Friday, 4 October 2019

मतदार जनजागृती उपक्रमातंर्गत जिल्ह्यात भरण्यात आली पाच लाख संकल्पपत्र


        जळगाव, दि. 3 - भारत निवडणूक आयोगामार्फत विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी. याकरीता स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जिलह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी यासाठी विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांकडून पाच लाख संकल्पपत्र भरून घेण्यात आले आहे. अशी माहिती स्वीप उपक्रमाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बी. जे. पाटील यांनी दिली आहे.
        जिल्ह्यात या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते 26 सप्टेंबर रोजी  करण्यात आला होता. जिल्ह्यातील इयत्ता 5 वी  ते 12 वीच्या विद्यार्थ्यांमार्फत आपल्या पालकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी हि संकल्प पत्र भरून घेण्यात आली आहे.
        जिल्ह्यातील अमळनेर, पाचोरा, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर, धरणगाव, भुसावळ रावेर, मुक्ताईनगर, यावल, चोपडा या तालुक्यांमध्ये प्रत्येकी 35 हजार, जळगाव तालुक्यात 40 हजार तर बोदवड व एरंडोल तालुक्यात प्रत्येकी 20 हजार तसेच दिव्यांगांमार्फत 5 हजार संकल्प पत्र भरून घेण्यात आली आहेत. एकूण 5 लाख संकल्प पत्रांद्वारे मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप नोडल अधिकारी  बी. जे. पाटील, सहाय्यक किशोर वायकोळे, डॉ. मिलिंद बागुल, प्रा. अतुल इंगळे हे जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करीत असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.
000

No comments:

Post a Comment