Saturday, 30 May 2020

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची जळगाव आकाशवाणी केंद्रावर मुलाखत



           जळगाव, दि. 30 (जिमाका) :- जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हावासियांनी घ्यावयाची काळजी याबाबत  जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची मुलाखत आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरुन रविवार, दि. 31 मे, 2020 रोजी सकाळी ठिक 7:25 वाजता प्रसारित होणार आहे.
            कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासन करीत असलेल्या उपाययोजना, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, मदत कार्य आणि लॉकडाऊनच्या काळात जिल्हावासियांनी घ्यावयाची काळजी व खबरदारी या व इतर अनेक बाबींची माहिती जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे आपल्या मुलाखतीत देणार आहे.
            ही मुलाखत जळगाव आकाशवाणीचे ज्येष्ठ उद्घोषक सतीश पप्पु यांनी घेतली आहे.
            तरी जिल्हावासियांनी ही मुलाखत रविवार, 31 मे, 2020 रोजी सकाळी ठिक 7.25 मिनिटांनी आपल्या जळगाव आकाशवाणीवर ऐकायला विसरु नये. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी, विलास बोडके यांनी केले आहे.
00000

Friday, 29 May 2020

बीयाणे खरेदी करतांना शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन


        जळगाव, दि. 29 (जिमाका) :- खरीप हंगामास लवकरच सुरुवात होत आहे. या हंगामासाठी बीयाणे खरेदी करतांना शेतकरी बांधवानी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, संभाजी ठाकूर यांनी केले आहे.  
            शेतकऱ्यांनी बीयाणे खरेदी करतांना अधिकृत परवानाधारक कृषी केंद्रातुनच बियाणे खरेदी करावे.    बनावट / भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडुन  पक्के बिल स्वत: व दुकानदाराच्या स्वाक्षरीसह घेऊन बियाण्याचे पाकीट/ पिशवी हि सिलबंद / मोहोरबंद असल्याची खात्री करुनच खरेदी करा. बियाण्याची अंतिम मुदत पाहुनच खरेदी करावी. खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेष्टण/ पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपुन ठेवावे. कोणत्याही खाजगी व्यक्तीकडून बियाणे खरेदी करु नये व आमिषाला बळी पडू नये. खरेदी करीत असलेल्या बियाणे पाकिटावरील मजकुर व लॉट क्रमांक इत्यादी बरोबर असल्याची खात्री करावी. कमी वजनाची निविष्ठा/छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री अथवा इतर तक्रारींसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

गुणवत्ता नियंत्रणासाठी 16 भरारी पथकांची स्थापना


        जळगाव, दि. 29 (जिमाका) :- जिल्हयात खरीप हंगाम 2020 साठी कृषि विभागामार्फत जिल्हास्तरीय 1 व तालुकास्तरीय 15 असे एकुण 16 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या भरारी पथकांमार्फत कृषि सेवा केंद्राची तपासणी करुन जादा दराने विक्री, बियाण्यांचा काळाबाजार बोगस / बनावट बियाणे विक्रीला प्रतिबंध करण्यात येणार आहे.
            कृषि विभागामार्फत कृषि निविष्ठा विक्रेत्याना सक्त ताकीद देण्यात येत आहे.  जिल्ह्यातील कोणीही बोगस / बनावट बियाणे / खते/ किटकनाशके विक्री करणार नाही अथवा जादा दराने विक्री किंवा काळाबाजार करणार नाही. असा प्रकार केल्यास त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येईन,
            तसेच याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारीसाठी संबधीत तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी / कृषि अधिकारी पंचायत समिती / उपविभागीय कृषि अधिकारी/ कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव यांचा दुरध्वनी क्रमांक 0257-2239054 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
०००

Thursday, 28 May 2020

जळगाव जिल्ह्यात आज आणखी 29 कोरोना बाधित रुग्ण आढळले


            जळगाव, (जिमाका) दि.  28 - भडगाव, नशीराबाद, चोपडा, सावदा, भुसावळ, जळगाव येथील 149 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त. 120 अहवाल निगेटिव्ह आले आहे तर 29 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
            पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भडगावचे चार, चोपडा, सावदा, भुसावळ, उमाळा, विटनेर येथील प्रत्येकी एक तर जळगाव शहरातील जखनीनगर, तांबापुरा, सलगार नगर व इतर भागातील वीस व्यक्तींचा समावेश आहे.
            जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 557 झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
00000

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत खरिप हंगामपूर्व जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न


            जळगाव, दि. 28 (जिमाका) - राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खरिप हंगामपूर्व जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे आवाहन केले आहे.
            बीजप्रक्रिया - बियाणे पेरणी पूर्वी पी.एस.बी, ट्रायकोडर्मा, इ. यांची बिज प्रक्रिया करुनच पेरणी करावी. व त्या पिकाचा त्वरित प्रधानमंत्री पिक योजनेत विमा काढावा.
आंतरपिक - शेतकऱ्यांनी पेरणी क्षेत्रामध्ये आंतरपिके घेतल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते व नुकसानीची जोखीम कमी होते. याकरिता कापूस पिकामध्ये मुग किंवा उडीद या सारख्या कमी कालावधीची आंतरपिके घ्यावीत व मका पिकामध्ये मूग किंवा उडीद किंवा तूर किंवा कडेने चार ओळी नेपिअर गवताच्या लावल्यास लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
            फेरोमन ट्रॅप - किडी व अळीमुळे पिकाच्या झालेल्या नुकसानीची पातळी समजण्यासाठी प्रति हेक्टरी 5 ट्रॅप पिकाच्या उंची पेक्षा 1 ते 1.5 फुट जास्त उंचीवर लावावेत. तसेच कापूस पिकावर प्रति हेक्टरी 25 ट्रॅप लावल्याने किडीचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकते, गुलाबी बोंड अळी निर्गमनासाठी पेक्टीनो लुर, तसेच सोयाबीन पिकासाठी स्पोडो लुर शेतकऱ्यांनी लावल्यास किडीचे नियंत्रण होवुन किडीमुळे होणारे नुकसान कमी होते. मका वरील फॉल आर्मी वर्म या अळीच्या नियंत्रणासाठी फ्रुजीपेरडा या लूरचा वापर करावा.
            पक्षी थांबे - कापूस व इतर पिकांवरील अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी प्रति एकरी कमीत कमी 10 पक्षी थांबे लावावेत. जेणेकरुन पिकावरील अळीचे नियंत्रण होऊन होणारे नुकसान कमी होते.
            कपाशीची पेरणी 1 जून नंतर पुरेसा पाऊस झाल्यावर करावी - पेरणी करतांनाच एकरी 20 किलो युरिया, 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 50 किलो गोणी म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे यानंतर एक महीन्याने 50 किलो युरिया, यानंतर तिसऱ्या वेळी पुन्हा 50 किलो युरिया खत द्यावेत.  
            सोयाबीन पेरणीसाठी घरचे चांगले टपोरे दाणे निवडुन काडीकचरा काढून टाकावा त्यांची उगवणक्षमता तपासून बियाणे म्हणून वापरावे, इतर आवश्यक माहितीसाठी गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
00000