Tuesday, 5 January 2021

आधार क्रमांक सीडिंगसाठी स्वस्त धान्य दुकाने सुरू राहणार दोन सत्रात प्रत्येकी चार तास सुरू राहणार दुकाने

            जळगाव, दि. 5 (जिमाका वृत्तसेवा) :- केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक सीडिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी जळगाव जिल्यातीतील स्वस्त धान्य दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 व दुपारी 4 ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कळविले आहे.

            अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांनी आधार व मोबाईल क्रमांक जोडण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी  31 जानेवारी,2021 पर्यंत विशेष मोहिम आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रास्त दर धान्य दुकानातील ज्या लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल क्रमांक अद्याप सीड झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांचे मोबाईल व आधार क्रमांकाचे सीडिंगची कार्यवाही रास्त भाव दुकानदारांनी करावयाची आहे.  त्यानुसार तालुका कार्यालयांकडून सर्व रास्त भाव दुकानदार यांना eD1 उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्य शासन परिपत्रकानुसार रास्त भाव दुकाने सकाळी 4 तास आणि दुपारी 4 तास निश्चितपणे उघडी ठेवावीत, असे निर्देश आहेत. तसेच स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हा प्रशासनाने वेळ निश्चित करावी, असे देखील निर्देश आहेत.  या मोहिमेच्या  अनुषंगाने जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आधार आणि मोबाईल क्रमांक सिडींग करणे शक्य व्हावे यासाठी  जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकाने यांच्या  वेळा निश्चित करणे आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

            जिल्ह्यातील रास्त भाव दुकाने यांच्या वेळा आणि कार्यपध्दती  निश्चित करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी  पुढीलप्रमाणे आदेश पारित केले आहेत. जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकाने सकाळी 8.00 ते दुपारी  12.00 तसेच दुपारी 4.00 ते रात्री 8.00 या कालावधीत उघडी ठेवणेत यावीत. या वेळेत धान्य वाटपाबरोबरच ज्या लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल क्रमांक सीड झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल  क्रमांक सीड करणेची कार्यवाही करून घ्यावी. ज्या गावात आठवडी बाजार भरत, असेल अशा ठिकाणी आठवडी बाजाराच्या दिवशी रास्त भाव दुकाने पूर्ण वेळ उघडी ठेवणेत यावीत. विविध कारखाने, उद्योगधंदे असलेल्या क्षेत्रात त्यांच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी रास्त भाव दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवण्यात यावीत. 15 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान संपन्न होणार असल्याने लाभार्थी मतदानासाठी येणार आहेत. यास्तव या दिवशी  सर्व रास्त भाव दुकानदार यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल सिडींग करून घ्यावे.

            लाभार्थी आधार आणि मोबाईल क्रमांक सिडींगसाठी आल्यावर त्वरीत आधार सिडींग करून घ्यावे. 31 जानेवारी 2021 पर्यंत आधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांना पुढील कालावधीचे धान्य देय होणार नसल्याने सदर कार्यवाही काळजीपूर्वक आणि विहीत वेळेत प्राधान्याने पूर्ण करण्यात यावी, असेही  जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

00000

No comments:

Post a Comment