Monday, 28 February 2022

लोकशाही दिनाचे 7 मार्च रोजी दुरचित्रवाणी परिषदेद्वारे आयोजन तहसील कार्यालयात उपस्थित राहून मांडता येणार तक्रारी

             जळगाव, (जिमाका) दि. 28 - नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, सद्यस्थितीत संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. सदरहू विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये तालुका/जिल्हाधिकारी/महानगरपालिका व विभागीय आयुक्तस्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन दुरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferancing) करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

            त्याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांकरिता दिनांक 7 मार्च, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता दुरचित्रवाणी परिषदेव्दारे (Video Conferancing) लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी नागरिकांनी आपल्या तालुक्यातील तहसिल कार्यालयात वेळेवर उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

'गांधीतीर्थ' सर्वांसाठी प्रेरणास्थान -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

            जळगाव दि. 28 (जिमाका वृत्तसेवा ) – जैन हिल्स येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या गांधी धाममध्ये बापूंचे जीवन  चित्रित केलेले आहे. लहान मुली-मुले आणि तरुण पिढी येथे येऊन प्रेरणा घेतात. गांधीजींच्या सत्य, अहिंसा, स्वदेशी, सदाचार आदींचे शिक्षण घेऊन देश चालवणारे देशाला नवी दिशा देऊ शकतात असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गौरवोदगार काढले.

            राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी जैन हिल्सस्थित गांधीतीर्थ ला भेट दिली. गांधी तीर्थ येथे जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, डॉ. सुदर्शन आयंगार यांनी त्यांचे स्वागत केले, या वेळी अतुल जैन सोबत उपस्थित होते.

            संपूर्ण जगाला गांधी विचारांची अनिवार्यता असून गांधी विचारांचे संस्कार अत्याधुनिक पद्धतीने युवा पिढीसमोर गांधी तीर्थ पोहचवित आहे. जगातील सुप्रसिद्ध अशा ऑडिओ गाईडेड म्युझियम खोज गांधीजी की या संग्रहालयास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली. गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन, डॉ. सुदर्शन आयंगार यांनी राज्यपाल महोदयांचे सुतीहार देऊन स्वागत केले. यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनचे मुख्य समन्वयक उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, नितीन चोपडा उपस्थित होते.

            गांधी तीर्थ साकारतांना भवरलालजी जैन यांनी शेती, माती, पाणी आणि शेतकरी तसेच देशाचा, तरुणाईच्या भल्याचा विचार केला. तरुणांना गांधीजींचा आदर्श अनुभवता यावा यासाठी त्यांनी जैन हिल्स येथे गांधी रिसर्च फाउंडेशन, गांधी तीर्थची निर्मिती केली. या माध्यमातून युवाशक्ती, तरुणांबद्दल तसेच ग्रामविकास, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्याबाबत ते सदैव प्रयत्नशील होते. त्यादृष्टीने गांधी रिसर्च फाउंडेशनचे निर्मिती उद्दीष्टाचे कार्य आजदेखील प्रभावीपणे होत आहे.

00000

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

        



            जळगाव, दि. २८ (जिमाका वृत्तसेवा) - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची वाटचाल अत्यंत समाधानकारक असून या विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही राज्यपाल तथा कुलपती श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी आज व्यवस्थापन परिषदेला दिली. 

            राज्यपाल श्री. कोश्यारी हे आज विद्यापीठात जलतरण तलावाच्या उदघाटनासाठी आले होते. उदघाटनापूर्वी त्यांनी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्यांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन, प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार आदी उपस्थित होते.

            श्री. कोश्यारी म्हणाले की, साधने मर्यादित असतांनाही उत्तम काम करता येते. विद्यापीठाच्या प्रश्नांसाठी वित्त विभाग व मंत्रालयातील इतर विभागांशी समन्वय ठेऊन विद्यापीठांनी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने तीस वर्षात उत्तम काम केले आहे. शिक्षक, कर्मचारी व इतर सर्व घटकांचे जे जे प्रश्न आहेत. त्यासाठी आपण निश्चित पुढाकार घेऊन मार्ग काढू त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्र्यांसोबतही बोलू अशी ग्वाही दिली. विद्यापीठाचे प्रवेशद्वार उत्तम असून आत मध्ये प्रवेश केल्याबरोबर बहिणाबाईंच्या कविता पाहून मन भारावते. असे सांगुन श्री. कोश्यारी यांनी पुन्हा वेळ काढून या विद्यापीठाला भेट देईल असे सांगितले.

            यावेळी बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यापीठाच्या विकासासाठी राज्यपालांनी मदत करण्याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधासोबत इतरही मागण्यांसाठी लक्ष घालण्याची विनंती केली. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानपीठ उभे राहत आहे म्हणून या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

            प्रारंभी प्रभारी कुलसचिव प्रा. रा. ल. शिंदे यांनी प्रास्ताविक करतांना जलतरण तलावाची सविस्तर माहिती दिली. प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी विद्यापीठाची थोडक्यात माहिती दिली. व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांनी मोलगी, जिल्हा नंदूरबार येथील आदिवासी पाड्यात विद्यापीठ संचलित वरिष्ठ महाविद्यालय काढण्यात आले असून त्याला विशेष निधी द्यावा अशी मागणी राज्यपालांकडे  केली. विद्यापीठातील विविध विद्यार्थी योजनांची माहिती देऊन विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यापीठाची वाटचाल सूरु असल्याचे त्यांनी सांगितले. दीपक पाटील यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाकडून राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. 

            यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य आर. एस. पाटील, प्राचार्य डॉ. पी. पी. छाजेड, प्रा. एस. आर. चौधरी, प्राचार्य एल. पी. देशमुख, प्राचार्य आर. पी.फालक, प्रा.मोहन पावरा, डॉ.महेश घुगरी, दीपक पाटील, विवेक लोहार, प्रा.जितेंद्र नाईक, सोमनाथ गोहिल, दीपक दलाल यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प.मुख्य अधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे आदि उपस्थित होते.

जलतरण तलावाचे उद्घाटन

            विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या जलतरण तलावाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. जलतरण तलाव पाहून श्री. कोश्यारी यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन, प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार, प्रभारी कुलसचिव प्रा. रा. ल. शिंदे, विद्यापीठ कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांच्यासह विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

            विद्यापीठात आठ लेनचा हा अद्ययावत असा जलतरण तलाव बांधण्यात आला असून त्यासाठी पाच कोटी ६३ लाख, ७५ हजार ९५८ एवढा खर्च आला असून त्यापैकी २ कोटी २५ लाख निधी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राप्त झाला तर उर्वरित ३ कोटी ३८ लाख ७५ हजार ९५८ रूपये विद्यापीठ निधीतून खर्च करण्यात आले. या जलतरण तलावाचे क्षेत्रफळ ३,५१७ स्के.मी. असून ५० मी.x २५ मी. ऑलिम्पीक आकाराचा हा तलाव २६.८५ लाख लिटर क्षमतेचा आहे.

00000











Sunday, 27 February 2022

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी केले स्वागत

            जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा ) :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जळगाव विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाले.

            यावेळी त्यांचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन, आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जैन इरिगेशनचे अतुल जैन यांनी त्यांचे स्वागत केले.

000000

Friday, 25 February 2022

जळगाव जिल्हयातील कोणतेही नागरिक, विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

       जळगाव, (जिमाका) दि. 25 – सदयस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे युक्रेन या देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी  अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच भारतीय नागरिकांसाठी खालील प्रमाणे हेल्पलाईन नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आलेल्या आहेत.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष (गृह विभाग), नवी दिल्ली , फोन – टोल फ्री -1800118797

दूरध्वनी क्रमांक -011-23012113/23014105/23017905, फॅक्स -011-23088124

ईमेल – situationroom@mea.gov.in

 जळगाव जिल्हयातील कोणतेही नागरिक, विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

 जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव

दूरध्वनी क्रमांक -0257-2217193 / 2223180

ईमेल –scy.jalgaon@gmail.com  असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

शेतकऱ्यांनी नवतंत्राचा स्वीकार करून शास्वत शेतीसाठी गटशेतीचा अवलंब करावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प कृषी कार्यशाळा उत्साहात

 






जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा ) :- देशात 52 %  शेतकरी असून शेतकऱ्यांनी  स्वत: नेतृत्व करण्याची गरज असून व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता स्वत व्यापारी दृष्टीकोन ठेवला पाहिजे  यासाठी  बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ( स्मार्ट )  योजना आधारवड ठरणार आहे. निर्यातक्षम केळी घड व्यवस्थापनासाठी अनुदानित तत्वावर योजना राबविण्यासाठी 7 कोटीचा प्रस्तावास शासनाची लवकरच मंजुरी मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांची मोठी हानी होत असते. यामुळे शेतकर्‍यांनी कृषी उत्पादनांवर प्रक्रियेकडे मोठ्या प्रमाणात वळावे, जेणेकरून त्यांना कृषी मालाचा मोबदला चांगला मिळू शकतो. तसेच शेतकऱ्यांनी नवतंत्राचा स्वीकार करून शास्वत शेतीसाठी गट शेतीचा अवलंब करावा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात  पालकमंत्री गुलाबराव  पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत आज समुदाय आधारीत शेतकरी कार्यशाळा उत्साहात पार पडली. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांनी नाविन्याचा ध्यास धरण्याचे आवाहन केले. शेती हा सर्वात मोठा दवाखाना असून यातून सर्वांना आरोग्य प्राप्त होत असते. आणि शेतकऱ्यांना  शासकीय पातळीवरून सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आज स्मार्ट योजनेच्या अंतर्गत समुदाय आधारित शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री  गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार उन्मेष पाटील, आ.राजुमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प. सीईओ डॉ. पंकज आशिया व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे , आत्माचे उपप्रकल्प उपसंचालक मधुकर चौधरी,  यांच्यासह कृषी खात्याचे व नाबार्डचे  अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी कंपन्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री  गुलाबराव पाटील म्हणाले की, केळी उत्पादकांना पुरेसा भाव मिळत नसतांना दुसरीकडे आपल्याच भागात ग्राहकांना आधीच्याच भावात केळी घ्यावी लागत आहे. यामुळे शेती मालास योग्य भाव मिळत नसल्याचे दिसून येत आहे. आपल्याकडे उत्पादीत होणार्‍या केळीपैकी फक्त चार-पाच टक्के केळीवरच प्रक्रिया करण्यात येते. हे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता आहे. ते पुढे म्हणाले की, अनेक शेतकरी तंत्रज्ञानाची कास पकडत असून यातून चांगले उत्पादन घेत आहेत. मात्र अद्यापही अनेक शेतकरी यापासून दूर असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आगामी काळात पालकमंत्री म्हणून शासकीय पातळीवरील जी काही मदत करता येईल याचे आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली. शेती ही फक्त शेती नसून खूप मोठा दवाखाना आहे. . .येथे गेलेल्याला कोणत्याही दुसर्‍या दवाखान्याची गरज पडत नाही असे पालकमंत्री म्हणाले. तसेच शेतकर्‍यांना योग्य प्रमाणात कर्ज भेटत नसल्याचे नमूद करत या प्रकरणी बँकांनी दृष्टीकोण बदलणे आवश्यक असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच शेतकर्‍यांनी आता सौर उर्जेकडे वळण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. जिल्हा परिषदेच्या लहान पाणी पुरवठा योजना सौरउर्जेवर सुरू करण्याचे आपण निर्देश दिल्याची माहिती सुध्दा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे , उत्पन्न व उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी शानच्या योजनानाचा लाभ घेऊन आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे  तसेच केळी हे जिल्ह्याचे प्रीमिअम प्रोडक्ट असून केळी प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी सकारत्मक भूमिका घ्यावी असे आवाहन केले .

कार्यक्रम सुरू होण्याआधी पालकमंत्र्यांनी सभागृहाच्या बाहेर शेतकर्‍यांनी लावलेल्या विविध स्टॉल्सला भेट दिली. यात केळीच्या भाकरींसह कृषीमालांवर प्रक्रिया केलेल्या अनेक पदार्थांचा आस्वाद घेत त्यांनी याबाबतची माहिती जाणून घेतली. प्रारंभी कृषी खात्यातर्फे उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून कृषी खात्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबद्दलची विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी ऍग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण यांनी आपल्या शेतातील उत्पादने मान्यवरांना भेट म्हणून दिले. तर त्यांनी आपल्या मनोगतातून जळगावात मार्च महिन्यात भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. याप्रसंगी विविध शेतकरी गटांना स्मार्ट योजनेच्या अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाचे धनादेश प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे अभ्यासपूर्वक सूत्रसंचालन प्रकल्प विशेषज्ञ संजय पवार यांनी केले आणि आत्माचे प्रकल्प उपसंचालक मधुकर चौधरी यांनी आभार प्रदर्शन यांनी केले.

मान्यवरांच्या हस्ते पुस्तिका विमोचन संपन्न

याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी अभिजित राऊत , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ, पंकज आशिया  व मान्यवरांच्या हस्ते स्मार्ट प्रकल्प माहिती पुस्तिका , तणांचे औषधी गुणधर्म, PMFME घडी पत्रिका व केली काढणी पश्च्यात तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योग घडी पत्रिकेचे विमोचन करून प्रकाशन करण्यात आले. या पुस्तीकांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

पिकेल ते विकेल योजनेतर्गत 18 शेतकरी कंपन्यांना 60 लाखाचे धनादेश वाटप

विकेल ते पिकेल संकल्पनेवर आधारित संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 2 वर्षांपासून सुरु करण्यात आलेले आहे.  या योजने अंतर्गत व्यापाऱ्यांशी झालेल्या करारानुसार जिल्ह्यातील 18 शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी कंपन्यांना केळी. भेंडी, कापूस, मुग बिजोत्पादन , मका, मिरची , नागवेल पान, हळद, भरीताची वांगी , पपई, जिरेनियम ओला पाला व टरबूज अश्या विविध पिकांसाठी विकेल ते पिकेल योजनेतर्गत 60 लक्ष 17 हजार ३३३ रुपयांचे अनुदान ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  वाटप करण्यात आले. यामुळे विकेल ते पिकेल ही योजना शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. 

खासदार उन्मेशदादा पाटील यांनी सांगितले की,

शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी योजनांचा लाभ घेऊन  शेतकरी संघटित होऊन शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी उत्पादक संघटना निर्माण करा. बांधावर बांबू लागवड करून शाश्वत उत्पनाचा स्रोत निर्माण करावा. एक पीक पद्धतीचा वापर न करता बहुपीक पद्धतीचा वापर करून नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. तर आमदार राजुमामा भोळे शेतकरी यांनी आधुनिक शेती वर भर देऊन शेती बरोबर जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करावे. शेतकऱ्यांनी  एकाच पिकाचे लागवड न करता विविध पीके शेतीमध्ये घेणे गरजेचे आहे. शेती विक्री नकरता कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन उत्पादन वाढीवर भर देण्याचे आवाहन केले.

ठळक बाबी

· पोखरा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात एकूण 460 गावांची निवड करण्यात आली असून आज रोजी आज पावेतो जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या 79 हजार 344 शेतकऱ्यांपैकी आज पावेतो 41 हजार 779 शेतकरी बांधवांना तब्बल रक्कम रुपये 257 कोटी 44 लक्ष इतका रकमेचे अनुदान वितरित करण्यात आलेला आहे.

· यात ठिबक सिंचन संच ,शेळी पालन , शेडनेट गृह ,शेततळे, पौलीहाउस, इलेक्ट्रिक मोटारपंप ,फळबाग व वनिका आधारित शेती,,पाईप , रेशीम उद्योग अश्या 22 प्रकारच्या बाबींवर  257 कोटी 43 लक्ष 27 हजार इतके अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर दिलेले आहे. शासनाकडे  225 लाभार्थ्यांचे एक कोटी 66 लाख इतके अनुदान वितरण अंतिम टप्प्यात आहे.

· पोकरा अंतर्गत 26 हजार 637 शेतकऱ्यांना त्यांच्या मागणी  प्रमाणे ठिबक, औजारे, शेड नेट अस्तरीकरणाचे सुमारे 25-30 कोटींचे प्रस्तावांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार  मंजूर केले आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी पूर्व मंजुरी दिलेल्या वस्तू / बाबी खरेदी कराव्यात जेणे करून जेणे करून अनुदान टाकता  येईल.

