Thursday, 28 February 2019

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर



        जळगाव, दि. 28 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
            शुक्रवार, दिनांक 1 मार्च, 2019 रोजी सकाळी 6. 10 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 6.15 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथून पाळधी, ता. धरणगाव जि. जळगावकडे प्रयाण. सकाळी 6.30 वाजता पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
०००

मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात दोन व तीन मार्च रोजी विशेष मोहीमेचे आयोजन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे



·        * मतदार नाव नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना विशेष संधी
            जळगाव, दि. 28 - आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवार 2 व रविवार 3 मार्च, 2019 रोजी जळगाव जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
            जिल्ह्यात 1 जानेवारी, 2019 या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तथापि, यामध्ये मतदार नोंदणी झाली नाही, अशा वंचित नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी म्हणून 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. तथापि, या मोहिमेवेळीही मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू न शकलेल्या नागरिकांना आणखी संधी देण्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे.
            या दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत. बीएलओंकडे नमुना क्रमांक 6, 7, 8 व 8अ चे अर्ज उपलब्ध असतील. तसेच नागरिकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी 1 जानेवारी, 2019 या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी बीएलओंकडे उपलब्ध असेल.
            सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी निरक्षर मतदारांसाठी मतदार यादीचे वाचन करण्यात येणार असून गावांमध्ये मतदार यादीचे चावडी वाचनही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिक कल्याण संघटना (रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन- आरडब्ल्यूए) आणि सर्व ग्रामस्थांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना देण्याबाबत कळविण्यात आले आहे.
            या कार्यक्रमाची माहिती सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय सहाय्यकाची (बीएलए) नेमणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, अशी विनंतीदेखील राजकीय पक्षांना करण्यात आली आहे.
            मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीwww.ceo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1950 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मतदार नोंदणीविषयक अधिक माहिती जाणून घ्यावी. असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.
०००

भुसावळ येथे 3 मार्च रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन


        जळगाव, दि. 28 - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व एम. आय. तेली इंग्लिश मेडीअम स्कूल, भुसावळ यांचे संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक 3 मार्च, 2019 रोजी सकाळी दहा वाजेपासून एम.आय.तेली इंग्लिश मेडीअम स्कूल, रेल्वे स्टेशन जवळ, भुसावळ येथे अल्पसंख्यांक बहुलक्षेत्रात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक संचालक श्रीमती अनिसा तडवी यांनी दिली आहे.
            या मेळाव्यासाठी विविध खाजगी आस्थापनांनी रिक्तपदांची मागणी कळविलेली असून रिक्तपदांसाठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास/नापास, 12 वी पास, आय.टि.आय पास, पदवीधर अशी आहे. या मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या उद्योजकांना विविध रिक्तपदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची असल्याने पात्रताधारक उमेदवारांनी मेळाव्यास येतांना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीसह स्वखर्चाने मेळाव्यास उपस्थित रहावे. नियोक्त्याकडून देण्यांत येणाऱ्या वेतनाबाबत व इतर सवलतींबाबत पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे दिवशी संबंधित कंपनीचे अधिकारी माहिती देणार आहेत.
            या मेळाव्यास जिल्ह्यातील इच्छुक व पात्र बेरोजगार उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीमती तडवी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                      ०००

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 5 मार्च रोजी आयोजन



        जळगाव, दि. 28 - प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. परंतु मार्च महिन्याच्या पहिल्या सोमवारी (दि. 4 मार्च रोजी) सार्वजनिक सुट्टी असल्याने या महिन्याचा लोकशाही दिन हा मंगळवार, दि. 5 मार्च, 2019 रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
           त्यानुसार नागरिकांनी आपल्या तक्रारी लोकशाही दिनाच्या दिवशी लेखी स्वरुपात घेऊन याव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.
०००

जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सभा संपन्न महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करा - जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे



             जळगाव, दि. 28 - अत्याचार पिडित महिलेला जलदगतीने न्याय मिळणे आवश्यक असून याकरीता महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचा तपास पोलीस विभागाने तातडीने पूर्ण करुन चार्जशीट दाखल करावे. अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिल्यात.
            जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची मासिक सभा आज जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी त्यांनी वरील निर्देश दिलेत. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड केतन ढाके, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प संचालक पी. सी. शिरसाठ, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस. सी. अहिरे, नगरपालिका शाखेचे जिल्हा प्रशासन अधिकारी श्री. कुटे यांचेसह कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, जिल्हा महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले की, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली दाखल झालेल्या गुन्ह्यांचे चार्जशीट 60 दिवसाच्या आत दाखल होणे आवश्यक आहे. त्यानुसार पोलीस विभागाने गुन्ह्यांचा तपास वेळेत पूर्ण करुन चार्जशीट दाखल करण्याचे कार्यवाही करावी. कुठल्या तालुक्यात वारंवार अशाप्रकारचे गुन्हे घडतात याची सन 2015 पासूनची तालुकानिहाय माहिती तयार करण्याचे निर्देश देऊन यावर तातडीने प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच अत्याचार पिडितांना तातडीने मदत मिळण्यासाठी मदतीचे प्रस्ताव वेळेत सादर करण्याची सुचनाही त्यांनी दिली.
            या बैठकीत डिसेंबर 2018 अखेर अनुसूचित जातीच्या 16 व अनुसूचित जमातीच्या 10 अशा एकूण 26 प्रलंबित गुन्ह्याच्या तपासावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार अनुसूचित जातीचे 4 व अनुसूचित जमातीचे 3 असे एकूण 7 गुन्ह्यांची निर्गती झाल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड यांनी बैठकीत दिली. तसेच एप्रिल 2018 ते जानेवारी 2019 या कालावधीत एफआयआर दाखल झाल्यानंतर 65 पिडितांना अर्थसहाय मंजूर करण्यात आले आहे. तसेच जानेवारी 2019 मध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर 3 पिडीताना 1 लाख 25 हजार रुपये तर फेब्रुवारीमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 6 पिडितांना 7 लाख 12 हजार 500 रुपयांचे  अर्थसहाय मंजूर करण्यात आले आहे. त्याचबरोबर जानेवारी 2019 मध्ये जिल्ह्यात अनुसूचित जातीचे 2 व अनुसूचित जमातीचे 1 असे एकूण 3 गुन्हे नव्याने दाखल झाल्याची माहिती सहायक आयुक्त श्री. योगेश पाटील यांनी दिली. या गुन्ह्यांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
०००

Wednesday, 27 February 2019

जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न वितरीत निधी वेळेत खर्च न झाल्यास संबंधितांस जबाबदार धरणार -जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे



            जळगाव, दि. 27 - जिल्हा वार्षिक योजनेमधून कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत केलेला निधी विहित वेळेत खर्च न झाल्यास संबंधित यंत्रणेच्या प्रमुखास जबाबदार धरण्यात येईल. असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिला.
            जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव विभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांचेसह विविध विभागांचे कार्यालय प्रमूख उपस्थित होते.
            जिल्हा वार्षिक योजना 2018-19 चा आढावा घेताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, ज्या यंत्रणांना निधीचे वाटप करण्यात आले आहे. त्या यंत्रणांनी शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी निधीचा विनियोग करावा. कामे पूर्ण होवूनही निधी वितरीत केला नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात विकासाची नवीन कामे करीत असतांना सामाजिक जाणीव ठेवून कामांची निवड करावी तसेच त्या कामांना जबाबदार अधिकाऱ्यांनी भेट देऊन कामांची दर्जा तपासणे आवश्यक आहे. कामांची निवड करतांना जिल्ह्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र असलेल्या पारोळा, एरंडोल, अमळनेर या तालुक्यातील पाझर तलावांच्या कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील 315 शाळांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे शिक्षणाधिकारी बी. एल. पाटील यांनी सांगितले असता जिल्ह्यातील शाळांचा दर्जा चांगला रहावा, विद्यार्थ्यांना चांगल्या वातावरणात ज्ञान संपादन करता यावे यासाठी समर्पित होणाऱ्या निधीतून शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्यासाठी तेथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य देण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिल्यात.
            या बैठकीत गेल्या चार वर्षापासून पासून जिल्हा परिषदेकडे तसेच फैजपूर व सावदा नगरपालिकेकडे असलेल्या अखर्चित निधीवर चर्चा करण्यात आली. सदरचा निधी खर्च होणार नसल्यास तो तातडीने शासन जमा करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिले.
            रमाई आवास योजनेतंर्गत नागरी भागातील लाभार्थ्यांकडे घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने त्यांना घरकुलाचा लाभ देता येत नाही. पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध असल्यास तातडीने उपलब्ध करुन देऊन तेथे घरकुल उभारावे असेही त्यांनी बैठकीत सांगितले.
वितरीत तरतुदीशी खर्चाच्या टक्केवारीत जळगांव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर
            सन 2018-19 साठी जिल्ह्याला सर्वसाधारण योजनेसाठी 301 कोटी 78 लाख रुपये, विशेष घटक योजनेसाठी 89 कोटी 8 लाख, टीएसपी योजनेतंर्गत 30 कोटी 81 लाख, आदिवासी उपयोजनेाठी 52 कोटी 12 लाख असा एकूण 473 कोटी 79 लाख 99 हजार रुपयांचा नियतव्यय मंजूर असून अर्थसंकल्पीय तरतुदही करण्यात आली आहे. त्यानुसारी 348 कोटी 4 लाख रुपये सर्व कार्यान्वीय यंत्रणांना वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 304 कोटी 65 लाख 41 हजार रुपये खर्च झाले आहे. वितरीत तरतुदीशी खर्चाची टक्केवारी 87.53 इतकी असून उपलब्ध तरतुदीशी खर्चाची टक्केवारी लक्षात घेता जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. याबद्दल जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन अधिकारी व सर्व संबंधित यंत्रणांचे अभिनंदन केले.
            या बैठकीत पशुसंवर्धन, कौशल्य विकास, अपारंपारीक उर्जा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण आदि विभागांनी अखर्चित निधी समर्पित करावा. समर्पित निधी इतर विभागांना वर्ग करण्याची सुचनाही त्यांनी बैठकीत दिली. वित्त विभागाच्या 25 जानेवारीच्या परिपत्रकानुसार 1 फेब्रुवारी 2019 नंतर खरेदीची प्रक्रिया करता येणार नसल्याने खरेदीचे प्रस्ताव नियोजन विभागाकडे मंजूरीसाठी पाठवू नये असेही जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.
000

शासकीय सहकार व लेखा पदविका (जीडीसीए) परिक्षेसाठी 28 मार्चपूर्वी ऑनलाईन अर्ज भरावेत



        जळगाव, दि. 27 - शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.अँड ए) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम) परिक्षा 23, 24, व 25 मे, 2019 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परिक्षेसाठी परिक्षार्थीकडून ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. परिक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 28 मार्च, 2019 पर्यंत आहे. अशी माहिती मेघराज राठोड, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी दिली आहे.
            परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सहकार विभागाच्या www.mahasahakar.maharashtra.gov.inwww.sahakaryukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून याबाबतची सविस्तर अधिसुचनाही याच संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
            जे परीक्षार्थी ही परिक्षा देवू इच्छितात, अशा परिक्षार्थींनी परिक्षेसंदर्भात आवश्यक ती माहिती सहकार खात्याच्या संकेतस्थळावरुन प्राप्त करुन घ्यावी. असे आवाहन श्री. राठोड यांनी केले आहे.
000

Tuesday, 26 February 2019

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत राज्यातील 55 लाख 92 हजार 886 शेतकरी कुटुंबांच्या नावांची नोंद पैसे खात्यावर जमा होण्याची प्रक्रीया सुरू उर्वरीत नावे नोंदविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु


·       जळगाव जिल्ह्यातील 1443 गावातील 2 लाख 30 हजार 840 पात्र शेतकरी कुटुंबांची झाली नोंद.
            पुणे, दि. 26 - प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा देशभरात शुभारंभ करण्यात आला असून राज्यातील 41 हजार 888 गावातील 55 लाख 92 हजार 886 पात्र शेतकरी कुटुंबांची माहिती मंगळवार, दि. 26 फेब्रुवारी, 2019 पर्यंत राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) पोर्टलवर नोंदविण्यात आली आहेत. या शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर योजनेचा पहिला हप्ता जमा करण्याची प्रक्रीया सुरू असून राज्यातील अन्य पात्र शेतकऱ्यांची नोंद करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.  
            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दि. 24 रोजी गोरखपूर येथील कार्यक्रमात ‘प्रधानमंत्री किसान सन्मान’ योजनेचे उद्घाटन केले. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होणार आहेत. योजनेच्या उद्घाटनानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. अनेक शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचे एसएमएसही आले आहेत.
            राज्यातील एकूण 44 हजार 84 गावांपैकी 41 हजार 888 गावांतील पात्र शेतकरी कुटुंबांची माहिती राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) पोर्टलवर नोंदविण्यात आली आहेत. मंगळवार, दि. 26 फेब्रुवारी, 2019 पर्यंत 55 लाख 92 हजार 886 पात्र शेतकरी कुटुंबांची नावे पोर्टलवर नोंदविण्यात आली आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचे पहिल्या टप्प्यातील 2 हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्याची प्रक्रीया सुरू आहे.
       राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील 1518 गावातील 3 लाख 88 हजार 517 पात्र शेतकरी कुटुंब, सातारा जिल्ह्यातील 1714 गावातील 3 लाख 15 हजार 594 पात्र शेतकरी कुटुंब, कोल्हापूर जिल्ह्यातील 1216 गावातील 2 लाख 92 हजार 460 पात्र शेतकरी कुटुंब, नाशिक जिल्ह्यातील 1904 गावातील 2 लाख 68 हजार 643 पात्र शेतकरी कुटुंब, नांदेड जिल्ह्यातील 1527 गावातील 2 लाख 63 हजार 864 पात्र शेतकरी कुटुंब, पुणे जिल्ह्यातील 1811 गावातील 2 लाख 43 हजार 550 पात्र शेतकरी कुटुंब, जळगाव जिल्ह्यातील 1443 गावातील 2 लाख 30 हजार 840 पात्र शेतकरी कुटुंब, सांगली जिल्ह्यातील 724 गावातील 2 लाख 28 हजार 666 पात्र शेतकरी कुटुंब, सोलापूर जिल्ह्यातील 1077 गावातील 2 लाख 27 हजार 566 पात्र शेतकरी कुटुंब, औरंगाबाद जिल्ह्यातील 1253 गावातील 2 लाख 20 हजार 846 पात्र शेतकरी कुटुंब,  बीड जिल्ह्यातील 1151 गावातील 2 लाख 5 हजार 282 पात्र शेतकरी कुटुंब,  बुलढाणा जिल्ह्यातील 1296 गावातील 1 लाख 93 हजार 552 पात्र शेतकरी कुटुंब, लातूर जिल्ह्यातील 942 गावातील 1 लाख 84 हजार 694 पात्र शेतकरी कुटुंब, अमरावती जिल्ह्यातील 1931 गावातील 1 लाख 82 हजार 622 पात्र शेतकरी कुटुंब, उस्मानाबाद जिल्ह्यातील 732 गावातील 1 लाख 82 हजार 417 पात्र शेतकरी कुटुंब, परभणी जिल्ह्यातील 833 गावातील 1 लाख 64 हजार 503 पात्र शेतकरी कुटुंब, जालना जिल्ह्यातील 892 गावातील 1 लाख 56 हजार 299 पात्र शेतकरी कुटुंब, यवतमाळ जिल्ह्यातील 2017गावातील 1 लाख 45 हजार 934 पात्र शेतकरी कुटुंब,  चंद्रपूर जिल्ह्यातील 1657 गावातील 1 लाख 18 हजार 650 पात्र शेतकरी कुटुंब, हिंगोली जिल्ह्यातील 702 गावातील 1 लाख 18 हजार 325पात्र शेतकरी कुटुंब, अकोला जिल्ह्यातील 972 गावातील 1 लाख 15 हजार 762 पात्र शेतकरी कुटुंब, गोंदिया जिल्ह्यातील 907 गावातील 1 लाख 14 हजार 258 पात्र शेतकरी कुटुंब, धुळे जिल्ह्यातील 622 गावातील 1 लाख 10 हजार 640 पात्र शेतकरी कुटुंब, भंडारा जिल्ह्यातील 855 गावातील 1 लाख 8 हजार 643 पात्र शेतकरी कुटुंब, वाशिम जिल्ह्यातील 796 गावातील 1 लाख 7 हजार 81 पात्र शेतकरी कुटुंब, रायगड जिल्ह्यातील 1873 गावातील 1 लाख 4 हजार 620 पात्र शेतकरी कुटुंब, नागपूर जिल्ह्यातील 1800 गावातील 1 लाख 3 हजार 831 पात्र शेतकरी कुटुंब, रत्नागिरी जिल्ह्यातील 1490 गावातील 86 हजार 676 पात्र शेतकरी कुटुंब,  पालघर जिल्ह्यातील 918 गावातील 77 हजार 730 पात्र शेतकरी कुटुंब, ठाणे जिल्ह्यातील 859 गावातील 71 हजार 836 पात्र शेतकरी कुटुंब, वर्धा जिल्ह्यातील 1234 गावातील 71 हजार 184 पात्र शेतकरी कुटुंब, नंदुरबार जिल्ह्यातील 896 गावातील 68 हजार 110 पात्र शेतकरी कुटुंब, गडचिरोली जिल्ह्यातील 1575 गावातील 68 हजार 106 पात्र शेतकरी कुटुंब, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 751 गावातील 51 हजार 585 पात्र शेतकरी कुटुंब अशा राज्यातील एकूण 41 हजार 888 गावातील 55 लाख 92 हजार 886 पात्र शेतकरी कुटुंबांची नावे  राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) पोर्टलवर नोंदविण्यात आली आहेत. ही आकडेवारी दि. 26 फेब्रुवारी, 2019 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतची आहे.
***

मेंढपाळ विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

  जळगाव, दि. 26 - केंद्र शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनेतंर्गत राज्यात मेंढपाळ विमा योजना राबविण्यासाठी केंद्रीय लोकर विकास मंडळ, जोधपूर यांनी मान्यता दिलेली आहे. राज्यामध्ये या योजनेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ हे नोडल एजन्सी म्हणून काम करीत आहे. 
  या योजनेतून विमा संरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील मेंढपाळांनी नजीकच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती व पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 
                                                                       ०००

मतदार नोंदणी व पडताळणी करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध - जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे

जळगाव, दि. 26 - भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशान्वये मतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदणी करण्यासाठी व यादीतील माहिती पडताळणी करण्यासाठी संकेतस्थळ, टोल फ्री हेल्पलाईन, एसएमएस सुविधा तसेच प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन मतदार यादीची पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
मतदार माहिती व पडताळणी (वोटर व्हेरिफिकेशन ॲण्ड इन्फॉर्मेशन प्रोग्राम-व्हीव्हीआयपी) कार्यक्रमाअंतर्गत मतदार ओळखपत्राच्या सहाय्याने मतदारांना विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. मतदार यादीत नाव असले़ल्या ओळखपत्रधारकांनाच मतदानाचा हक्क बजावता येणार असल्यामुळे मतदार ओळखपत्र असले तरी मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘1950’ ही टोल फ्री हेल्प लाईन, www.nvsp.in आणि https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा तसेच प्रत्यक्षरित्या मतदार सुविधा केंद्राला भेट देऊन खात्री करता येणार आहे. मतदार यादीत नाव नसल्यास मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे.
‘1950’ ही टोल फ्री हेल्पलाईन
•  जिल्ह्यातील मतदारांनी ‘1950’ हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक फिरवल्यास त्याला मतदार यादीतील त्याच्या नावाची पडताळणी करुन घेणे शक्य होणार आहे.
•  मतदारांना SMS द्वारेही मतदार यादीतील नावाचा शोध घेता येईल. त्यासाठी मतदाराने<EPIC><SPACE><EPIC NO>असा संदेश (SMS) 1950 वर पाठवावा.
संकेतस्थळाला भेट देऊन नावाची पडताळणी
मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceo.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ आणि राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल अर्थात www.nvsp.in वरही मतदार यादी उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यावर आपल्या नावाचा शोध घेता येईल.
  एकाच मतदाराचे एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीत नाव असणे बेकायदेशीर असून एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंद असल्यास नमुना-7 भरुन इतर ठिकाणाहून आपले नाव वगळून घ्यावयाचे आहे. मतदार यादीतील आपल्या तपशिलामधील त्रुटींची दुरुस्ती करायची असल्यास नमुना- 8, विधानसभा मतदार संघांतर्गत मतदाराचा पत्ता बदलला असल्यास त्याने नमुना- 8अ किंवा इतर विधानसभा मतदार संघामध्ये स्थानांतर झाले असल्यास नमुना- 6 मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.
        नवीन मतदार नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर नमुना-6 भरुन मतदार नोंदणी करता येईल. याशिवाय मुख्य निवडणूक अधिकारी किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावरुन नमुना-6 डाऊनलोड करावा. हा नमुना भरुन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, वयाचा दाखला (18-21 वर्ष वयोगटासाठी) आणि रहिवासी दाखला ही कागदपत्रे मतदार नोंदणी अधिकारी (इआरओ) किंवा बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा केल्यासही मतदार नोंदणी केली जाईल.
  तरी या सर्व सुविधांचा वापर करुन ज्या नागरीकांनी मतदार नोंदणी केलेली नसेल त्यांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 
                                                                  ०००

Monday, 25 February 2019

वजनमापे विभागाच्या चार सेवा झाल्या ऑनलाईन

       जळगाव, दि. 25 - शासनाच्या उद्योग सुलभता धोरणाच्या अनुषंगाने वैधमापन शास्त्र कार्यालयाचे कामकाज ऑनलाईन पध्दतीने करण्यास सुरुवात झालेली आहे. मागील वर्षी वजने मापे उत्पादन, दुरुस्ती व विक्री परवाने ऑनलाईन कामानंतर आता वजने व मापे उपयोगकर्त्यांचे पडताळणी प्रमाणपत्रासह इतर तीन सेवा देण्याचे कामकाजही ऑनलाईन करण्यात आले आहे. अशी माहिती रा. भ. बांगर, सहायक नियंत्रक, वैधमापन शास्त्र यांनी दिली आहे.
         यासाठी विभागाच्या जिल्ह्यातील सर्व निरीक्षकांना स्वतंत्र लॅपटॉप व इंटरनेट कनेक्शन देण्यात आलेले आहे. निरीक्षकांनी संबंधित वजने मापे उपयोगकर्त्यांची माहिती ऑनलाईन अपलोड करण्यास यापूर्वीच सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता वजनमापे उपयोगकर्ता व त्यांचेजवळ असलेले वजनमापे यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील वजनमापे उत्पादक, दुरुस्तक व विक्रेते यांना ऑनलाईन पध्दतीने परवाने दिले जात आहेत. व परवान्यांचे नुतनीकरण ही ऑनलाईन पध्तीने केले जात आहे. त्यासाठी परवानाधारक यांना ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. त्यासोबत आवश्यक असलेली माहिती ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर अन्वेषणासाठी संगणकीय सोडत पध्दतीने जिल्ह्यातील कुठल्याही अधिका-यास वाटप करण्यात येते. एकाच परवानाधारकाचे अन्वेषण त्याच अधिका-यास सलग दोन वेळा न देण्याची तरतुदही संगणकीय प्रणालीमध्ये करण्यात आली आहे. अन्वेषणाची कार्यपध्दती व तपासणी सुची तसेच परवाना देणे, नुतनीकरण करणे, परवान्यात फेरफार करणे. यासाठीची कार्यपध्दती व आवश्यक ती कागदपत्रे यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 
           या अगोदर वजनमापे उपयोगकर्त्यांची वजनमापे मुदत संपल्यानंतर संबंधित निरीक्षकांमार्फत पडताळणी व मुद्रांकन होऊन ऑफलाईन पध्दतीने प्रमाणपत्र दिले जात होते. या कामासाठी बराच वेळ जात होता. आता मात्र पडताळणी प्रमाणपत्रांचे कामकाज ऑनलाईन पध्दतीने सुरु झालेले आहे. त्यासाठी प्रथम वजनमापे उपयोगकर्त्याची माहिती संगणक प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अपलोड केल्यानंतर वजनमापे प्रमाणपत्र उपलब्ध होत आहे. तसेच संबंधित उपयोगकर्ता यांना नोंदणी करणेबाबत अलर्ट मेसेजही पाठवला जाणार आहे.       
           वैधमापन यंत्रणेच्या संगणकीकरणाची प्रक्रिया सुरु झालेली असल्याने यापुढे वजनमापे उत्पादक/ दुरुस्तक/विक्रेते यांचे नविन परवाने देणे व त्या परवान्यांचे नुतनीकरण करणे. वजनमापे यांचे परवान्यामध्ये फेरबदल, आवेष्टित वस्तुंचे उत्पादक/आवेष्टक/आयातदार यांची नोंदणी व नोंदणीत फेरफार करणे, नामनिर्देश नोंदणी प्रमाणपत्र या सेवा केवळ ऑनलाईन सेवेव्दारेच उपलब्ध राहतील, यांची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे श्री. रा. भ. बांगर, सहायक नियंत्रक, वैधमापन शास्त्र जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                             ०००

