Saturday, 21 September 2019

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे विधासभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर





            जळगाव, दि.21 :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 ची घोषणा केली असुन जिल्ह्यातील 11 विधानसभा क्षेत्रात सार्वत्रिक निवडणूका पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.अविनाश डॉकणे यांनी आज पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीना दिली.
            जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 17 लाख 96 हजार 326 तर स्त्री मतदार 16 लाख 50 हजार 729 व इतर 93 असे एकूण 34 लाख 47 हजार 148 मतदार आहेत. तसेच 11 विधानसभा मतदार संघात एकूण 7846 सैनिक मतदार आहेत. तर दिव्यांग मतदार एकूण 14852 आहेत. जिल्ह्यात एकूण 3532 मतदान केंन्द्र असून सहाय्यकारी मतदान केंन्द्राची संख्या 54 असे एकूण 3586 मतदान केंन्द्र आहे.
            मतदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी 6513 मतदान यंत्र (बीयु ) तर 44430 (सीयु) तर 4882 (व्हीव्हिपॅट ) यंत्रे प्रशासनाकडे उपलब्ध आहेत.
             21 सप्टेंबर पासून निवडणूकीची आदर्श आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात लागू झालेली असल्याने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक भयमुक्त व पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार असून यासाठी आचारसंहिता पथके तयार करण्यात आली आहेत.
            येत्या 27 सप्टेंबर (शुक्रवार) रोजी निवडणूक अधिसूचना जारी करण्यात येणार असून, अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोंबर (शुक्रवार) आहे. 5 ऑक्टोंबर (शनिवार) रोजी अर्जाची छाननी होणार आहे. तर 7 ऑक्टोबर(सोमवार) पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. 21 ऑक्टोबर (सोमवार) रोजी मतदान तर, 24 ऑक्टोंबर (गुरुवारी) रोजी मतमोजणी होणार आहे. तर निवडणूक प्रक्रिया पुर्ण होण्याचा दिनांक 27 ऑक्टोंबर (रविवार )असल्याचेही डॉ. ढाकणे यांनी सांगितले.
 यासाठी संपूर्ण प्रक्रीयेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध कक्ष प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिली.
            1950 या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर मतदारांना निवडणुकी विषयी माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच  विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 साठी  SUVIDHA, C-Vigil, SUGAM  या IT Application वापर करण्यात येणार आहे. तसेच निवडणुक कामकाजासाठी आवश्यक असलेले मनुष्य बळ पुरेसे उपलब्ध आहेत. त्यांच्या नियुक्तीही करण्यात आल्या असूनही प्रशिक्षण देखील देण्यात आले आहेत.
            जिल्ह्यातील मतदान टक्केवारी वाढण्यासाठी  माध्यम प्रतिनिधीनी सहकार्य करण्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
            मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता येण्यासाठी पुरेशी सुरक्षा यंत्रणा सक्रीय करण्यात आली असून पोलीस विभागाने प्रतिबंधात्मक कार्यवाही हाती घेतली असल्याची माहिती यावेळी जिल्हा पेालीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिली. तसेच गुन्हेगारांना पाठबळ देण्याऱ्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.
            याप्रसंगी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, निवासी उपजिल्हाधिकारी वामनराव कदम, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसिलदार आंनद कळसकर यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment