Wednesday, 25 September 2019

विषमुक्त अन्नाच्या निर्मितीसाठी कृषि पुरस्कारार्थीनी मार्गदर्शन करावे - मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील


जळगाव, दि. 24 - सद्य:परिस्थितीमध्ये शेतीत रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. त्याचे विपरीत परिणात मानवाच्या जीवनावर होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ज्या शेतकऱ्यांना कृषि पुरस्कार मिळाले आहे. त्यांनी इतर शेतकऱ्यांना विषमुक्त अन्नाच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन करावे. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले.  
            कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना विविध कृषि पुरस्कार देण्यात येतात. सन 2017 करीता जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना नुकतेच कृषि पुरस्कार जाहिर झाले. याबद्दल कृषि विभागाच्यावतीने कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांच्या हस्ते वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कार मिळालेले उमरे,ता. एरंडोल येथील शेतकरी समाधान दयाराम पाटील व उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त जामनेर येथील शेतकरी रविंद्र माधवराव महाजन यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह तर जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जळगाव जिल्हा कॉपीटेबल बुक देऊन सत्कार करण्यात आला.
            डॉ. पाटील पुढे म्हणाले की, शेती ही अफवांवर केली जाते. त्याचे विपरीत परिणाम आपणास दिसून येतात. मागील वर्षी ज्या पिकाला चांगला बाजारभाव मिळाला असेल तेच पीक शेतकरी लावतात. त्यामुळे उत्पादन वाढल्यामुळे बाजारभाव कमी होतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतीचेही तंत्र बदलले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या बदलाची माहिती घेऊन शेती करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
            याप्रसंगी कृषिरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी विश्वासराव पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी व कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment