Tuesday, 5 November 2019

बाल विवाह प्रतिबंधात्मक कायद्यान्वये वधु-वरांचे किमान वय अनुक्रमे 18 व 21 असणे अनिवार्य


       जळगाव.दि.05:- बाल विवाह कायदा 2006 अंतर्गत वधुचे वय 18 वर्षे पुर्ण व वराचे वय 21 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे. बाल विवाह प्रतिबंधात्मक कायद्यान्वये वधु-वरांचे वय अनुक्रमे 18 व 21 पुर्ण नसताना बाल विवाह लावणारा, ठरविणारा, पार पाडणारा, करणाऱ्याला बाल विवाह करणेबाबत सुचविणारा, संस्था, कळत-नकळतपणे या विवाहाला मान्यता देणारे तसेच या विवाहाला उपस्थित राहणारे किंवा वर जर 18 वर्षाहून अधिक वयाचा असेल तर कुणालाही दोन वर्षे सक्तमजुरी किंवा एक लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा हावू शकतात.
          बाल विवाह रोखण्यासाठी ग्रामिण भागात ग्रामसेवक हे बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत. अंगणवाडी सेविका ह्या सहाय्यक बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत.  तर नागरी भागात बाल विकास प्रकल्प‍ अधिकारी बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत. सर्व पर्यवेक्षिका ह्या सहाय्यक बाल विकास प्रतिबंधक अधिकारी आहेत.
      तरी बाल विवाह संबंधित कोणालाही काही माहिती मिळाल्यास किंवा कळवायचे असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, दुसरा मजजा मध्यवर्ती प्रशासकीय भवन, आकाशवाणी शेजारी, जळगाव या कार्यालयाच्या 0257-2228828 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव विजयसिंह परदेशी यानी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment