Thursday, 30 January 2020

अपघातांवर नियंत्रणा संबंधित यंत्रणांनी तातडीने पावले उचलावीत -खासदार रक्षा खडसे








जळगाव.दि.29- केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालयाच्या 19 डिसेंबर 2019 च्या अधिसूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्याच्या वरिष्ठ संसद सदस्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ते सुरक्षा समिती स्थापन करण्याच्या निर्देशानुसार 16 सदस्यीय समितीच्या बैठकीत बोलताना समितीच्या अध्यक्षा  खासदार रक्षा खडसे यांनी सर्व संबंधितांना निर्देश दिलेत.
याप्रसंगी खासदार उन्मेश पाटील,आमदार शिरीष चौधरी,जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही,जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप पाटोडे,उप विभागीय अधिकारी फैजपूर डॉ. अजित थोरबोले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,सार्वजनिक बांधकाम,उप प्रादेशिक परिवहन,राज्य परिवहन मंडळ यांचेसह विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षा खासदार रक्षा खडसे पुढे म्हणाल्या की, बहुतांश अपघात हे वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्याचे गांभिर्य लक्षात न घेतल्याने होत असतात  जळगाव जिल्हा अपघातांच्या घटनांमध्ये राज्यात 6 व्या क्रमांकावर असून सर्व वाहन चालक, वाहन आणि वाहतूकीवर नियंत्रण ठेवणाऱ्या सर्व यंत्रणांनी वाहतूक नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी केल्यास आणि जिल्ह्यातील सर्व प्रकरच्या वाहन चालकांनी या यंत्रणांनी सहकार्य केल्यास जिल्हाचा अपघातांच्या संखेत असलेला 6 व्या क्रमांकावरून लक्षणीय रित्या खाली येईल असा विश्वास खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केला.
 संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य खासदार उन्मेश पाटील यांनी रस्ते सुरक्षा आणि सुरक्षित प्रवास यासंबंधी सर्व शाळा महाविद्यालयांमधून विविध स्पर्धांचे आयोजन तसेच प्रबोधनांमधून  प्रचार ,प्रसारावर भर देवून शिक्षण विभागाने यासंबंधी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना केल्यात.सर्व संबंधित यंत्रणांनी सांघिक प्रयत्न करून या कामाला विशेष प्राधान्य देण्याच्या सूचनाही खासदार उन्मेश पाटील यांनी दिल्या.
समिती सदस्य आमदार शिरीष चौधरी यांनी वाहतूक नियमांच्या पालनाविषयीची माहिती सांगण्यासाठी केवळ  पारंपारिक कागदी पत्रकांचा वापर न करता ऑडिओ/व्हिडीओ (दृक/श्राव्य) यासारख्या माध्यमांचा वापर करावा,जेणेकरून त्याचा प्रभाव  मानवी मनावर विशेष करून युवा वाहन चालकांवर अधिक प्रभावीपणे होईल असा विश्वास आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केला.
 समितीचे सदस्य सचिव जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी वाहतूक नियमांचे महत्व संबंधित यंत्रणांनी सर्व नागरिकांना समजविताना नियमांचे पालन केल्याने जिवीत तसेच वित्तीय हानी कशी टाळता येवू शकते याचे समाज प्रबोधन करण्यासाठी समाजाचे मार्गदर्शकाची भूमिका बजावावी .हेल्मेट,शिटबेल्टाचा वापर केल्याने होणारे फायदे आणि न वापरल्याने होणारे तोटे याची माहिती सर्व वाहन धारकांना /चालकांना अधिकाधिक माध्यमांद्वारे समजवाव्यात अशा  सूचना जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी करून ते पुढे म्हणाले की,नियमांचे पालन करण्याची चांगली सवय आपल्या पासून व्हायला पाहिजे आणि याचाच एक भाग म्हणून प्रथमत: सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी हेल्मेट शिवाय मी कार्यालयात वाहन नेणार नाही याची मनाशी शपथ घ्यावी,आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विविध शासकीय कार्यालयांच्या फाटकावरच अधिकारी/कर्मचारी हेल्मेट शिवाय वाहन आणतांन आढळल्यास त्यांना प्रथम दंडित केल्यास जिल्ह्यातील इतर नागरिक याचा नक्कीच बोध घेतील.
समिती सदस्य उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी जिल्ह्यातील अपघातांची स्थिती,काळ,कारणे यांची कारणमिमान्सा सादर करून  अपघात कमी करण्यासाठी त्यांचा विभाग करीत असल्याला उपाय योजनांची माहिती विस्तृतपणे सादर केली.
00000

No comments:

Post a Comment