर येथून मोटारीने रवाना, सकाळी 10:30 वाजता सावखेडा रावेर येथे आगमन. सकाळी 10.30 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंत सावखेडा रावेर येथे स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक. सकाळी 11.00 वाजता सावखेडा रावेर येथून रवाना (चोपडा आणि एरंडोल मार्गे, प्रत्येक ठिकाणी १५ मिनिटे थांबा). दुपारी 1.30 वाजता चाळीसगाव येथे आगमन. दुपारी 1.30 ते दुपारी 2.30 चाळीसगाव येथे स्थानिक लोकांसोबत बैठक. दुपारी 2.30 वाजता चाळीसगाव येथून मोटारीने छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे रवाना.

०००००००००

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला जिल्हा नियोजन विकास कामांचा आढावा ▪ जिल्ह्यातील नवीन होत असलेल्या कामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश

 



            जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) - जळगाव जिल्ह्यात होत असलेली सर्व कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवावे तसेच नवीन रस्ते दर्जेदार असावेत यासाठी त्यांची गुणवत्ता चाचणी करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्हा नियोजन समिती मार्फत पी डब्ल्यू डी, पोलीस विभाग , नाविम्यापूर्ण , सिव्हील हॉस्पिटल, डीन, अपारंपारिक उर्जा, व इतर  मंजूर करण्यात आलेल्या 141 कोटी 63 लाखांच्या निधीतून 507 कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी शहरातील  100 कोटींच्या कामांबाबत  सविस्तर आढावा अधीक्षक अभियंता पी.पी. सोनवणे यांनी सादर केला.

            या बैठकीस आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनावणे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.

            जिल्ह्यातील 68 मोठया विकासकामांपैकी 40 पूर्ण झाली असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. रामानंद पोलीस स्टेशन पूर्णत्वास येत असून 10 पोलीस चौक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. पशुवैद्यकीय विभागाच्या 16 पैकी 13 इमारतींची कामे अंतिम टप्प्यात आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्मारकाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. 

महत्त्वाची प्रकल्पे प्रगतीपथावर

            महाराष्ट्रातील पहिले पशु रेतन केंद्र - जिल्हा नियोजन निधीतून हे अभिनव केंद्र उभारले जात असून त्याचे काम वेगाने सुरू आहे*. भरोसा सेल इमारत, संविधान भवन बांधकाम, बहिणाबाई स्मारक, बालकवी ठोंबरे स्मारक, वारकरी भवन*-राज्यातील अनोख्या वारकरी भवनाच्या बांधकामालाही गती मिळाली असून लवकरच हे प्रकल्प पूर्ण होईल.

जिल्हाधिकारी कार्यालयाचा कायापालट

            जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय हे ब्रिटिशकालीन वारसा इमारतींपैकी एक आहे. त्यामुळे त्याचा हेरिटेज दर्जा कायम ठेवत सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हेरिटेजच्या नियमांचे पालन करत कार्यालयाचे नूतनीकरण होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील परिसर हिरवाईयुक्त असा विकसित करण्यात येणार असल्याचे अधिक्षक अभियंता श्री. सोनावणे यांनी सांगितले. या सर्व प्रकल्पांच्या वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ततेसाठी संबंधित विभागांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

००००००००


शेळगाव बॅरेज प्रकल्पातून पहिल्यांदाच सुटणार आवर्तन – 25 गावांना मोठा दिलासा ▪ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

 


            जळगाव, 25 फेब्रुवारी – जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने यंदा प्रथमच आवर्तन सोडले जाणार आहे. सध्या 67% पाणीसाठा उपलब्ध असल्याने जळगाव, धरणगाव, यावल आणि चोपडा तालुक्यातील 25 गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.

            पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे यांना तात्काळ उचित कार्यवाही करून पुढील दोन दिवसांत पाणी सोडण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच, शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पातील पुलांचे काम, भूसंपादन आणि बुडीत क्षेत्रातील अनुषंगिक कामांना तृतीय सुप्रमा मिळण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही दिले.

            या बैठकीला आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. अमोल जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (व्हीसीद्वारे), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

पाणीटंचाई टाळण्यासाठी तातडीची कार्यवाही

            सध्या जिल्ह्यात अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला त्वरित पाणीपुरवठ्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः धरणगाव, जळगाव आणि यावल काठच्या गावांना तातडीने पुरेसा पाणीपुरवठा होईल, याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले.

            "जनतेच्या गरजा लक्षात घेऊन प्रशासनाने आवर्तन सोडण्याचा त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईमुळे त्रास होऊ नये, यासाठी शासन वचनबद्ध आहे. जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात."

    पालकमंत्री गुलाबराव पाटील

गावकऱ्यांना दोन महिन्यांचा दिलासा

            शेळगाव बॅरेज प्रकल्पातून आवर्तन सोडण्याच्या निर्णयामुळे परिसरातील 25 गावांना सलग दोन महिने पिण्याचे पाणी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या संकटातून मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासनाने यासाठी तातडीने कार्यवाही सुरू केली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे आणि कार्यकारी अभियंता कामेश पाटील हे नियोजन करत आहेत.

या गावांना होणार थेट फायदा

            सध्या 67.50 द.ल.घ.मी. (61.15%) पाणीसाठा असून, आवर्तन सोडल्यानंतर प्रकल्पात 25.00 द.ल.घ.मी. (21.00%) पाणी शिल्लक राहणार आहे. 60 ते 70 दिवसांपर्यंत पाणीपुरवठा होणार आहे.

फायदा होणारी गावे:

जळगाव तालुका: आसोदा, भादली, ममुराबाद, शेळगाव, तुरखेडे, आमोदे, भोकर, कानसवाडे, आवार, घार्डी, भोलाणे, विदगाव, धानोरे, सुजदे, डीकसाई, करंज, लिधुर, किनोद

यावल तालुका: टाकरखेडे, भालशिव, शिरागड

चोपडा तालुका: पुनगाव, मितावली, पिंप्री, वडगाव, वटार सुटकार, खेडी, भोकरी, कोळंबे, सनफुले, कठोर, कुरवेल, निमगव्हाण, तावसे, खाचणे

धरणगाव तालुका: धरणगाव शहर, नांदेड, पिंप्री, पथराड या निर्णयामुळे गावकरी आणि शेतकरी संतोष व्यक्त करत असून त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प तृतीय सुप्रमा मिळाल्यास कामांना येणार गती

            शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पातील पुलांचे काम, भूसंपादन, बुडीत क्षेत्रातील रस्ते, कडगाव-जोगलखेडा उंच पूल, शेळगाव-बामनोद उंच पूल, तसेच यावल उपसा सिंचन योजना यांसारख्या अनुषंगिक कामांसाठी तृतीय सुप्रमा मंजुरी मिळणे आवश्यक आहे.

            तृतीय सुप्रमा प्रस्ताव  तांत्रिक सल्लागार समिती, नाशिक यांना 6 ऑगस्ट 2024 रोजी तांत्रिक तपासणीसाठी सादर केला असून, मंजुरी मिळाल्यास या कामांना गती मिळणार आहे.

            बळीराजा जलसंजिवनी योजनेअंतर्गत यावल उपसा सिंचन योजनेस शासनाने 12 जुलै 2024 रोजी तत्त्वतः मान्यता दिली असून, तृतीय सुप्रमा प्रस्तावात योजनेचा समावेश केला असल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

०००००००००


पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा १ मार्च रोजीचा जळगाव जिल्हा दौरा

        जळगाव दि. 28 ( जिमाका )- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा  जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

                 शनिवार, दि. १ मार्च, २०२५ रोजी  सकाळी १०.०० वाजता शासकीय वाहनाने पाचोराकडे प्रयाण, सकाळी        ११ वाजता मा. आमदार श्री. किशोर पाटील यांच्या सांत्वनपर भेट, सकाळी ११.३० वाजता चाळीसगावकडे प्रयाण, दुपारी १२.३० वाजता चाळीसगाव येथे सन्मान सोहळा कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ :- राजपूत मंगल कार्यालय चाळीसगाव    जि. जळगाव. सोईनुसार - पाळधी ता. धरणगाव जि. जळगाव कडे प्रयाण व राखीव.

                                                                                     0000000000

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राज्यस्तरीय मेळावा व उद्घाटन सोहळ्याचे आयोजन

          जळगाव, दिनांक  28 (जिमाका वृत्त ):  राज्याच्या आरोग्य विभागामार्फत संपुर्ण राज्यातील शासकिय व निमशासकिय शाळा आणि अंगणवाडीतील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला-मुलीची सर्वांगीण आरोग्य तपासणी करिता "राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम" राबविण्यात येणार आहे. शाळा व अंगणवाडीमधील मुला-मुलीची विनामुल्य आरोग्य तपासणी करण्यात येणार असून जन्मजात आजार व इतर आजारांवर विनामुल्य उपचार, संदर्भसेवा व विनामुल्य शस्त्रक्रिया मोहिम राबविण्यात येणार आहे.

        राज्याचे उपमुख्यंमत्री अजित पवार हे या कार्यक्रमाचे दुरभाष्य प्रणालीव्दारे उद्घाटन करणार आहेत. तसेच आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.    

      उपमुख्यमंत्री अजित  पवार  यांच्या हस्ते इंदीरा गांधी मॉडेल स्कुल, औंध, पुणे येथे दि.०१ मार्च २०२५ ला सकाळी ८.३० वा. दुरभाष्य प्रणालीव्दारे उद्घाटन या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

          त्याअनुषंगाणे जळगाव जिल्हयातील एकुण १५ तालुक्यात दुरभाष्य प्रणालीव्दारे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असुन उपस्थित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तर जिल्हास्तरावर उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन अभिनव विद्यालय, प्रताप नगर, जळगांव येथे सकाळी ८.३० वाजता करण्यात येणार आहे.

००००००००००

Thursday, 27 February 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा आढावा मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी केंद्र शासनाकडून विशेष निधीसाठी प्रयत्न करावे ग्रामीण भागात ‘हर घर जल’ योजनेची प्रभावी अमंलबजावणी करावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

             मुंबई, दि. २७: राज्यातील प्रत्येक गावाला स्वच्छ आणि सुरक्षीत पाणी पुरवठा, शाश्वत स्वच्छता यासोबतच ‘हर घर जल’ योजनेद्वारे १०० टक्के घरगुती नळ जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मराठवाड्याचा दुष्काळ संपविण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अभियान संचालक ई.रविंद्रन, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आयुक्त विजय पाखमोडे आदी यावेळी उपस्थित होते.

            राज्यात जलजीवन निशन अंतर्गत २० हजार घरांना थेट नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात असून त्यामाध्यमातून सुमारे ८० लाख कुटुंबांना फायदा होत आहे. उर्वरित घरांना नळाद्वारे पाणी पुरवठ्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

            मराठवाड्याचा दुष्काळ हटविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना अत्यंत महत्वाची असून या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्रीय जल शक्ती मंत्री सी. आर पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाबाबत चर्चा केली.

            स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या टप्पा दोन बाबत देखील या बैठकीत आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागात वैयक्तीक शौचालयांबरोबरच सार्वजनिक शौचालयांच्या निर्मितीवर भर देण्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विभागाला सांगितले. शंभर दिवसांच्या उपक्रमामध्ये हर घर जल अंतर्गत १०० टक्के नळ जोडणीचे उद्दीष्ट्य पूर्ण करावे. शाळा, अंगणवाड्यांमध्ये १०० टक्के पिण्याच्या पाण्यासाठी नळ जोडणी उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

००००

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे दि. २२ मार्च २०२५ रोजी आयोजन

             जळगाव दि. 26 ( जिमाका वृत्तसेवा ) वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांमध्ये जलदगतीने तोडगा काढण्यासाठी तसेच सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशभरात राष्ट्रीय लोकअदालतांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये दिनांक २२ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे.

            या लोकअदालतीमध्ये नागरी वाद, मोटार अपघात प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मजुरी दावे, दिवाणी प्रकरणे, न्यायालयीन प्रक्रियेत असलेले थकबाकीचे प्रकरणे तसेच इतर तडजोडीयोग्य प्रकरणे सोडविण्यात येणार आहेत. न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी आणि प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी नागरिकांनी आपल्या प्रकरणांचा राष्ट्रीय लोकअदालतीत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे.

            या लोकअदालतीमध्ये प्रकरणे सोडवण्यासाठी तडजोडीला महत्त्व दिले जाईल. यामुळे संबंधित पक्षकारांना वेळेची आणि पैशांची बचत होईल तसेच प्रकरणांचा निकाल जलद गतीने लागेल. ज्या नागरिकांना त्यांची प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीत सोडवायची असतील त्यांनी २२ मार्च २०२५ पूर्वी आपल्या वकिलांशी संपर्क साधावा.

