Saturday, 31 August 2019

इलेक्टॉनिक मतदान यंत्रावर 1 सप्टेंबर रोजी अभिरूप मतदान राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीनी उपस्थित रहावे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे


            जळगाव.दि.31- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी जळगाव जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या तसेच प्राप्त  झालेल्या  इलेक्टॉनिक मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी  अंतिम टप्यात असून  या अंतर्गत 1 सप्टेंबर 2019 रोजी  सकाळी 10 ते 5 वाजेदरम्यान अभिरूप मतदान घेण्यात येणार आहे.
             भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर अभिरूप मतदान करतेवेळी  मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थित ठेवण्याबाबत सुचित केल्यानुसार जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक 2019 चे उपलब्ध तसेच प्राप्त झालेल्या ईव्हीएम मशीनपैकी 5 टक्के मशीनवर पाचशे, एक हजार आणि 1200 याप्रमाणे  मतदान करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रीय स्तरावरील व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर अभिरुप मतदान (Mock Poll ) करतेवेळी दिनांक 1 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10 .00 वाजता तहसिल कार्यालय, भुसावळ येथील आवारातील शासकीय धान्य गोदाम येथे पाहणी करणेकामी ओळखपत्रासह उपस्थित राहता येईल. असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

Friday, 30 August 2019

ना. मदन येरावर यांचा जळगाव जिल्हा दौऱ्यावर


            जळगाव, दिनांक 30 :-  राज्याचे राज्यमंत्री ना. मदन येरावर (उर्जा, पर्यटन, अन्न व औषध प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम, सामान्य प्रशासन) यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
            शनिवार, दिनांक 31 ऑगस्ट, 2019 रोजी यवतमाळ येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता यवतमाळ, नेर, शिंगणापूर, कारंजा, मुर्तीजापूर, अकोला, बाळापूर, खामगांव, मलकापूर, भुसावळ आणि जळगाव येथे रात्री 10.30 वाजता जळगाव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
            रविवार, दिनांक 1 सप्टेंबर, 2019 रोजी सकाळी 9.45 वाजता जळगाव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृह येथून बालाणी रिमोट, एमआयडीसी परिसर जळगावकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता भारतीय जनता पार्टी बैठकीस उपस्थिती. (स्थळ : बालाणी रिसोट, एमआयडीसी, जळगाव) दुपारी 4.30 वाजता जळगाव येथून यवतमाळकडे प्रयाण. जळगाव, भुसावळ, मलकापूर, खामगांव, बाळापूर, अकोला, मुर्तीजापूर, कारंजा, शिंगणापूर, नेर, यवतमाळ.
0 0 0 0

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 सप्टेंबर रोजी आयोजन


        जळगाव, दिनांक 30 - प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. तथापि, माहे सप्टेंबर-2019 महिन्याच्या पहिला सोमवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस म्हणजेच मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर, 2019 रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
            माहे सप्टेंबर-2019 या महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ज्या नागरिकांना लोकशाही दिनात आपले तक्रारी अर्ज सादर करावयाचे असतील त्यांनी मंगळवार, दिनांक 3 सप्टेंबर,2019 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दुपारी 3 वाजेपर्यंत आपले तक्रारी अर्ज (न्याय प्रविष्ठ प्रकरणे वगळून) सादर करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
0 0 0 0

