Tuesday, 30 April 2019

ध्वजारोहण, शानदार संचलनाने महाराष्ट्र राज्य स्थापना दिन उत्साहात साजरा महाराष्ट्र हे थोर राष्ट्र नेत्यांच्या विचारांचा वारसा जपणारे राज्य - पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील














जळगाव, दि. 1-  महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. महाराष्ट्र राज्याला अनेक थोर राष्ट्र नेत्यांचा वारसा असून आपले राज्य हे या विचारांचा वारसा जपणारे राज्य आहे. त्यामुळेच राज्याने विविध क्षेत्रात प्रगती करुन आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देतांना ना. पाटील बोलत होते. यावेळी महापौर सिमाताई भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी निलभ रोहन, जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, यांचेसह स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री पुढे म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे महत्वपूर्ण योगदान आहे. महाराष्ट्राचा धार्मिक, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी असून राज्याचे विविधांगी भावविश्व थक्क  करणारे आहे. महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच ती शूरवीरांचीही भूमी आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, सामाजिक समतेचा पाया रचणारे छत्रपती शाहू महाराज, भारताला लोकशाहीची देणं देणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व थोर राष्ट्र नेत्यांच्या विचारांचा वारसा जपणारे राज्य असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
पोलीस कवायत मैदान येथे सकाळी आठ वाजता ना. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शानदार संचलन करण्यात आले. त्यात जिल्हा पोलीस दल, होमगार्ड पुरुष व महिला पथक, शहर वाहतुक शाखा, बॉम्ब शोधक पथक, पोलीस बॅण्ड पथक, वरुण पथक, जळगाव शहर महानगरपालिकेचे अग्निशमन पथक, निर्भया पथकांनी संचलनात सहभाग घेतला. या संचलनाचे नेतृत्व कमांडिग ऑफिसर भुसावळ उप विभागाचे पोलीस उपअधिक्षक गजानन राठोड यांनी केले. तर सेकंड कमांडिग ऑफीसर राखीव पोलीस निरिक्षक सुभाष कावरे हे होते.  
 यावेळी काशिनाथ पलोड शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोल मल्लखांब, सेंट टेरेसा शाळेच्या विद्यार्थीनींनी रोप मल्लखांब तर योग शिक्षिका अनिता पाटील यांच्या विद्यार्थ्यांनी रिदमिक योगा सादर करुन उपस्थितांच्या डोळ्यांची पारणे फेडली. त्यानंतर पालकमंत्री ना. पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना भेटून शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गयाज उस्मानी आणि राजेश यावलकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
            महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा विज्ञान व सुचना अधिकारी प्रमोद बोरोले यांचेसह महसुल विभागाचे अधिकारी, विभागप्रमुख, कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त श्री. विनायक राजाराम मानखुंबरे, सजा भातखेडा, ता. एरंडोल यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात ध्वजारोहण
            मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारातही महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुद्रांक जिल्हाधिकारी श्री. विजय भालेराव,  कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, सह दुय्यम निबंधक सुनील पाटील यांचेसह प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांचे प्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी आदी उपस्थित होते.
०००

माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील सेवानिवृत्त




            जळगाव, दि. 30 - जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी श्री. जगन्नाथ निंबा पाटील आज 39 वर्षाच्या प्रदिर्घ शासकीय सेवेनंतर आज दिनांक 30 एप्रिल 2019 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
            सेवानिवृत्ती निमित्ताने श्री. पाटील यांना जिल्हा माहिती कार्यालयातर्फे स्नेहपुर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी श्री. विलास बोडके यांनी श्री. पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्यात.
            यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी विनोद पाटील, दिलीप खैरनार, प्रविण बावा, श्रीमती उषा लोखंडे, रामकृष्ण कोळी, शांताराम नरोटे, पंकज ठाकूर, प्रमोद भंगाळे, कार्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश सानप उपस्थित होते.
            श्री. पाटील यांनी जून 1980 मध्ये औरंगाबाद येथे आपल्या शासकीय सेवेस प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी जालना, नंदुरबार, धुळे, पणजी (गोवा), नागपुर, जळगाव येथे विविध पदांवर काम केले. श्री. पाटील हे जून 2018 ला नागपूर येथून जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव येथे माहिती अधिकारी या पदावर रुजू झाले. या काळात श्री. पाटील यांनी जिल्हा माहिती अधिकारी, नंदूरबार या पदाचा अतिरिक्त कार्यभार यशस्वीपणे सांभाळला. 
000

