Tuesday, 11 August 2020

प्रत्येक विभागाने सोपविलेली जबाबदारी समन्वयातून पार पाडावी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे स्वातंत्र्य दिन पूर्वतयारी आढावा बैठकीत निर्देश

             जळगाव, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट, 2020 रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त 15 ऑगस्ट, 2020 रोजी सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होईल. या समारंभासाठी प्रत्येक विभागावर सोपविण्यात आलेली जबाबदारी सर्व संबंधितांनी समन्वयातून जबाबदारीपूर्वक पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. राऊत बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, पोलिस उप अधीक्षक (गृह) राजेश चंदेल,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील, जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी  बी. ए. बोटे (ग्रामपंचायत), शाखा अभियंता आर. आर. चव्हाण  यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले की, महानगरपालिकेने शहरातील सर्व भागाबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता ठेवावी. रस्त्यावर किंवा कुठेही कचरा दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. शासकीय कार्यालयांनीही आपापले कार्यालय व परिसरात स्वच्छता ठेवावी.  स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ज्या शासकीय विभागांकडून जिल्हास्तरावर पुरस्कार वितरण होणार असेल, अशा विभागांनी पुरस्कारार्थींच्या नावांची यादी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोपवावी. जेणेकरुन पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन करणे सुलभ होईल.

            स्वातंत्र्य दिनी वृक्षारोपण, आंतर शालेय/ आंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाइन पद्धतीद्वारे वाद-विवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा/ देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धाचे आयोजन इयत्ता 7 व 8 वी आणि 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांची निवड करावी.  जिल्हा पोलिस विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पुरेशी सुरक्षा व्यवस्था, राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यासाठी बॅन्डपथक तयार ठेवावे. शहरात सुरक्षा व्यवस्था ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील बगीचाचे सुशोभिकरण करुन परिसर सुस्थितीत ठेवावा. तसेच आवश्यक तेथे रंगरंगोटी करावी. त्याचबरोबर मुख्य शासकीय समारंभाच्या कालावधीत म्हणजेच सकाळी 8.35 ते 9.35 या वेळेत कुठेही शासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी दिले.

00000

No comments:

Post a Comment