जळगाव, (जिमाका) दि. 2- जिल्हा प्रशासनातर्फे
आयोजित करण्यात आलेला लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात प्रभारी
जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या लोकशाही दिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी
सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. आज झालेल्या लोकशाही
दिनी एकूण 118 तक्रार अर्ज दाखल झाले. यामध्ये प्रामुख्याने सहकार, जिल्हा परिषद,
महानगर पालिका, महसुल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पोलीस व महिला व
बालविकास विभाग यासह इतर विभागांच्या तक्रारींचा समावेश आहे.
या जिल्हास्तरीय लोकशाही दिनास, यावल वन विभागाचे उप
वनसंरक्षक पी.पी.मोराणकर, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत
सोनवणे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) बी. ए. बोटे,
जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हाअधिक्षक भूमिअभिलेख सुनिल भोंगळे,
विशेष भुसंपादन अधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, सहाय्यक
प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी
उपस्थित होते.
लोकशाही दिनाच्या
कार्यक्रमानंतर प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी गेल्या अकरा महिन्यातील लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या
तक्रारी अर्जांपैकी प्रलंबित तक्रारींचा
आढावा घेतला. तक्रार अर्ज संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात
आलेल्या आहेत. त्या सर्व तक्रार अर्जांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही
करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिलेत. तक्रारदारांना पुन्हा
लोकशाही दिनात तक्रार घेऊन येण्याची आवश्यकता भासू नये, याची दक्षता घेण्याच्या
सूचनाही प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.
नंदकुमार बेडसे यांनी यावेळी सर्व संबंधित
अधिकाऱ्यांना दिल्यात.
तसेच यापुढे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी प्रत्येक
तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येईल. या लोकशाही
दिनास संबंधित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी आपल्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना
उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात.
तालुकास्तरीय लोकशाही दिनात आपल्या
विभागाशी संबंधित प्राप्त तक्रारी स्विकारून निपटारा लवकरात लवकर करावा. तालुकास्तरावर
आयोजित लोकशाही दिनात तक्रारदारांना आपल्या तक्रारींचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही असे वाटल्यास ते
तक्रारदार जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आपल्या तक्रारी दाखल करू शकतील. असेही प्रभारी जिल्हाधिकारी
डॉ. बेडसे यांनी उपस्थितांना सांगितले.
त्याचप्रमाणे नागरीकांनी लोकशाही दिनाशी संबंधितच तक्रारी
तालुकास्तरावरील लोकशाही दिनात मांडाव्यात. न्यायप्रविष्ठ असलेल्या विषयांच्या व
इतर तक्रारी लोकशाही दिनात आणू नयेत, लोकशाही दिनास बाहेरुन गावाहून नागरीक येत
असतात. त्यामुळे त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण होण्यासाठी सर्व
विभागप्रमुखांनी उपस्थित रहावे. जे विभागप्रमुख विनापरवानगी गैरहजर राहतील.
त्यांचेवर कार्यवाही करण्याचा इशाराही प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. बेडसे यांनी
आजच्या बैठकीत दिला.
0000
No comments:
Post a Comment