जळगाव,
दि. 1 - महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाची अधिकाधिक टक्केवारी वाढावी,
याकीरता भारत निवडणूक आयोगाने स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये मतदान जनजागृती
करण्यासाठी रिजनल आउटरिच ब्युरो, पुणे यांचेमार्फत चित्ररथ तयार करण्यात आला आहे.
हा चित्ररथ आज जिल्ह्यात दाखल झाला आहे.
‘माझं
मत-माझा महाराष्ट्र’ या जनजागृती चित्ररथाचा जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी
उपजिल्हाधिकारी श्री. वामन कदम यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात
आला. याप्रसंगी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी (महसुल)
रवींद्र भारदे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, तहसीलदार बाबासाहेब गाढवे,
स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी
किशोर वायकोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्ररथ मार्गस्थ करण्यात आला.
जिल्हाधिकारी
कार्यालयात झालेल्या मतदान जनजागृती कार्यक्रमात विनोद ढगे व त्यांच्या
सहकाऱ्यांनी पथनाट्य सादर केले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कदम यांनी
उपस्थितांना जिल्ह्यात विधानसभेसाठी अधिकाधिक मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी
आपण सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद
बागुल यांनी तर आभार प्रा. अतुल इंगळे यांनी मानले. कार्यक्रमास नायब तहसीलदार
अनंत कळस्कर यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
‘माझं मत-माझा महाराष्ट्र’ हा चित्ररथ जिल्ह्यात
5ऑक्टोबरपर्यंत राहणार असून या कालावधीत जळगाव, पाचारो, भुसावळ, जामनेर व अंमळनेर
या तालुक्यात जाऊन मतदारांमध्ये मतदान जनजागृती करणार आहे. त्यानंतर हा रथ धुळेकडे
रवाना होईल.
000
No comments:
Post a Comment