गाडेगाव येथे 5 मे रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन



        जळगाव, दि. 30 -  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व लेवा पाटीदार बिझीनेस नेटवर्क यांचे संयुक्त विद्यमाने गाडेगांव येथील तोताराम महाराज समाधी कॅम्पस, सुपीम  इंडस्ट्रीज जवळ, जळगाव- औरंगाबाद नॅशनल हायवे मु.पो. गाडेगाव ता. जामनेर, जि. जळगाव येथे दिनांक 5 मे, 2019 रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 2.30 या वेळेत युवक/युवतींसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
           या मेळाव्यासाठी विविध खाजगी आस्थापनांनी एकूण 300 रिक्तपदांची मागणी कळविलेली असून रिक्तपदांसाठी शैक्षणिक पात्रता आय.टी.आय पास, डिप्लोमा व इंजिनियरींग पात्रता धारक अशी आहे.
         उपस्थित राहणा-या उदयोजकांना विविध रिक्तपदांसाठी  पात्र उमेदवारांची  निवड करावयाची असल्याने उमेदवारांनी स्वखर्चाने मेळाव्यास उपस्थित रहावे. मेळाव्यास येतांना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटोसह 5 मे, 2019 रोजी ठिक 8.00 वाजता मु. पो. गाडेगाव, ता. जामनेर जि. जळगाव येथे उपस्थित रहावे. नियेक्त्यांकडून देण्यात येणा-या वेतनाबाबत व इतर सवलतीबाबत रोजगार मेळाव्याचे दिवशी संबंधित कंपनीचे अधिकारी/ प्रतिनिधी माहिती देणार आहेत.
            या सुवर्ण संधीचा लाभ इच्छुक उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. तसेच रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in  वेबसाईटला भेट दयावी, असेही श्रीमती तडवी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी





        जळगाव, दि. 30 - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            यावेळी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसीदार (महसुल) मंदार कुलकर्णी, विकास लाडवंजारी यांचेसह अधिकारी,  कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
000

जिल्ह्यातील चारा लगतच्या जिल्ह्यात अथवा राज्यात वाहतुकीस बंदी



        जळगाव, दि. 30 - जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध असणे आवश्यक आहे. भविष्यात उत्पन्न होणाऱ्या चारा टंचाईची  परिस्थिती  लक्षात घेता या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी  डॉ. अविनाश ढाकणे, यांनी जळगाव जिल्ह्यातील चारा लगतच्या जिल्ह्यात किंवा लगतच्या राज्यात वाहतुक करण्यास निर्बंध घातले आहेत. हे आदेश पुढील 60 दिवसाच्या कालावधीसाठी लागू राहतील.
            या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुध्द, संस्थेविरुध्द फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. असेही डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

