Sunday, 31 January 2021

जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ



            जळगाव, (जिमाका) दि. 31 - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज सकाळी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लहान बालकाला पोलिओ डोस पाजून करण्यात आला.

            आरोग्य विभागामार्फत आज जिल्हाभरात पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ रविवारी सकाळी पालकमंत्री ना. पाटील यांच्या उपस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, महापौर भारतीताई सोनवणे, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, नाशिक विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. एम. एन. पट्टणशेट्टी, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, प्रशासकीय अधिकारी डॉ. यु. बी. तासखेडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, अधिसेविका कविता नेतकर आदि उपस्थित होते.

            पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर रुद्राक्ष गोपाळ पाटील या बालकाला पल्स पोलिओचा डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.           प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षाखालील बालकांना पोलिओचा डोस पाजून घ्यावा. एकही मुलाला पोलिओ होऊ नये याकरिता आरोग्य यंत्रणा सक्षम असून पालकांनीही आपल्या मुलांना पोलिओ लस घेऊन यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री ना. पाटील यांनी केले.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रास्ताविकात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली. कार्यक्रमास आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

जिल्ह्यात लॉकडाऊनच्या कालावधीत 28 फेब्रुवारीपर्यत वाढ

         जळगाव, दि. 31 (जिमाका) - कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावली (SOPs) नुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेशान्व्ये  जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधीत 28 फेब्रुवारी, 2021 पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. लॉकडाऊन कालावधीत लागू करण्यात आलेले निर्बध शिथिल करण्याबाबत निर्देश दिले आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून लॉकडाऊन कालावधीत लागू केलेले निर्बंध शिथील करण्याबाबत वेळोवेळी दिलेले निर्देशही पुढील आदेश होईपावेतो लागू राहतील.

            या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहिल, असे अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

            जळगाव, दि. 31 (जिमाका) - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव मार्फत महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाव्दारे राबविण्यात येणारी केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना  3.0 (PMKVY 3.0) च्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांना नि:शुल्क कौशल्य प्रशिक्षण तद्नंतर कौशल्य प्रमाणपत्र  व रोजगार/स्वयंरोजगार संधी प्राप्त होणार आहे.

            कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना विविध रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहे. तरी सर्व शाळा, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था, कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था यांनी पुढाकार घेऊन कौशल्य विकास प्रशिक्षणाची माहिती अधिकाधिक उमेदवारांपर्यत पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

            इच्छुक 15 ते 45 वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी ऑनलाईन पध्दतीने https://forms.gle/८yF३wwxxVUQyvx७f८  या लिंकव्दारे नोंदणी करावी. तसेच ऑफलाइन नोंदणीसाठी व योजनेबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी. एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्र. 0257-2239605 वर संपर्क साधावा.  असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त, डॉ. राजपाल कोल्हे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

महिला व बाल विकास मंत्रालयमार्फत देण्यात येणाऱ्या नारी शक्ती पुरस्काराकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

              जळगाव, दि. 31 (जिमाका) - केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला, संस्था, कंपन्या यांना नारी शक्ती पुरस्कार दिला जाणार आहे.

            सन 2019-20 या वर्षाकरीता सदर पुरस्कारासाठी पात्र महिला कार्यकर्त्या, स्वयंसेवी संस्था, कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग इ. कडून अर्ज ऑनलाईन मागविण्यात येत आहेत. शासन पत्रात नमुद मार्गदर्शक सुचनेनुसार नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्जदाराने अर्ज / नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रांसह केवळ ऑनलाईन पध्दतीने केंद्र शासनाचे www.narishaktipuraskar.wcd.gov.in / www.wcd.nic.in   या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत. केवळ ऑनलाईन पध्दतीने केलेले अर्जच स्वीकारले जातील, असे मार्गदर्शक सुचनांमध्ये नमूद केले आहे.

