महात्मा
गांधी उद्यानाचे लोकार्पण
जळगाव शहराच्या विकासासाठी 100 कोटींचा
निधी आणणार
जळगाव, दि. 2 :- महात्मा गांधीजींचा
स्वच्छतेचा विचार सर्वांनी अंगिकारणे आवश्यक असून त्यांनी दाखविलेल्या
स्वच्छतेच्या मार्गावर चालल्यास आपणास स्वच्छता अभियानासारखे उपक्रम राबविण्याची
गरज भासणार नाही असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री
गिरीश महाजन आज यांनी केले.
महात्मा
गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती आणि जागतिक विश्व अहिंसा दिनानिमित्त जळगाव
महानगरपालिका, गांधी रिसर्च फाऊंडेशन,
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, जैन एरिगेशन सिस्टीम, जळगाव यांच्या संयुक्त
विद्यमाने महात्मा गांधी उद्यान पुनर्बांधणी व नुतनीकरणाचा लोकार्पण सोहळ्याचे
उदघाटन वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते चरखा फिरवून करण्यात आले,
त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी
व्यासपीठावर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, आमदार राजुमामा भोळे, आमदार
चंदूलाल पटेल, महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा
पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु के.
बी. पाटील, मनपा स्थायी समिती सभापती वर्षा खडके, उपमहापौर गणेश सोनवणे, माजी
मंत्री सुरेश जैन, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेविका ज्योती तायडे, जैन उद्योग
समुहाचे चेअरमन अशोक जैन, दलूभाऊ जैन आदि उपस्थित होते.
मंत्री
श्री. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, जैन उद्योग समुहाने भाऊंचे उद्यान, काव्यरत्नांजली
चौक, मेहरुण तलावचे सुशोभीकरण यासारख्या अनेक गोष्टी जळगावकरांना दिल्या. त्यातच
नवीन भर म्हणून आता महात्मा गांधी उद्यान लोकांसाठी खुले केले आहे. जैन उद्योग
समुह भवरलाल भाऊंनी दाखविलेल्या मार्गावर चालत असून अशा कार्यातून सामाजिक
बांधीलकी जोपासत आहे. जळगाव ही जैन उद्योग समूहाची कर्मभूमी असल्याने सामाजिक,
शैक्षणिक, कृषी, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. जळगाव शहराचे नाव
फक्त राज्याच्या नाही तर जागतिक पातळीवर नेण्याचे काम जैन उद्योग समुहाने केले
आहे. यापुढे देखील जळगाव शहराच्या विकासासाठी जैन उद्योग समुहाचे सहकार्य कायम राहील
असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
जळगाव शहरासाठी 100 कोटी आणणार
जळगाव
शहराच्या विकासासाठी अनेक प्रकल्प
राबवायचे आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करण्याची गरज आहे. शहराच्या विकासाच्या कामासाठी निधी कमी पडू नये यासाठी शासनाकडून 100 कोटी रुपये मंजूर करुन
घेण्यासाठी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना
भूटून प्रयत्न करणार असल्याचेही मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.
महात्मा
गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी सर्व उपस्थितांना अहिंसा आणि स्वच्छतेची शपथ
दिली. ते म्हणाले की, महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या तत्वांबाबत आजही
आपल्याला इतरांना सांगावे लागते, स्वच्छता अभियानासारखे उपक्रम शासनाला घ्यावे
लागतात. आजोबा वडिलांना सांगायचे की, राग वाईट असतो. परंतु राग अनावर होत असल्यास
त्याचा उपयोग समाजातील वाईट प्रवृत्ती दूर सारण्यासाठी करायला हवा. गांधीजी यांनी
सांगितेल्या तत्त्वांना घेवून आपल्याला पुढे जायचे आहे, असेही ते म्हणाले.
शहराच्या विकासासाठी कटीबध्द
महानगरपालिकेच्या
आयुक्तपदाचा पदभार सध्या माझ्याकडे असून त्या माध्यमातून शहराचा समतोल विकास कसा साधता
येईल यासाठी मी कटीबध्द असल्याचे जिल्हाधिकारी तथा मनपा प्रभारी आयुक्त किशोर
राजे निंबाळकर यांनी सांगितले. भवरलाल जैन ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे
महात्मा गांधी उद्यानाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. नुतनीकरण करणे सोपे आहे, मात्र
त्याची देखभाल व दुरूस्ती करणे खर्चीक व अवघड आहे. जळगाव मनपाकडून भवरलाल जैन ॲण्ड
कांताबाई जैन फाऊंडेशनला उद्यानाच्या देखभालीसाठी खर्च देण्यात येईल. असेही जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी
सांगितले.
महानगरपालिका,
गांधी रिसर्च फाऊंडेशन, भवरलाल ॲण्ड
कांताबाई जैन फाऊंडेशन, जैन एरिगेशन सिस्टीम, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने
महात्मा गांधी उद्यान पुनर्बांधणी व नुतनीकरण करण्यात आले. या नुतनीकरणाची सुरवात
28 जुलैला करण्यात येवून 2 ऑक्टोबरला काम पूर्ण झाले. गांधीजींच्या जीवनदर्शनाचा
उलगडणारा प्रवास 135 फुट लांबीच्या भिंतीवर मोहन ते महात्मा याबाबतचे प्रदर्शन
उद्यानात लावण्यात आले आहे. महात्मा गांधीच्या पेटी चरख्याच्या रचनेवर आधारीत 625
मीटरचा 4 मीटरचा रुंदीचा वॉकींग ट्रॅक, लहान व मोठ्या मुलांसाठी आकर्षक खेळणी, वीस
हजार फुटांचे प्रशस्त लॉन्स, म. गांधीजी, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांचे
संदेश उद्यानात लावण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या
सुरवातीस महात्मा गांधी उद्यानाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते फीत
कापुन उद्घाटन करण्यात आले. तर उद्यानातील महात्मा गांधी यांच्या पुर्णाकृती
पुतळ्याचे अनावरण महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते करण्यात
आले. यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते. महात्मा
गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी हार
अर्पण करुन अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या
सुरवातीस शाळेच्या मुलांनी महात्मा गांधी
यांचे आवडते गाणे वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड परायी जाणे रे सादर केले.
या
कार्यक्रमास मराठी, उर्दु, इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थीनी,
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शंभू पाटील तर आभार
भुजंग बोबडे यांनी मानले.
0000
No comments:
Post a Comment