शहरात 4 व 5 मे रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन


जळगाव, दि. 30 - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व पिपल्स पीस फाऊंडेशन, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने येथील हॉटेल रॉयल पॅलेस, महाबळ रोड, डी. एस. पी. चौक येथे दिनांक 4 व 5 मे, 2019 रोजी सकाळी 10.30 वाजेपासून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांसाठी  रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती श्रीमती अनिसा तडवी,  सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी दिली आहे.
            या मेळाव्यासाठी विविध खाजगी आस्थापनांनी एकूण 550 रिक्तपदांची मागणी कळविलेली असून रिक्तपदांसाठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास/नापास, 12 वी पास, आय.टी. आय. पास, ग्रॅज्युएट, डिप्लोमा, तांत्रिक पदवीधर अशी आहे.
            उपस्थित राहणा-या उद्योजकांना विविध रिक्तपदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची असल्याने आपण स्वखर्चाने मेळाव्यास उपस्थित रहावे. मेळाव्यास येतांना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो सह 4 मे, 2019 रोजी  ठिक 10.30 वाजता हॉटेल रॉयल पॅलेस, महाबळ रोड, डी.एस.पी. चौकाजवळ, जळगाव येथे उपस्थित रहावे. नियोक्त्याकडून देण्यात येणा-या वेतनाबाबत व इतर सवलतीबाबत रोजगार मेळाव्याचे दिवशी संबंधित कंपनीचे अधिकारी/ प्रतिनिधी माहिती  देणार आहेत.
            रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 30 एप्रिल, 2019 पर्यंत  http://peoplespeacefoundation.com/job-fair  या लिंकवर आपले नांव नोंदवावे. तसेच या विभागाच्या www.mahaswayam.gov.in  या वेबसाईटला भेट द्यावी. तसेच या सुवर्णसंधीचा लाभ इच्छूक महिला उमेदवारांनी घेण्याचे आवाहन श्रीमती तडवी यांनी केले आहे.
०००

Monday, 29 April 2019

जळगाव लोकसभा मतदार संघातील भडगाव येथील मतदान केंद्रावर 48.44 टक्के मतदान

       चाळीसगाव, दि. 29 - 03-जळगाव लोकसभा मतदार संघा अंतर्गत 18-पाचोरा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक 107 भडगाव येथे आज 48.44 टक्के मतदान झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र  कचरे  यांनी दिली.
         भारत निवडणूक आयोगाने 03-जळगाव लोकसभा मतदार संघाअंतर्गत 18-पाचोरा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक 107-भडगाव या ठिकाणी फेरमतदान घेण्याचे निर्देश दिले होते.  त्यानुसार या मतदान केंद्रावर  आज फेरमतदान घेण्यात आले.
       या मतदान केंद्रांतर्गत पुरुष मतदार 690, स्त्री मतदार 652 असे एकूण 1342 मतदार होते. यापैकी 354 पुरुष मतदार, 296 स्त्री मतदार असे एकूण 650 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.  एकूण मतदानाची टक्केवारी 48.44 टक्के आहे.
       आज सकाळी 6 वाजता मॉकपोल घेण्यात आला.  त्यानंतर सकाळी 7 वाजता मतदानास सुरवात झाली.  मतदान शांततेत पार पडले.  सकाळी मतदानास सुरवात झाल्यानंतर अवघ्या दोन तासात म्हणजे सकाळी 9 वाजेपर्यंत 9 टक्के मतदान झाले. यानंतर सकाळी 11 वाजेपर्यंत 21.24 टक्के, दुपारी 1 वाजेपर्यंत 28.46 टक्के, दुपारी 3 वाजेपर्यंत 34.58 टक्के, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 43.82 आणि सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 48.44 टक्के मतदान झाले असल्याची  माहिती 18- पाचोरा विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे  यांनी दिली आहे.
                                                                      000

महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापनदिनाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदानावर

     जळगाव, दि. 29 – महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 59 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते बुधवार, दिनांक 1 मे, 2019 रोजी पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे सकाळी ठिक 8.00 वाजता होणार आहे. 
         या कार्यक्रमास जिल्ह्यातील  स्वातंत्रसैनिक, राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम  यांनी केले आहे. 
                                                                              ०००

Friday, 26 April 2019

कृषी विभागाने उत्पादन वाढीसाठी शेतक-यांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करुन दयावे - डॉ. अविनाश ढाकणे