            प्रस्तावातील अटी व शर्ती व विहीत नमुन्यातील फॉर्मसाठी सदर पुरस्काराची नियमावली  व निकष केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, (0257-2228828) आकाशवाणी चौक, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जळगाव यांचेशी संपर्क साधावा. असे  विजयसिंग परदेशी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

जिल्ह्यातील विविध गावांतील अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 12 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, दि. 31 (जिमाका) - जिल्ह्यातील विविध एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पातंर्गत अंगणवाडी केंद्र असून त्यापैकी काही ग्रामपंचायतीच्या गावी सेविका व मदतनीसांची पदे रिक्त आहेत. यासाठी स्थानिक रहिवाशी (ग्रामीण) भागातील महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

            पारोळा तालुक्यातील धाबे, तांबोळे, रत्नापिंप्री, पिंपळकोठा, पुनगांव, चोरवड, सुमठाणे येथील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका, खेडीढोक येथे मिनी अंगणवाडी सेविका तर गडगाव येथील मदतनीस पदासाठी अर्ज मागणविण्यात येत आहे.

            अमळनेर तालुक्यातील धुपी, बामणे, पाडसे, गांधली, गलवाडे खु,, वासरे, आर्डी, अंचलवाडी, शिरसाळे खु., दापोरी बु, रुंधाटी, इंदापिंप्री, पिंपळे बु. येथील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका पदासाठी तर भडगाव तालुक्यातील सावदे येथील दोन व देव्हारी येथील एक अंगणवाडी पदासाठी तर नावरे व महिंदळे येथील प्रत्येकी एका मदतनीस पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.  

            अर्जदाराचे वय दि. 31 जानेवारी, 2021 रोजी 21 वर्ष पूर्ण ते 30 वर्षाचे दरम्यान असावे, अर्जदारास 2 अपत्याचेवर अपत्य नसावीत. दोन पेक्षा जास्त अपत्य होऊ देणार नाही याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल, अर्जदार महिला असावी, अर्जदार स्थानिक रहिवाशी असावी (ग्रामसेवकाचा दाखला आवश्यक), शैक्षणिक पात्रता सेविकेसाठी किमान दहावी पास ते उच्चतम तर मदतनीस साठी किमान सातवी पास ते उच्चतम असावी.

            अर्ज कार्यालयाने वितरीत केलेला व विहित नमुन्यातील असावा, अर्जदार विधवा असल्यास गट विकास अधिकारी, पंचायत समिती अथवा तहसिलदार यांचा दाखला असावा. विधवा व अनाथ उमेदवारास अतिरिक्त 10 गुण देण्यात येतील, जातीचा दाखला सक्षम प्राधिकाऱ्याचा असावा. (एस.सी/एस.टी/व्ही.जे.एन.टी/ओबीसी/ एस.बी.सी), मागासवर्गीय उमेदवारास 1) एससी व एसटी साठी 10 गुण 2) व्ही.जे.एन.टी/ओबीसी/एस.बी.सी साठी 5 अतिरिक्त गुण देण्यात येतील. 12 वी नंतर अर्जदार पदवीधर/ङि एड/बि.एड केले असल्यास अतिरिक्त 5 गुण देण्यात येतील. अंगणवाडी सेविका व मदतनीस कामाचा दोन वर्ष व त्यापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असल्यास सक्षम अधिकाऱ्याचा दाखला जोडण्यात यावा. अनुदानित व खाजगी संस्थाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही, रिक्त पदांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्यास तसा बदलाबाबत व भरतीप्रक्रिया स्थगित करण्याबाबत अधिकार बालविकास प्रकल्प अधिकारी यांना आहे,

            अर्ज विक्री व स्विकृती 1 ते 12 फेब्रुवारी, 2021 पर्यंत असून अर्ज स्वीकारण्याची मुदत दि. 12 फेब्रुवारी पर्यंत राहिल. शासकीय सुट्टीचे दिवशी अर्ज विक्री वा स्वीकारणे बंद राहिल, शैक्षणिक पात्रेतसंबधी व अर्जासोबत जोडलेले सर्व प्रमाणपत्र साक्षांकित केलेले नसल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार नाहीत व त्या प्रमाणपत्रांना गुणदान करता येणार नाही याची नोंद घ्यावी. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांव्यतिरिक्त कोणतेही कागदपत्र नंतर स्वीकारले जाणार नाही. मदतनीस पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान 7 वी पास असावी, अर्जासोबत इ. 7 वी चे गुणपत्रक जोडावे. तसेच पुढील शिक्षण झाले असल्यास त्याचे गुणपत्रक अर्जासोबत जोडावेत. असे बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, पारोळा, अमळनेर, भडगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

जळगाव तहसील कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

             जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) - नागरीकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी सोडविण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.  त्यानुसार सोमवार, दिनांक 1 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिलदार, जळगाव यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, जळगाव येथे तालुका स्तरावरील लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व संबंधितांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा. असे नामदेव पाटील, तहसिलदार, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

Friday, 29 January 2021

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची शनिवारी जळगाव आकाशवाणी केंद्रावर मुलाखत •पल्स पोलीओ व कोरोना लसीकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या विचार ऐकायलाच हवे…

 

                     जळगाव, दि. 29 (जिमाका) - जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. तसेच येत्या 31 जानेवारी रोजी पल्स पोलीओ लसीकरण मोहिमही  जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी, उपाययोजना व जिल्हावासियांनी घ्यावयाची काळजी, करावयाचे सहकार्य याबाबत माहिती देणारी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची मुलाखत आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरुन शनिवार, दि. 30 जानेवारी, 2021 रोजी सकाळी ठिक 7:40 वाजता प्रसारित होणार आहे.

            जिल्हाधिकारी राऊत यांनी आपल्या मुलाखतीत कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित असून नागरीकांनी घाबरण्याचे कारण नाही. त्याचबरोबर कोरोनाची लस आलेली असली तरी, नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना घ्यावयाची काळजी, कोरोना काळात स्वयंशिस्तीला असलेले महत्व, पल्स पोलीस लसीकरण मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटीतील 3 लाख 72 हजार बालकांना 2654 बुथवर करण्यात येणाऱ्या लसीकरणासाठी आरोग्य विभागाने केलेली तयारी आदिंबाबतची माहिती आपल्या मुलाखतीत दिली आहे. 

            ही मुलाखत जळगाव आकाशवाणीचे ज्येष्ठ उद्घोषक सतीश पप्पु यांनी घेतली आहे.

            तरी जिल्हावासियांनी  ही मुलाखत शनिवार, 30 जानेवारी, 2021 रोजी सकाळी ठिक 7.40 मिनिटांनी आपल्या जळगाव आकाशवाणी केंद्रावर ऐकावी. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

00000

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 436.77 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यांना मार्चअखेरपर्यंत नळजोडणी देणार - पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

 





           जळगाव, दि. 29 (जिमाका) :- जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकासह विद्यार्थ्यांना शुध्द व मुबलक पाणी मिळावे. याकरीता जळगाव जिल्हा परिषदेच्या 2764 शाळा व 3076 अंगणवाड्यांना मार्चपर्यंत स्वतंत्र नळजोडणी देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री   ना. गुलाबराव पाटील यांनी आज दिली.

            जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील जिल्हा नियोजन भवनात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष पाटील, महापौर भारतीताई सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आदि उपस्थित होते.

            यावेळी बोलतांना पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील कोणतेही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही याकरीता लोकप्रतिनिधींनी कामे सुचवितांना गावांच्या पाणीपुरवठा योजनांना प्राधान्य द्यावे. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना विकास कामांसाठी यावर्षी 5 लाख रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्याप्रमाणे पुढील वर्षाच्या नियोजनातही 5 लाख रुपयांची तरतूद करण्यात येईल. त्याचप्रमाणे कवयित्रि बहिणाबाई चौधरी यांचे स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असून चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

            जिल्हा प्रशासनाचे नियोजन व लोकप्रतिनिधींनी केलेल्या सहकार्यातून जिल्ह्याने कोरोनावर मात केल्याने पालकमंत्र्यांनी सर्वांचे कौतूक केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घेतानाच इतर सर्व यंत्रणांना यावर्षी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीतून जिल्ह्यात विकासाची कामे उभी रहावी याकरीता स्क्षूम नियोजन करावे. व विकासकामांचे प्रस्ताव सात दिवसात नियोजन विभागास पाठवावे. विभागांना देण्यात आलेला निधी अखर्चित राहणार नाही याची विभागप्रमुखांनी काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी केली. जळगाव शहरातील व्यापारी गाळयांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महापालिका आयुक्त, महापौर व व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. शिवाय जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प राबविण्यासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शासनाची मान्यता मिळाल्याबरोबर निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच समिती सदस्यांच्या मागणीनुसार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे दोन विभाग करण्याचा ठरावही या बैठकीत मान्य करण्यात आला.

            शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध व्हावेत, याकरीता जिल्ह्यात शेत पाणंद रस्ते योजना पुढील आर्थिक वर्षातही राबविण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी बैठकीत केली त्यासही मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना प्राथमिक आजारांवरील औषधे उपलब्ध व्हावी याकरीता औषधे खरेदीसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल. परंतु रुग्णांना बाहेरुन औषधे आणावी लागणार नाही त्याचबरोबर किरकोळ कारणांसाठी रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठविले जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचनाही त्यांनी केल्यात. नियतव्ययापेक्षा यंत्रणांनी अधिक रक्कमेच्या सुचविलेल्या कामांसाठी राज्यस्तरीय बैठकीत निधीची मागणी करण्यात येईल. जिल्ह्याच्या विकासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.  खासदार रक्षाताई खडसे यांनी जळगाव- औरंगाबाद रस्त्याच्या कामाबाबत तर खासदार उन्मेष पाटील यांनी बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक व चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्याबाबत बैठकीत प्रश्न मांडले.

            बैठकीच्या प्रास्तविकात नियोजन समितीचे सदसय सचिव तथा जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले की, केलेल्या नियोजनानुसार सर्व विभागांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. जिल्हा परिषदेला स्पीलसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीची कामे मार्चअखेर पूर्ण करावी. जिल्हा परिषदेच्या शाळांना वॉलकम्पाऊंडसाठी, शासकीय आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांच्या दुरुस्ती, औषधोपचारासाठी व वीजेसंबंधीच्या कामांना विशेष तरतुद जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात करण्यात येत असल्याचे बैठकीत सांगितले.

            शासनाने सन 2021-22 आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना रु.300.72 कोटी, अनुसुचित जाती उपयोजना रु. 91.59 कोटी, आदिवासी उपयोजना क्षेत्र रु. 15.51 कोटी आणि आदिवासी उपयोजना बाहयक्षेत्र रु.28.95 कोटी इतकी नियतव्ययाची मर्यादा दिली आहे. शासनाने दिलेल्या नियतव्ययाच्या मर्यादेत सन 2021-22 चा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला आहे. सन 2021-22 प्रारुप आरखडयाची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे आहे.   

          सर्वसाधारण जिल्हा वाषिक योजने अंतर्गत पशु संवर्धन विभाग रु. 626.16 लक्ष, मत्स्यव्यवसाय रु. 1.00 लक्ष, ग्रामिण विकास कार्य रु. 800.00 लक्ष, ग्रामिण रोजगार रु. 15.00 लक्ष, उर्जा विकास रु. 1550.00 लक्ष, ग्रामिण व लघु उद्योग रु. 51.20 लक्ष, पर्यटन विकास रु. 1128.67 लक्ष, कौशल्य विकास  रु. 739.56 लक्ष, ग्रंथालय रु. 25.00 लक्ष, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग   रु. 36.80 लक्ष, गावठाण विस्तार रु. 50.00 लक्ष आणि मागासवर्गीय कल्याण रु. 70.00 लक्ष याप्रमाणे कार्यान्वयीन यंत्रणेच्या मागणीनुसार 100% निधी प्रस्तावति केला आहे.  तसेच वन विभाग रु.2550.98 लक्ष, लघु पाटबंधारे विभाग रु. 4720.27 लक्ष, रस्ते विकास रु. 5693.05 लक्ष, सामान्य शिक्षण रु.1030.00 लक्ष, क्रिडा विकास रु. 450.02 लक्ष, आरोग्य विभाग रु.3910.00 लक्ष, नगर विकास विभाग रु. 2684.16 लक्ष, अंगणवाडी बांधकाम रु. 500.00 लक्ष, पोलीस व तुरुंग विभाग रु.500.00 लक्ष आणि नाविन्यपुर्ण योजना रु. 1202.88 लक्ष याप्रमाणे नियतव्यय प्रसतावित केला आहे.              

