Wednesday, 21 May 2025

मान्सूनपूर्व तयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना सर्व विभागांनी सतर्क राहून समन्वयाने कार्य करण्याचे आदेश






         जळगाव, दि. 21 मे 2025 (जिमाका वृत्तसेवा): -मान्सून काळात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे, कोणतीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. आयुष प्रसाद यांनी दिल्या.

            जिल्हाधिकारी कार्यालयात आज मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. अंकुश पिनाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभ क्षेत्र प्राधिकरण कडा श्री. गणेश भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण श्री. नरवीर रावळ, उपआयुक्त महानगरपालिका श्री. गणेश चाटे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग श्रीमती अदिती कुलकर्णी, शहर अभियंता श्री. मनीष अमृतकर, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहायक श्री. नासिदूल इस्लाम आदी अधिकारी उपस्थित होते.

            बैठकीत हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन धरणातून विसर्ग नियंत्रित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. पूर निवारणासाठी पाटबंधारे विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच नद्यांमधील गाळ तात्काळ काढून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी, अशी सूचनाही देण्यात आली. नदीवरील पूल सुरक्षित राहतील यासाठी खबरदारी घेण्याचे आदेशही देण्यात आले.

            जिल्हा परिषदेने शाळांची दुरुस्ती करावी. आरोग्य विभागाने पावसाळ्यातील साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध साठा, रुग्णवाहिका व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांची तयारी तपासावी.

अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ काढण्याचे आदेश:

            पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ काढून टाकावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यासंदर्भात सर्व नगरपालिका प्रशासनांनी सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले.

            महावितरणने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ‘आपदा मित्र’ म्हणून प्रशिक्षण देऊन आपत्ती व्यवस्थापन किट उपलब्ध करून द्यावेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सर्व विभागांना वितरित करण्यात आलेले शोध व बचाव साहित्य तपासून सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

            सर्व विभागांनी आपल्या कार्यालयात 24×7 नियंत्रण कक्ष सुरू करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

००००००००००

No comments:

Post a Comment