जिमाका-जळगाव, दि.21:- महाराष्ट्रातील 9 कृषि हवामान विभागांतर्गत
विविध प्रकारची अन्नधान्ये, भाजीपाला, फळपिके, मसाला पिके, औषधी व सुगंधी
वनस्पतीची लागवड करण्यास मोठा वाव आहे. शाश्वत शेतीसाठी शाश्वत बाजारपेठ आवश्यक
ठरते. यामुळे शेती व पूरक उद्योगात स्थिरता येऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती
होते. शाश्वत उत्पादनामुळे ठोक खरेदीदार, निर्यातदार, कृषि प्रक्रिया उद्योग, औषधी
व सुगंधी उत्पादने इ. उद्योग कच्चा मालाच्या मुबलक उपलब्धतेमुळे उभारले जाऊ शकतात.
यामुळे उत्पादक म्हणजेच शेतकरी आणि
प्रवर्तक म्हणजे ठोक खरेदीदार, विक्रेते, निर्यातदार, प्रक्रिया उद्योजक एकमेकांच्या
सहकार्याने, समन्वयाने दोघांचाही फायदा (Mutual benefit) करुन घेऊ शकतात. यासाठी करार
शेती हे महत्वाचे माध्यम आहे. असा करार नाममात्र पाचशे रुपये शुल्क भरुन व शंभर रुपयांच्या मुद्रांक
(स्टॅम्प पेपर) वर दोन्ही पक्षकारांनी सामंजस्याने निश्चित केलेल्या अटी शर्तीसह
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयात निश्चित करण्यात येत असल्याने
व्यवहार अधिक पारदर्शकपणे होतात.
याबाबत यामध्ये काही विवाद निर्माण
झाल्यास, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 सन 2006
मध्ये केलेल्या तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनाचे राजपत्र क्र. 154, दि. 7 डिसेंबर
2012 नुसार जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी “ समेट अधिकारी ”या क्षमतेत
न्यायनिवाडा करु शकतात. त्यांनी दिलेला निर्णय शेतकरी अथवा खरेदीदार (व्यापारी,
प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार इ.) यापैकी कोणा एका पक्षकारास न पटल्यास ते आयुक्त
कृषि यांचेकडे “ अपिल प्राधिकारी ”
म्हणून 30 दिवसांच्या आत दादहरी मागू शकतात. करार शेतीमुळे व्यवहारात कायद्याने
संरक्षणही मिळते.
राज्यात गटशेती, समुह शेतीला चालना देण्यात
येत आहे. राज्यात शेतक-यांचे उत्पन्न दृप्पट करण्याच्या उद्देशाने विविध केंद्र
राज्य पुरस्कृत योजना राबविण्यात येतात. राज्यात सुमारे 1300 शेतकरी उत्पादक
कंपन्या आहेत. राज्यात कृषि व पुरक व्यवसायावर आधारीत खरेदीदार, निर्यातदार,
प्रक्रिया केंद्र, उद्योजक आहेत. त्यामुळे या सर्वांनी करार शेतीचा अवलंब करावा
असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात येत आहे.
करार शेतीबाबत सविस्तर मार्गदर्शक
परिपत्रक कृषि विभागाच्या संकेतस्थळावर (www.krishi.maharashtra.gov.in) उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कार्यालयाशी
संपर्क साधण्याचे आवाहन विवेक सोनवणे यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment