Tuesday, 25 August 2020

दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षण

             जळगांव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गाना महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबईची शासन मान्यता आहे.  तसेच  MS-CIT  या संगणक प्रशिक्षणासाठी हे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून शासन मान्यता आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील  FICCI AWARD 1999 हा प्राप्त झालेला आहे. सन 2020-21 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. माफक जागा असल्याने त्वरीत संपर्क साधावा.

प्रवेशासाठी नियम अटी व सवलती

            अभ्यासक्रमाचे नाव :- सटिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस.ऑफिस                        (संगणक कोर्स) इयत्ता 8 वी पास, मोटार ॲन्ड आमेंचर रिवायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज,           (इलेक्ट्रीक कोर्स ) इयत्ता 9 वी पास, एम.एस. सी. आय.टी. (संगणक कोर्स), वयोमर्यादा – 16 ते 40 वर्ष, प्रशिक्षण कालावधी -1 वर्ष, फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो.

            सोई व सवलती :- प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावयत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कीग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक, उज्वल यशाची परंपरा, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना.

        अर्ज केव्हा, कसे व कोठे करावेत :-प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज ता. मिरज जि. सांगली पिनकोड-416410 नंबर-0233-2222908, मोबाईल 7972007456 / 9922577561 /9975375557 या पत्यावर पोस्ट व्दारे किंवा समक्ष मोफत मिळतील प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिका-यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे पाठवावेत, प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समिती व्दारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल. माफक जागा असल्याने गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन अधिक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, मिरज, जि. सांगली यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                    00000

शेतकरी कष्टाच्या घामासोबत संस्काराचे मोती पिकवतो- पालकमंत्री गुलाबराव पाटील बळीराजाच्या आयएएस मुलाच्या यशाबद्दल ना. गुलाबराव पाटील यांचे कौतुकोद्गार !

 

             जळगाव, (जिमाका) दि.25 :- शहरातील मुलेच उच्च अधिकारी होवू शकतात असा आजवर समज होता. परंतु कांतीलाल सुभाष पाटील या काळ्या आईची सेवा करणार्‍या शेतकर्‍याच्या मुलाने, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून आणि कोणताही क्लास न लावत युपीएससी उत्तीर्ण होऊन हा समज खोडून काढला आहे. शेतकर्‍याचा मुलगाही आयएएस होऊ शकतो, हे दाखवून शेतकरी कष्टाच्या घामासोबत संस्काराचे मोतीही पिकवतो असा आत्मविश्‍वास त्यांनी समाजाला दिला असल्याचे कौतुकोद्गार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील कांतीलाल पाटील यांच्या सत्काराप्रसंगी काढले.

            भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा येथील कांतीलाल सुभाष पाटील या तरूणाने यंदाच्या युपीएससी परिक्षेत यश संपादन केले आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज त्याचा हृद्य सत्कार केला. याप्रसंगी त्यांचे वडील सुभाष पाटील, भुसावळचे नगरसेवक मनोज बियाणी व सामाजिक कार्यकर्ते राजू पारख यांची उपस्थिती होती.

            याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी कांतीलाल पाटील यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, आमचे जुने सहकारी तथा जुने शिवसैनिक सुभाष पाटील यांच्या चिरंजीवांनी मिळवलेले यश हे अतिशय अभिमानास्पद आहे. खरं तर शहरातील मुलेच उच्च अधिकारी होऊ शकतात असे मानले जाते. पण शेतकर्‍याचा मुलगा, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेला व कोणतेही क्लास न लावता यश संपादन केलेल्या कांतीलाल यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. जिल्ह्यातील तरूणांनी याचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे.

            ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, कांतीलाल यांनी या पदाच्या माध्यमातून देशसेवा करीत असताना आपल्या मूळ गावाचा व संस्कृतीचा विसर पडू देवू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कुटुंबाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद असल्याचे नमूद करत ना. गुलाबराव पाटील यांनी कांतीलाल पाटील यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

                                                                  00000

माहे सप्टेंबरसाठी भरडधान्य उपलब्ध

     जळगाव दि. 25- पणन हंगाम 2019-20 (रब्बी) अंतर्गत खरेदी केलेले भरडधान्य (ज्वारी व मका) सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंगर्तत वाटप करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. सदर भरडधान्य गव्हाचे परिमाण कमी करुन त्याच प्रमाणात भरडधान्य (ज्वारी व मका) वाटप करण्याच्या सुचना आहेत. माहे सप्टेंबर, 2020 च्या नियतनात भरडधान्य  (ज्वारी व मका)  अंत्योदय अन्न योजना कार्डधारकांना वितरीत करण्यात येणार आहे.

            त्यानुसार अंत्योदय योजना कार्डधारकांसाठी गहू 12 कि.ग्रॅ. प्रती किलो 2 रुपये दराने, ज्वारी 3 कि.ग्रॅ. प्रती किलो 1 रुपये दराने, मका 10 कि.ग्रॅ. प्रती किलो 1 रुपये  दराने  व तांदुळ 10 कि. ग्रॅ. प्रती किलो 3 रुपये दराने कुटुंब लाभार्थी योजनेतील त्या कार्डधारकांना वितरीत करण्यात येणार आहे. सदर लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एक प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. 

                                                                        00000

माहे सप्टेंबरसाठी धान्य उपलब्ध

             जळगाव दि. 25:-  पणन हंगाम 2019-20 (रब्बी) अंतर्गत खरेदी केलेले भरडधान्य ( ज्वारी व मका) सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. सदर भरडधान्य गव्हाचे परिमाण कमी करुन त्याच प्रमाणात भरडधान्य (ज्वारी व मका) वाटप करण्याच्या सुचना आहेत. माहे सप्टेंबर, 2020 च्या नियतनात भरडधान्य  (ज्वारी व मका)  प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे.

            त्यानुसार प्राधान्य कुटूंब योजना प्रति लाभार्थी  गहू 1 कि.ग्रॅ. प्रती किलो 2 रुपये दराने, ज्वारी  1 कि.ग्रॅ. प्रती किलो 1 रुपये दराने, मका 1 कि.ग्रॅ. प्रती किलो 1 रुपये  दराने  व तांदुळ 2 कि. ग्रॅ. प्रती किलो 3 रुपये दराने  प्रति सदस्य वितरीत करण्यात येणार आहे. सदर लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एक प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. 

00000

चारचाकी वाहनांसाठी नवीन पसंती क्रमांक मालिका

             जळगाव, दि. 25 :- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेत्तर संवर्गातील चारचाकी वाहनांची नवीन नोंदणी  एमएच 19- सीझेड-0001 ते 9999 पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येत आहे.

            ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी दि. 27 व 28 ऑगस्ट रोजी  दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज  करावेत.  या अर्जासोबत शासकीय शुल्काचा डीडी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे द्यावा.  शुल्क भरल्यावर 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी न केल्यास भरलेले शुल्क हस्तांतरीत होणार नाही.  नवीन मालिका दि. 2 सप्टेंबर, 2020 पासून नियमित सुरु करण्यात येईल. अधिक माहितीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

०००००

Monday, 24 August 2020

कवयित्री बहिणाबाईंच्या स्मारकासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करणार बहिणाबाईंच्या जन्मभूमीचा जनसेवक असल्याचा मला सार्थ अभिमान पालकमंत्री गुलाबराव पाटील

 

            जळगाव, (जिमाका) दि. 24 - कवयित्री   बहिणाबाई चौधरींच्या जन्मभूमीचा (आसोदा) मी जनसेवक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. बहिणाबाई या समाजाला प्रेरणादायी आहेत. त्यांनी कवितेच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे काम केले. त्या खर्‍या अर्थाने समाज सुधारक होत्या. असे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

            कवयित्री बहिणाबाईंच्या जयंतीनिमित्त आसोदा येथील बहिणाबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर पालकमंत्री उपस्थितांशी बोलत होते.

            पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, बोली भाषेतील बहिणाबाईंच्या कविता, गाणी सर्वव्यापी व सर्वस्पर्शी आहेत. निसर्ग, शेतकरी, शेती, स्त्रियांच्या व्यथा, विनोद, अध्यात्म अशा सर्व विषयांना त्यांनी कवितेतून जगासमोर मांडले. बहिणाबाई या समाजाला प्रेरणादायी आहेत. त्यांनी कवितेच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे काम केले. त्या खर्‍या अर्थाने समाज सुधारक होत्या. असेही पालकमंत्री यांनी आवर्जून सांगितले.

            बहिणाबाईंची जन्मभूमी असणारे आसोदा हे गाव माझ्या मतदारसंघात संघात असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. पालकमंत्री झाल्यानंतर बहिणाबाईंच्या स्मारकाच्या कामाला गती देणार तोच कोरोनाची आपत्ती आली. असे असले तरी आपण बहिणाबाईंच्या स्मारकासाठी लवकरच दोन कोटी रूपयांची तरतूद करणार असून हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली. आसोदेकरांना आपण जी जी कामे करण्याचे आश्वासन दिले होते.त्यापैकी अनेक कामे पूर्ण झाली असून काही कामे सुरू आहेत. गावासाठी आपण नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी कटिबद्ध असून योजना लवकरच पूर्ण होणार असल्याची ग्वाहीही ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर भादली गावाकडे जाणार्‍या चौकातील वाढीव काम करण्याच्या सूचनाही त्यांनी कंत्रादाराला दिल्या.

            या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच श्रीमती नबाबाई बिर्‍हाडे, तुषार महाजन,  बहिणाबाई स्मारक समिती अध्यक्ष किशोर चौधरी, उपाध्यक्ष प्रदीप भोळे, सदस्य संजीव पाटील, योगेश वाणी, रविकांत चौधरी, ग्रा. पं. सदस्य अनिल महाजन, संजय भोळे, खेमचंद महाजन, संजय बिर्‍हाडे, सुभाष महाजन,सचिन चौधरी, रमाकांत कदम, उमेश बाविस्कर,जितेंद्र भोळे तसेच बहिणाबाई महिला मंडळाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

000000

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्ह्यातील युवक-युवतींना नोकरीची सुवर्णसंधी

               जळगाव, (जिमाका) दि. 24 :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयातर्फे 25 ते 27 ऑगस्ट, 2020 या कालावधीत कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाईन पध्दतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

        याअनुषंगाने जळगाव जिल्हा व जिल्ह्याबाहेरील आस्थापना/कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदांव्दारे मोठी सुवर्णसंधी जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी देऊ केली आहे. या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडुन  www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेब पोर्टलवर विविध शैक्षणिक पात्रतेची एकूण 310 रिक्तपदे अधिसुचित करण्यात आली आहेत. यासाठी विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणा-या किंवा ऑनलाईन अप्लाय केलेल्या उमेदवारांच्या मुलाखतींकरीत जास्तीत जास्त उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलला लॉग-इन करुन लाभ घ्यावा.

            याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते संध्या 6.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0257-2239605 वर संपर्क साधावा. असे श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी  एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

Thursday, 20 August 2020

जिल्ह्यात हत्तीरोग शोध मोहिमेस सुरुवात गृहभेटीच्यावेळी नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

             जळगाव, (जिमाका) दि. 20 – जिल्ह्यात हत्तीरोग शोध मोहिम 16 ते 31 ऑगस्ट, 2020 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत शहरी व ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन नियमित गृहभेटीच्या वेळी प्रत्येक गावात प्रत्येक घरात हत्तीरोग शोध मोहिम राबविणार आहेत. नागरीकांनी या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.  

            भारतात हिवताप खालोखाल हत्तीरोग ही महत्वाची सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आपल्या राज्यातुन 2021 मध्ये हत्तीरोग दुरीकरणाचे ध्येय ठेवण्यात आलेले आहे.   त्यानुसार हत्तीरोग दुरीकरणाची कार्यवाही प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यात बाह्य लक्षणेयुक्त व अंडवृध्दी रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. बुचेरिया बॅक्रोपटाय व बुग्रीया मलायी नावाचा परजीवी जंतुमुळे हत्तीरोग हा आजार होतो. जेव्हा डासाची क्युलेक्स मादी हत्तीरोग झालेल्या आजारी व्यक्तीस चावते तेव्हा ती मानवाच्या शरीरातील जंतु मानवाच्या रक्तासोबत शोषून घेते. डासाच्या शरीरातील जंतुची 12 ते 15 दिवसात वाढ होऊन पुन: दुस-या निरोगी व्यक्तीस जेव्हा हा डास चावतेा तेव्हा हे जंतु त्या व्यक्तीच्या शरिरात सोडतो. मानवाच्या शरीरात हे जंतु लसीका संस्थेत जातात तेथे त्याची वाढ होते नर व मादी वेगळे होतात. नर व मादीचे मिलन होऊन असंख्य पिल्ले जन्म घेतात. त्यांना आपण मायक्रोफायलेरिया म्हणतो. नर व मादी मानवी शरीरात 5 ते 8 वर्षे राहतात. लसीका वाहिनीत हे जंतु अडकुन बसल्याने तेथील भाग फुगीर बनतो व तेथेच संबधीत व्यक्तीस विकृती येते. त्यास आपण लसीकाचा हत्तीरोग झाला असे म्हणतो. डास चावल्यापासुन ते हत्तीरोग लक्षणे दिसण्याचा कालावधी (अधीशीयन काळ) 12 ते 18 महिने आहे.

        हत्तीरोग आजाराची लक्षणे : हत्तीरोगग्रस्त रुग्णाच्या लसीकाग्रंथी सुजतात जाघेंत गाठ येते, वेदना होतात, रुग्णास ताप येतो, थंडी सुध्दा वाजते, काही पुरषांमध्ये वृष्णदाह होतो. हातपाय व बाहयजनेंद्रीय सुजतात रुग्णास अंडवृध्दी होते. या लक्षणांमुळे रुग्ण सामाजिक उपक्षेस पात्र ठरतो. रुग्णाचे लग्न होत नाही. अशा या हत्तीरोगाचे केंद्र शासनाने 2020 पर्यत उच्चाटण करण्याचे ठरविले. सद्यस्थितीत हत्तीरोगाच्या नियंत्रणासाठी रुग्णांना औषोधोपचार व डास नियंत्रण या कार्यप्रणालीनुसार हत्तीरोगाचे नियंत्रण करण्यात येते.

            शोध मोहिम 16 ते 31 ऑगस्ट, 2020 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत शहरी व ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन नियमित गृहभेटीच्या वेळी प्रत्येक गावात प्रत्येक घरात हत्तीरोग शोधण्याचे काम करणार आहेत.

            हत्तीरोगाची उत्पत्तीस्थाने - हत्तीरोगाचा प्रसार करणारा डास साचलेल्या किंवा संत वाहणा-या घाणेरडया पाण्यात अंडी घालतात व सर्वसाधारणपणे निदर्शनास आलेली क्युलेक्स डासाची उत्पत्तीस्थाने ही सेप्टीक टॅक, वापरात नसलेली पडक्या विहीरी, खड्डे, उघडी गटारी, शोष खड्डे इ. आहेत.

            प्रतिबंधात्मक उपाययोजना - आपल्या घराभोवती पाणी साचु देऊ नका, घरातील पाण्याची सर्व साठे आठवड्यातून एकवार निश्चित करुन रिकामी करावी. या साठ्यातील आतील बाजु व तळ घासुन पुसुन कोरडे करुन पुन्हा वापरावे व पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकुन ठेवावीत. अंगण व परिसरातील खड्डे बुजवावीत. त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी, झोपतांना पुर्ण अंगभर कपडे घालावीत, पांघरुण घेऊन झोपावे, संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान दारे खिडक्या बंद करावीत, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, झोपतांना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा, घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकावू टायर्स, कप, मडकी इ. ची वेळीच विल्हेवाट लावावी, संडासाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवड्याला नाल्यांमध्ये क्रुड ऑईल टाकावे, हिवतापाची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय/नपा/मनपा दवाखान्यात मोफत उपलब्ध आहे, या दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास वावरणार नाही म्हणजे योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणा-या आजारापासुन दुर ठेवतो. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण होणेसाठी सर्वानी हातभार लावावा. असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.     

00000

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाचा जिल्ह्यात शुभारंभ

        जळगाव, (जिमाका) दि. 20 - केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम फेज-2 चा शुभारंभ जिल्ह्यात 1 ऑगस्ट, 2020 रोजी करण्यात आला. ही योजना जिल्ह्यात 1 ऑगस्ट, 2020 ते 31 मे, 2021 या कालावधीत मोहिम स्वरुपात राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत देशी गायी, गावठी गाय, संकरीत गायी व म्हशींमध्ये अधिक दुध उत्पादन क्षमता असलेल्या उच्च वंशावळीच्या वळुच्या रेतमात्रा वापरुन कृत्रिम रेतन करण्यात येणार आहे.

            या कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील एकूण 500 गावांची निवड जिल्हाधिकारी यांचे मान्यतेने करण्यात आलेली आहे. या गावांमध्ये शासकीय संस्था, सहकारी दुध संघ, सेवाभावी संस्था यांचेकडील इन्सिमीनेटर तसेच खाजगी कृत्रिम रेतन करणा-या व्यक्ती इत्यादींमार्फत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम फेज-2 (NAIP-2) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार अंमलबजावणी करण्यात येणार आहे. असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

         जळगाव, (जिमाका) दि. 20 - महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत लघु उद्योग व व्यवसायांकरीता कर्ज पुरवठा केला जातो. त्या अनुषंगाने सन 2020-21 या वित्तीय वर्षाकरीता विविध योजनांचे जळगाव जिल्ह्याकरीता उद्दिष्ट प्राप्त झाले आहेत. या मध्ये 20% बीज भांडवल योजना व एक लाखापर्यत थेट कर्ज योजना तसेच ऑनलाईन योजनेमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा या योजनांचा समावेश आहे. एक लाखांपर्यत थेट कर्ज योजनेकरीता अर्जदारांचा सिबील स्कोअर हा किमान 500 असणे बंधनकारक आहे. ऑनलाईन योजनेसाठी महामंडळाच्या msobcfdc.org या वेबसाईटवर नोदणी करुण अर्ज भरता येईल याची नोंद घ्यावी.

            अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, सामाजिक न्याय भवन, मायादेवी शनि मंदिरासमोर, महाबळ रोड, जळगाव दुरध्वनी क्रमाक 0257-2261918 येथे संपर्क साधावा. असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

                                                                              00000

माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा

 


            जळगाव, (जिमाका) दि. 20 - येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला.

            माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. यावेळी प्रविण महाजन यांनी माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी (महसुल) रविंद्र भारदे, उप जिल्हा निवडणुक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रसाद मते, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, नायब तहसिलदार रविंद्र मोरे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000

Wednesday, 19 August 2020

जिल्ह्यात 2 सप्टेंबरपर्यंत 37 (3) कलम लागू

             जळगाव, (जिमाका) दि. 19 - आगामी सण व उत्सव लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याकरीता 2 सप्टेंबर, 2020 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. असे राहुल पाटील, अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.

            हे आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा यांना लागू असणार नाही. असेही अपर जिल्हादंडाधिकारी श्री. पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.

00000

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यातील 5681 रुग्णांना मिळाला 12.43 कोटी रुपयांचा लाभ

             जळगाव, (जिमाका) दि. 19 - महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यात एकूण 34 अंगीकृत रुग्णालये असून या अंगीकृत रुग्णालयातून 837 कोविड व संशयित कोविड रुग्ण तर 4 हजार 844 नॉन-कोविड रुग्ण अशा एकूण 5681 रुणांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या रुग्णांना 1 एप्रिलपासून आजतोपावेतो या योजनेच्या माध्यमातून एकूण 12.43 कोटी रुपयांचा लाभ राज्य शासनाने  दिला आहे. अशी माहिती डॉ गोपाल जोशी, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे जळगाव जिल्हा समन्वयक यांनी दिली आहे.

आरोग्य क्षेत्रात रुग्णांना महागड्या उपचारासाठी स्वतः चे पैसे खर्च करावे लागतात, गरीब रुग्णांना नि:शुल्क गुणात्मक वैद्यकीय सेवा मिळावी. या उद्देशाने शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना चालू केली आहे. 1 एप्रिलपासून सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजना योजना राज्यामध्ये ई निविदा पद्धतीने निवड करण्यात आलेल्या युनायटेड इंडिया इन्शुरंस कंपनीतर्फे राबविण्यात येत आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष दीडलाखापर्यंत विमा संरक्षण मिळते. तर प्रधान मंत्री जन आरोग्य योजना योजनेंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाखापर्यंत विमा संरक्षण मिळते. लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला किवा अनेक व्यक्तीना या योजनेचा लाभ घेता येईल.

योजनेत समाविष्ट उपचार - योजनेंतर्गत 34 विशेषज्ञ सेवांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 996 उपचार व शस्त्रक्रिया. एकत्रित योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सर्वसाधारण शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया, स्त्री रोगावरील शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया व उपचार, जठर व आतड्याच्या शस्त्रक्रिया व उपचार, बालरोग शस्त्रक्रिया व उपचार, मेंदू व मज्जासंस्था यांचे आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार, प्लास्टिक सर्जरी, जळीत रुग्णावरील उपचार, कृत्रिम अवयव, आकस्मिक वैद्यकीय उपचार, त्वचेच्या, सांध्याच्या व फुफ्फुसाच्या आजारावरील आकस्मिक उपचार, ऐनडोक्राईन, लहान मुलांचे कर्करोग, मानसिक आजार व इंटरव्हेशनल रेडओलॉजी उपचार यांचा लाभ मिळतो.

या योजनेंतर्गत लाभार्थी रुग्णास अंगीकृत रुग्णालयातून नि:शुल्क वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे. ही योजना पूर्णतः संगणकीकृत असून लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी) तसेच फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयातून मोफत उपचार घेऊ शकतात. वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयीन उपचार, निदानासाठी लागणाऱ्या चाचण्या, आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन आणि परतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयातून सुटी केल्यावर पाठपुरावा सेवा आणि 10 दिवसांपर्यंत गुंतागुंत झाल्यास त्याचे मोफत उपचार समाविष्ट आहेत.

            जळगाव जिल्हात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत एकूण 34 अंगीकृत रुग्णालय आहेत. सर्व अंगीकृत रुग्णालयात रुग्ण-सहायतासाठी आरोग्यमित्र कार्यरत आहेत. योजनेतंर्गत कोविड किंवा संशयित कोविड अप्रुव्हड केसेस 721 तर इमरजँसी टेलिफोनिक इन्टिमेशनद्वारे 116 केसेस झाल्या आहेत. अशाप्रकारे एकूण 837 केसेसमध्ये कोविड किंवा संशयित कोविड रुग्णांनी लाभ घेतला आहे. तसेच 4 हजार 844 नॉन-कोविड रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला आहे. अशाप्रकारे जळगाव  जिल्ह्यातील रुग्णालयात  1 एप्रिल, 2020 ते आजतोपावेत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत शासनाने रुग्णांना एकूण रु 12.43 कोटी रुपयांचा लाभ दिला आहे.

 

क्र.

 जळगाव  जिल्हातील रुग्णालयात  दि. १ एप्रिल २०२० ते आजतोपावेत मज्योफुजआयो अंतर्गत घेतलेला लाभ 

प्रकरण

प्रकरण

एकूण रक्कम

1

कोविड किंवा संशयित कोविड

अप्रुव्हड केसेस

721

837

रु 1.68 करोड

इमरजँसी टेलिफोनिक इन्टिमेशन केसेस

116


2

नॉन-कोविड केसेस 

4844

रु 10.74  करोड

 

एकूण कोविड  आणि नॉन-कोविड केसेस 

5681

रु 12.43 करोड

 

23 मेच्या शासन निर्णयानुसार ही योजना 31 जूलैपर्यंत लागू करण्यात आली होती. यात पांढरी शिधापत्रिकाधारक सुद्धा या योजनेचे लाभार्थी आहेत. तसेच काही किरकोळ आजार तर काही मोठे आजार (उदा- डिलेव्हरी, सिजर डिलेव्हरी इत्यादी)  व काही तपासण्या ज्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत सामाविष्ट नाही, अशा 67 उपचार पद्धती व तपासणीचा समावेश सर्व नागरीकांसाठी अंगीकृत रुग्णालयात लागू केलेला आहे.

            महाराष्ट्र शासनाने सध्या कोविड-19 च्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत राज्यातील नागरिकांना मिळत असलेला लाभ लक्षात घेता दिनांक 23 मे, 2020 रोजी अंमलात आलेल्या शासन निर्णयास तीन महिन्यांसाठी दिनांक 31 ऑक्टोबर, 2020 पर्यंत वाढ केली आहे.

अधिक माहिती साठी रुग्णालयातील प्रवेशद्वार जवळील मदत केंद्रात उपस्थित आरोग्य-मित्राशी संपर्क साधावा

माहिती व तक्रारीसाठी टोल फ्री संपर्क क्रमांक - 155388 & 1800 233 2200

उपचार पद्धतीची  यादी www.jeevandayee.gov.in  या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. अशी माहितीही डॉ. जोशी यांनी दिली आहे.

योजने अंतर्गत जिल्ह्यातील अंगीकृत रुग्णालयांची यादी

अ . क्र.

अंगीकृत रुग्णालय

1

डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल जळगाव खुर्द

2

अश्विनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जळगाव

3

ऑर्चिड हॉस्पिटल जळगाव

4

कांताई नेत्रालय जळगाव

5

खडके एक्सिडेंट हॉस्पिटल जळगाव

6

गायत्री हॉस्पिटल जळगाव

7

जावळे हॉस्पिटल जळगाव

8

जीवन ज्योती कॅन्सर हॉस्पिटल जळगाव

9

डॉ. एजी भंगाळे नर्सिंग होम अँड हॉस्पिटल जळगाव

10

प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल जळगाव

11

महाजन हॉस्पिटल जळगाव

12

श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल जळगाव

13

श्री साई लीला एक्सिडेंट हॉस्पिटल जळगाव जळगाव

14

संजीवनी रुग्णालय जळगाव

15

सुलोचन रेटीना केअर हॉस्पिटल जळगाव

16

कमल हॉस्पिटल जामनेर

17

ग्लो. म. हॉस्पिटल जामनेर

18

श्री एक्सीडेंट अँड ट्रामा केअर हॉस्पिटल अमळनेर

19

धन्वंतरी हॉस्पिटल वरणगाव

20

पुष्पा सर्जिकल अँड यूरोलॉजी हॉस्पिटल भुसावळ

21

भिरूड हॉस्पिटल भुसावळ

22

विश्वनाथ हॉस्पिटल भुसावळ

23

साई पुष्पा हॉस्पिटल भुसावळ

24

बाबजी जीवनदीप हॉस्पिटल चाळीसगाव

25

सौ. शैलजा हॉस्पिटल चाळीसगाव

26

श्री नृसिंह हॉस्पिटल चोपडा

27

विघ्नहर्ता हॉस्पिटल पाचोरा

28

आशीर्वाद हॉस्पिटल फैजपुर

29

उपजिल्हा सामान्य रुग्णालय चोपडा

30

ग्रामीण रुग्णालय धरणगाव

31

सिव्हिल हॉस्पिटल जळगाव

32

ग्रामीण रुग्णालय, पहूर

33

उपजिल्हा सामान्य रुग्णालय जामनेर

34

उपजिल्हा सामान्य रुग्णालय मुक्ताईनगर

 00000