जळगांव दि. 26:-  जिल्हयासाठी कृषी हा अत्यंत महत्वाचा घटक असून  कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाने कमी पाण्यात शेतक-यांना दुप्पट उत्पादन मिळेल अशा पिकांचे बियाणे नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकसित करुन शेतक-यांना शाश्वत शेतीसाठी प्रवृत्त करावे अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज केल्या .
जिल्हाधिकारी कार्याल्याच्या नियोजन सभागृहात आज  खरीप हंगाम 2018 - 2019 चा आढावा व खरीप हंगाम 2019- 2020 नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर , उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा अग्रणी बॅकेचे अधिकारी  अरुण  प्रकाश , नाबार्डचे श्रीकांत जांभरे जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी, तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस.आर. बेडिस, पस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले , कृषी विज्ञान केंद्र , कृषी विभागाने आराखडा तयार करतांना बाजार पेठेचे विश्लेषण करुन कोणत्या काळात कोणते पीक घेतल्यास  शेतक-यांना चांगला लाभ होईल याचा विचार करावा, यामुळे जिल्हयातील पीक पध्दती बदलण्यास मदत होवून शेतक-यांना  चांगला मोबदला मिळेल. शेतक-याने शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून पशुधनाचा  वापर करुन दुग्धव्यवसायाच्या  माध्यमातून आपला विकास साधावा असेही डॉ. ढाकणे यांनी सांगितले.
डॉ. ढाकणे म्हणाले की, गेल्या दोन तीन वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे तसेच कपाशी सारख्या  पिकावर बोंडअळीचा प्रार्दभाव झाल्यामुळे  शेतकरी अडचणीत आला आहे.  अडचणीतून शेतक-यांना बाहेर काढण्यासाठी  नव नवीन संशोधनाचा वापर करुन कमी पावसात चांगले उत्पादन कसे येईल अशा  पिकांचे संशोधन करुन शेतक-यांना कापसाबरोबर मका, ज्वारी, बाजरी,  मुग, उडीद असे कमी पावसात येणारे पिके घेण्यासाठी शेतक-यांना प्रवृत्त करावे लागेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ.ढाकणे म्हणाले की,  काही शेतकरी शेतमजूर मिळत नसल्यामुळे  शेती करत नाहीत, यासाठी कृषी विभागाने तालुका पातळीवर  वेगवेगळे कृषी अवजारे बनविणा-या  नामांकित कंपन्यांना आमंत्रित करुन कृषी प्रदर्शनाचे आयोजन करुन अशा प्रदर्शनात शेतक-यांना कृषी अवजारांचा वापर कसा करावा याबाबत  आधुनिक प्रशिक्षण मिळेल  असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, विद्युत विभागाबाबत शेतकरी वारंवार माझ्याकडे तक्रारी घेवून येतात. विज येते जाते यामुळे अनेक शेतक-यांची विहिरीवरील मोटरी जळाल्या आहेत. यासाठी विद्युत विभागातर्फे शेतक-यांच्या विद्युतपंपाचे इंन्शुरंश करुन घेता येईल का याबाबतही चर्चा केली. तसेच विद्युत विभागाने   शेतक-यांना  सिंचनासाठी लागणारी विज वेळेवर उपलब्ध करुन दयावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, जिल्हयातील 15 तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे अशा प्रत्येक तालुक्यातूल एक  सामुहिक गट निवडून त्यांना राज्य व केंद्र शासनाच्या वेगवेगळया स्किममधून निधी उपलब्ध  करुन जिल्हयात 1 हजार 500 हेक्टर सामुहिक गटशेती विकसित झाली पाहिजे  त्याच प्रमाणे जिल्हयात शेडनेट शेतीस चालणा देण्यासाठी कृषी विभागाने योग्य नियोजन करावे अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हयात गेल्या वर्षी पावसाचे प्रमाणे कमी राहिले आहे. पाण्याची कमरता पाहता नागरिकांनी पाण्याचा अतिशय काटकसरीने  आणि जपून वापर करावा .  शेतक-यांनी आगामी काळात कमी पाण्यात येणा-या पिके घ्यावीत . आगामी खरीप हंगामासाठी शेतक-यांना  बँकांनी  तत्काळ पतपुरवठा करावा. कपाशीवरील बोंड अळी, मकावरील  अमेरिकन लष्कर अळी निर्मुलनासाठी  शेतक-यांमध्ये जनजागृती करावी. अशा सुचनाही  डॉ. ढाकणे  यांनी दिल्या.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. ठाकूर यांनी सांगितले  सन 2019- 20 साठी जळगाव जिल्हयात  8 लाख 96 हजार हेक्टर क्षेत्र लागवडीयुक्त असून 8 लाख 10 हजार 209 हेक्टर क्षेत्रावर पेरा करण्यात येणार आहे.  खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, मका, कापूस , तूर, मुग, उडीद,भूईमुग , सोयाबीन, सुर्यफुल ,ऊस केळी आदी पिके घेतली जातात. खरीप हंगामासाठी विविध प्रकारच्या 42  हजार 675 क्विंटल बियाणंचे नियोजन करण्यात आले असून  कापसाच्या बियाण्याच्या 25 लाख पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. तसेच खरीप हंगाम 2019 -20  करीता 340090 टन खतांचे आवंटन मंजूर केला असून मार्च 2019 अखेर 332000 मे.टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध करुन देण्यात येणार  असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.            
 कार्यक्रमाचे सूत्र संचलन  श्रीमती काविरी राजपूत यांनी केले तर आभार  कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी मानले. या बैठकीस  जिल्हयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
                                                     00000     