· सभागृहाच्या बाहेर शेतकऱ्यांनी लावलेल्या विविध स्टॉल्सला भेट दिली. यात केळीच्या भाकरींसह कृषीमालांवर प्रक्रिया केलेल्या अनेक पदार्थांचा आस्वाद घेत त्यांनी याबाबतची माहिती जाणून घेतली.   0000


Thursday, 24 February 2022

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. श्री. उदय सामंत यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

           जळगाव, (जिमाका) दि. 24 –  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री यांचा मा. ना. श्री. उदय सामंत,  यांचा शनिवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजीचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे –

शनिवार दि. 26 फेब्रुवारी, 2022 रोजी सकाळी  -7.45 वाजता मुंबई येथून विमानाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण, सकाळी 9.00 वाजता विमानाने जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने दिपस्तंभ फाऊंडेशन मनोबल संस्था, जळगावकडे प्रयाण, सकाळी 9.20 वाजता दिपस्तंभ फाऊंडेशन मनोबल संस्थेस सदिच्छा भेट, स्थळ : 47 हौसिंग सोसायटी, जिल्हा सत्र न्यायालयाच्या पाठीमागे, जळगाव संदर्भ : श्री. यजुवेंद्र महाजन  -9822476545, सकाळी 9.45 वाजता विष्णू भंगाळे शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ- ओकरनगर, बस स्टँडमागे, जळगाव, सकाळी 10.00 वाजता मोटारीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कडे प्रयाण, सकाळी 10.15 वाजता कवयित्री बहिणाबाईचौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, येथे आगमन व राखीव, सकाळी 10.30 वाजता व्यवस्थापन परिषद सदस्यांसमवेत चर्चा स्थळ – व्यवस्थापन परिषद सभागृह, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, सकाळी  11.00 वाजता विद्यार्थी व प्राध्यापकांसमवेत संवाद, स्थळ – अधिसभा ( सिनेट) सभागृह, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, सकाळी 11.30 ते  दुपारी 1 वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @  जळगाव या अभिनव उपक्रम कार्यक्रमास उपस्थिती स्थळ – दिक्षांत सभागृह, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , जळगाव संदर्भ – मा. संचालक उच्च शिक्षण / मा. संचालक, तंत्रशिक्षण व इतर संबंधित अधिकारी

दुपारी 1.00 वाजता पत्रकार परिषद,  स्थळ – व्यवस्थापन परिषद सभागृह, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संदर्भ – मा. जिल्हा माहिती अधिकारी जळगाव, 1.30 ते 1.45 वाजता राखीव,  दुपारी 2.00 वाजता स्व.. रमेश डोंगरशिंदे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट स्थळ – जयहिंद कॉलनी, द्रौपदी नगर, मानराज पार्क समोर, जळगाव, संदर्भ श्री अजय देशमुख -8551088774, दुपारी 2.15 वाजता युवासेनेच्या वतीने आयोजित युवासंवाद कार्यक्रमास उपस्थिती स्थळ – जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव संदर्भ – विराज कावडिया, युवा सेवा सहसचिव – 9422222699 , दुपारी         3 .00 वाजता जिल्हा ग्रंथालय नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळयास उपस्थिती- स्थळ – जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय परिसर, महाबळ कॉलनी, संदर्भ – मा. जिल्हा ग्रंथालय अधिकारी जळगाव, दुपारी 4.00 वाजता महाबळ कॉलनी येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण, दुपारी 4.30 वाजता जळगाव विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण

००००

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 26 फेब्रुवारी रोजी जिल्हा ग्रंथालय नुतन इमारतीचे उदघाटन

          जळगाव, (जिमाका) दि. 24 – महाराष्ट्र शासन, उच्च्‍ व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत जिल्हा ग्रथालय अधिकारी कार्यालय, जळगाव या कार्यालयाच्या नुतन इमारतीचे उदघाटन शनिवारी दि. 26 फेब्रुवारी, 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता मा. ना. श्री. उदय सामंत मंत्री उच्च्‍ व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते व मा. ना. गुलाबराव पाटील मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.            

                जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव या कार्यालयासाठी सन 2018-19 मध्ये 26.50 गुंठे जागा जिल्हाधिकारी यांच्याकडून उपलब्ध होवून तात्काळ रु. 5.00 कोटी निधी देखील मंजूर झाल्याने सदर निधीतून या कार्यालयाची सुसज्ज अशी इमारत तयार झाली असून या इमारतीमध्ये सुमारे 250 विदयार्थ्यांसाठी वातानुकूलीत अभ्यासिका, 25 महिलांसाठी स्वतंत्र महिला विभाग, 25 बालकांसाठी स्वतंत्र बाल विभाग, दिव्यांग (अंध) व्यक्तींसाठी स्वतंत्र दिव्यांग विभाग, 15 विदयार्थ्यांसाठी डिजीटल विभाग, मिटींग हॉल व 100 व्यक्तींसाठी ऑडोटोरीयम इ. सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. याचा लाभ जळगाव शहरासह जिल्ह्यातील वाचक, अभ्यासक व ग्रंथालय प्रेमींना  होणार असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

नगरोत्थान महाअभियानांसाठी नगरपालिका व महानगरपालिकां – 6368.98 लाख रुपयांच्या अनुदानास प्रशासकीय मान्यता

         जळगाव, (जिमाका) दि. 24 – जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत नगरपालिका शाखेकडील महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानासाठी नगरपालिकां व महानगरपालिकेस अनुदाने या योजनेंतर्गत सन 2020-21 या आर्थिक वर्षात एकूण 234 कामांसाठी रु. 6368.98 लक्ष रकमेच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या आहेत. आजतागायत या कामांसाठी एकूण 3073.79 लक्ष निधी वितरीत करण्यात आलेला आहे. तसेच नागरी दलितेत्तर वस्त्यांत सुधारणा या योजनेसाठी सन 2020-21 या आर्थिक वर्षात एकूण 212 कामांसाठी रु. 5760.54 लक्ष रकमेच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या असून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या कामांसाठी आजतागायत रु.4027.47 लक्ष निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

 जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2020-21 अंतर्गत महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानांसाठी नगरपालिकांना व महानगरपालिकेस अनुदाने या  योजनेंतर्गत जळगाव शहर महानगरपालिकेकडील एकूण 90 कामांसाठी एकूण रु. 2720.82 लक्ष रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या असून व या कामांसाठी रु. 1062.06 लक्ष रक्कम जिल्हा नियोजन समितीकडून वितरीत करण्यात आली आहे. तसेच नागरी दलितेत्तर वस्त्यांत सुधारणा या योजनेसाठी जळगाव शहर महानगरपालिकेकडील एकूण 78 कामांना 2027.99 लक्ष रकमेच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या असून 1162.09 लक्ष  रक्कम जिल्हा नियोजन समितीकडून या कामांसाठी आजपर्यंत  वितरीत करण्यात आलेली आहे.

 जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2020-21 अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या जळगाव शहर महानगरपालिकेकडील कामांची iPAS प्रणालीमधील सद्यस्थिती

 

                योजनेचे नाव – 22178502 महाराष्ट्र नगरोत्थान महा अभियान – एकूण कामे-90- प्रशासकीय मान्यता रक्कम रुपये हजारात – 272082.18,  iPAS  प्रणालीनुसार कामांची सद्यस्थिती – फायनल कंम्पलिटेट – 0,  फिजिकली कंम्पलिटेट -2 ,   इन प्रोग्रेस -5, नॉट स्टारटेट -3, ऑन टेड्रर -47, वर्क ऑर्डर अवार्ड  - 33

योजनेचे नाव- 22179411 नागरी दलितेत्तर वस्त्यांमध्ये सुधारणा – एकूण कामे -78-  प्रशासकीय मान्यता रक्कम रुपये हजारात – 202799.41 , प्रणालीनुसार कामांची सद्यस्थिती – फायनल कंम्पलिटेट – 0, फिजिकली कंम्पलिटेट -3 , इन प्रोग्रेस -12, नॉट स्टारटेट -0, ऑन टेड्रर -54, वर्क ऑर्डर अवार्ड  - 9   जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिकेकडून सुरु असलेल्या कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

 वित विभाग, शासन निर्णय दिनांक 06 जुन, 2008 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना ज्या आर्थिक वर्षात निधी वितरीत करण्यात आला आहे. त्या आर्थिक वर्षाच्या लगतच्या पुढील आर्थिक वर्षात निधी खर्च न झाल्यास अखर्चित निधी शासन लेख्यात जमा करणे आवश्यक आहे. सन 2020-21 या आर्थिक वर्षात मनपा, जळगाव कडील दोन योजनांसाठी वितरीत एकूण                   रु. 2204.04 लक्ष निधीपैकी अखर्चीत निधी 31 मार्च 2022 पुर्वी निधी खर्च न केल्यास निधी शासन लेख्यात जमा करावा लागणार आहे. यास्तव महानगरपालिकेने ही सर्व कामे मार्च 2022 पुर्वी पूर्ण करुन iPAS  प्रणालीमध्ये सदर कामांचे परिपुर्ण निधी मागणी प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडे तात्काळ सादर करावे असे निर्देश  जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत.

                जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2021-22 अंतर्गत जिल्हा नियोजन समिती कडील उपलब्ध निधीच्या मर्यादेत 100 टक्के कामांसाठी प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत. शहरातील रस्त्यांची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे. जिल्हा नियोजन समितीने केवळ विशेष बाब म्हणून मुख्य रस्त्यांसाठी रु. 4748.81 लक्ष रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन त्या कामांसाठी रु. 2224.16 लक्ष निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. सदर कामे पुर्ण झालेनंतर निधी मागणीचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे आल्यास या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देता येईल. महानगरपालिका क्षेत्रांतर्गत इतर रस्ते महानगरपालिकेने नगरविकास विभागाकडून उपलब्ध होणारा निधी तसेच महानगरपालिकेच्या निधीमधून करणे अपेक्षित आहे. असे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००

महिला शक्ती केंद्राअंतर्गत कंत्राटी पदभरती अंतीम निवड यादी प्रसिध्द

             जळगाव, (जिमाका) दि. 24 – महिला शक्ती केंद्राअंतर्गत कंत्राटी पदभरतीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत मुलाखत घेवून अंतीम निवड झालेल्या उमेदवारांची यादी रोजी Jalgaon.nic.in  या संकेतस्थळावर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील दर्शनी भागात सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००

परिवहन विभागाचा मार्च महिन्याचा तालुकानिहाय दौरा जाहिर

         जळगाव, (जिमाका) दि. 24 - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगावमार्फत मार्च महिन्याचा तालुकानिहाय मासिक दौरा आयोजित करण्यात आला असून याची जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.       

मार्च-2022 चे शिबीर कार्यालयाचे वेळापत्रक, दौऱ्याचे ठिकाण

 अमळनेर-पहिला व चौथा / पाचवा – सोमवार व गुरुवार, जामनेर-दुसरा बुधवार, पाचोरा-  बुधवार (पाचवा), भुसावळ-पहिला, दुसरा व (पाचवा) गुरुवार, चाळीसगाव-पहिला, दुसरा व चौथा शुक्रवार,  यावल - दुसरा मंगळवार, सावदा - पहिला बुधवार, चोपडा - दुसरा सोमवार, रावेर – (पाचवा) मंगळवार, बोदवड - तिसरा बुधवार, पारोळा - तिसरा सोमवार, एरंडोल – चौथा मंगळवार,  मुक्ताईनगर- तिसरा मंगळवार, वरणगाव – चौथा बुधवार याप्रमाणे दौरा राहील.               

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल, अन्यथा रद्द करण्यात येईल. असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी   श्री. लोही यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 

0000

Wednesday, 23 February 2022

जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

             जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि.23:- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 8 मार्च,2022 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) लागू करण्यात आले आहे.

            या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश ज्यांना लाठी किंवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही अशा वृद्ध अथवा अपंग इसमांना लागू राहणार नाही. व प्रेत यात्रा व लग्न समारंभ यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

0000

 

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा विविध स्पर्धेचे आयोजन १५ मार्च पर्यंत सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध

         जळगाव, दि.२३ (जिमाका वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिनाक पासून 15 मार्च, 2022 पर्यंत माझे मत माझे भविष्य- एका मताचे सामर्थ्य ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे. याव्दारे जनतेच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर लोकशाही बळकटीकरणासाठी करण्यात येत आहे. माझे मत माझे भविष्य- एका मताचे सामर्थ्य या मध्यवर्ती संकल्पनेवर राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत प्रश्नमंजुषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा,गाण्याची स्पर्धा, व्हिडीओ मेकिंग स्पर्धा आणि पोस्टर डिझाईन स्पर्धांचा समावेश आहे.

 या स्पर्धेविषयी सविस्तर माहिती  https://ecisveep.nic.in/contest/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच स्पर्धकांनी प्रवेशिका सर्व तपशिलांसह  yoter-contest@eci.gov.in या ईमेलवर 15 मार्च, 2022 पर्यंत पाठवाव्यात ई –मेल करतांना स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा.

 तरी जळगाव जिल्हयातील सर्व नागरिकांनी राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा  अंतर्गत विविध स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांचे मार्फत एका प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात येत आहे.

००००