            शासनाच्या आदिवासी विकास विभागाने सन 2021-22 आर्थिक वर्षाकरीता आदीवासी उपयोजना क्षेत्रासाठी (TSP) रु.1550.94 लक्ष आणि आणि आदीवासी उपयोजना बाहय (OTSP) क्षेत्रासाठी रु.2895.97 लक्ष इतकी नियतव्ययाची मर्यादा दिली आहे.

            आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत (TSP) कार्यान्वयीन अधिका-यांनी सन 2021-22 साठी रु. 3336.20 लक्ष ची मागणी केली असुन शासनाने दिलेल्या व्यय मर्यादेत म्हणजे रु.1550.94 लक्षचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत (TSP) प्रामुख्याने पेसा अंतर्गत रु.3.90 कोटी, वने रु.2.94 कोटी, लघु पाटबंधारे रु.6.28 कोटी, रस्ते रु. 4.21 कोटी, आरोग्य रु. 1.30 कोटी, पाणी पुरवठा रु. 4.62 कोटी, मागसवर्गीय कल्याण रु. 2.21 कोटी आणि बाल कल्याण रु. 4.71 कोटीची मागणी आहे. या कार्यालयाने प्रस्तावित केलेल्या नियतव्ययामध्ये प्रामुख्याने पेसा रु.3.90 कोटी, वने 1.53 कोटी, रस्ते रु.2.50 कोटी आणि बाल कल्याण रु. 2.50 कोटी निधी प्रस्तावति केला आहे.

            आदिवासी उपयोजना बाहय (OTSP) क्षेत्रासाठी रु.2895.97 लक्ष इतकी  नियतव्ययाची मर्यादा दिली आहे. कार्यान्वयीन यंत्रणेची मागणी रु.2944.22 लक्ष ची आहे. त्यामुळे कार्यान्वयीन यंत्रणेच्या मागणीनुसार निधी प्रस्तावति केला आहे. प्रस्तावित केलेल्या निधीमध्ये प्रामुख्याने पीकसंवर्धन रु. 1.53 कोटी, विद्युत विकास रु.1.00 कोटी, रस्ते विकास रु.5.51 कोटी आणि मागासवर्गीय कल्याण रु. 18.52 कोटी निधीचा समावेश आहे.

शासनाच्या समाज कल्याण   विभागाने सन 2021-22 आर्थिक वर्षाकरीता अनुसुचित जाती उपयोजनेसाठी  रु.91.59 कोटी   इतकी  नियतव्ययाची मर्यादा दिली आहे.  कार्यान्वयीन यंत्रणेच्या मागणीनुसार 100% म्हणजे रु. 91.59 कोटी इतका निधी सन 2021-22 साठी प्रस्तावति करण्यात आला आहे.  यामध्ये प्रामुख्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना रु. 7.00 कोटी, पाणी पुरवठा व स्वच्छता रु.3.42 कोटी, नगर विकास रु. 38.95 कोटी आणि मागासवर्गीयांचे कल्याण रु. 33.70 कोटीचा समावेश आहे.

            सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 अंतर्गत जळगांव जिल्हयासाठी रु. 375.00 कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतुद  मंजुर आहे. शासनाने  प्रथम 30 नोव्हेंबर,2020 पर्यंत मंजुर अर्थसंकल्पिय तरतुदीच्या 33% म्हणजे रु. 123.00 कोटी इतका निधी BDS वर उपलब्ध करुन दिला होता. सदर उपलब्ध तरतुदीच्या 50% म्हणजे रु.61.50 कोटी निधी कोव्हिड-19 साठी राखीव ठेवण्यात यावा म्हणुन शासनाचे निर्देश होते. त्यानंतर 8 डिसेंबर2020 रोजी शासनाने मंजुर अर्थसंकल्पिय तरतुदीच्या 100% म्हणजे रु. 375.00 कोटी इतका निधी BDS वर उपलब्ध करुन दिला आहे. शासनाकडुन संपुर्ण तरतुद प्राप्त झाली आहे. सदर उपलब्ध तरतुदीच्या 16.5% म्हणजे रु.61.87 कोटी निधी कोव्हिड-19 साठी राखीव ठेवण्यात यावा म्हणुन शासनाचे निर्देश आहेत.

            सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 अंतर्गत जळगांव जिल्हयासाठी प्राप्त झालेल्या रु. 375.00 कोटी मधुन कोव्हिड-19 साठी 16.5%, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना साठी 10% आणि अतिवृष्टीमुळे दुरावस्था झालेल्या ग्रामिण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 5% निधी पुनर्विनियोजनाने उपलब करुन द्यावा   म्हणुन नियोजन विभागाचे निर्देश आहेत. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 अंतर्गत प्राप्त तरतुदीमधुन कोव्हिड-19 साठी 61.87 कोटी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना साठी 37.50 कोटी, अतिवृष्टीमुळे दुरावस्था झालेल्या ग्रामिण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 18.75 कोटी, जिल्हा परीषदेने कळविलेला स्पील 18.75 कोटी, शासकीय यंत्रणांनी  कळविलेला स्पील 29.05 कोटी राखीव निधी ठेवल्यानंतर नवीन मंजुर कामांसाठी उपलब्ध निधी खालील प्रमाणे आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 अंतर्गत प्राप्त रु. 375.00 कोटी मधुन वरीलप्रमाणे राखीव तरतुद ठेवल्यानंतर नवीन मंजुर कामांसाठी रु. 182.56 कोटी इतका निधी उपलब्ध आहे.

            सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेकडील विविध विकास योजनांसाठी रु. 115.72 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला होता. सदर वितरीत केलेल्या निधीमधुन माहे डिसेंबर,2020 अखेर पर्यंत फक्त रु.51.72  कोटी इतका निधी खर्च झाला असुन रु. 64.00 कोटी निधी जिल्हा परिषदेकडे अखर्चित आहे. यामध्ये प्रामुख्याने लघु पाटबंधारे विभाग रु.16.69 कोटी, शिक्षण विभाग रु.15.44 कोटी,  बांधकाम विभाग रु. 13.62 कोटी, आरोग्य विभाग रु.9.11 कोटी, पशुसंवर्धन विभाग रु. 1.54 कोटी, अंगणवाडी बांधकाम रु.2.67 कोटी आणि नाविन्यपुर्ण योजनेचा रु.2.39 कोटी निधीचा समावेश आहे. सदर मागील आर्थिक वर्षातील अखर्चित निधी खर्च करण्याची मुदत 31 मार्च,2021 पर्यंत असुन या मुदतीत निधी खर्च न झाल्यास शासन जमा करावा लागणार आहे. तसेच SCP चा रु.74.38 कोटी आणि TSP चा रु. 2.39 कोटी इतका निधी अखर्चित असुन सदर निधी 31 मार्च,2021 पर्यंत खर्च करण्याची मुदत आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 चा रु. 9.06 कोटी आणि सन 2018-19 चा रु. 44.34 कोटी खर्च न झाल्याने सदर निधी जिल्हा परिषदेने शासन लेख्यात जमा केल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी बैठकीचे सुत्रसंचलन करताना दिली.

