जळगाव, दि. 3 (जिमाका
वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापन दिन
15 ऑगस्ट, 2019 रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त 15 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 9.05 वाजता
मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या प्रांगणात राज्याचे वैद्यकीय शिक्षण,जलसंपदामंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या शासकीय ध्वजारोहण समारंभासाठी प्रत्येक विभागावर सोपविण्यात आलेली
जबाबदारी सर्व विभागांनी बिनचुकपणे पार पाडावी,
असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज दिनांक 03 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापन दिन साजरा करावयाच्या
दृष्टीने विविध शासकीय विभागांनी पार पाडावयाच्या जबाबदारीसाठीच्या आयोजित
पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे बोलत होते.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी
वामन कदम, उपजिल्हाधिकारी (महसूल)रविंद्र भारदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी
अभियंता विलास पाटील,महानगरपालिकेचे उपायुक्त मिनिनाथ दंडवते, माध्यमिक शिक्षणाधिकारी
बी.जी.पाटील, मनपाचे आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम (विद्यूत) विभागाचे अभियंते आर.आर.पाटील,
पोलीस निरीक्षक शशीकांत जोशी, गोरख शिरसाठ, समाजकल्याण विभाग, शिक्षण विभागांसह विविध विभागांचे प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी पुढे सांगितले की, महानगरपालिकेने
शहरातील सर्व भागांबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता ठेवावी. रस्त्यावर
किंवा कुठेही कचरा दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. पोलीस विभागाने रहदारी कोंडी होणार नाही याची खबरदारी
घ्यावी ,शासकीय कार्यालयांनीही आपापले कार्यालय व परिसरात स्वच्छता ठेवावी. महसुल विभागाने
जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, स्वातंत्रसैनिक, मान्यवर यांना समारंभाचे निमंत्रण
देणे, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ज्या शासकीय विभागांकडून जिल्हास्तरावर पुरस्कार
वितरण होणार असेल, अशा विभागांनी पुरस्कारार्थींच्या नावांची यादी तत्काळ जिल्हाधिकारी
कार्यालयाकडे सोपवावी, जेणेकरुन पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन करणे सुलभ होईल. तसेच
शिक्षणाधिकारी कार्यालय, महानगरपालिकेचे शिक्षण मंडळ यांनी विद्यार्थ्यांच्या प्रभात
फेरीचे नियोजन करावे. जिल्हा पोलिस विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पुरेशी
सुरक्षा व्यवस्था, राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यासाठी बॅन्डपथक तयार ठेवणे व शहरात
सुरक्षा व्यवस्था ठेवावी. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या आवारातील बगीचाचे सुशोभिकरण करुन परिसर सुस्थितीत ठेवावा. तसेच आवश्यक
तेथे रंगरंगोटी करावी. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या विद्युत विभागाने विद्युत
पुरवठ्यासोबतच रोषनाईचे काम चोखपणे बजावावे, त्याचबरोबर मुख्य शासकीय समारंभाच्या कालावधीत
म्हणजेच सकाळी 8.35 ते 9.35 या वेळेदरम्यान कुठेही शासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. असेही
निर्देश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी
बैठकीत दिले.
*****
No comments:
Post a Comment