जळगाव, दि. 12 - ‘स्वच्छता हीच सेवा’
समजून नागरीकांमध्ये स्वच्छतेची सवय वाढावी, पर्यावरणाचे रक्षण व्हावे, याकरीता जळगाव
जिल्हा प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
यांनी आज अनंत चतुर्थीच्या दिवशी केला असून या अभियानात जिल्ह्यातील नागरीकांनी
मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे
स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करणे व 2 ऑक्टोबर, 2019 रोजी राष्ट्रपिता महात्मा
गांधी यांची 150 वी जयंती साजरी होत आहे. या दिनाचे औचित्य साधून 20 सप्टेंबर ते 1
ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्याला प्लॅस्टीकमुक्त करण्याचा संकल्प डॉ. ढाकणे यांनी
आज केला. याकरीता जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांची बैठक जिल्हाधिकारी यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय
टेकाळे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) बी. ए. बोटे, रेडक्रॉस
सोसायटीचे डॉ. विनोद बियाणी, राजेश यावलकर यांचेसह लघु उद्योग भारती, रोटरी क्लब,
प्लॅस्टिक निर्मिती कंपन्यांचे प्रतिनिधी, पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.
प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा होणारा
ऱ्हास व हानी रोखणे, पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरीकांमध्ये रुजविणे व सामाजिक
बांधिलकतेच्या भावनेतून हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. याकरीता 20
सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील सामाजिक संस्थांच्या मदतीने,
पर्यावरण प्रेमी नागरीकांच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्लॅस्टीक गोळा करण्यात
येणार आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेणार
असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी बैठकीत सांगितले.
प्लॅस्टीकमुळे जमिनीची नापिकता वाढीस
लागत असून भविष्यात अनेक अडचणींना सामोर जागे लागणार आहे. यावर वेळीच उपाय व्हावेत,
समाजात बदल घडावा अशी अनेक नागरीकांची भावना पण असते. यासाठी कोणीतरी पुढे आले
पाहिजे. याच भावनेने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्ह्यातील
1502 गावांतील प्लॅस्टीकचा कचरा गोळा करण्यासाठी सर्व गावांमध्ये स्वयंस्फुर्तीने
काम करण्यास तयार असलेले प्रर्यावरण प्रेमी स्वयंसेवक नेमण्यात येणार आहे. गावातील
प्लॅस्टीक जमा करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने मोठी बॅग (गोणी)
देण्यात येणार आहे. गावातील नागरीकांनी आपल्या गावातील प्लॅस्टीकचा कचरा या
बॅगमध्ये जमा करायचा आहे. हा अभिनय उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच एनसीसी, एनएसएस चे विद्यार्थी, सामाजिक व
पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचीही मदत घेण्यात येणार आहे.
जमा केलेल्या प्लॅस्टीकमधील ज्या
प्लॅस्टीकवर रिसायकलींग करता येईल त्याचा पुनर्वापर करता येणार आहे तर उर्वरित
प्लॅस्टीक नष्ट करण्यात येणार असल्याचेही डॉ ढाकणे यांनी सांगितले. या उपक्रमात
चांगले काम करणाऱ्या गावांना भेट वस्तु तर शाळा महाविद्यालयांना पर्यावरण प्रेमी
शाळा/ महाविद्यालय असा पुरस्कार देण्याचाही भविष्यात विचार असल्याचे जिल्हाधिकारी
यांनी सांगितले.
या अभिनव उपक्रमात जिल्ह्यातील
नागरीकांचा सहभाग वाढावा, नागरीकांच्या या उपक्रमाबाबतच्या सुचना स्वीकारण्यासाठी
येत्या रविवारी 15 सप्टेंबर, 2019 रोजी
सांयकाळी 4 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक घेण्यात
येणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले. या बैठकीस जिल्ह्यातील
रोटरी, लायन्स क्लब, औद्योगिक संस्था, उद्योग मित्र, पर्यावरण प्रेमी संस्था,
सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधकारी डॉ. ढाकणे
यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment