जळगाव, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) :- बालकामगार ही अनिष्ट प्रथा असून खेळण्या बागडण्याच्या वयात लहान मुलांना शिक्षणापासून वंचित करुन कष्टाच्या कामाला जुंपले जाते. कोवळया खांदयावर कामाचे ओझे टाकून त्यांच्या बालपणाचा आनंद हिरावून घेतला जातो. त्यामुळे बालकाच्या सर्वागीण विकासावर विपरीत परिणाम तर होतोच परंतु त्यामुळे देशाचे भविष्य असलेला बालक सुजाण, कार्यक्षम व जबाबदार नागरिक होऊ शकत नाही. बालकामगार ही अत्यंत गभीर समस्या असून त्याचे संपूर्ण निर्मूलन झालेच पाहिजे. बालकांना बालक म्हणून असलेले हक्क मिळालेच पाहिजे अशी भावना 12 जून या जागतिक बालकामगार विरोधी दिनाच्या दिवशी व्यक्त करुन जळगाव जिल्हा बालकामगार मुक्त करण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
जिल्हाधिकारी
अभिजीत राऊत जळगाव यांनी दिलेल्या
निर्देशानुसार जागतिक बालकामगार विरोध दिनाच्या पार्श्वभूमीवर सहाय्य कामगार
आयुक्त कार्यालय, जळगाव व चाईल्ड लाईन यांच्या मार्फत विविध ठिकाणी बालकामगार
प्रथा विरोधी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. बालकामगार प्रामुख्याने
आढळून येणाऱ्या हॉटेल्स, ढाबे, चहाटपरी, ग्यारेजेस, विटभट्टी, बांधकाम उदयोग इ.
ठिकाणी भेटी देवून बालकाचे बालपण टिकवून त्याना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी
जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच आस्थापना मालकांना कायदयातील तरतुदींची माहिती
समजावून सांगण्यात येणार असून विविध आस्थापनाना भेटी देवून मालकाकडून बालकामगार
कामावर ठेवणार नाही असे हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. तसेच येथे बालकामगार
कामावर ठेवले जात नाही असे स्टिकर दुकानामध्ये दर्शनी भागात लावण्यात येणार आहे. बालकामगार
प्रामुख्याने आढळून येणाऱ्या ठिकाणी भविष्यात धाडसत्रे मोहिम आयोजित करण्यात येणार
असुन बालकामगार ठेवणाऱ्या मालकाविरोधात
सक्त कारवाई करण्यात येणार आहे. व्यपारी असोसिएशन, उदयोजक संघटना, स्वयंसेवी
संघटना यांनाही या जनजागृती कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात येणार आहे. तसेच
बालकामगार कामावर ठेवू नये याबाबत सोशल मिडिया मार्फतही जनजागृती करण्यात येणार
आहे.
बाल
व किशोरवयीन (प्रतिबंध व नियमन कामगार अधिनियम, 1986 च्या तरतुदींनुसार 14
वर्षाखालील सर्व उदयोग व प्रक्रिया मध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
बालकामगार कामावर ठेवणाऱ्या आस्थापना मालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येते. दोषी मालकास 6 महिने ते 2 वर्षापर्यंत तुरुंगवास
किंवा रु. 20,000 ते रु 50,000 पर्यंत आर्थिक दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद
करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाची पुनरावृत्ती झाल्यास तुरुगवासची शिक्षा 1 ते 3
वर्षापर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही आस्थापना मालकाने आपल्या
आस्थापनेत बालकाना कामावर ठेवू नये. अन्यथा कायदेशी कारवाई करण्यात येईल.
बालकामगार
काम करत असल्यास सुजाण नागरिकांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, डॉ. आंबेडकर
मार्केट, जिल्हापेठ, जळगाव यांचेकडे अथवा संबंधित विभागातील पोलीस स्टेशन येथे
अथवा चाईल्ड लाईनच्या 1098 या टोल फ्री नंबर वर तक्रार दाखल करावी, असे आवाहन
सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत बिरार यांनी दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे. ००००
No comments:
Post a Comment