Thursday, 25 April 2019

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत शेतकऱ्यांना भूसंपादनाची 38.22 कोटी रुपयांची भरपाई





            जळगाव, दि. 25 :- चाळीसगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदला म्हणून मुंदखेडा व पातोंडा येथील संबंधित शेतकऱ्यांना तीन टप्प्यात 38.22 कोटी रुपयांचा मोबादला अदा करण्यात येणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत तापी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाने ही तडजोड केली. याशिवाय तापी खोरे विकास महामंडळाने 205 प्रकरणांध्ये सुमारे 160 कोटी रुपयांची तडजोड केली आहे.
        भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांनी दाखविलेल्या संयम, समजदारी आणि भूसंपादन करणाऱ्या यंत्रणांनी दाखविलेल्या सहकार्यामुळे लाभ देणे शक्य झाले, असे जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. सानप यांनी सांगितले. शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला मिळविताना संयम व प्रशासनावर विश्वास दाखवावा, असेही त्यांनी सांगितले. शेतकरी व भूसंपादन अधिकारी यांच्यात मध्यस्थीमुळे तसेच अटी व शर्तीच्या पूर्ततेमुळे   भूसंपादितांना लाभ मिळालेला आहे, अशा भावना भूसंपादित शेतकऱ्यांच्या वकिलांनी व्यक्त केल्या.
      यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲङ पी.बी.चौधरी, ॲङ एन.आर.लाठी,तापी महामंडाळाचे  कार्यकारी संचालक श्री.कुलकर्णी, ॲङ के.एच.ठोंबरे, जिल्हा सरकारी वकील ॲङ केतन ढाके आदींनी मार्गदर्शन केले. ॲङ देवप्रसाद पाटील, ॲङ केतन ढाके, शेतकरी मोठया संखेने उपस्थित होते.
000000

महाराष्ट्र दिनाच्या पुर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा - जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे



  सोपविलेली कामे जबाबदारीने पार पाडण्याचे दिले निर्देश
        जळगाव, दि. 25:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापनदिन समारंभानिमित्त सर्व संबधित विभागांवर सोपविण्यात आलेली कामे जबाबदारीने पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज दिले.
            महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 59 वा वर्धापनदिन समारंभ पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी वामन कदम, उप जिल्हाधिकारी दिपमाला चौरे, तहसिलदार वैशाली हिंगे, जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, पोलिस अधिकरी श्री.चंदेल कावरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता जि.आर.सुर्यवंशी, आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
            महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनाचे समारंभानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ 1 मे, 2019 रोजी  सकाळी 8.00 वाजता पोलीस कवायत मैदानावर आयोजीत करण्यात आला आहे.  समारंभासाठी लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, लेखक, साहित्यीक, कवी, विशेष पुरस्कार प्राप्त मान्यवर तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना निमंत्रणे देण्यात आली असून त्यांची बैठक व्यवस्था करण्याची व्यवस्था करण्यात यावी, प्रमूख पाहुण्यांना मानवंदना देणे, परिसराची स्वच्छता आदि कामांचा आढावा घेऊन सोपविलेली कामे जबाबदारीने पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे  यांनी यावेळी दिले.
०००

Wednesday, 24 April 2019

जळगाव लोकसभा मतदार संघात 56.11 टक्के रावेर लोकसभा मतदार संघात 61.40 टक्के मतदान



जळगाव दि. 24 :- लोकसभा निवडणूकीसाठी 03 जळगाव लोकसभा व 04 रावेर लोकसभा या मतदार संघासाठी दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी मतदान पार पडले. 03 जळगाव लोकसभा मतदार संघात 56.11  तर 04 रावेर लोकसभा मतदार संघात 61.40 टक्के मतदान झाले.
03 लोकसभा मतदार संघात पुरुष मतदार 10,08,818, स्त्री मतदार 9,16,470, इतर मतदार 64, एकूण मतदार 19,25,352, मतदान केलेले मतदार पुरुष 5,84,465, स्त्री  4,95,815, इतर 13 असे एकूण मतदान केलेले मतदार 10,80,293, मतदानाची टक्केवारी पुरुष 57.94 टक्के, स्त्री 54.10 टक्के, इतर 20.31 टक्के अशी एकूण 56.11 टक्के मतदान झाले.  
तर 04 रावेर लोकसभा मतदार संघात मतदार पुरुष 9,23,627, स्त्री 8,49,451, इतर 29, एकूण 17,73,107, मतदान केलेले  मतदार पुरुष  5,83,427, स्त्री  5,05,262, इतर  1 असे एकूण मतदान केलेले मतदार 10,88,690, मतदानाची टक्केवारी पुरुष 63.17 टक्के, स्त्री 59.48 टक्के, इतर 3.45 टक्के अशी एकूण 61.40 टक्के मतदान झाले.

03 जळगाव लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघनिहाय मतदान पुढीलप्रमाणे.
13 जळगाव शहर विधानसभा मतदार संघ - पुरुष मतदार 2,06,968, स्त्री मतदार 1,84,353, इतर मतदार 32, असे एकूण मतदार 3,91,353,  मतदान केलेले मतदार पुरुष 1,06,703, स्त्री 85,595, इतर 4, एकूण मतदार- 1,92,302, मतदानाची टक्केवारी  पुरुष 51.56, स्त्री 46.43 आणि इतर 12.50 अशी एकूण 49.14 टक्के मतदान.
14 जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघ -  पुरुष मतदार 1,64,045, स्त्री मतदार 1,50,411, इतर मतदार 2, असे एकूण मतदार 3,14,458,  मतदान केलेले मतदार पुरुष 1,02,297, स्त्री 87,778, इतर निरंक, एकूण मतदार- 1,90,075, मतदानाची टक्केवारी  पुरुष 62.36, स्त्री 58.36, इतर निरंक अशी एकूण 60.45 टक्के मतदान.
15 अमळनेर विधानसभा मतदार संघ - पुरुष मतदार 1,51,772, स्त्री मतदार 1,40,258, इतर मतदार 7, असे एकूण मतदार 2,92,037,  मतदान केलेले मतदार पुरुष 83,471, स्त्री 72,772, इतर निरंक, एकूण मतदार- 1,56,243, मतदानाची टक्केवारी  पुरुष 55.00, स्त्री 51.88, इतर निरंक अशी एकूण 53.50 टक्के मतदान.
16 एरंडोल विधानसभा मतदार संघ - पुरुष मतदार 1,44,587, स्त्री मतदार 1,34,420, इतर मतदार 3, असे एकूण मतदार 2,79,010,  मतदान केलेले मतदार पुरुष 88,571, स्त्री 76,905, इतर 1, एकूण मतदार- 1,65,477, मतदानाची टक्केवारी  पुरुष 61.26, स्त्री 57.21, इतर 33.33 अशी एकूण 59.31 टक्के मतदान.
17 चाळीसगाव विधानसभा मतदार संघ - पुरुष मतदार 1,79,981, स्त्री मतदार 1,59,422, इतर मतदार 18, असे एकूण मतदार 3,39,421, मतदान केलेले मतदार पुरुष 1,07,623, स्त्री 89,925, इतर 8, एकूण मतदार- 197556, मतदानाची टक्केवारी  पुरुष 59.80, स्त्री 56.41, इतर 44.44 अशी एकूण 58.20 टक्के मतदान.
18 पाचोरा विधानसभा मतदार संघ- पुरुष मतदार 1,61,465, स्त्री मतदार 1,47,606, इतर मतदार 2, असे एकूण मतदार 3,09,073,  मतदान केलेले मतदार पुरुष 95,800, स्त्री 82,840, इतर निरंक, एकूण मतदार- 1,78,640, मतदानाची टक्केवारी  पुरुष 59.33, स्त्री 56.12, इतर निरंक अशी एकूण 57.80 टक्के मतदान.

04 रावेर लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघनिहाय मतदान पुढीलप्रमाणे.
10 चोपडा विधानसभा मतदार संघ- पुरुष मतदार 1,58,146, स्त्री मतदार 1,49,128, इतर मतदार 1, असे एकूण मतदार 3,07,275,  मतदान केलेले मतदार पुरुष 99,646, स्त्री 88,694, इतर निरंक, एकूण मतदार- 1,88,340, मतदानाची टक्केवारी  पुरुष 63.01, स्त्री 59.48, इतर निरंक अशी एकूण 61.29 टक्के मतदान.
11 रावेर विधानसभा मतदार संघ- पुरुष मतदार 1,54,537, स्त्री मतदार 1,42,614, इतर मतदार 1, असे एकूण मतदार 2,97,152,  मतदान केलेले मतदार पुरुष 1,04,049, स्त्री 91,523, इतर निरंक, एकूण मतदार- 1,95,572, मतदानाची टक्केवारी  पुरुष 67.33, स्त्री 64.18, इतर निरंक अशी एकूण 65.82 टक्के मतदान.
12 भुसावळ विधानसभा मतदार संघ- पुरुष मतदार 1,59,449, स्त्री मतदार 1,43,802, इतर मतदार 22, असे एकूण मतदार 3,03,273,  मतदान केलेले मतदार पुरुष 86,626, स्त्री 72,257, इतर 1, एकूण मतदार- 1,58,884, मतदानाची टक्केवारी  पुरुष 54.33, स्त्री 50.25, इतर 4.55 अशी एकूण 52.39 टक्के मतदान.
19 जामनेर विधानसभा मतदार संघ- पुरुष मतदार 1,60,195, स्त्री मतदार 1,47,102, इतर मतदार 4, असे एकूण मतदार 3,07,301,  मतदान केलेले मतदार पुरुष 98,945, स्त्री 85,569, इतर निरंक, एकूण मतदार- 1,84,514, मतदानाची टक्केवारी पुरुष 61.77, स्त्री 58.17, इतर निरंक अशी एकूण 60.04 टक्के मतदान.
20 मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघ- पुरुष मतदार 1,50,515, स्त्री मतदार 1,40,616, इतर मतदार 1, असे एकूण मतदार 2,91,132, मतदान केलेले मतदार पुरुष 96,983, स्त्री 85,503, इतर निरंक, एकूण मतदार- 1,82,486, मतदानाची टक्केवारी पुरुष 64.43, स्त्री 60.81, इतर निरंक अशी एकूण 62.68 टक्के मतदान.
21 मलकापूर विधानसभा मतदार संघ- पुरुष मतदार 1,40,785, स्त्री मतदार 1,26,189, इतर मतदार निरंक, असे एकूण मतदार 2,66,974,  मतदान केलेले मतदार पुरुष 97,178, स्त्री 81,716, इतर निरंक, एकूण मतदार- 1,78,894, मतदानाची टक्केवारी पुरुष 69.03, स्त्री 64.76, इतर निरंक अशी एकूण 61.40 टक्के मतदान.
000