0000000000

 

जिल्हाधिकारी कार्यालयात 3 मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

             जळगाव, दिनांक  27 (जिमाका वृत्त ): दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक  3 मार्च 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी दिली आहे.

           या दिवशी संबधित तक्रारदार हे प्रत्यक्ष अर्ज सादर करणार असल्याने संबधित विभागाच्या विभाग प्रमुख यांनी देखील लोकशाही दिनी उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे.

            नागरिकांनी आपल्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

००००००००००

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा २७ फेब्रुवारी रोजीचा जळगाव जिल्हा दौरा

         जळगाव दि. 27 ( जिमाका )- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा  जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

                 गुरुवार, दि. २७ फेब्रुवारी, २०२५ रोजी  दुपारी ३.०० वाजता शासकीय निवासस्थान जेतवन येवून शासकीय वाहनाने सीएसएमटी स्थानकाकडे प्रयाण, दुपारी ४.०० वाजता सी.एस.एम.टी स्थानकावरुन २२२२१ राजधानी एक्सप्रेसने जळगावकडे प्रयाण. रात्री ८.४८ वाजता जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन, रात्री ९.०० वाजता जळगाव येथून शासकीय वाहनाने पाळधी ता. धरणगाव जि. जळगाव कडे प्रयाण रात्री ९.२० वाजता पाळधी ता. धरणगाव जि. जळगाव येथे आगमन व राखीव.

0000000000

Tuesday, 25 February 2025

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

         जळगाव दि.25 ( जिमाका )- वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा यांचा  जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            मंगळवार, दिनांक 25 फेब्रुवारी, 2025  रोजी  रात्री  9 वा. 15.मि. भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण,  रात्री 9 वा.40 मि. निवासस्थान येथे आगमन व राखीव  

०००००००००

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य; नाहरकत प्रमाणपत्र सादर करायची २८ फेब्रुवारी अंतिम मुदत

             जळगाव दि. 25 ( जिमाका )-  सन २०२३ या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेअंतर्गत ५०००/- रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसहाय्य कमाल २ हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत आहे. यासाठी खरीप २०२३ मध्ये ई-पिक पहाणी केलेले कापूस/सोयाबीन उत्पादक शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०२३ मध्ये ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाहीं तथापि ज्यांच्या खरीप २०२३ च्या ७/१२ उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे अशा खातेधारकांनी, खरीप २०२३ कापूस / सोयाबीन उत्पादक वनपट्टेधारक खातेदार व बंदपुर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील  डिजिटलाइज्ड नसलेली गावे (Non digitalised villages) मधील खरीप २०२३ कापूस/सोयाबीन उत्पादक वैयक्तिक व सामाईक खातेदार पात्र आहेत,

               पात्र शेतक-यांनी ई-पिक पहाणी पोर्टलवरील यादीत आपले नाव असल्याची खातरजमा www.acagridut.mahat.org या पोर्टलवर किंवा संबंधित कृषि सहाय्यक यांचेकडून करुन घ्यायची आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०२३ मध्ये ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही, ज्यांच्या खरीप २०२३ च्या ७/१२ उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे, अशा शेतक-यांनी व चंद्रपुर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील Non digitalised villages मधील खरीप २०२३ कापूस सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी आपल्या गावातील संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. खरीप २०२३ कापूस / सोयाबीन उत्पादक वनपट्टेधारक खातेदार यांनी तहसिल/जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

          अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक खातेदारांना आपले आधार संमती व सामाईक खातेदारांना आधार संमतीसह ना हरकत प्रमाणपत्र दि. २८ फेब्रुवारी पर्यंत संबंधित कृषि सहाय्यक यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्राचा नमूना कृषि सहाय्यक यांच्याकडे उपलब्ध आहे. विहीत मुदतीत आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र कृषि विभागास प्राप्त न झाल्याने लाभार्थी अर्थसहाय्यापासून वंचित राहिल्यास याची जबाबदारी कृषि विभागाची रहणार नाही, याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

०००००००००००

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 5 मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

