Monday, 1 July 2019

पर्यावरण संवर्धनासाठी वनराईशिवाय पर्याय नाही- जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे







             जळगाव, दि.1 :- पर्यावरण संवर्धनासाठी वनराईशिवाय पर्याय नाही. वनराई राहिली, तर नद्या- नाले वाहतील. मानवासह पशुपक्ष्यांना पाणी मिळेल. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करीत त्याचे संगोपन व संवर्धन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.
            33 कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत रामदेववाडी येथे जिल्हास्तरीय वृक्षारोपण शुभारंभ कार्यक्रम आज सकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर सीमाताई भोळे, मुख्य वनसंरक्षक ए. एस. कळसकर, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव  वन विभागाचे उप वनसंरक्षक डिगंबर पगार, यावल वन विभागाचे उप वनसंरक्षक प्रकाश मोराणकर, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, विभागीय वन अधिकारी मधुकर नेमाडे, स. ई. शेख, संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा भोसले, रामदेववाडीच्या सरपंच न्यालाबाई गजानन पवार, जिल्हा  क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले, वृक्षारोपण हे राष्ट्रीय कर्तव्य असून भावी पिढीच्या सुरक्षिततेसाठी हे काम प्रत्येकाने केले पाहिजे. स्वच्छ हवा, पुष्कळ पर्जन्यमान, दुष्काळ विरहीत राज्य, तापमानात घट यासाठी वनराई आवश्यक आहे. महापौर श्रीमती भोळे यांनी वन, सामाजिक वनिकरण यांनी केलेल्या वृक्ष लागवडीच्या तयारीबाबत समाधान व्यक्त करीत नागरिकांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी वनसंरक्षणाचे महत्व विशद करीत वनराईचे संरक्षण व संवर्धन होवून गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश वायू प्रदुषणमुक्त करावे, असे आवाहन केले.
            मुख्य वनसंरक्षक श्री. कळसकर यांनी वृक्ष लागवडीमुळे पर्यावरणाचा समतोल अबाधित राहण्यास कसे उपयुक्त ठरेल हे स्पष्ट करून उपस्थितांना रोपांचे संगोपन मुलांप्रमाणे करावे, असे आवाहन केले. उपवनसंरक्षक श्री. पगार यांनी जिलह्यातील विभागनिहाय वृक्ष लागवडीचे उदिष्ट आणि आतापर्यंत केलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली.
       जळगाव जिल्ह्यास 1 कोटी 15 लाख रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यात वनविभाग 41.60 लाख, सामाजिक वनीकरण 20.00 लाख, ग्रामपंचायत 36.77 लाख, इतर शासकीय यंत्रणा 17.71 लाख असे एकूण  116.08. तसेच जलसंपदा विभाग, जळगाव 1 लाख 31 हजार 825,  एमआयडीसी 30 हजार, शिक्षण विभाग 1 लाख 30 हजार 372, उर्जा विभाग 4530 असे मिळून 1 कोटी 15 लाख रोपांची लागवड करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
0000

No comments:

Post a Comment