            बैठकीत उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सुचनांवर तसेच सुचविलेल्या कामांवरही चर्चा करण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीस कोरोना काळात मृत्यु पावलेले माजी खासदार हरिभाऊ जावळेसह इतरांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 

            या बैठकीस आमदार सर्वश्री. संजय सावकारे, सुरेश भोळे, किशोर पाटील, चिमणराव पाटील, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, मंगेश चव्हाण, श्रीमती लताताई सोनवणे यांचेसह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

00000

Thursday, 28 January 2021

अपघाती क्षेत्रांची माहिती संकलीत करुन आवश्यक उपाययोजना तातडीने करा - खासदार रक्षा खडसे

 



जळगाव, (जिमाका) दि.28 - जिल्ह्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी अपघाती क्षेत्रांची माहिती संकलीत करुन त्याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. असे निर्देश खासदार रक्षाताई खडसे यांनी आज दिलेत.

 येथील जिल्हा नियोजन भवनात संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार श्रीमती खडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आदि उपस्थित होते.

            खासदार श्रीमती खडसे पुढे म्हणाल्या की, सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महामार्गाची कामे सुरु आहे. त्यामुळे वाहनचालकांना मार्गदर्शक ठरतील असे सुचनाफलक ठिकठिकाणी लावावे. ज्याठिकाणी वारंवार अपघात होतात अशा ठिकाणांची माहिती तातडीने संकलीत करुन तेथे आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात. घोडसगाव येथे सर्व्हिसरोड तयार करण्याच्या सुचना देऊन महामार्गाच्या कामांची गती वाढविण्याचेही निर्देश दिलेत. बहुतांश अपघात हे वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्याचे गांर्भीर्य लक्षात न घेतल्याने होत असतात. यात दुचाकी धारकांची संख्या जास्त असल्याने दुचाकीला साईड मिरर आवश्यक करावा, यंत्रणांनी वाहतुक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. यावेळी श्रीमती खडसे यांनी जळगाव-चिखली, जळगाव-धुळे, जळगाव-औरंगाबाद, बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची सद्यस्थितीचा माहिती सर्व संबंधित यंत्रणांकडून जाणून घेतली.

चाळीसगाव येथे परिवहन विभागाच्या उप कार्यालयाचा प्रस्ताव तातडीने सादर करा- पालकमंत्री

नागरीकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन चाळीसगाव येथे परिवहन विभागाचे उप कार्यालय सुरु करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा. अशा सुचना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिल्यात. रस्त्यांच्या सुरु असलेल्या कामांमुळे नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे ही कामे लवकर पूर्ण होणे आवश्यक असून कामांचा दर्जा चांगला राहील याची दक्षता विभागाने घ्यावी. तसेच जे कंत्राटदार विहित कालावधीत कामे पूर्ण करणार नाही. त्यांचेवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत. तसेच जिल्ह्यातील महामार्गावरील ट्रामा केअर सेंटरच्या प्रस्तावांचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला. महामार्गावर प्रमुख गावांजवळ बसथांबा असावा, भविष्यातील अडचणी लक्षात घेता गिरणा नदीवरील बांभोरी पुलाला पर्यायी पुल उभारावा. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ ॲम्बुलन्स पोहोचेल याचीही काळजी घ्यावी.  

 

वाहनांची नोंदणी करतांना कोणी बोगस कागदपत्रे तर सादर करीत नाही ना, याची खात्री विभागाने करावी. रिक्षांमध्ये वाढीव प्रवाश्यांची होणारी वाहतुक अपघाताला निमंत्रण देत असल्याने त्याचीही तपासणी व्हावी. रसत्यांवर वाहनाच्या गतीबाबतचे फलक लावावे, भुसावाळ येथील रुग्णालयात ऑक्सिजन टँक, पोस्टमार्टम रुम उभारावी, रुग्णालयाला वॉलकम्पाऊंड करण्याची मागणी आमदार संजय सावकारे यांनी केली तसेच आमदार निधीतून एक ॲम्बुलन्सही देण्याची मागणी त्यांनी बैठकीत केली.  

समितीचे सदस्य सचिव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी वाहतूक नियमांचे महत्व संबंधित यंत्रणांनी सर्व नागरिकांना समजविताना नियमांचे पालन केल्याने जिवीत तसेच वित्तीय हानी टाळता येवू शकते याचे समाज प्रबोधन करण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी. वाहन चालवितांना हेल्मेट, सिटबेल्टाचा वापर करण्याच्या सुचना देतांनाच महामार्गावर माहिती फलक तातडीने लावण्याच्या सुचना दिल्यात. त्याचबरोबर वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागामार्फत कठोर कारवाईची मोहिम राबविण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ मुंढे यांनी सांगितले.

समिती सदस्य उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यात तरसोद फाटा टीव्ही टॉवर, शिव कॉलनी थांबा, चिंचखेड फाटा, धुळे चाळीसगाव रस्ता या तीन ठिकाणी ब्लॅकस्पॉट निश्चित करण्यात आले आहे. मागीलवर्षी 2019 मध्ये जिल्ह्यात 835 अपघातात 454 मृत्यु झाले तर 770 व्यक्ती जखमी झाल्या असून 2020 मध्ये 752 अपघातात 471 मुत्यु झाले असून 514 व्यक्ती जखमी झाल्या असून मागीलवर्षीपेक्षा अपघातांची संख्या 10 टक्क्‌यांनी कमी झाले असून मृत्युंची संख्या 3.5 टक्के वाढली आहे तर जखमींची संख्या 33 टक्क्यांनी घटल्याचे सांगितले. तर वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलीस विभागाने 2020 मध्ये 89 वाहने निलंबित केली असून 5 वाहनचालकांचे लायसन्स निलंबित करुन प्रस्ताव परिवहन विभागास पाठविल्याची माहिती शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक देविदास कुणगर यांनी बैठकीत दिली. जिल्ह्यात पारोळा, मुक्ताईनगर, पाचोरा, अंमळनेर, रावेर  आदि ठिकाणी ट्रामा केअर सेंटरचा प्रस्ताव असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेल्या रस्त्यांबाबतची माहिती अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी राष्ट्रीय महामार्गांच्या कामाची माहिती प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा आणि धुळेचे अरविंद काळे यांनी दिली. बैठकीस परिवहन, एस.टी, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

      भडगावच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार तृप्ती धोडमिसे जीवनदूत पुरस्काराच्या मानकरी

अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी अनेक वेळा नागरीक बघ्याची भूमिका घेतात. त्यात अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव धोक्यात येतो. अशा व्यक्तींना तातडीने दवाखान्यात दाखल करुन त्यांना उपचार मिळावे, जेणेकरुन त्यांचा जीव वाचण्यास मदत होईल. यासाठी शासनाने जीवनदूत पुरस्कार देण्याचा निर्णय जाहिर केला आहे. त्यानुसार वर्षीचा जिल्हास्तरीय जीवनदूत पुरस्कार भडगावच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार तृप्ती धोडमिसे (भाप्रसे) यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

श्रीमती तृप्ती धोडमिसे या भडगावच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून मागील महिन्यात रुजू होण्यासाठी जात असताना भडगाव येथे एक आजीचा अपघात झाला होता. श्रीमती धोडमिसे यांनी तातडीने त्यांना आपल्या वाहनात बसवून दवाखान्यात दाखल केले होते. शिवाय दवाखान्यात त्यांचेवर योग्य ते उपचार तातडीने मिळावेत यासाठी डॉक्टरांकडे पाठपुरावा केला होता. श्रीमती धोडमिसे यांनी आजींना तातडीने उपाचारासाठी दाखल करुन त्यांचा जीव वाचविल्याने त्यांना यावर्षीचा जिल्हास्तरीय जीवनदूत पुरस्कार घोषित करण्यात आला. आज तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत असल्याने श्रीमती धोडमिसे या हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहू शकल्या नाही. नंतर त्यांना हा पुरस्कार यथोचित प्रदान करण्यात येणारअसल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

00000