Friday, 28 March 2025

जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकाच दिवशी 34,423 घरकुलांचे भूमिपूजन

 





        जळगाव दि. 28 मार्च ( जिमाका वृत्तसेवा ) -  प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील 34,423 घरकुलांचे भूमिपूजन 27 मार्च 2025 रोजी एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर करण्यात आले.

            जळगाव जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मध्ये सन 2024-25 या वर्षात एकूण 86,689 घरकुल मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी 71,645 लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करण्यात आला. या अनुषंगाने 4 मार्च 2025 रोजी विशेष मोहीम राबवून 35,264 घरकुलांची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली होती.

            आजच्या विशेष अभियानाअंतर्गत 34,423 घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले. यामुळे आतापर्यंत एकूण 70,687 घरकुलांचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच, रोजगार सेवक, ग्रामीण गृहनिर्माण अभियंते आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

            या कामाच्या सातत्यपूर्ण अनुषंगाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी तालुकास्तरावर भेटी देऊन लाभार्थ्यांना प्रेरित केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व गटविकास अधिकाऱ्यांना नियमित पाठपुरावा करून काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

            प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सुरू असलेला हा वेग गृहनिर्माण क्षेत्रात जळगाव जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरत आहे.

००००००००००००


कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 28 व 29 मार्चला आदिवासी वारसा आणि संशोधनाचा उत्सव_ आदिवासी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यापीठ काम करत असल्याचे पाहुन प्रभावित झालो; विद्यापीठाला याकामी सहकार्य करणार - आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

 




            जळगाव दि.२८ (जिमाका वृत्तसेवा)- आ‍दिवासी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ज्या पध्दतीने काम करते आहे ते पाहुन प्रभावित झालो असून याकामी विद्यापीठाला सहकार्य करत राहण्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

           कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आदिवासी वारसा ओळख आणि अस्तित्वाचा उत्सव (सेलिब्रेटींग ट्रायबल हेरीटेज फॉर इटस आयडेंटीटी ॲण्ड एक्झिस्टन्स) आणि आदिवासी समुदायाच्या संशोधन पध्दती आणि तंत्रज्ञान  या दोन विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे एकत्रित उद्घाटन करतांना डॉ.उईके बोलत होते.  

    अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी होते. विचारधारा प्रशाळेअंतर्गत असलेल्या स्वामी विवेकांनद अध्ययन व संशोधन केंद्र, व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा तसेच आदिवासी अकादमी यांच्या वतीने या दोन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.                   

      आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके म्हणाले की, आदिवासी समुदायाची संस्कृती वेगळी आहे. हा समाज प्रामाणिक, सन्मान करणारा आणि विश्वासू आहे. तो आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येतो आहे. मात्र जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी हा समाज आपली संस्कृती विसरणारा नाही. ही संस्कृती संपुष्टात येणारी नाही. या समाजाच्या विकासासाठी कौशल्यविकासाची तसेच सुक्ष्म आणि लघु उद्योगाची गरज आहे. विद्यापीठाच्या नंदुरबार येथील आदिवासी अकादमीच्या माध्यमातुन विद्यापीठाच्या विविध प्रस्तावासाठी राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांच्यापर्यंत चर्चा करुन पाठपुरावा केला जाईल असेही डॉ.उईके म्हणाले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी विविध क्षेत्रात आदिवासी समुदायाच्या योगदानाची दखल घेतली गेली नाही याबद्दल खंत व्यक्त केली. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी या विद्यापीठामार्फत केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची तसेच विविध अभ्यासक्रमांची माहिती त्यांनी दिली. प्रारंभी विवेकानंद संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा.अतुल बारेकर, आदिवासी अकादमीचे प्रभारी संचालक प्रा.के.एफ.पवार, तसेच व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या संचालक प्रा.मधुलिका सोनवणे यांनी आयोजना मागील भूमिका सांगितली.यावेळी विद्यापीठाच्या वतीने सावित्रीबाई फुले प्रथम शिक्षित विद्यार्थिंनी सन्मान योजनेअंतर्गत ९ विद्यार्थिनींचा प्रा.उईके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, नितिन झाल्टे, चैत्राम पवार, वैभव सुरंगे, प्रा.म.सु.पगारे, प्रा.मधुलिका सोनवणे, प्रा.के.एफ.पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.कविता सोनी व खेमराज पाटील यांनी केले.सामाजिक कार्यकर्ते किशोर काळकर यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.  

