Friday, 30 June 2023

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

     जळगाव, दि. ३० (जिमाका वृत्तसेवा) : शासनाच्या सामाजिक न्याय विभाग अंतर्गत जळगांव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सिंधी कॉलनी, जळगांव या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता शालेय विद्यार्थ्यानी १२ जुलै, २०२३ पर्यंत व कनिष्ठ महाविद्यालय विभाग विद्यार्थ्यांनी ३१ जुलै, २०२३ पर्यंत (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) तसेच बीए/ बीकॉम/बीएससी, इयत्ता १२ वी नंतरच्या पदविका आणि पदविनंतरचे पदव्युत्तर सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांनी ३१ जुलै, २०२३ पर्यंत प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल एस. आर. पाटील यांनी केले आहे
     प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाष्टा, भोजन, निवास, निर्वाहभत्ता, शैक्षणिक सहित्य व संगणक सुविधा, वायफाय सुविधा व इतर सोयीसुविधा शासनामार्फत विनामूल्य पुरविण्यात येतात.
     ज्या विद्यार्थ्यांनी या वसतिगृहात प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांनी वसतिगृहात येऊन अर्ज प्राप्त करुन ३१ जुलै, २०२३ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म विहित मुदतीत सादर करावा. तसेच अधिकमाहितीसाठी डॉ. बाबासाहेब आबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जळगाव येथील गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन सुर्यभान पाटील, गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी 7 जुलैपर्यत मुदतवाढ

      जळगाव, दि. ३० (जिमाका वृत्तसेवा) : धनगर समाजाच्या (भटक्या जमाती-क) विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये पहिली व पाचवीच्या वर्गात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून यापूर्वी ३० जून, २०२३ पर्यत अर्ज मागविण्यात आले होते. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत ७ जुलै, २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
     अर्ज करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड, जळगाव येथे संपर्क करावा. अधिक माहितीसाठी कार्यालयीन सहाय्यक आकाश साबळे-८८५५९०९६९४ व मिलींद पाटील-७९७२७६५९५५ यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन महेंद्र चौधरी,  सहाय्यक लेखाधिकारी, समाज कल्याण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

000000

कृषि दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन

     जळगाव, दि. ३० (जिमाका वृत्तसेवा) :- कृषि विभाग, आत्मा व कृषि विभाग, जिल्हा परिषद, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने हरीत क्रांतीचे जनक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंतीनिमित्त १ जुलै, २०२३ रोजी सकाळी ११.00 वाजता पुज्य साने गुरुजी सभागृह, जिल्हा परिषद, जळगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. असे सुरज जगताप, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
    या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून ना. गुलाबराव पाटील, मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री, जळगाव जिल्हा हे राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमन मित्तल हे आहेत. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव पंकज आशिया, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. तर कापुस पैदासकार, कापुस संशोधन केंद्र, जळगाव डॉ. गिरीष चौधरी, वरिष्ठ शास्त्रज्ञ, किरण जाधव, वरिष्ठ शास्त्रज्ञ, डॉ. हेमंत बाहेती हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
     या कार्यक्रमास शेतकरी बांधव तसेच नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Wednesday, 28 June 2023

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत ज्ञानेश्वर आमले यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 50 लाखाचा धनादेश वितरित

 

 जळगाव, दिनांक २८ (जिमाका वृत्तसेवा) : शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जळगांव येथील पोलीस कवायत मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्र, जळगांव व जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ, जळगांव या कार्यालयाकडून  रोजगार  व स्वयंरोजगारासाठी राबविण्यात येणा-या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती  कार्यक्रम योजनेमध्ये लाभ घेतलेले श्री ज्ञानेश्वर विठ्ठल आमले, रा. खडके, ता. भुसावळ यांना फलॉय ॲश ब्रिक्स या उत्पादनासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, भुसावळ या शाखेने ५० लाख रुपये एवढे कर्ज मंजुर  केले. तसेच त्यांना १७.५० लाख रुपये एवढे अनुदान शासनाकडुन मिळणार आहे. श्री. आमले यांना ५० लाख रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

जिल्ह्यातील युवक व युवतींनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेमध्ये रोजगार व स्वंयरोजगारासाठी cmegp.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावा, तसेच योजनेच्या अधिक  माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा खादी ग्रामोद्योग, शासकीय आयटीआयजवळ, जळगांव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, श्री. चेतन पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                             ००००००

शासन आपल्या दारी अभियानातंर्गत आयोजित रोजगार मेळाव्यात 1074 उमेदवारांची प्राथमिक निवड

 जळगाव, दिनांक २८ (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयाने २७ जून, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून “शासन आपल्या दारी” या उपक्रमातंर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि  जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे केले होते.

  या मेळाव्यासाठी एकूण १२ औद्योगिक / खाजगी आस्थापनानी १० वी पास/ १२ वी पास, आयटीआय, डिप्लोमाधारक, पदवीधर आणि इतर शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या होत्या. रोजगार मेळाव्यासाठी एकूण 2241 रिक्तपदे कळविण्यात आली होती. मेळाव्यास 1335 उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी 1074 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली असून 46 उमेदवारांची अंतिम निवड झाली आहेत. विविध आस्थापनांच्या स्टॉलवर भेटी देऊन मुलाखती दिलेल्या उमेदवारांची निवड प्रक्रियेची कार्यवाही उदयोजकांचे स्तरावर सुरु असल्याचे वि. जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                             00000

जिल्हाधिकारी कार्यालयात ३ जुलै रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

   जळगाव, दि. २८ (जिमाका वृत्तसेवा) :- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार जुलै महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, ३ जुलै, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.     

          तरी जिल्ह्यातील नागरीकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

                                                                      00000

Tuesday, 27 June 2023

उपेक्षित, वंचितांचं आयुष्य पालटलं! शासकीय योजनांच्या लाभाचे फलित योजना कल्याणकारी, शासन आपल्या दारी

 











            जळगाव, दि.27 जून 2023 (जिमाका) - कोणाला रोजगार नव्हता, कोणी शेतमजूरी, हात काम करून शिक्षण घेत होतं...कोणाला जन्मतः कर्णदोष होता.. कोणाला हात-पायाचं व्यंग होतं.. अशा उपेक्षित, वंचितांना शासकीय योजनांचा परिसस्पर्श लाभला असून त्याचं आयुष्य पालटून गेलं आहे. 'शासन आपल्या दारी' या शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमात शासनाचे हे लाभार्थी जळगाव येथे एका छताखाली जमले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.

अगरबत्ती विक्रीतून मिळाले आर्थिक बळ..

            जळगाव मधील पिंप्राळे येथे राहून अगरबत्ती विक्रीतून उदरनिर्वाह करणाऱ्या सागर सुधाकर सुतार याला जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या दिव्यांग सक्षमीकरण योजनेमधून तीनचाकी व्हीलचेअर सायकल मिळाली. यामुळे त्याला आता त्याचा अगरबत्ती विक्रीच्या व्यवसाय करण्यास एक नवीन बळ मिळणार आहे अशी प्रतिक्रिया सागर सुतार यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमात व्यक्त केली.

श्रवण शक्ती मिळाल्यानं आयुष्य पालटलं…

            साडेपाच वर्षाच्या रूदुराज गांगुर्डेला जन्मत: दोन्ही कानानी ऐकू येत नव्हते. खासगी रुग्णालयात त्याच्या कानाच्या शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे सहा लाखापर्यंत होता. त्यांच्या उपचाराची आम्हाला चिंता सतत सतावत होती. मात्र आमच्या मदतीला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाची योजना देवदूतासारखी धावून आली. या योजनेच्या माध्यमातून पुण्याच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये काँक्रिलियर इम्प्लांटची अवघड शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. यामुळे माझ्या रुदुराजला आता चांगलं ऐकू येत आहे. तो हसतखेळत जगत आहे. त्याचं आयुष्य  पालटून गेलं आहे. अशी भावना रुदुराज चे वडील वसंत गांगुर्डे, आई सरिता गांगुर्डे यांनी व्यक्त केली आहे.

स्वाधार योजनेच्या लाभामुळे यशवंतला मिळाली कामापासून सुटका…

            जळगाव मधील एम. जे महाविद्यालयात समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणारा यशवंत किशोर कुंवर (रा.रायखेड, ता.शहादा, जि.नंदुरबार) हा शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवत होता. त्यामुळे त्याला अभ्यासाला पुरेसा वेळ देता येत नव्हता. अशातच त्याला समाज कल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची माहिती मिळाली आणि योजनेचा लाभ मिळाला. या योजनेत वसतिगृहाबाहेर राहून शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. यशवंतला या स्वाधार योजनेतून पहिल्या वर्षी ३८ हजारांची आर्थिक मदत मिळाली यामुळे यशवंतची वेटर कामापासून सुटका झाली असून आता त्याला अभ्यासाला ही पुरेसा वेळ देता येत आहे.

शेतमजूराच्या मुलाचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार…

            वडील लहानपणीच वारले होते. त्यामुळे आई दुसऱ्याच्या शेतात शेतमजुरी करून माझ्या शिक्षणाचा खर्च भागवत होती. मीही पडेल ते काम करून माझं बीकॉम चे शिक्षण पूर्ण केले. जळगावच्या नूतन मराठाच्या महाविद्यालयात एम कॉम शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता. मात्र या पदव्युत्तर पदवी शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा यांची संपूर्ण कुटुंबाला चिंता होती. मात्र समाजकल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत ३९ हजार ७०० रूपयांची मदत मिळाल्याने आता माझं एमकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण होणार आहे. अशी प्रतिक्रिया मिलिंद एकनाथ निकम (रा‌. मालेगांव, जि.नाशिक) यांनी दिली आहे.

ट्रॅक्टर मिळाल्याने शेतीची मशागत करणं सहज झालं शक्य..

            जळगाव जिल्ह्यातील लोणखडी येथे लताबाई जुलाल पाटील यांची अडीच एकर बागायती शेती आहे. बागायती शेती करतांना ते बैलजोडी व पारंपरिक अवजारांसह शेती करत होते‌. यामुळे शेतीची मशागत करण्यास फार कष्ट घ्यावे लागत होते. त्यांना कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेतंर्गत कृषि ट्रॅक्टर साठी 1 लाख 25 हजार रुपयांचा  मिळाला. त्यामुळे आता त्या ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत करणं सहजशक्य झाले असून त्यांच्या शेतात मका, कापूस पिकांचे उत्पादन घेत आहे. अशी प्रतिक्रिया लताबाई पवार यांनी दिली आहे.

महारोजगार मेळाव्यात योगेशला मिळाली नियुक्ती..

            जळगाव येथील योगेश पाटील यांचे शिक्षण बीएस्सी झाले असून आज जिल्हृयात  शासन आपल्या दारी’ अभियांनातर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज शासन आपल्या दारी याकार्यक्रमातंर्गत नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे आज पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात उपस्थित राहून ॲन्टीमो ब्रेक सिस्टीम्स इ. प्रा. लि. बांभोरी जि.जळगाव या कंपनीत रोजगार मेळाव्यात कागदपत्रे सादर केली. कंपनीने त्याची मुलाखत घेऊन त्वरीत ट्रेनी या पदावर नियुक्ती मिळाल्यामुळे योगेशने शासनाचे आभार मानले आहे.

गिरीषला मिळाला वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ..

            गिरीष किशोर पाटील, जळगाव यांचे शिक्षण एमबीए पर्यंत झाले असून वडील रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतात. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने त्यांने व्यवसाय सुरु करण्याचे ठरिवले. यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची त्याला माहिती मिळाली. व त्याने महामंडळाकडे कॅफेटिरीया चालविण्यासाठी कर्ज मंजूरीसाठी प्रकरण सादर केल्यावर त्यांला 5 लाखांचे कर्ज मंजूर झाले. कर्ज मंजुर झाल्यावर त्यांने पहिल्या हप्त्याची नियमित परतफेड केल्यानंतर गिरीषला 5 हजार 500 रुपयाचा व्याज परतावाही महामंडळाकडून मंजूर झाल्याने गिरीषला शासन आपल्या दारी या उपक्रमाचा फायदा झाला असून त्याने शासनाचे आभार मानले आहे.

धनश्रीने केले एमएससीआयटीचे मोफत प्रशिक्षण…

            धनश्री सपकाळे ही जळगाव येथील रहिवासी असून ती टीवायबीए ला शिक्षण घेत आहे. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळामार्फत अनूसूचित जातीच्या लाभधारकांना व्यवसाय तसेच कौशल्य प्राप्त करुन तांत्रिक व्यवसाय सुरु करण्यासाठी 3 ते 6 महिन्यापर्यंत मोफत प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती तीला मिळाली आणि धनश्रीने एमएससीआयटी संगणकाचा कोर्स करण्यासाठी महामंडळाकडे अर्ज सादर केला. महामंडळामार्फत धनश्रीने तीन महिन्याचे शासनमान्य संस्थेत एमएससीआयटीचे प्रशिक्षण यशस्वी पुर्ण केले असून प्रशिक्षणासाठी धनश्रीला 3 हजार रुपयाचे विद्यावेतन ही मंजूर झाले आहे. तीच्याप्रमाणे इतर मुलींनीही स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच मोफत प्रशिक्षणांचा लाभ घेण्यासाठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या इतर योजनेचा लाभ घ्यावा असे ती सांगते.

000000

खान्देशसाठी जळगाव येथे स्वतंत्र विभागीय आयुक्तालय; केळी विकास महामंडळासाठी १०० कोटींची तरतुद-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यातील प्रकल्पांना गती देणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 




























            जळगाव, दि.२७ जून २०२३ (जिमाका) - खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी जळगाव येथे विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात येईल. तसेच केळी विकास महामंडळासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात येईल. त्याचबरोबर बोदवड उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. अशा जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केल्या. जळगाव शहर खड्डेमुक्त करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना गती दिली जाईल. अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यतील लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भाषणात मागणी केलेल्या याबाबींवर मुख्यमंत्र्यांनी यावेळी या घोषणा केल्या.

            पोलीस कवायत मैदान येथे 'शासन आपल्या दारी' या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते‌. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वैद्यकिय शिक्षण, ग्रामविकास, क्रीडा मंत्री गिरीष महाजन, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष महाजन, आमदार सर्वश्री चिमणराव पाटील, आ.सुरेश भोळे, आ.किशोर पाटील, आ.संजय सावकारे आ.लता सोनवणे, आ.चंद्रकांत पाटील, आ.मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, चंदुलाल पटेल, शिरिष चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

            'शासन आपल्या दारी' अभियानात जळगाव जिल्ह्यात 3 लाख ३ हजारपेक्षा अधिक नागरिकांना लाभ देण्यात आला आहे‌. यापैकी ३५ हजार लाभार्थी आज येथे उपस्थित आहेत. असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिदे म्हणाले, मागील एक वर्षात शासनाने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. सततच्या पावसामुळे झालेले नुकसान नैसर्गिक आपत्ती म्हणून धरले. शेतकऱ्यांना १५०० कोटी रूपयांची नुकसान भरपाई दिली. नैसर्गिक आपत्तीसाठी आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना १२ हजार कोटींची मदत केली आहे‌. एक रूपयात पीक विमाचा निर्णय घेतला. नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला ५० हजार रूपये प्रोत्साहन रक्कम दिली. महिला सक्षमीकरणासाठी, सर्वसामान्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल करण्यासाठी शासन निर्णय घेत आहेत. लेक लाडकी लखपती योजना सुरू केली. शासकीय योजनांचा लाभ घेऊन सरपंचांनी आपले गाव स्वच्छ व समृद्ध करण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सर्वाधिक पायाभूत सुविधा निर्माण करणारे महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे‌. परदेशी गुंतवणूकीत राज्याने आघाडी घेतली आहे. १ लाख १८ हजार कोटी रूपयांची परदेशी गुंतवणूक राज्यात मागील वर्षभरात झाली आहे. राज्यातील सर्व साडेबारा कोटी नागरिकांना आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ५ लाखांपर्यंतचा मोफत उपचार केला जाणार आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पांना गती दिली जाईल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी पाडळसे प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. बोदवड उपसा सिंचन योजनेचे बाकी राहिलेले २० टक्के काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना गती देण्यात येईल. सिंचनासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, मागील वर्षभरात जिल्ह्यात २० हजार हेक्टर शेती क्षेत्रावर ठिंबक सिंचनाचा लाभ देण्यात आला‌. याचा २१ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला. ५० हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला. १ हजार ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. रस्ते कामांकरिता जिल्ह्याला अडीच हजार कोटींची मदत शासनाने केली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा चाळ जळगाव जिल्ह्यात उभारण्यात आल्या. जलजीवन मिशनच्या १३५४ योजना जिल्ह्यात सुरू आहेत‌. फळबाग योजना व नैसर्गिक आपत्तीत जळगाव जिल्ह्याला भरघोस मदत करण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी ४७ कोटींची मदत दिली आहे. जलजीवन मिशनच्या १७६५ कोटींच्या योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. मुक्ताईनगर मध्ये १८५ कोटींचा पूल मंजूर केला आहे. चोपडा पूला करिता १७५ कोटींची शासन मदत झाली आहे. सर्व सामान्यांच्या हितासाठी शासन योजना गतिमान पद्धतीने राबवित आहे.

            वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन म्हणाले, या शासनाने जिल्ह्यात मेहरूण येथे १२४ कोटींचे नवीन अद्यावत क्रीडा संकुल मंजूर केले आहे. अत्याधुनिक मेडिकल हब जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नये यासाठी शासनाने शासन आपल्या दारी लोकाभिमुख अभियान आणले आहे. यात दुर्गम, पाड्या-वस्त्यावरील लाभार्थ्यांला शासकीय योजनांचा लाभ घरबसल्या मिळत आहे.

            यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शासनाच्या विविध योजनांच्या १५ लाभार्थ्यांना व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली. यामध्ये लताबाई पाटील, शशिकांत कोळी, अथर्व साळुंखे, दिपक भिल, गोमा गायकवाड, नीता पाटील, हिलाल बिल, मधुकर धनगर, मोहिनी चौधरी, सोनी गवळे, दत्तात्रय महाजन, विजया देवरे, ज्ञानेश्वर आमले, कु. सायली शिरसाठ, मिलिंद निकम यांचा समावेश होता. यातील प्रातिनिधिक पाच लाभार्थ्यांचा लाभाचे प्रमाणपत्र व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेतून यावेळी दहा रूग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

            यावेळी जळगाव जिल्ह्याने विविध योजनांच्या माध्यमातून दिलेल्या लाभांची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे खान्देशी टोपी, रूमाल, केळीपासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तु, तृणधान्याचा संच व बहिणाबाईंच्या कवितांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले‌. तर उपस्थितांचे आभार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ आशिया यांनी मानले.

            यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी आणि कामगार विभागाच्या लाभार्थीना कामगार किट, टॅक्टरचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातून आलेल्या सरपंचाशी ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यासपीठावरून खाली येत प्रत्यक्ष संवाद साधला.

मुख्यमंत्र्यांनी केले हार्वेस्टिंग मशीनचे सारथ्य

            जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या समारोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः व्यासपीठावर खाली येऊन शेतकऱ्यांना पॉवर टिलर वाटप करण्यासाठी गेले. त्याठिकाणी त्यांना महाडीबीटी योजनेत एका लाभार्थ्यांला मिळालेले हार्वेस्टिंग मशीन दिसले. मुख्यमंत्री स्वतः या मशीनवर चढले आणि त्यांनी मशीनचे सारथ्य केले. त्यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार  किशोर पाटील,  मंगेश चव्हाण हे ही हार्वेस्टिंग मशीनवर सोबत उपस्थित होते.

            कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे डॉ. अमोल शिंदे यांनी शासन आपल्या दारी योजनेची माहिती दिली. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आले‌ आहेत‌. यामाध्यमातून जनकल्याण योजनांचा सर्वसामान्यांना लाभ दिला जात आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

एका छताखाली २५ शासकीय विभागाच्या माहितीचे स्टॉल

            शासन आपल्या दारी अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात विविध शासकीय विभागांचे २५ स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळत मिळाल्यामुळे या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या लेखी समस्या, तक्रारी, निवेदने स्वीकारण्यात आली. जिल्हा सामान्य प्रशासन रूग्णालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरासही या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाअगोदर स्थानिक कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. रोजगार मेळाव्यात एकूण 1335 युवकांनी नोंदणी केली. यापैकी 1074 युवकांची प्राथमिक निवड करण्यात आली तर 46 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या मेळाव्यात 12 विविध आस्थापना सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अपूर्वा वाणी केले.

00000000