Saturday, 20 April 2019

जिल्ह्यात मतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप अंतिम टप्प्यात - जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. ढाकणे



            जळगाव, दि. 20- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता 03- जळगाव व 04- रावेर लोकसभा मतदार संघासाठी जिल्ह्यात 23 एप्रिल, 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरू करण्यात आले असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, मतदानासाठी केवळ छायाचित्रासह मतदार चिठ्ठी ही मतदाराला ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्रावर स्वीकारण्यात येणार नाही. यासोबत ओळख पटविण्यासाठी मतदारांनी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आणावे किंवा भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 11 अतिरिक्त ओळखपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सोबत आणावे, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी कळविले आहे.
            जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी कळविले आहे, छायाचित्र मतदार चिठ्ठींचे वाटप मतदारांना करुन त्याचा दैनंदिन अहवाल बीएलओंनी सादर करावयाचा आहे. छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप करतानाच मतदार चिठ्ठी हा मतदानासाठीचा पुरावा नसून मतदानासाठी येताना भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 11 पुराव्यांपैकी एक पुरावा आणणे बंधनकारक असल्याचे मतदारांना बीएलओ सांगत आहेत.
            सद्य:स्थितीत मतदारांना मोठ्या प्रमाणात छायाचित्रासह मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आलेले आहे. तसेच आधार कार्ड देखील आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने आता केवळ छायाचित्रासह मतदार चिठ्ठी मतदाराचे ओळखपत्र म्हणून धरण्यात येणार नाही, असा निर्णय घेतला आहे. तसेच छायाचित्रासह मतदार चिठ्ठीवर आता, ‘केवळ छायाचित्रासह मतदार चिठ्ठी ही आपली ओळख पटविण्यासाठी मतदार केंद्रावर स्वीकारण्यात येणार नाही, तर त्यासोबत ओळख पटविण्यासाठी आपण आपले छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आणावे किंवा भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 11 अतिरिक्त ओळख कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक राहील.
            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकणार नाहीत, अशा मतदारांना त्यांची स्वतंत्र ओळख पटविण्यासाठी  मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त पुढील नमूद कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत आयोगाने आदेश दिले आहेत.
            या पुराव्यांमध्ये पारपत्र (Passport), वाहन चालक परवाना, केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे स्वत:चे छायाचित्र असलेले नोकरी ओळखपत्र, बँक, टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरीत करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, मनरेगाअंतर्गत निर्गमित जॉब कार्ड, भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, मा. खासदार, मा. आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड यांचा समावेश असेल.
000

No comments:

Post a Comment