जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि.३ -
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी
केंद्र शासनाने अटी शर्तीवर परवानगी दिली
आहे. त्यानुसार आता राज्य शासनानेही अडकलेल्या नागरिकांना बाहेरील राज्यातून,
जिल्ह्यातून त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी दिल्याने परराज्य, जिल्ह्यात
अडकून पडलेल्या नागरिकांनी दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर ऑनलाईन परवानगी मिळत
असल्याने अडकलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या चाेवीस तासात तब्बल 3 हजार 553 जणांना जिल्ह्यात
येण्याचे परवाने देण्यात आले आहे. तर 993
नागरिकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच 648 नागरिकांना
जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी परवानगी नाकारली आहे. परवानगी दिलेल्यांपैकी अनेक
नागरिक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तर अनेक जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात गेले
आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सुचनेनुसार व जिल्हाधिकारी डाॅ ढाकणे
यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी व त्यांची टीम सुट्टीच्या दिवशीही आॅनलाईन
पध्दतीने परवाने देण्याची मोहीम राबवित असल्याने जळगाव जिल्ह्यात येणाऱ्यांची व
जिल्ह्यातून जाणा-यांची सोय झाली आहे. शनिवार, रविवार सुटीचा दिवस असतानाही जिल्हा
प्रशासन परवाने देण्याचे काम करीत असल्याने नागरिक प्रशासनाचे अाभार मानत आहे.
‘लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, इतर
नागरिकांना त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार
ज्या नागरिकांना परराज्यातून अथवा इतर जिल्ह्यांतून जळगाव जिल्ह्यात यायचे व जायचे
असेल त्यांना आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिली अाहे.
यासाठी जिल्ह्यात येणा-यांसाठी उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील यांची तर
जिल्ह्यातून इतर राज्यांत व जिल्ह्यात जाण्यासाठी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे
यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी
यापूर्वीच काढले होते.
एक मेस आदेश निघाल्यानंतर काल (ता.२) परजिल्ह्यात, राज्यात जाण्यासाठी व
जिल्ह्यात येण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रांची माहिती घेण्यासाठी, ऑनलाईन
परवानगी कशी घ्यावी लागते हे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील
कार्यालयांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. सुमारे सहा हजारापेक्षा अधिक
नागरिकांनी आजअखेरपर्यंत अॉनलाईन अर्ज केले आहेत.
जिल्ह्यात बाहेरील राज्यातून,
जिल्ह्यातून येण्यास परवानगी दिलेले नागरिक असे
राज्य--संख्या
गुजरात--3553
राजस्थान-- 119
मध्यप्रदेश- -40
झारखंड- -8 तर
इतर नागरिक महाराष्ट्राच्या विविध
जिल्ह्यातून आलेले आहेत. यामध्ये नाशिक, धुळे, औरंगाबाद, नंदूरबार, बुलडाणा मुंबई,
पुणे, गडचिरोली, अहमदनगर या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
जिल्ह्यातून बाहेरील जिल्ह्यात
जाण्यासाठी परवानगी दिलेले नागरिक
नाशिक- -519
धुळे --233
औरंगाबाद--98
अहमदनगर- -96
इतर--47 याप्रमाणे आहेत.
बाहेरील राज्यातून व जिल्ह्यातून
आलेल्या नागरिकांनी त्याबाबत तलाठी, तहसिलदार, प्रांताधिकारी, पोलिस यांना कळवायचे
आहे. तसेच आल्यानंतर तालुक्यातील आरोग्य केंद्रातून स्वतःची आरोग्य तपासणी करून
घ्यायची आहे. स्वतः 14 दिवस होम क्वारंटाईन
व्हायचे आहे. असे न करणाऱ्या व्यक्तींची माहिती गावातील लोकांनी प्रशासनाला
कळवायची आहे. त्यांची नावे गोपनीय ठेवले
जातील. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीनी असे न केल्यास त्यांच्यावर नियमानुसार
कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment