Thursday, 20 August 2020

जिल्ह्यात हत्तीरोग शोध मोहिमेस सुरुवात गृहभेटीच्यावेळी नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

             जळगाव, (जिमाका) दि. 20 – जिल्ह्यात हत्तीरोग शोध मोहिम 16 ते 31 ऑगस्ट, 2020 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत शहरी व ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन नियमित गृहभेटीच्या वेळी प्रत्येक गावात प्रत्येक घरात हत्तीरोग शोध मोहिम राबविणार आहेत. नागरीकांनी या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.  

            भारतात हिवताप खालोखाल हत्तीरोग ही महत्वाची सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आपल्या राज्यातुन 2021 मध्ये हत्तीरोग दुरीकरणाचे ध्येय ठेवण्यात आलेले आहे.   त्यानुसार हत्तीरोग दुरीकरणाची कार्यवाही प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यात बाह्य लक्षणेयुक्त व अंडवृध्दी रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. बुचेरिया बॅक्रोपटाय व बुग्रीया मलायी नावाचा परजीवी जंतुमुळे हत्तीरोग हा आजार होतो. जेव्हा डासाची क्युलेक्स मादी हत्तीरोग झालेल्या आजारी व्यक्तीस चावते तेव्हा ती मानवाच्या शरीरातील जंतु मानवाच्या रक्तासोबत शोषून घेते. डासाच्या शरीरातील जंतुची 12 ते 15 दिवसात वाढ होऊन पुन: दुस-या निरोगी व्यक्तीस जेव्हा हा डास चावतेा तेव्हा हे जंतु त्या व्यक्तीच्या शरिरात सोडतो. मानवाच्या शरीरात हे जंतु लसीका संस्थेत जातात तेथे त्याची वाढ होते नर व मादी वेगळे होतात. नर व मादीचे मिलन होऊन असंख्य पिल्ले जन्म घेतात. त्यांना आपण मायक्रोफायलेरिया म्हणतो. नर व मादी मानवी शरीरात 5 ते 8 वर्षे राहतात. लसीका वाहिनीत हे जंतु अडकुन बसल्याने तेथील भाग फुगीर बनतो व तेथेच संबधीत व्यक्तीस विकृती येते. त्यास आपण लसीकाचा हत्तीरोग झाला असे म्हणतो. डास चावल्यापासुन ते हत्तीरोग लक्षणे दिसण्याचा कालावधी (अधीशीयन काळ) 12 ते 18 महिने आहे.

        हत्तीरोग आजाराची लक्षणे : हत्तीरोगग्रस्त रुग्णाच्या लसीकाग्रंथी सुजतात जाघेंत गाठ येते, वेदना होतात, रुग्णास ताप येतो, थंडी सुध्दा वाजते, काही पुरषांमध्ये वृष्णदाह होतो. हातपाय व बाहयजनेंद्रीय सुजतात रुग्णास अंडवृध्दी होते. या लक्षणांमुळे रुग्ण सामाजिक उपक्षेस पात्र ठरतो. रुग्णाचे लग्न होत नाही. अशा या हत्तीरोगाचे केंद्र शासनाने 2020 पर्यत उच्चाटण करण्याचे ठरविले. सद्यस्थितीत हत्तीरोगाच्या नियंत्रणासाठी रुग्णांना औषोधोपचार व डास नियंत्रण या कार्यप्रणालीनुसार हत्तीरोगाचे नियंत्रण करण्यात येते.

            शोध मोहिम 16 ते 31 ऑगस्ट, 2020 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत शहरी व ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन नियमित गृहभेटीच्या वेळी प्रत्येक गावात प्रत्येक घरात हत्तीरोग शोधण्याचे काम करणार आहेत.

            हत्तीरोगाची उत्पत्तीस्थाने - हत्तीरोगाचा प्रसार करणारा डास साचलेल्या किंवा संत वाहणा-या घाणेरडया पाण्यात अंडी घालतात व सर्वसाधारणपणे निदर्शनास आलेली क्युलेक्स डासाची उत्पत्तीस्थाने ही सेप्टीक टॅक, वापरात नसलेली पडक्या विहीरी, खड्डे, उघडी गटारी, शोष खड्डे इ. आहेत.

            प्रतिबंधात्मक उपाययोजना - आपल्या घराभोवती पाणी साचु देऊ नका, घरातील पाण्याची सर्व साठे आठवड्यातून एकवार निश्चित करुन रिकामी करावी. या साठ्यातील आतील बाजु व तळ घासुन पुसुन कोरडे करुन पुन्हा वापरावे व पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकुन ठेवावीत. अंगण व परिसरातील खड्डे बुजवावीत. त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी, झोपतांना पुर्ण अंगभर कपडे घालावीत, पांघरुण घेऊन झोपावे, संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान दारे खिडक्या बंद करावीत, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, झोपतांना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा, घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकावू टायर्स, कप, मडकी इ. ची वेळीच विल्हेवाट लावावी, संडासाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवड्याला नाल्यांमध्ये क्रुड ऑईल टाकावे, हिवतापाची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय/नपा/मनपा दवाखान्यात मोफत उपलब्ध आहे, या दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास वावरणार नाही म्हणजे योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणा-या आजारापासुन दुर ठेवतो. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण होणेसाठी सर्वानी हातभार लावावा. असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.     

00000

No comments:

Post a Comment