Tuesday, 27 August 2019

स्वयंसहायता बचतगटांना ट्रॅक्टर व उपसाधने मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, दि. 27 - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसचित जातीच्या स्वयंसहायता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविण्यात येणार आहे. याकीरता अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            याकरीता अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. मिनि ट्रॅक्ट्रर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रुपये 3.50 लाख इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल रुपये 3.15 लाख) शासकीय अनुदान अनज्ञेय राहील. लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटांनी या योजनेतंर्गत  अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा टॅक्ट्रर  व त्याची उपसाधने खरेदी  करता येईल मात्र त्याची या योजनेअंतर्गत अनुज्ञेय असेलेल्या अनुदाना ( रुपये 3.15 लाख ) पेक्षा जास्तची रक्कम संबंधित बचत गटाने  स्वत: खर्च करावी. स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न करावे. निवड झालेल्या बचत गटाला निवड झाल्याचे लेखी कळविण्यात येईल. ज्या स्वयंसहाय्यतांना बचत गटांची निवड करण्यात आलेली आहे त्यांनी सदरहू यंत्र चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे (परिवहन अधिकारी) व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. निवड झालेल्या  स्वयंसहाय्यता  बचत गटाने  मिनि ट्रॅक्ट्रर व त्याची उपसाधने खरेदी केल्याची पावती सादर केल्या नंतर व खातर जमा करुन लाभार्थी बचत गटाला शासकिय अनुदानाचा 50 टक्के हप्ता त्यांच्या बचत गटाच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येईल. उर्वरित 50 टक्के अनुदान  मिनि ट्रॅक्ट्रर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद  झाल्यानंतर  बचत गटाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल किंवा स्वयंसहाय्यता बचत  गटाने  मिनि ट्रॅक्ट्रर व त्याची उपसाधने यांची  आरटीओ कार्यालयाकडे नोंद  केल्याचे पुरावे सादर केल्यावर 100 टक्के  अनुदान स्वयंसहाय्यता बचतगटाचे  बँक खात्यात जमा करण्यात  येईल. बचतगटाने खरेदी केलेल्या  मिनी टॅक्ट्ररच्या दर्शनी भागावर महाराष्ट्र शासन, सामाजिक  न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत  अर्थसहाय्य असे ठळकपणे लिहिण्यात यावे. या योजनेअंतर्गत  बचतगटांचे आर्थिक उत्पन्न वाढावे  या हेतूने  देण्यात आलेला मिनि ट्रॅक्ट्रर व त्याची उपसाधने इतर शेतक-यांना भाडेतत्वावर देऊ शकेल मात्र कोणत्याही परिस्थितीत त्या मिनि ट्रॅक्ट्रर व त्याची उपसाधने विकता येणार नाही. अथवा सावकार किंवा अन्य व्यक्तीकडे गहाण ठेवता येणार नाही. लाभार्थ्यांने मिनी टॅक्ट्रर विकल्यास किंवा गहाण ठेवल्यास सदर व्यवहार बेकायदेशीर ठरवून स्वयंसहाय्यता बचत गटांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच संबंधित  स्वयंसहाय्यता बचत गटांकडून शासनाने मिनी टॅक्ट्रर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीसाठी खर्च केलेली संपूर्ण रक्कम वसूल करण्यात येईल आणि संबंधित बचतगटाला शासनाच्या अन्य योजनांचे लाभ घेण्यास किमान 5 वर्षे अपात्र ठरविले जाईल. अशा आशयाचे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर  नोंदणीकृत  हमीपत्र स्वयंसहाय्यता बचत गटांना करुन द्यावे लागेल. 
वरील अटी व शर्तीमध्ये जे बचत गट पात्र असतील अशा बचत गटांनी बचत गट नोंदणी प्रमाणपत्र, नियोजन विभागाच्या दिनांक 5 डिसेंबर, 2016 च्या शासन निर्णयानुसार वस्तु स्वरुपात मिळणा-या लाभाचे हस्तांतरण रोख स्वरुपात लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्या बाबतचा निर्णय असल्याने बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार क्रमांकाशी संलग्न खाते पासबुकाची प्रथम पानाची झेरॉक्स प्रत, गटातील प्रत्येक सदस्याचे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार क्रमांकाशी संलग्न खाते पासबुकाची प्रथम पानाची झेरॉक्स प्रत, बचत गटाचे घटनापत्र, बचत गट कार्यकारणी सदस्याची मुळ यादी, सदस्याचा स्वत:चा जातीचा दाखला. को-या कागदावर फोटोसह बचत गटाची ओळख. मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने पुरवठा अंतर्गत आरटीओ नोंदणी आणि स्थानिक जकात आणि विमा उतरविणेचा खर्च बचत गटांना करावयाचा आहे. बचत गटाने अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगांव यांच्या कार्यालयातून प्राप्त करुन 31 ऑगस्ट, 2019  पर्यत  परिपूर्ण अर्ज सादर करावे. अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येतील यांची नोंद घ्यावी. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविलेले आहे.
000

मेंढी व शेळी पालन प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

        जळगाव, दि. २७ - महाराष्ट्र मेंढी शेळी विकास महामंडळ, पुणे अंतर्गत राज्यात मेंढी शेळी पालनास प्रेात्साहन देण्यासाठी राजे यंशवतराव होळकर महामेष योजनेंतर्गत राज्यातील भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील १८ ते ६० वयोगटातील अर्जदारांकडून ४ सप्टेंबर, २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
         या योजनेची संपुर्ण माहिती अर्ज करण्याची कार्यपद्धती याबाबतचा संपुर्ण तपशील www.mahamesh.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज महामंडळाच्या वरील संकेतस्थळावर तसेच Android Mobile मध्ये Google Play Store वरुन Mahamesh App द्वारे करण्यात यावे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जातील याची नोंद घ्यावी.
            तरी इच्छुक अर्जदारांनी या योजने अंतर्गत विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केलेले आहे.
000

Monday, 26 August 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून जिल्हा निरोगी बनवूया - जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे


        


      जळगाव, दि. 26- इलाज करुन आजार बरा करण्यापेक्षा आजार होवू नये याकरीता प्रतिबंधात्मक उपाय योजल्यास निरोगी समाज निर्माण होण्यास मदत होईल. यासाठी शासनाचे राष्ट्रीय आरोग्य अभियान महत्वपूर्ण ठरेल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले. 
            येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा रुग्णालय, जळगाव, राज्य आरोग्य सोसायटी, महाराष्ट्र शासनमार्फत आयोजित आदिवासी व ग्रामीण भागातील जनतेसाठी मोफत सर्व रोग निदान, दंत व शस्त्रक्रिया शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी केले. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त  डॉ. उदय टेकाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. पाटोडे, डॉ. चांडक, महाजन, चिरमाडे, गाजरे आदि चिकित्सक, आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, विविध आजारांचे निदान व इलाजासाठी ग्रामीण भागातून आलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या संखेने उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे पुढे म्हणाले की, शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नागरीकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. बेटी बचाव, बेटी पढाव या अभियांनातंर्गत जिल्ह्याने चांगले काम केल्याने मुलींच्या जन्मदरात लक्षणीय वाढ होवून मुलींचा जन्मदर 1 हजाराच्या तुलनेत 825 वरून 925 असा झाला आहे. या कामात सातत्य ठेवल्यास लवकरच मुलगा-मुलगी असा भेदा-भेद संपण्यास मदत होईल. आरोग्य विभाग, आरोग्य विभागात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी आप-आपसात समन्वय ठेवून आरोग्याविषयक सुविधांबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहनही डॉ. ढाकणे यांनी केले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी बेटी बचाव, बेटी पढाव  या अभियानास जिल्हा आरोग्य विभाग, सामान्य रुग्णालय, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांच्या आवाहनाला साथ देत जिल्ह्यातील नागरिकांना चांगला प्रतिसाद दिल्याने मुलींच्या दरात लक्षणीय वाढ होवून जळगाव जिल्हा देशातील पहिल्या 10 जिल्ह्यांमध्ये अव्वल स्थानावर आला आहे. जिल्ह्यात 26 ते 29  ऑगस्ट चार दिवसीय राष्टीय आरोग्य शिबीरात तपासणीस आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी होवून सर्व तज्ञ डॉक्टरकडून  तपासणी, इलाज व आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया सुध्दा केल्या जाणार असल्याचे सांगितले.                
            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी ग्रामीण  भागातील जनतेकडून होत असलेल्या तंबाखूजन्य मिशिरीचा दात घासण्यसाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. याबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नागरिकांना प्रधानमंत्री आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना अशा लोकोपायोगी योजनांचा माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
            याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, डॉ. चांडक यांचीही समयोचित भाषणे झालीत.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश यावलकर यांनी तर आभार जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डी. एस. पाटोडे यांनी मानले.
000