Monday, 15 April 2019

वंचित न राहो कोणी मतदार ! चित्ररथ व पथनाट्याद्वारे जिल्हाभरात होणार मतदान जनजागृती

जळगाव, दि. 15 - लोकसभा निवडणूकीत मतदानाचे प्रमाण वाढावे, या मतदानापासून कोणीही वंचित राहू नये. यासाठी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयातंर्गत क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्यावतीने मतदान जनजागृती चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
     यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, तहसीलदार (महसूल) मंदार कुलकर्णी, निवडणूक नायब तहसिलदार अनंत कळस्कर, स्वीप सहाय्यक डॉ. मिलिंद बागुल, क्षेत्रिय प्रचारक उल्हास कोल्हे, योगेश पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     याप्रसंगी दिशा बहुद्देशिय संस्थेचे विनोद ढगे, सचिन महाजन, रोशन गांधी, दुर्गेश आंबेकर, देवराज बोरसे, अरविंद पाटील, अवधूत दलाल, बापूराव पाटील यांनी पथनाट्य सादर केले. हा चित्ररथ 15 ते 21 एप्रिल, 2019 या कालावधीत जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये दररोज पंधरा मतदान केंद्रावर पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती करणार आहे. हा चित्ररथ 15 एप्रिल रोजी जळगांव शहर, 16 एप्रिल रोजी जळगांव ग्रामीण, 17 एप्रिल रोजी अमळनेर, 18 एप्रिल रोजी एरंडोल व पारोळा, 19 एप्रिल रोजी धरणगांव, 20 एप्रिल रोजी पाचोरा व भडगांव आणि  21 एप्रिल, 2019 रोजी चाळीसगांव तालुक्यातील मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदारामध्ये जनजागृती होण्यासाठी पथनाट्य सादर करणार आहे.
                                                                   000

No comments:

Post a Comment