          जळगाव दि. 25 ( जिमाका )-  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने 100 दिवसाचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय जळगाव या कार्यालयाशी संबधित असलेल्या नागरीकांच्या अडीअडचणी, प्रश्न, समस्या इत्यादी जाणून घेवून त्यांचे नियमानुसार निराकरण करण्यासाठी 5 मार्च 2025 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

                सहायक आयुक्त, समाज कल्याण जळगाव, डॉ. बाबासाहेव आंबेडकर सामाजिक न्याय भवन मायादेवी मंदौरा समोर महाबळ रोड जळगाव येथे  सकाळी ११.०० ते दु.१.०० या वेळेत लोकशाही दिन आयोजित करण्यात आलेला आहे.  अशी माहिती योगेश साटील सहायक आयुक्त, समाज कल्याण जळगाव यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.

००००००००००

Monday, 24 February 2025

आंतरजिल्हा युवा आदान प्रदान कार्यक्रमाच्या समारोप समारंभास खा. स्मिताताई वाघ यांनी तरुणांना केले मार्गदर्शन

 



           जळगाव दि. 24 ( जिमाका )-  मेरा युवा भारत - नेहरू युवा केंद्र जळगाव द्वारे १३-१७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान आंतरजिल्हा युवा आदान प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमात मुंबईतील २७ तरुण-तरुणींनी सहभाग घेतला. १५ फेब्रुवारी रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत प्रकल्प अधिकाऱ्यांनी लालमती आश्रम शाळा आणि गावाला भेट दिली आणि तेथील लोकांचे जीवन समजून घेतले. त्यानंतर मनोलव प्रकल्प, दीपस्तंभ संस्थेतील अपंग विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेण्यात आली जेथे युजवेंद्र महाजन यांच्या दृढ निश्चय आणि समर्पणाने तरुणांना समाजसेवेची प्रेरणा दिली. १६ फेब्रुवारी रोजी अजिंठा लेण्यांना भेट देऊन भारताच्या सांस्कृतिक वारशाबद्दल माहिती दिली.

            कार्यक्रमाचा समारोप समारंभ १७ फेब्रुवारी रोजी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. प्रास्ताविकात, नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र यांनी ०५ दिवसांच्या उपक्रमांची माहिती दिली. विभागीय नियंत्रक, एमएसआरटीसी भगवान जगनोर  यांनी तरुणांना जळगावमधील वाहतूक परिस्थिती आणि भविष्यातील नियोजित विकास कामांबद्दल माहिती दिली आणि तरुणांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. जळगाव येथील प्राचार्य सोना कुमार यांनी तरुणांना नवीन शिक्षण प्रणाली आणि करिअरबद्दल मार्गदर्शन केले.

                  खासदार श्रीमती स्मिताताई वाघ तरुणांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी तरुणांना देश आणि समाजाच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा दिली. जळगावमध्ये होत असलेल्या आर्थिक विकासाविषयी, जसे की एमआयडीसी, विमानतळ इत्यादींचे अपग्रेडेशन, याबद्दलही तरुणांना माहिती देण्यात आली. दुर्गम आदिवासी गावांच्या विद्युतीकरणासाठी केंद्र सरकारने दिलेल्या निधीचीही तरुणांना माहिती करून देण्यात आली. त्यांनी भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया इत्यादी युवा विकास योजनांचे कौतुक केले. व्यावसायिकतेवर भर देत, तरुणांना कौशल्य विकासासाठी प्रेरित केले. व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये चांगले समन्वय साधण्यासाठी त्यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. तरुणांना सन्मानचिन्हे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तरुणांनी देखील त्यांचे दिवसांचे अनुभव सांगितले. अजिंक्य गवळी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तुषार साळवे, तेजस पाटील, अनिल बाविस्कर, मुकेश भालेराव आणि रोहन अवचरे यांनी प्रयत्न केले.

००००००००००

 


एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस












         मुंबई, दि. २४ :   तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून  राज्य शासनामार्फत प्रशासन व अर्थव्यवस्थेला गती देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

                हॉटेल ग्रॅंड हयात येथे नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप समिट कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नॅसकॉमचे श्रीकांत वेलामकन्नी यांनी मुलाखत घेतली.

                मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले, राज्यात डिजिटल सेवांचे प्रमाण वाढले असून, बहुतांश शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध झाल्या आहेत. राज्य शासनाने मुंबई विद्यापीठात एआय सेंटरची स्थापना केली आहे. जागतिक आर्थिक मंचासोबत भागीदारीतून इंडस्ट्री केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

                मुख्यमंत्री श्री. म्हणाले, महाराष्ट्राने ट्रिलियन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी राज्याने नीती आयोगाच्या सहकार्याने नवीन आर्थिक रोडमॅप तयार केला जात आहे. विशेषतः मुंबई महानगर क्षेत्राला (MMRDA) १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

डेटा सेंटर आणि फिनटेक क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर

                देशातील ६०% डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत. नवीन मुंबईत डेटा सेंटर पार्क उभारण्यात येत असून, २०३० पर्यंत राज्यातील ५०% वीजनिर्मिती हरित ऊर्जेवर आधारित असेल. मुंबई ही भारताची ‘फिनटेक राजधानी’ असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

नाशिक कुंभमेळा ; अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

                नाशिक येथे २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. या ठिकाणी गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा, आणि आभासी  अनुभव यासाठी अत्याधुनिक उपाययोजना केल्या जातील. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात महाकुंभमेळा यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुकही केले.

कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार

                मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,  शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘अ‍ॅग्री-स्टॅट’ उपक्रमाअंतर्गत संपूर्ण शेती प्रक्रियेचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे. 'ड्रोन शक्ती' कार्यक्रमांतर्गत  ड्रोन प्रशिक्षण देऊन  कृषी फवारणी खर्च कमी करण्याचा मानस आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तिसरी मुंबई

                नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तिसरी मुंबई विकसित करणार असल्याचे सांगून मुखमंत्री म्हणाले, ही 'इनोव्हेशन सिटी'  देशातील सर्वात प्रगत शहरांपैकी एक ठरेल. तीनशे एकरमध्ये ही सिटी विकसित केली  जाणार असून या सिटीमध्ये तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संशोधन, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर भर दिला जाणार आहे. तसेच महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथे जीसीसी पार्क विकसित करणार असल्याचेही ते म्हणाले. यासाठी उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपल्या कल्पना आणि योगदान द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

०००००

 

Friday, 21 February 2025

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे - पालकमंत्री गुलाबराव पाटील ▪ आत्मा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न

 



           जळगाव, दि. २१ ( जिमाका वृत्तसेवा ) - ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतकऱ्यांना मजूर टंचाईच्या समस्येवर तोडगा काढता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्मा अंतर्गत शेतकरी गट स्थापन करून ड्रोनच्या मदतीने फवारणी तंत्रज्ञानाचा लाभ घेवून अनुदानासाठी अर्ज करावा, आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसह शेतीतील विविध अडचणींवर मात करता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे व आधुनिक कृषी साधनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.पिंपळे खुर्द येथे आत्मा (ATMA) अंतर्गत जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

            या कार्यक्रमात आत्मा समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, आत्मा जळगावचे प्रकल्प संचालक कुरबान तडवी, उपविभागीय कृषी अधिकारी (अमळनेर) चंद्रशेखर साठे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. हेमंत बाहेती, वैभव सुर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी किरण देसले, मंडळ कृषी अधिकारी अरुण कोळी तसेच तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक उपस्थित होते. गावचे सरपंच कैलास पाटील, उमेदचे नारायण महाजन, कांचन पाटील, सुदर्शन पाटील, मोती  आप्पा, गोपीचंद पाटील, रविंद्र पाटील, गोपीचंद पाटील, रवींद्र पाटील, मनोज पाटील, बंडू पाटील  यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         चौकट

पालकमंत्र्यांचा झाला नागरी सत्कार

            ग्रामपंचायत कार्यलयात मंत्री गुलाबराव पाटील यांचा ग्रामस्थांनी व ग्रा.पं. मार्फत शाल श्रीफळ व गुलाबाचा हार घालून भव्य नागरी सत्कार केला. प्रसंगी त्यांनी सांगितले की, गावाचे  प्रेम व सत्कार सदैव स्मरणात राहील व गावासाठी निधीची निकड भासू देणार नाही. यावेळी सरपंच सौ. सुनंदा पाटील, उपसरपंच किरण पाटील, मार्केटचे माजी सभापती प्रमोद पाटील, शाखा  प्रमुख ललित पाटील, कैलास पाटील  ग्रा.पं. सदस्य विनोद पाटील, जगदीश पाटील, मानसी पाटील, सुनंदा पाटील, यशंवत श्रीवंत, राजू मोरे,  समाधान पाटील आदी उपस्थित  होते.

            शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात आत्मा प्रकल्प संचालक कुरबान तडवी यांनी ॲग्री स्टेक शेतकरी नोंदणीबाबत मार्गदर्शन केले. रब्बी हंगामातील पिकांवरील कीड व रोग संरक्षणाविषयी डॉ. हेमंत बाहेती यांनी माहिती दिली. शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध कृषी यंत्रांची देखभाल आणि दुरुस्ती कशी करावी, यासंदर्भात वैभव सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे फवारणीचे महत्त्व आणि त्याचा उपयोग याविषयी यश वाघ यांनी सखोल माहिती दिली.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मा बीटीएम दीपक नागपुरे यांनी केले. त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी किरण देसले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी ड्रोनद्वारे फवारणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी सहाय्यक विमल सुरावार, गजानन मोरे, राहुल पवार, पद्माकर पाटील, तृषिकेश रेड्डी, अक्षय पाटील, नितीन पाटील, ललित पाटील, रविंद्र पाटील यांनी मेहनत घेतली.

००००००००००


Thursday, 20 February 2025

जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत घरकुल मंजुरी व हप्ता वितरण सोहळा

                  जळगाव दि. 20 ( जिमाका वृत्तसेवा ) प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत जळगाव जिल्ह्याकरिता मंजूर ८९,८६८ उद्दिष्टांपैकी ८४,४५४ लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण व घरकुल मंजुरी पत्र वितरण कार्यक्रम शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

            राज्यस्तरावर पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वीस लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र व दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

            जळगाव जिल्ह्यातील ८४,४५४ लाभार्थ्यांना पहिला हप्ता व घरकुल मंजुरी पत्र प्रदान करण्याचा हा महत्त्वपूर्ण सोहळा थेट प्रक्षेपणाद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्रामपंचायत स्तरावर देखील दाखविण्यात येणार आहे.

            केंद्रीय मंत्री अमित शहा हे राज्यभरातील लाभार्थ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार असून, जळगाव जिल्ह्यातील जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर, भुसावळ तालुक्यातील पहूर पेठ, देवगाव, साकरी, पाळधी, हातेड, दहिवद या ग्रामपंचायतींच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

            या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, तसेच लाभार्थ्यांनी जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामपंचायत स्तरावर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी केले आहे.

                                                                               0000000000

भुसावळ येथील संतोषी माता बहुउद्देशीय क्रीडा संकुल येथे 22 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन.

             जळगाव दि. 20 ( जिमाका )- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व प्रतिष्ठा महिला मंडळ भुसावळ आणि समर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठान, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 09.00 वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन संतोषी माता बहुउद्देशीय क्रीडा संकुल, प्रोफेसर कॉलनी, भुसावळ ता.भुसावळ जि.जळगाव येथे करण्यात आलेले आहे.

         नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असुन 10वी, 12 वी/ सर्व शाखेतील पदवीधारक / आ.टी.आय सर्व ट्रेड/ बी.ई/ बी.सी.ए./ एम.बी.ए तसेच सर्व डिग्री धारक पात्रता धारकासाठी 600 पेक्षा जास्त रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

         जिल्हयातील जैन फॉर्म फ्रेश जळगाव, युवा शक्ती नाशिक, हिताची ॲस्टीमो ब्रेक.प्रा.लि.जळगाव, किरण मशिनटुल्स जळगाव, फ्युचर टेक्स जळगाव,टी.डब्लयु.जे, जळगाव, जैन इंरिकेशन प्रा.लि, मानराज मोटर्सजळगाव,गोविंदा एच.आर.नाशिक अशा आस्थापनांकडे नोकरीची संधी उपलब्ध आहे.

           मेळाव्यात पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर लॉग-इन करुन रिक्तपदांना ॲल्पाय करावे. तसेच ज्या उमेदवारांनी नाव नोंदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्र व बायोडाटासह मेळाव्यास मुलाखतीच्या दिवशी हजर राहावे.

          याबाबत काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 09.45ते संध्या.06.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्रमांक 0257 - 2959790 वर संपर्क साधावा असे आवाहन संदिप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी केले आहे.                                                  ०००००००००००