जळगाव, दि.20 - जिल्ह्यात मागील आठवडयात ढगांच्या गडगडाटासह, वीज व वादळी वा-यासह झालेल्या अवकाळी पावसाने चोपडा व जामनेर तालुक्यात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच चोपडा तालुक्यात एक व्यक्ती अंगावर वीज पडून जखमी झाल्याची घटना घडलेली आहे. आगामी काळतही अशा अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि वीज या नैसर्गिक आपत्ती मुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी व वीजेपासून सुरक्षिततेच्यादृष्टीने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
आपत्तीच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी काय करावे व काय करु नये, याबबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे खालील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत त्याचे नागरीकांनी पालन करावे. असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
घरात असतांना घ्यावयाची दक्षता
ढगाळ वातावरणातील बदल पाहुन व अति वेगाने वाहणा-या वा-याचा अंदाज असेल तर शक्यतो घराबाहेर जाणे टाळा. घराच्या खिडक्या व दरवाजे बंद ठेवा, घरातील इलेक्ट्रॉनिक व इलेट्रिक्सच्या वस्तू बंद ठेवाव्यात, वीजेवर चालणा-या वस्तु बंद ठेवा, घराचे दरवाजे खिडक्या कुंपण यापासुन दुर रहा.
हे लक्षात ठेवा
मोबाईल वायरव्दारे जोडले गेलेले फोन स्मार्टफोन व इतर इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक्स उपकरणे विद्युत जोडणीस लाऊ नका. वादळ सुरु असतांना व विजा चमकत असतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वार करु नका, धातुचे दारे, लोखंडी खिडक्या, वायरींग लोखंडी नळ यांच्याशी संपर्क टाळा,
घराबाहेर असतांना घ्यावयाची दक्षता
त्वरीत सुरक्षित निवा-याच्या ठिकाणी (मजबुत इमारतीकडे) आश्रय घ्या, ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल, शेतातील मोटर पंप यापासुन दुर रहा, मोठया झाडांपासून वाहने लांब पार्क करा, मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारांपासुन लांब रहा, जंगलात असल्यास कमी उंचीच्या झाडाखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्या,
विज पडल्यास हे करा
त्वरीत रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत बोलवा, वज्रघाताने जखमी झालेल्या व्यक्तीस धीर देऊन त्वरीत वैद्यकीय सेवा मिळवुन द्या, पाण्यामुळे ओल्या व थंड जागी बाधित व्यक्ती व जमीन यांच्यात संरक्षणात्मक थर ठेवा जेणेकरुन शरीराचे अती कमी तापमान (हायपोथर्मीया) या धोका कमी होईल.
यांना संपर्क करा
आपात्कालीन परिस्थीतील जवळचे तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन, आरोग्य केंद्र यांच्याशी संपर्क साधावा. रुग्णवाहिकेच्या टोल फ्री क्रमांक 108 यावर त्वरीत संपर्क करावा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांचे टोल फ्री 1077 तसेच 0257-2217193/2223180 या आपात्कालीन दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असेही डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment