Thursday, 15 May 2025

खरीप हंगाम जागृती लेखमाला – भाग ३ बीजप्रक्रिया : उत्पादन वाढीचा प्रभावी मंत्र



             खरीप हंगाम सुरू होण्याच्या तयारीत सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे — बियाण्याची योग्य निवड आणि प्रक्रिया. बियाणे उत्तम असले तरी त्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया केली नाही, तर जमिनीतून किंवा बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांमुळे उत्पादनावर परिणाम होतो. बियाण्यावर जैविक किंवा रासायनिक औषधांची प्रक्रिया म्हणजेच बीजप्रक्रिया केली, तर पिकं रोगमुक्त, सतेज आणि जोमदार होतात. शिवाय कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते.

 या लेखात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या सहकार्याने आपण बीजप्रक्रियेचे प्रकार, त्याचे फायदे, टप्पे आणि आवश्यक दक्षता यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत.

बीजप्रक्रिया म्हणजे काय?

            बियाणे पेरण्यापूर्वी त्यावर बुरशी, जिवाणू वा कीटकांपासून संरक्षण करणाऱ्या जैविक किंवा रासायनिक द्रव्यांनी केलेली प्रक्रिया म्हणजे बीजप्रक्रिया. ही प्रक्रिया बियाण्याची उगवणक्षमता वाढवते, रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि शेवटी उत्पादनात वाढ करते.

बीजप्रक्रियेचे प्रमुख फायदे :

१. रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळता येतो.

२. बियाण्याची उगवणक्षमता वाढते.

३. रोपे जोमदार आणि सतेज होतात.

४. उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

५. ही प्रक्रिया कमी खर्चात होते, म्हणून किफायतशीर आहे.

अ) जैविक बीजप्रक्रिया – जिवाणू संवर्धक वापरून

            वापरण्याची पद्धत (सोयाबीनसाठी): १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम Rhizobium japonicum व २५० ग्रॅम स्फुरद विरघळवणारे जिवाणू. १ लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ टाकून द्रावण तयार करा.

बियाणे ओलसर करून त्यावर जिवाणू संवर्धक लेप द्या. सावलीत सुकवून त्वरित पेरणी करा.

दक्षता:

बुरशीनाशकांची प्रक्रिया आधी करावी.

बियाण्यावर पूर्वीपासून औषधे लावलेली असल्यास, जिवाणू संवर्धक दीडपट प्रमाणात वापरावा.

ब) जैविक बुरशीनाशक – ट्रायकोडर्मा प्रक्रिया: १ किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा, बियाणे पातळ थरात पसरवून ट्रायकोडर्मा ओलसर करून शिंपडावे. हलक्या हाताने मिसळून सावलीत सुकवावे व पेरणी करावी.

दक्षता:

ट्रायकोडर्मा रासायनिक औषधांपासून दूर ठेवावे.थंड व कोरड्या ठिकाणी साठवावे.

क) रासायनिक बुरशीनाशक प्रक्रिया:

१ किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम किंवा २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम. १० किलो बियाण्यास १०० मिली पाण्यात द्रावण तयार करा. बियाणे ओलसर करून घोळसावे, नंतर सावलीत वाळवून पेरणी करावी.

    बीजप्रक्रिया म्हणजे कमी खर्चात उत्पादनवाढीची खात्री. योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात बीजप्रक्रिया केल्यास शेतकरी बांधवांना बियाण्याची ताकद वाढवता येते, आणि खरीप हंगाम यशस्वी होतो.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा :

गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी.

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव

000000000

No comments:

Post a Comment