Tuesday, 6 August 2019

जिल्ह्यात 8 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविण्यात येणार - जिल्हा आरोग्य अधिकारी


       जळगाव, दि.6 - जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 14 वर्ष वयोगटातील किमान 241 दशलक्ष (68 टक्के) मुले त्यातील 28 टक्के बालकांना कृमीदोष होण्याची शक्यता असते. बालकांमध्ये होणारा दिर्घकालीन कृमीदोष हा व्यापक व मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोष हे रक्तक्षय व कुपोषणाचे  कारण तर आहेच तसेच बालकांची बौध्दीक व शारिरीक वाढ खुंटण्याचे कारण ठरते.
           जिल्ह्यात 8 ऑगस्ट, 2019 रोजी राट्रीय जंतनाशक दिन तर 16 ऑगस्ट हा मॉप-अप दिन साजरा करावयाचा आहे. यासंबंधी जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर, प्राथमिक आरोग्य केंद्रांवर नोडल शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
            राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा 1 ते 19 वर्षे  वयोगटातील सर्व पुर्वशालेय वयोगटातील व शालेय वयोगटातील विद्यार्थी यांना  शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा असून हा कार्यक्रम 8 व 16 ऑगस्ट, 2019 रोजेी संपूर्ण जिल्ह्यात शाळा व अंगणवाडीत राबविला जाणार आहे.
        कृमी दोषामुळे होणारे दुष्परीणाम :- बालकांमध्ये कायम अशक्तपणा येतो, बालके नेहमी थकलेली दिसतात, या बालकांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. ही मोहिम ग्रामीण भागातील 2538 शाळा व 3594 अंगणवाड्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत  ग्रामीण भागातील 8 लाख 60 हजार 148 लाभार्थी असून 1 ते 19 वर्षातील लाभार्थ्यांनी मोहिमेचा लाभ घ्यावा. शाळाबाह्य 9507 बालकांना देखील लाभ देण्यात येणार आहे. गोळी दिल्यानंतर मळमळ, पोटदुखी, अतिसार झाल्यास त्वरीत 108 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. पाटोडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                               *****                   

No comments:

Post a Comment