Thursday, 2 November 2017

स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ३० शेतकऱ्यांच्या वारसांना ६० लाख रुपयांची मदत



    विशेष वृत्त

           जळगाव, दि. २ - दुर्दैवाने अपघात होवून शेतकऱ्याच्या कुटूंबावर दु: खाचा डोंगर कोसळतो. अशावेळी कुटूंबप्रमुख शेतकरी जर दगावला किंवा अपंग झाला, तर कुटूंब आर्थिक संकटात सापडते. या परिस्थितीत शेतकऱ्याच्या कुटूंबाला मोठ्या हिंमतीने सावरावे लागते. मात्र अशा बिकट प्रसंगी आता राज्य शासन शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहे. दुर्दैवाने अपघात झाल्यास स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतंर्गत विम्याची मदत दिली जाणार आहे. त्यासाठी शासनाने सर्व खातेदार शेतकऱ्यांचा विमा उतरविला आहे. त्यामुळे शेतकरी कुटूंबाला अशा प्रसंगी विम्याची हमखास मदत मिळणार आहे. जिल्ह्यात  ऑक्टोबर १७ अखेर या अपघात विमा योजनेतंर्गत कृषि विभागाकडे ७२ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी ४८ प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर करण्यात आले असून यापैकी ३० प्रस्ताव विमा कंपनीने मंजूर केले आहे. तर ३० प्रस्ताव कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तालुका स्तरावर पाठविण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या वारसांना या योजनेतंर्गत ६० लाख रूपयांची मदत देऊन आघात झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबाला मदतीचा हात दिला आहे.

           या योजनेतंर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रूपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रूपये आणि अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी  झाल्यास एक लाख रूपये मदत  दिली जाते. या लाभासाठी लाभार्थ्यांकडे सातबारा उतारा, 6 क, 6 ड (फेरफार) आदी पात्रता असावी. यामध्ये नोंदणीकृत असलेले 10 ते 75 वयोगटातील खातेदार शेतकऱ्यांचा विमा उतरविण्यात आला आहे.
         विमा संरक्षणासाठी रस्ता, रेल्वे अपघात, उंचावरून पडणे, बुडून मृत्यू, सर्पदंश, प्राणीदंश, खून, जनावराचा हल्ला, दंगल, वीज पडणे, विषबाधा, नक्षलवादी हल्ला व इतर अपघात आदींमधील अपघातांचा समावेश आहे. विम्याचा दावा करण्यासाठी दावा पत्र, वारसा नोंद, शेतकऱ्याचा वयाचा पुरावा, पोलीस (एफ आय आर) किंवा जवाब, बँक पासबुक प्रत, सातबारा उतारा, तलाठी प्रमाणपत्र, 6 ड (फेरफार), उतारा 6 क, शव विच्छेदन अहवाल, पोलीस स्थळ पंचनामा, अपंगत्व आल्यास टक्केवारी प्रमाणपत्र, लाभार्थ्याचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, मृत्यू प्रमाणपत्र व पोलीस मरणोत्तर पंचनामा आदी कागदपत्रे आवश्यक आहे.
            राज्यातील जवळपास १ कोटी ३७ लाख खातेदार शेतकऱ्यांचा विमा शासनाने उतरविला आहे. विम्याचा हप्ताही कंपनीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. दुर्देवाने अपघात झाल्यास अशा संकटसमयी केवळ कृषि कार्यालयात अर्ज भरून अपघातग्रस्त शेतकरी कुंटूंबीय विम्याची मदत मिळवू शकतात. एवढी सुटसुटीत लाभाची ही योजना आहे.  
    या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघातानंतर संबंधित जिल्हा, तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसहीत दावा अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. याकरिता कोणताही वकील किंवा एजंट नेमण्याची आवश्यकता नाही. तरी अपघातग्रस्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येते. या योजनेमुळे घरातील कर्ता शेतकरी पुरूष गेल्यामुळे हवालदील झालेल्या शेतकरी कुटूंबाला ही आर्थिक मदत जगण्याचे बळ देवून जाते.
000

No comments:

Post a Comment