Saturday, 30 November 2019

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत


·         360 रुपयात मिळणार 24 हजार रुपयांचे पीक विमा संरक्षण
·         जोखीम टाळण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
        जळगाव, दि. 30 - रब्बी हंगाम 2019-20 मध्ये अधिसुचित पीकासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबर, 2019 पर्यंत अंतिम मुदत आहे. रब्बी हंगाम घेणाऱ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे आणि पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. हा  शेतकरी हिताचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रब्बी हंगाम 2019-2020 मध्ये जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून (Area Approach) राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वैशिष्ट्ये- ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एैच्छिक आहे. नुकसान भरपाई कृषि आयुक्तालयामार्फत पिक उत्पादनाच्या अंदाजासाठी घेतलेल्या पिक कापणी प्रयोगाच्या उत्पादकतेच्या सरासरी आकडेवारीवर आधारित असेल. जोखीमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
जोखमीच्या बाबी-अपूरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसुचित मुख्य पिकांची अधिसुचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी/लावणी होवू न शकलेल्या क्षेत्रासाठी पेरणी/लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय राहिल. दुष्काळ, पावसातील खंड, पुर, क्षेत्र जलमय होणे, कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कासळणे, चक्रीवादळ आणि गारपीट या टाळता न येण्यायोग्य जोखमींमुळे पिके पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण देय राहिल.
पिकनिहाय विमा हप्ता दर व विमा सरक्षित रक्कम- सर्व अन्नधान्य व गळीत धान्य पिकांसाठी संरक्षित रकमेच्या 1.5 टक्के दराने आणि कांदा पिकासाठी संरक्षित रकमेच्या 5 टक्के दराने विमा हप्ता आकारला जाईल. पिके, जोखीमस्तर (टक्केवारीत), विमा संरक्षित रक्कम (रुपयात), शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम अनुक्रमे अशाप्रकारे आहेत. प्रत्येक पिकाचा जोखीमस्तर 70 टक्के इतका राहिल. गहू, बाजरी- विमा संरक्षित रक्कम रुपये 33 हजार, शेतकऱ्यांने भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये 450/-, ज्वारी,बाजरी- विमा संरक्षित रक्कम 24 हजार रुपये, शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये 360/-, ज्वारी जिरायत- विमा संरक्षित रक्कम रुपये 24 हजार, शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये 360/-, हरभरा- विमा संरक्षित रक्कम रुपये 24 हजार, शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम रक्कम रुपये 360/-, भुईमुग- विमा संरक्षित रक्कम रुपये 35 हजार, शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये 525/-, कांदा- विमा संरक्षित रक्कम रुपये 52 हजार, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम रुपये 2600/- अशाप्रकारे आकारणी करण्यात येईल.
रब्बी हंगाम 2019-2020 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेंमध्ये अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी जवळच्या बँकेत, आपले सरकार सेवा केंद्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संपर्क साधून सहभाग नोदवावा. अथवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर स्वत: सहभाग नोदविण्याची सुविधा आहे. कर्जदार शेतकऱ्यांचा हप्ता संबंधित बँकेद्वारे भरला जाऊन सहभाग नोदविला जातो. विमा हप्ता भरण्यापूर्वी आपले शिवार ज्या महसूल मंडळात आहे, त्या महसूल मंडळाचा योजनेंतर्गत समावेश असल्याबाबतची खात्री केल्यावरच विमा हप्ता भरावा. अधिक माहितीसाठी नजिकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, राष्ट्रीयकृत बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्र, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
000

वाघुर धरण कार्यक्षेत्रातील लाभार्थी शेतकऱ्यांनी 20 डिसेंबरपर्यंत पाणी मागणी अर्ज सादर करावेत


            जळगाव, दि. 30 - वाघुर धरण विभाग, जळगावच्या कार्यक्षेत्रातील वाघुर डावा कालवा व उजवा कालवा तसेच कालवा उपसा व जलाशय उपसा यावरील प्रकल्पावर जेथे शक्य असेल तेथे कालव्याद्वारे (प्रवाह) तसेच अधिसुचित/अनाधिसुचित लाभ क्षेत्रातील नदी, नाला व इतर जलाशयातून उपसा सिंचनाने पाण्याचा उपयोग घेणाऱ्या सर्व बागायदारांना सूचित करण्यात येते की, चालू वर्षी प्रकल्पात उपलब्ध झालेल्या पाणी साठ्यानुसार 15 ऑक्टोबर, 2019 ते 28 फेब्रुवारी, 2020 दरम्यानच्या रब्बी हंगामासाठी कपाशी, ज्वारी, गहु, हरभरा, बारमाही भाजीपाला इतर तेलबिया कडधान्य व भुसार पिके इत्यादि पिकांसाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षणा व्यतिरिक्त उपलब्ध साठ्यातून अटी व शर्तींच्या अधिन राहून पाणी पुरवठा करण्याचे नियोजित केले आहे.
                                      सिंचनाच्या पाणीपुरवठ्यासाठी अटी व शर्ती अशा आहेत.
        लाभधारक शेतकरी यांनी 2018-2019 पर्यंतची संपूर्ण पाणीपट्टी थकबाकीसह भरणा केलेली असावी. पाटमोट संबंध नसावा, प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रासच मंजूरी दिली जाईल. शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी तसेच प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजूरी मिळाल्याचे गृहित धरू नये. पाणी अर्जाचा निर्णय संबंधित उपविभाग, पाटशाखेत/गामपंचायत कार्यालयात नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येईल. 20 डिसेंबर, 2019 नंतर आलेले पाणी अर्जांवर नियमानुसार जादा पाणीपट्टी आकारणी केली जाईल. मंजूर क्षेत्रासच व मंजुर पिकांनाच पाणी घ्यावे लागेल. पाणी अर्ज देतांना 7/12 उतारा किंवा खाते पुस्तीका संबंधित उपविभागास दाखवावी लागेल. मंजुरी पाटबंधारे अधिनियम (महाराष्ट्र राज्य) 1976 प्रचलीत शासनाने वेळोवेळी काढलेले आदेश तसेच प्रचलीत नियमानुसार अनुसरून राहील.
            तरी लाभार्थी शेतकऱ्यांना असेही सूचित करण्यात येते की, उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करून अन्नधान्याचे अधिक उत्पादन वाढवावे तसेच महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाकडील 13 सप्टेंबर, 2019 च्या सुधारित दराप्रमाणे केलेली आकारणी भरणे लाभार्थी शेतकऱ्यांना भरणे बंधनकारक राहील. याची नोंद घेवून संबंधित लाभार्थ्यांनी विहित मुदतीत पाणी अर्ज सादर करून उपलब्ध पाण्याचा सिंचनासाठी लाभ घ्यावा. असे आवाहन कार्यकारी अभियंता, वाघुर धरण विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000

चोपडा-धरणगाव-जळगाव वाहतूक मार्गात आजपासून बदल पर्यायी मार्गाने वाहतुक करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन


जळगाव, दि. 30 - मेहेरगाव-धुळे-अमळनेर-चोपडा-खरगोन रस्ता राज्यमार्ग-15 कि.मी 86/500 मधील निमगव्हाण जवळील तापी नदी पुलाचे दुरूस्तीचे काम राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. या कामाचा ठेका मे. सॅनफिल्ड इंडिया लिमीटेड, भोपाळ या कंपनीला देण्यात आलेला आहे. पुलाच्या जुन्या बिअरींग बसविणे, नवीन एक्सापान्शन जॉइंट बसविणे आदि बाबींचा समावेश आहे. या कामाची व्याप्ती पाहता प्रत्यक्षात काम करताना पुलाचे गर्डर उचलून नवीन बिअरिंग बसविणे प्रस्तावित असल्याने पुलावरील वाहतुक कमीत कमी एक महिना बंद करणे आवश्यक आहे. तसेच पुलाच्या शेजारुन पर्यायी मार्ग बनविणे अशक्य आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुक पर्यायी मार्गावरून कळविणे आवश्यक आहे.
वाहनांच्या विनियमनासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोपडा ते जळगाव (धरणगाव मार्गे), चोपडा ते अमळनेर, चोपडा ते धरणगाव या तीन्ही मार्गावरून येणारी व जाणारी सर्व प्रकारच्या वाहतुकीस रविवार, 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर, 2019 पावेतो सर्व प्रकारची वाहतुक बंद करून पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात येत आहे.
चोपडा ते जळगाव (धरणगाव मार्गे) होणाऱ्या वाहतुकीकरीता नागरीकांनी पर्यायी मार्ग चोपड, अडावद, धानोरा मार्ग जळगाव या मार्गाचा येण्यासाठी व जाण्यासाठी वापर करावा. चोपडा ते अमळनेर दरम्यान होणाऱ्या वाहतुकीकरीता नागरीकांनी चोपडा, हातेड बु. मार्गे तसेच अमळगाव, जळोद मार्गे या पर्यायी मार्गाचा येण्यासठी व जाण्यासाठी वापर करावा, चोपडा ते धरणगाव दरम्यानच्या होणाऱ्या वाहतुकीसाठी नागरीकांनी चोपडा, जळोद, अमळगाव, नांद्री, पातोंडा तसेच चोपडा, हातेड, जळोद, नांद्री, पातोंडा मार्गे या पर्यायी मार्गाचा येण्यासाठी व जाण्यासाठी वापर करावा. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000