वैभव सुरंगे यांचे बीजभाषण

            सामाजिक कार्यकर्ते वैभव सुरंगे यांनी आपल्या बीज भाषणात आदिवासी समुदायाच्या विविध संस्कृतीची माहिती दिली. आदिवासी समुदायाचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होत मात्र देशभर या समुदायाला ओळख मिळाली नाही. या समाजात महिला आणि पुरुषांना बरोबरीचा दर्जा आहे. मात्र या समाजाची ओळख चुकीच्या पद्धतीने मांडली गेली त्यामुळे देशभरातील संशोधकांनी नव्याने या समाजाचे संशोधन करावे. संशोधन करणाऱ्याची दृष्टी सकारात्मक असावी तसेच संशोधन पध्दती योग्य असायला हवी. त्यासाठी या समाजाची ताकद आणि ज्ञान जाणून घ्या. संशोधनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची अस्मिता समोर यायला हवी अशी अपेक्षा सुरंगे यांनी व्यक्त केली. `                यावेळी सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री चैत्राम पवार यांची मुलाखत प्रा. म.सु.पगारे व प्रा. मधुलिका सोनवणे यांनी घेतली. चैत्राम पवार यांनी जल, जंगल, जमीन, पशुधन यांच्या संवर्धन, संरक्षण यासाठी बारीपाडा आणि त्या भागात केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.                                                              ०००००००००००


ना. संजय सावकारे, मंत्री, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा

             जळगाव दि - 28( जिमाका ) :  ना. संजय सावकारे, मंत्री, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढिल शुक्रवार, दिनांक 28 मार्च, 2025 रात्री 01.10  वाजता 22177 भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण, रात्री 01.20  वाजता निवासस्थान येथे आगमन व राखीव.

००००००००००

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण

 

            मुंबई, दि. २८:-  राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आले.

जानेवारी , फेब्रुवारी व मार्च असे ३ महिन्याचे अनुदान आहे.  गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रती दिन प्रती गाय रु. ५०/- अनुदान योजनेर्गत राज्यातील ५६० गोशाळांमधील ५६ हजार ५६९ गायींसाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी ४५ लाख ६० हजार ५०० रुपये इतके अनुदान महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत लाभार्थी गोशाळांना वितरीत करण्यात आले.

             महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या या कार्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्य गोसेवा आय़ोगाचे अभिनंदन केले. देशी गोवंश संवर्धन ही काळाची गरज असून, देशी गोवंशाचे संवर्धनामुळे ग्रामीण विकासाचे गतिमान होण्यास मदत होणार आहे. राज्यातील अधिकाधीक गोशाळांना या योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

            पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आयोगाच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या असून, देशी गोसंवर्धनाला चालना देण्यासाठी गोसेवा आयोगाच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे सुरु असलेले काम प्रशंसनीय आहे. यामुळे देशी गोवंश संरक्षण व संवर्धन होणार असल्याचे, म्हटले आहे.

            देशी गायींची उत्पादनक्षमता कमी आहे. त्यामुळे त्यांचे संगोपन करणे व्यावसायिकदृष्ट्या किफायतशीर ठरत नाही. तसेच भाकड - अनुत्पादक गायींचे संगोपन करणे पशुपालकांना फायदेशीर ठरत नाही. असे पुशधन गोशाळेत ठेवण्यात येतात. अशा गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणी असलेल्या गोशाळेतील गायींना ५०/- रुपये प्रती दिन गोवंश परिपोषण योजना सुरु केली आहे. ही योजना राज्यातील शेकडो गोशाळांना दिलासादायक ठरली असून, यातून आतापर्यंत ५६० गोशाळांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आल्याचे आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी सांगितले.

            ऑनलाईन अनुदान वितरण प्रसंगी आयोगाचे अध्यक्ष श्री. मुंदडा, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, आयोगाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

असे आहे योजनेचे स्वरुप…

            महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या गोशाळांतील भारत पशुधन प्रणालीवर नोंद असलेल्या देशी गायींच्या परिपोषणासाठी प्रती दिन अनुदान देय राहिल. अनुदानाची रक्कमः रुपये ५०/- प्रती दिन प्रती देशी गाय

अनुदान पात्रतेच्या अटी…

            महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्था अनुदानासाठी पात्र. संस्थेस गोसंगोपनाचा कमीतकमी तीन वर्षाचा अनुभव असावा. गोशाळेत किमान ५० गोवंश असणे आवश्यक. संस्थेतील गोवंशीय पशुधनास ईअर टॅगींग करणे अनिवार्य.  ईअर टॅगिंग झालेले गोवंशीय पशुधन अनुदानास पात्र. संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

००००००००००


केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा

             जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा )- केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा दिनांक 29 मार्च  ते 01 एप्रिल  2025 दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा खालील प्रमाणे

                     शनिवार, दिनांक 29 मार्च, 2025 रोजी सकाळी 07 वाजता  छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून मोटारीने मुक्ताईनगरकडे रवाना. सकाळी 10.30 वाजता मुक्ताईनगर, जळगाव येथे आगमन. दुपारी 12 ते संध्याकाळी 06 वाजेपर्यंत मुक्ताईनगर निवासस्थानी  शासकीय काम आणि स्थानिक लोकांशी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.