जागतिक एड्स सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होण्याचे प्रशासनाचे आवाहन


जळगाव, दि. 30 - जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभागामार्फत राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
एड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीची माहिती देण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. बेडसे यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर, कार्यक्रम सहाय्यक गिरीश गडे, माध्यमांचे व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
एड्स नियंत्रण व प्रतिबंधक अभियानाचे कार्य अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचण्यासाठी 1 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 8.30 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयापासून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रभातफेरीचे उद्घाटन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. बेडसे यांच्या होणार असून त्याप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात पोस्टर प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानातंर्गत जिल्हा पोलीस मुख्यालयात 2 डिसेंबर रोजी दुपारी 4.00 वाजता  मार्गदर्शन व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून त्यात एचआयव्हीबाबत मार्गदर्शन व एैच्छिक तपासणी करणे आणि आयईसी साहित्यांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच जळगाव रेल्वे स्थानक व बसस्थानक येथे सकाळी 10 वाजता पोस्टर प्रदर्शन, मार्गदर्शन व आयईसी साहित्य वितरीत करण्यात येणार आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने 5 ते 31 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील 60 महाविद्यालयात स्थापित असलेल्या रेडरिबिन क्लबद्वारे युवकांमध्ये पोस्टर प्रदर्शन, व्याख्यान, चित्रफित दाखवून जिल्ह्यातील 23 आयसीटीसी केंद्राद्वारे युवकांसाठी विविध कार्यक्रम राबविले जाणार आहे. त्याचबरोबर 10 ते 31 डिसेंबर या कालावधीत दिशा समाजप्रबोधन संस्था, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने चित्रकला, रांगोळी, घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
दिनांक 9  डिसेंबर रोजी दुपारी 4.00 वाजता संगीत सभागृह, भास्कर मार्केट जवळ, जळगाव येथे आणि  10 डिसेंबर रोजी  जिल्हा उद्दोग केंद्र, भुसावळ येथे पोस्टर प्रदर्शन, लघुपट आणि व्याखानाचे तर दुपारी 2.00 वाजता गोदावरी संस्था, जळगाव येथेही पोस्टर पदर्शन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आधार संस्था, अमळनेर तर्फे 10 ते 14 डिसेंबर दरम्यान अमळनेर, पाचोरा, चोपडा तालुक्यांतील देह विक्रय करणाऱ्या भगिनीकरिता, भगिनी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
एमएसएम (पुरुष, पुरुषांमध्ये लैंगिक संबध) मेळाव्यांतर्गत गोदावरी फाऊंडेशन, लुंकड मार्केट, जळगाव येथे पोस्टर प्रदर्शन, व्याख्याने, लघुपट इत्यादि कार्यक्रमाचे आयोजन व 13 डिसेंबर रोजी डिआयसी केंद्र, भुसावळ येथे सायंकाळी 4.00 वाजता गोदावरी संस्था, जळगाव यांचेतर्फे आयोजित करण्यात येणार आहेत.
राष्ट्रविकास संस्था, जळगाव यांचेमार्फत 16 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता एमआयडीसी, जळगाव येथे पोस्टर प्रदर्शन, माहिती पत्रिका वाटप, लघुपट, व्याख्याने अश्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ट्रक चालक व वाहक तसेच निगडीत कर्मचारी यांच्या मेळाव्यांतर्गत 5 ते 20 डिसेबर दरम्यान ट्रान्सपोर्ट नगर व शहराच्या आत येणाऱ्या नाक्यावर पोस्टर प्रदर्शन, माहिती पत्रिका वाटप व व्याख्याने देवून उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागांमध्ये 100 गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर, विविध मंडळे यांचे माध्यमांद्वारे ग्रामीण जनतेमध्ये एचआयव्ही एड्स विषयी जनजागृतीपर कार्यक्रम लिंक वर्कर (क्षेत्रीय कार्यकर्ते) आधार संस्था, अमळनेर यांचेमार्फत करण्यात येणार आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी या अभियानात स्वयंस्फुर्तीने आपला सहभाग नोंदवून जिल्हा एड्स, टीबी मुक्त करण्यास सहकार्य करावे. तसेच नागरीकांनीही मनात करसलीही भिती न बाळगता आपली तपासणी करुन घेण्याचे आवाहन डॉ. बेडसे यांनी केले याप्रसंगी केले.
जिल्हा एकात्मिक सल्ला व चाचणी (ICTC) केंद्राद्वारे एप्रिल ते ऑक्टोबर, 2019 दरम्यान 66 हजार 136 सर्वसामान्य नागरीकांची मोफत एचआयव्हीची तपासणी करण्यात आली आहे. या चाचणीत 326  व्यवक्ती एचआयव्ही संसर्गित आढळून आल्या आहेत. तर 32 हजार 225 गरोदर मातांच्या तपासणीत 25 गरोदर माता एचआव्ही संसर्गिंत आढळलया आहेत. याप्रमाणे या कालावधीत जिल्ह्यात 351 व्यक्ती संसर्गित आढळून आल्याचे कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात जळगाव व अमळनेर येथे प्रत्येकी 1 असे दोन आशा केंद्र कार्यान्वीत आहेत. एच.आय.व्ही संसर्गित व्यक्तींना संधीसाधू आजार हाऊ नये व आरोग्य सुदृढ राहण्याच्या उद्देशाने रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी ओैषधी सामान्य रुग्णालय, जळगाव येथे विनामुल्य दिली जातात. एप्रिल 2007 ते ऑक्टोंबर 2019 दरम्यान नोंदणीकृत 8 हजार 665 पुरूष रुग्णांपैकी 7 हजार 264 एवढे प्रत्यक्षात औषधी घेत आहेत. तर नोंदणीकृत महिला रुग्ण 5 हजार 75 एवढे असून प्रत्यक्षात औषध घेणाऱ्या महिला रुग्णांची संख्या 1 हजार 924 इतकी आहेत. तर 748 मुलं-मुली रुग्ण नोंदणीकृत असून त्यापैकी 160 मुलं प्रत्यक्षात औषध घेतात. असे एकूण 14 हजार 507 रुग्णांपैकी प्रत्यक्षात 9 हजार 345 रुग्णच औषधी घेत आहे.
जिल्ह्यात सन 2019-2020 मध्ये 76 हजार 303 गरोदर मातांची चाचणी केली असता त्यातील 24 गरोदर माता संसर्गिक आढळून आल्यात. तर सामान्य जनतेतून 1 लाख 5 हजार 992 नागरीकांची चाचणी केली असता त्यातून 326 रुग्ण संसर्गिक असल्याचे आढळून आले आहे. याप्रमाणे जिल्ह्यात एकूण 1 लाख 82 हजार 295 नागरीकांपैकी 350 रुग्ण संसर्गिक आढळून आले आहेत. जिल्ह्यात सन 2007-08 मध्ये संसर्गित व्यक्ती आढळून येण्याचे प्रमाण हे 5.57 टक्के इतके होते. जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभागामार्फत करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे व औषधोपचारामुळे हे प्रमाण 2019-20 मध्ये 0.19 टक्क्यांवर आले असल्याचेही कार्यक्रम अधिकारी श्री. पहुरकर यांनी यावेळी सांगितले.
000

Friday, 29 November 2019

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील शिक्षाबंदी कै. गोरख काकडे यांच्या मृत्यु प्रकरणी शंका असल्यास 4 डिसेंबरपूर्वी मालेगाव प्रांताधिकाऱ्यांकडे खुलासा करावा


            जळगाव, दि. 29 - नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील शिक्षाबंदी क्रं.बी.46238 कै.गोरख रामदास काकडे, वय-28 यांस कारागृह वैद्यकीय अधिकारी यांचे सल्यानुसार संदर्भ सेवा रुग्णालय, शालीमार, नाशिक येथे 30 ऑगस्ट, 2019 रोजी दाखल केले होते. औषधोपचार चालू असताना बंदी क्रं.बी. 46238 कै. गोरख रामदास काकडे हा मयत झाल्याचे कर्तव्यावर हजर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयसिंग ज्ञानोबा मुंढे यांनी 30 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 9.10 वाजता घोषित केले.
            फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 मधील कलम 176 (1) (2) (3) (4) अन्वये कै. गोरख रामदास काकडे त्यांच्या मृत्युबाबतच्या दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांनी उप विभागीय अधिकारी, मालेगाव यांना दिले आहेत.
            तरी कै.गोरख रामदास काकडे यांचे मयताबाबत शंका असल्यास 4 डिसेंबर, 2019 पर्यंत उप विभागीय दंडाधिकारी मालेगाव, उपविभागीय कार्यालय, मालेगाव, एकात्मता चौक, कॉलेज रोड, नवीन तहसिल कार्यालय, मालेगाव, जि, नाशिक यांना लेखी स्वरूपात खुलासा कळविण्यात यावा. 4 डिसेंबर, 2019 पर्यंत खुलासा प्राप्त न झाल्यास पुढील उचित कार्यवाही करणेत येईल, याची नोंद घ्यावी. असे उप विभागीय अधिकारी, मालेगाव जि. नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000