                     रविवार, दिनांक 30 मार्च, 2025 रोजी सकाळी 10 वाजता मुक्ताईनगर येथून मोटारीने जळगावकडे प्रस्थान. सकाळी 10.30 वाजता जळगाव येथे आगमन. सकाळी 11 ते दुपारी 03 वाजेपर्यंत भाजप कार्यालय, जळगाव येथे कार्यकर्त्यांशी बैठक. दुपारी 03 वाजता जळगाव येथून मोटारीने मुक्ताईनगरकडे प्रस्थान.  दुपारी 3.30 वाजता मुक्ताईनगर, जळगाव येथे आगमन. संध्याकाळी 04 ते 06 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासस्थानी शासकीय काम. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.

               सोमवार, दिनांक 31 मार्च, 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासस्थानी शासकीय काम आणि स्थानिक लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी बैठक दुपारी 02 ते  संध्याकाळी 06 वाजेपर्यंत राखीव. संध्याकाळी 06 वाजता मुक्ताईनगर येथून मोटारीन छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान. रात्री 09.30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे आगमन.

०००००००००००

मंत्री ना. गिरीश महाजन यांचा जळगाव जिल्हा दौरा

             जळगाव दि - 28 ( जिमाका ) :  गिरीश महाजन, मंत्री, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम कार्यक्रम पुढिल प्रमाणे,

        शुक्रवार, दिनांक 28  मार्च, 2025 रोजी सायंकाळी 06.17  रेल्वेने जळगावकडे प्रयाण. रात्री 08.45 वाजता जळगाव येथील रेल्वेस्थानक येथे आगमन.  जळगाव रेल्वेस्थानक येथुन मोटारीने जामनेरकडे प्रयाण. रात्री 09.45 वाजता खासगी निवासस्थान, जामनेर येथे आगमन व राखीव.

००००००००००

दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्थेत वनरक्षक प्रशिक्षण सत्राचा दीक्षांत समारंभ







        जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा ) : दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्था, पाल येथे दिनांक २७ मार्च रोजी नवनियुक्त वनरक्षक प्रशिक्षण सत्राचा (सप्टेंबर २०२४ ते मार्च २०२५) दीक्षांत समारंभ आणि प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

                सहा महिन्यांच्या या प्रशिक्षण सत्रात नागपूर, छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक वनवृत्तातील एकूण ५३ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. प्रशिक्षण सत्रात वानिकी आणि संबंधित २१ विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन तिमाही परीक्षा आणि सेमिनार देखील घेण्यात आले.या परिक्षांमध्ये सर्व ५३ प्रशिक्षणार्थी हे उत्तीर्ण झालेले असून,त्यापैकी ७ प्रशिक्षणार्थींनी ७५% पेक्षा जास्त गुण मिळवून ‘सन्मान प्रमाणपत्र’ पटकावले, तर उर्वरित ४६ प्रशिक्षणार्थींना ‘उत्तीर्ण प्रमाणपत्र’ देण्यात आले. या सत्रापासून सर्व वनरक्षक प्रशिक्षणार्थींना एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या चेतना केंद्रातर्फे ‘Certificate Programme in Forestry’ या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले.

         सत्राच्या परीक्षेत विशिष्ट विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या प्रशिक्षणार्थींना सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. ज्यात,

वन संवर्धन व वन व्यवस्थापन भाग-१.२.३ जेएफएम कार्यक्रम, वन उपयोगिता पदक: नंदकिशोर जनार्धन थोरात

वन्यजीव व्यवस्थापन, जैवविविधता व्यवस्थापन, कुरण व्यवस्थापन विषयक पदक: जीवन केरप्पा चोरमले

अभियांत्रिकी व सर्वेक्षण पदक: नंदकिशोर जनार्धन थोरात

  वन विषयक कायदा:  अमोल बालासाहेब सोनवणे

  क्रॉस कंट्री पदक: शुभम नारायण जाधव

  सर्वोत्कृष्ट/अष्टपैलू गुणसौजन्यपूर्ण वागणूक, प्रत्येक कार्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी: विठ्ठल शंकर मुळे

                 प्रशिक्षण सत्रात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या नंदकिशोर जनार्धन थोरात यांना सुवर्णपदक, स्वप्नील डिलेराम गाते यांना रौप्य पदक व अनिल गुलाबराव वाघ यांना कांस्य पदकांने गौरविण्यात आले. कार्यक्रमात दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्थेचे संचालक हेमंत शेवाळे यांनी सत्राचा अहवाल आणि निकाल वाचन केले. तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे वनवृत्त धुळे राजेंद्र सदगीर आणि एसएनडीटी महिला विद्यापीठ पुणे संकुलचे प्राध्यापक डॉ. सचिन देवरे उपस्थित होते. त्यांनी नवप्रशिक्षितांना मार्गदर्शन केले आणि वन, वन्यजीव संवर्धन आणि मानव वन्यजीव संघर्षाबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.

              कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जमीर शेख, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग, जळगाव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि भविष्यात प्रशिक्षणाचा उपयोग वनसंरक्षण, वनव्यवस्थापन आणि वनसंवर्धनात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमास वन प्रशिक्षण संस्थेतील वनक्षेत्रपाल अंजली बोरावार, वनक्षेत्रपाल अजय बावणे, व्याख्याते रागीब अहमद, संस्थेतील लेखापाल, लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. प्रशिक्षणार्थींचे पालक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

                                                                                   ००००००००

 

Thursday, 27 March 2025

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांचा जळगाव जिल्हा दौरा

         जळगाव दि-27 (जिमका):- राज्याचे आदिवासी विकास, मंत्री डॉ. अशोक वुईके यांचा जळगाव  जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे शुक्रवार दिनांक 28 मार्च, 2025 रोजी सकाळी 6.20 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ, छत्रपती संभाजीनगर येथे आगमन,सकाळी 10.00 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव येथे आगमन व राष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित, सकाळी 11.00 वाजता जळगाव येथून चिखली   जि. बुलढाणा कडे प्रयाण.

००००००००

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; तूर खरेदी नोंदणीला मुदतवाढ!

         जळगाव दि-27 (जिमका):- केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराने (हमीभाव) नाफेड अंतर्गत २०२४-२५ हंगामातील तूर खरेदीसाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शेतकरी ८ एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करू शकतात.

            जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव अशा एकूण १६ खरेदी केंद्रांवर ही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.

                तुर खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी अंतिम तारीख ८ एप्रिल २०२५ आहे. तर खरेदीचा कालावधी १३ फेब्रुवारी २०२५ ते १३ मे २०२५ दरम्यान असणार आहे. तुर हमीभाव ७५५० रुपये प्रति क्विंटल इतका आहे.

            शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, बँक पासबुक, ऑनलाइन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा आणि ८ अ ही कागदपत्रे घेऊन जवळच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय संचालक मंत्री संजय वामनराव सावकारे, उपाध्यक्ष रोहितदादा दिलीपराव निकम, संचालक संजय मुरलीधर पवार आणि प्र. जिल्हा पणन अधिकारी एस.एस. मेने यांनी केले आहे.

000000000

Wednesday, 26 March 2025

मंत्री ना. गिरीश महाजन यांचा जळगाव जिल्हा दौरा

             जळगाव दि - 26 ( जिमाका ) :  गिरीश महाजन, मंत्री, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम कार्यक्रम पुढिल प्रमाणे,

        बुधवार, दिनांक 26 मार्च, 2025 रोजी सायंकाळी 06.15 विमानाने जळगावकडे प्रयाण. रात्री 07.35 वाजता जळगाव विमानतळ, जळगाव येथे आगमन. जळगाव विमानतळ येथुन मोटारीने जामनेरकडे प्रयाण. रात्री 08.10 वाजता खासगी निवासस्थान, जामनेर येथे आगमन व राखीव.

०००००००००००

थकबाकीदारांवर कारवाईचा इशारा; ग्रामपंचायत सदस्यांना कर भरण्याचे आवाहन

           जळगाव दि. 26 मार्च ( जिमाका वृत्तसेवा ) - जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना 31 मार्च 2025 पर्यंत त्यांच्या ग्रामपंचायतींकडे असलेल्या कराची थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे.

               जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी 31 मार्च 2025 पर्यंत त्यांच्या कराची थकबाकी भरलेली नाही, त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते. कर भरण्याची पावती मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत कर न भरल्यास संबंधित व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य पदावरून, ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच पदावरून अपात्र ठरू शकते.

            जिल्हाधिकारी कार्यालयाने ग्रामपंचायत सदस्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या स्थानिक ग्रामपंचायतीकडून कर भरण्याच्या अंतिम मुदतीची माहिती घ्यावी. तसेच, ज्या सदस्यांना कराची पावती मिळाली नसेल, त्यांनी ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधून थकबाकीची पावती मिळवावी आणि मुदतीत भरणा करावा. वेळेत कराचा भरणा न केल्यास थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

००००००००००

जळगाव जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील आश्रमशाळातील विद्यार्थी प्रथमच विधान भवनाला भेट देण्यासाठी रवाना



         जळगाव दि. 26 मार्च ( जिमाका वृत्तसेवा ) - इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून जळगाव जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील आश्रमशाळेतील विद्यार्थी प्रथमच विधानभवनाला भेट देण्यासाठी रवाना झाले आहेत. या अभ्यास भेटीत विद्यार्थ्यांना विधानभवनाच्या कामकाजाचा थेट अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

                नाशिक विभागातील तांडा, वाडी-वस्त्यांवरील आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विधानभवनाच्या कामकाजाचा थेट अनुभव घेण्याची संधी मिळावी यासाठी ही अभ्यास भेट आहे. यासाठी जळगाव विभागाचे 14 विद्यार्थी व 1 शिक्षिका आणि 1 शिक्षक आणि 41 विद्यार्थी यी अभ्यास भेटीसाठी रवाना झाले आहेत.

            यात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विधानसभेचे कामकाज पाहता येणार आहे. आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने पुढे जाऊन राष्ट्राची प्रगती साधावी, हा शासनाचा यामागील उद्देश आहे.

            या अभ्यास भेट दरम्यान विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला, तारांगण या ठिकाणांना देखील विद्यार्थी भेट देतील असा मानस आहे. शासनाच्या विविध उपक्रमांद्वारे विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दार खुले करण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे. या अभ्यास भेटीसाठी सचिव विनोद सिंघल ,संचालक ज्ञानेश्वर खिल्लारी, नाशिक  इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसंचालक भगवान वीर, सहायक संचालक योगेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

०००००००००

जळगाव जिल्ह्यात आधार संच वितरणाची संधी; अर्ज करण्याचे आवाहन

           जळगाव दि. 24 मार्च ( जिमाका वृत्तसेवा )-  माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय, मुंबई यांचे कडून जळगाव जिल्ह्यास आधार संच प्राप्त झाले आहेत. ज्या महसुल मंडळात सद्यस्थितीमध्ये आधार केंद्र नाही अश्या 25 महसुल मंडळ तसेच ७ शहरी भाग मध्ये आधार केंद्र वाटपा बाबत दिनांक २४ मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या संदर्भात मात्र आपले सरकार केंद्रचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइट www.jalgaon.gov.in वर जाऊन अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष, रिक्त महसुल मंडळाचे नावे व आवश्यक माहिती प्राप्त करून घ्यायची आहे.

          इच्छुक आपले सरकार केंद्र चालकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे दिनांक 02 एप्रिल 2025 पर्यंत संध्याकाळी 5.00 पर्यंत https://forms.gle/Bn1s4filH1SDDQB97 या गूगल लिंक वर पाठवावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Tuesday, 25 March 2025

दुय्यम निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च या तीन दिवसाच्या सार्वजनिक सुटृीच्या दिवशी सुरु राहणार

         जळगाव, दि. २५ मार्च २०२५ ( जिमाका वृत्तसेवा )  - वार्षिक बाजारमूल्य दर तक्ते दरवर्षी १ एप्रिल रोजी प्रसिध्द होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात, मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होत असते. तसेच महत्वाच्या सणामुळे देखील दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे. हे लक्षात घेवून आणि आर्थिक वर्ष २०२४-२०२५ या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने दि. २९ ते ३१ मार्च, २०२५ या आर्थिक वर्षअखेर असलेल्या सुट्टीच्या दिवसात सर्व नोंदणी कार्यालये सुरु ठेवण्यात येत आहेत. या बाबतच्या सूचना आपले अधिनस्त असलेल्या सर्व दुय्यम निबंधक यांना आपले स्तरावरुन देण्यात याव्यात, असे नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) उदयराज चव्हाण, महाराष्ट्र राज्य पुणे, यानी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0000000000

जळगाव पोलीस दलाची शांतता समिती बैठक संपन्न_ सण-उत्सव शांतते पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाकडून आवाहन

 






            जळगाव, दि. २५ मार्च २०२५ ( जिमाका वृत्तसेवा )  - जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्यासह विविध पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

       शांतता राखण्याची जबाबदारी पोलिसांबरोबर समाजातील प्रतिष्ठित आणि जबाबदार व्यक्तींनीही स्वीकारली पाहिजे. समाजात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी शांतता समिती सदस्यांनी सतर्क राहावे, असे जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी सांगितले. तसेच, समाजात अज्ञानता दूर करण्यावर भर दिला पाहिजे आणि महापुरुषांच्या स्मारकांचा सन्मान योग्य प्रकारे व्हायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

       सध्या सोशल मीडिया समाजात वाद आणि गैरसमज निर्माण करण्याचे प्रमुख साधन ठरत आहे. विशेषतः १५ ते २५ वयोगटातील युवक सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकत असल्याने वाद उद्भवतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांपर्यंत तत्काळ पोहोचवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.

नागरिकांकडून विविध सूचना

            शांतता समितीच्या बैठकीत नागरिकांनी पुढील महत्त्वपूर्ण सूचना दिल्या –आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट पोलिसांना तत्काळ कळवाव्यात, शहरात अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, ११ एप्रिल रोजी महात्मा फुले मार्केट आणि १४ एप्रिलच्या आधी मुख्य मिरवणूक मार्ग अतिक्रमणमुक्त करावा.

शांतता समिती सदस्यांना हेल्मेट वाटप

बैठकीच्या शेवटी, जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शांतता समिती सदस्यांना हेल्मेट वितरित करण्यात आले. वाहतुकीच्या नियमांचे पालन करून अपघात टाळणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी केले, तर आभार अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी मानले.

0000000000


देशभक्तीच्या रंगात न्हालं जिल्हा कारागृह "जीवन गाणे गातच जावे" संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात संपन्न




             जळगाव दि. 25 मार्च ( जिमाका वृत्तसेवा ) - कारागृहातील बंदी यांचा भावनिक विकास होऊन सकारात्मक विचारसरणी रुजावी, यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असते. समाजविघातक प्रवृत्तीमुळे कारागृहात गेलेल्या बंदींचे समुपदेशन देशभक्तिपर गाण्यांच्या माध्यमातून व्हावे, तसेच संगीताच्या प्रभावी माध्यमातून त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर नेऊन त्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागवावी, या उद्देशाने "जीवन गाणे गातच जावे" या संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांच्या वतीने जळगाव जिल्हा कारागृहात करण्यात आले.

          जिल्हा कारागृहाच्या कला भवनात झालेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील होते. जिल्हा कारागृह अधीक्षक गजानन पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी. जे. चव्हाण, तुरुंग अधिकारी राकेश देवरे, सुभेदार सुभाष खरे, श्री. खांडरे आदी उपस्थित होते.

         राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून, तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अप्पर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे व सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यातील सर्व कारागृहांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

देशभक्तीपर गीतांनी भरले रंग

         कार्यक्रमाची सुरुवात स्वर शुभम ग्रुपच्या प्रतीथयश कलाकार कपिल घुगे आणि सहकारी यांच्या सादरीकरणाने झाली. "इतनी शक्ति हमें देना दाता" या प्रार्थनेसह कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्यानंतर विविध देशभक्तिपर गीतांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले. बंदी बांधवांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांना दाद दिली. "भारत मातेच्या जयघोषाने" संपूर्ण कारागृह दुमदुमून गेले. विशेष म्हणजे, कारागृहात बंदीवास भोगत असलेल्या दोन बंदिवान बांधवांनीही भक्तिगीत व देशभक्तिपर गीते सादर केली.

शाहीर विनोद ढगे यांच्या भारुडाने प्रबोधन

         जळगावचे सुप्रसिद्ध लोकशाहीर शाहीर विनोद ढगे आणि त्यांची "दिशा काला पथक" संस्था यांच्यातर्फे पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून भारुड सादर करण्यात आले. व्यसनमुक्ती व सकारात्मक जीवनदृष्टी यावर भर देणाऱ्या भारुडाने उपस्थितांना विचार करायला भाग पाडले.

कलावंतांचा प्रभावी सहभाग

स्वर शुभम ग्रुप व दिशा काला पथकाच्या १५ कलाकारांनी या कार्यक्रमात भाग घेतला. कार्यक्रमाची सांगता स्वर शुभम ग्रुपच्या कलावंत वर्षा पाटील यांच्या "है मालिक, तेरे बंदे हम" या गाण्याने झाली.

    कार्यक्रमाचे समन्वयक विनोद ढगे यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिशा संस्थेचे सचिन महाजन, मोहित पाटील, अवधूत दलाल, संतोष चौधरी, विनोद पाटील, आकाश भावसार, मनोज जैन यांनी मेहनत घेतली.

००००००००००

Monday, 24 March 2025

शंभर दिवसांच्या मोहिमेत जळगाव जिल्ह्यात अतिक्रमित पाणंद रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

                                                                                

             जळगाव दि. 24 मार्च ( जिमाका वृत्तसेवा )-  गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणंद / पांधण / शेतरस्ते /शिवाररस्ते / शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करावे , वहिवाटीचे रस्ते मोकळे  करुन तयार करण्याच्या सुचना जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. त्याअतंर्गत जळगाव जिल्ह्यात अतिक्रमित शेत पाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी शंभर दिवसांची मोहीम राबविण्यात येत आहे . या मोहिमेचा पहिला टप्पा 22 मार्च 2025 रोजी यशस्वीपणे पूर्ण झाला. जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग, भूमी अभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांनी एकत्रितपणे काम करत 155 गावातील 152 रस्ते मोकळे करण्यात यश मिळविले आहे,  ज्यांची एकूण लांबी 223.4 किलोमीटर आहे. या मोहिमेमुळे 6283 शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

तालुकानिहाय माहिती

 * अमळनेर: 6 गावातील 10 रस्ते, लांबी 15.9 किमी, 2280 लाभार्थी

 * भडगाव: 6 गावातील 4 रस्ते, लांबी 5.5 किमी, 65 लाभार्थी

 * भुसावळ: 3 गावातील 4 रस्ते, लांबी 8 किमी, 272 लाभार्थी

 * बोदवड: 2 गावातील 3 रस्ते, लांबी 4 किमी, 20 लाभार्थी

 * चाळीसगाव: 18 गावातील 23 रस्ते, लांबी 29 किमी, 112 लाभार्थी

 * चोपडा: 21 गावातील 21 रस्ते, लांबी 36.5 किमी, 639 लाभार्थी

 * धरणगाव: 18 गावातील 13 रस्ते, लांबी 18.6 किमी, 384 लाभार्थी

 * एरंडोल: 7 गावातील 7 रस्ते, लांबी 9.7 किमी, 382 लाभार्थी

 * जळगाव: 11 गावातील 12 रस्ते, लांबी 19 किमी, 150 लाभार्थी

 * जामनेर: 15 गावातील 8 रस्ते, लांबी 11 किमी, 530 लाभार्थी

 * मुक्ताईनगर: 6 गावातील 6 रस्ते, लांबी 12 किमी, 332 लाभार्थी

 * पाचोरा: 1 गावातील 2 रस्ते, लांबी 2.5 किमी, 140 लाभार्थी

 * पारोळा: 10 गावातील 10 रस्ते, लांबी 4.4 किमी, 108 लाभार्थी

 * रावेर: 15 गावातील 19 रस्ते, लांबी 32.3 किमी, 622 लाभार्थी

 * यावल: 16 गावातील 10 रस्ते, लांबी 15 किमी, 247 लाभार्थी

           या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी अडथळामुक्त मार्ग उपलब्ध होणार आहे. तसेच शेतीमालाची वाहतूक सुकर होऊन वेळ आणि खर्च वाचणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी या उपक्रमाला सहकार्य करून आपल्या हक्काच्या रस्त्यांसाठी पाठिंबा द्यावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

०००००००००००

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त जळगाव येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम ▪ छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात ऐतिहासिक ठेव्याचा दर्शन सोहळा

 












        जळगाव दि. 24 मार्च ( जिमाका वृत्तसेवा )- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने प्रेक्षकांना अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रावर आधारित नाट्य, संगीत व दृक-श्राव्य सादरीकरणाच्या माध्यमातून ऐतिहासिक ठेवा पाहण्याची संधी मिळाली. त्री जन्मशताब्दी दिनानिमित्त अहिल्यादेवींना वंदन करणारा, नमन करणारा आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित शाहिरी-पोवाडे, नृत्य, नाट्य, संगीत अशा विविध कलांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाची निर्मिती परिवर्तन संस्थेच्यावतीने शंभू पाटील व नारायण बाविस्कर यांनी केली होती.

             कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी  विजयकुमार ढगे, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, उद्योजक किरण बच्छाव, सुरेंद्र पाटील, नहीचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, आर्किटेक शिरिष बर्वे, नारायण बाविस्कर, सुभाष सोनवणे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

             याप्रसंगी अहिल्यादेवींच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, "अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन हा निस्वार्थ सेवा, न्यायप्रियता आणि सामाजिक परिवर्तनाचा आदर्श आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण समाज उन्नतीसाठी कार्य करावे."

जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी अहिल्याबाईंच्या कार्याचा ऐतिहासिक धांडोळा घेऊन इतिहासातील अहिल्यादेवींच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. जळगाव शहरात अहिल्यादेवींचे स्मारक व्हावे यासाठी पाठपुरावा करणारे व त्यासाठी पुढाकार घेणा-यांमधील एक प्रमुख कार्यकर्ते सुभाष सोनवणे यांचा सन्मान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

           परिवर्तनच्यावतीने नाट्यप्रयोगाची निर्मिती करण्यात आली. कार्यक्रमाचे दिग्दर्शक हर्षल पाटील, नाट्य दिग्दर्शक हनुमान सुरवसे, संगीत दिग्दर्शक शरद भालेराव, नृत्य दिग्दर्शक नाना सोनवणे यांचे होते. ७० कलावंतांचा सहभाग असलेल्या नाटकात अहिल्याबाईंच्या जीवनातील विविध प्रसंगांची नाट्यात्मक मांडणी करून सादर केले होते. आकर्षक वेशभूषा, प्रभावी संगीत, उत्तम शाहिरी साथ, गाणी, नृत्य आणि अभिनेत्यांनी केलेला उत्तम अभिनय याद्वारे हा सांस्कृतिक कार्यक्रम प्रभावीपणे सादर करण्यात आला. प्रेक्षागृहात अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. रसिकांनी नाटकास उत्तम दाद दिली. अहिल्यादेवींच्या जिवनावरील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी  मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव तथा अप्पर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभागाचे विकास खारगे व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांचे सहकार्य लाभले होते. अहिल्यादेवींचे कार्य हे आजही सर्वांसाठी प्रेरणादायी असून या थोर समाजसेवी कर्तृत्ववान महिलेच्या कार्याची ओळख सर्वांना व्हावी यासाठी ही निर्मिती केल्याचे शंभू पाटील यांनी सांगितले.

               नाटकात नेहा पवार, दिपक महाजन, तन्वी काटकर, गणेश सोनार, मंगेश कुलकर्णी, होरिलसिंग राजपूत, अक्षय नेहे, योगीता भालेराव, विकास वाघ, गणेश सोनार, पवन भोई यांच्यासह ६० कलावंत सहभागी होते. रंगभूषा चिंतामण पाटील यांनी तर वेशभुषा अजय पाटील यांनी केली होती. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व कलावंतांचा सन्मान करण्यात आला.

००००००००००

 


Friday, 21 March 2025



 जळगाव, दि. 21 मार्च (जिमाका वृत्तसेवा) – उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष सतर्क राहावे, असे निर्देश पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जलजीवन मिशनच्या आढावा बैठकीत त्यांनी स्पष्ट आदेश दिले की, वीज जोडणीअभावी रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांना तातडीने वीज जोडणी द्यावी, जेणेकरून या योजना त्वरित कार्यान्वित होऊन नागरिकांना पिण्याचे पाणी मिळू शकेल.

या बैठकीस जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,महावितरणचे अधिक्षक अभियंता अनिल महाजन, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजेंद्र लोखंडे, सर्व गटविकास अधिकारी, कर्मचारी व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान महावितरणचे अधीक्षक अभियंता महाजन यांना वीज जोडणीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच जलसंपदा व पाणीपुरवठा विभागाने ठेकेदारांवर लक्ष ठेवून प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी, असेही आदेश पालकमंत्र्यांनी दिले.

पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला की, जनतेच्या मूलभूत सुविधांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियोजनबद्ध कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर जबाबदारी निश्चित केली जाईल. गावागावांत पाणीटंचाई जाणवू नये यासाठी प्रशासनाने ग्रामपंचायतींशी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

या बैठकीत जिल्ह्यातील जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या आणि प्रगतीपथावर असलेल्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, पाणीपुरवठा यंत्रणेच्या दुरुस्तीस विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, जेणेकरून नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये.

                                                     0000000000

महाराष्ट्र राज्य परीक्षा पश्रषिद पुणे – 01 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा – 2025

         जळगाव दि. 21 ( जिमाका वृत्तसेवा )- महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक  अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन माहे मे व जून २०२५ मध्ये करण्याचे नियोजित आहे. तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

            परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल्. तेव्हा इच्छूक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळावर भेट दयावी, असे आयुक्त , महाराष्ट्र राज्य परीक्षा परिष्‍द पुणे -०१ यांनी कळविले आहे.

00000000