सैन्य दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी इच्छुकांना 13 मार्च रोजी उपस्थितीचे आवाहन

  जळगाव, दि 25 - भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांची सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (SSB) परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यात येणार आहे. यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र  शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी 19 ते 28 मार्च, 2019 या कालावधीत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
         जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे दिनांक 13  मार्च, 2019 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC ट्रेनिंगच्या गुगल प्लस पेजवरती किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या  www.mahasaink.com या वेबसाईट वरील रिक्य्रुटमेंट टॅबला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध चेकलिस्ट आणि महत्वाच्या तारखा यांचे अवलोकन करावे. त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊनलोड करुन त्यांच्याही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन आणावेत.
          केंद्रामध्ये एस.एस.बी कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे. व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेवून यावेत.
             कंम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSE) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA- UPSE) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.
         एनसीसी “ C” सर्टिफिकेट “A”  किंवा “B” ग्रेड मध्ये पास झालेले असावेत. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे, युनिव्हर्सिटी एंट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर असावे. किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे. 
            अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दुरध्वनी क्र. 0253-2451031 आणि 0253-2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 
                                                                ०००

Sunday, 24 February 2019

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ जिल्हयातील 2 लाख 27 हजार 743 शेतकरी कुंटूबाना योजनेचा लाभ मिळणार




      जळगाव : दि.24:-  शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जिल्हास्तरीय  शुभारंभ आज दिनांक  24 फेब्रूवारी 2019 रोजी  ममुराबाद जि.जळगाव येथील कृषि विज्ञान केद्रात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी  डॉ.अविनाश ढाकणे  यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

         यावेळी  आमदार सुरेश भोळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर कृषि उपसंचालक अनिल भोकरे एन.आय.सी.चे प्रमुख प्रमोद बोरोले, महात्मा फुले कृषि विज्ञान पिठाचे डॉ. सुदाम पाटील कृषि विज्ञान केंद्राचे डॉ.बाहेती,नाबाडचे श्रीकांत झांबरे, खते, कृषि बियाणे विक्रेते ,प्रातिनिधीक स्वरूपात निवड झालेले शेतकरी, विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

         जिल्हा प्रशासनासह कृषि, महसूल, कृषि विज्ञापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम 79.52 टक्के पुर्ण झाले असुन लवकरच  पात्र शेतक-यांच्या  खात्यात  थेट निधी जमा  करण्यात येणार असल्याचे सांगुन जिल्हाधिकारी श्री. डॉ.अविनाश ढाकणे पुढे म्हणाले की,  शेतक-यांनी अभिनव पध्दतीचा वापर करावा.  पाण्याचे योग्य नियोजन करून कमी खर्चात जास्त उत्पादन मिळण्यासाठी  प्रयत्नशील राहावे. शेतक-यांच्या सन्मानासाठी ही योजना आहे. शेवटच्या  लाभार्थ्यांच्या खात्यात निधी पोहचविण्यासाठी  शासन कटिबध्द आहे. शेतक-यांच्या खात्यात  निधी पोहचविण्यासाठी  काही त्रुटी किंवा अडचणी असल्यास लाभार्थ्यांनी  ग्राम पातळीवर,  तालुका पातळीवर,  जिल्हा पातळीवर तयार करण्यात आलेल्या समितीकडे तक्रार करावी असेही त्यांनी सांगितले.

     2 लाख 27 हजार 743 शेतकरी कुंटूबीयांच्या  खात्यात  प्रधानमंत्री किसान  सन्मान निधी योजनेचा लाभ पोहचणार आहे. हा निधी लाभार्थ्यांनी आपल्या शेतीतील उत्पन्न वाढीसाठी, अडिअडचणीसाठी खर्च करून तो सत्कार्मी लावावा असे सांगून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री.ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून  योजनेची माहिती सांगितली. 

         ही योजना राज्यात दिनांक 1 डिसेंबर 2018 पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.  योजनेतंर्गत  विहित  निकषांप्रमाणे ज्या कुटंबाचे  (पती , पत्नी  व त्याची 18 वर्षाखालील अपत्ये) सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक  2 हेक्टर पर्यंत  क्षेत्र असलेल्या शेतकरी कुंटबियांस  2 हजार प्रती हप्ता याप्रमाणे दरवर्षी 3 हप्त्यात 6 हजार रूपयापर्यंत लाभ मिळणार आहे.   या योजनेचा पहिला हप्ता   31 मार्च पर्यंत    शेतक-यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे.

            गावपातळीवर  पात्र शेतक-यांच्या कुंटूबीयांचे  निश्चितीकरण करून लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यासाठी शेतक-यांचे नाव, लिंग, प्रवर्ग, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख याबाबतची  माहिती शेतक-यांनी  दयावयाची आहे. तसेच सामाईक कुटूंबातील एक सदस्यांनी योजनेचा लाभ बँक खात्यावर अदा  करण्यासाठी स्वयं घोषणापत्र दयावयाचे आहे. लाभार्थ्यांची यादी अंतिम झाल्यावर केंद्र शासनाच्या पीएम किसान पोटर्लवर  अपलोड केली जाणार आहे.  त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीव्दारे  निधी जमा होणार आहे. या योजनेच्या अमलबजावणीसाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामस्तरावर सनियंत्रण समित्या गठित करण्यात आल्या असुन त्यानुसार  योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व स्वागतपर भाषणात डॉ. बाहेती यांनी  कार्यक्रमाची सविस्तरपणे रुपरेषा  सांगून उपस्थित शेतकऱ्यांना योजनेची माहिती सांगितली.

            प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ गोरखपुर, उत्तर प्रदेश येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आधुनिक पध्दतीचा वापर करून डीजीटल पध्दतीने करण्यात आले. त्याचे थेट प्रक्षेपण देशवासीयांना दाखविण्यात आले. तसेच मन की बात या कार्यक्रमाच्या प्रसारणामध्ये प्रधानतंत्री नरेंद्र मोदी यांनी शहीद जवान तसेच शेतकऱ्यांबद्दल गौरवोदगार काढले.

                                                               **************

Friday, 22 February 2019

राष्ट्रसंत गाडगे बाबांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन




जळगाव, दि. 23 - राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातीलअधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000


किटकनाशकाची बेकायदेशीर व विना परवानगी उत्पादन, साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल


        जळगाव, दि 22 :- ऑक्सीफलावर (नायट्रोबेन्झीन) या किटकनाशकाची बेकायदेशीर व विना परवानगी उत्पादन, साठवणूक व विक्री केल्यामुळे मे. स्किंडलर बायोकेमीकल, नेरी बु., ता. जामनेर आणि       मे. पाटील बायोटेक प्रा. लि. जळगाव यांनी शासनाची दिशाभुल करुन फसवणुक केलेली आहे. त्यामुळे त्यांचेविरुध्द एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन, जळगाव येथे भादंवि कलम 420, किटकनाशक कायदा 1968 चे कलम 3 (के), 9, 13, 17 (1) (अे) (सी) (डी), 17 (2), 18 (1)(अे), 18(2) आणि किटकनाशक नियम 1971 मधील नियम 9,10,15,16,17,18,19 चा भंग केल्याने दोन्ही कंपनीच्या जबाबदार व्यक्तींवर सरकार तर्फे श्री. संजय पांडुरंग पाटील, किटकनाशक निरीक्षक, तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगाव यांनी 21 फेब्रुवारी, 2019 रोजी गुन्हा दाखल केला आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                        ०००

मुद्रांक शुल्काचा थकित महसूल जमा करण्याचे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन



जळगाव, दि.22 :- जिल्ह्यातील मुद्रांक शुल्क थकबाकीदार यांनी, त्यांना प्राप्त झालेल्या नोटीशीमध्ये नमूद असलेल्या, कमी भरलेल्या मुद्रांक शुल्क व नोंदणी फीचा भरणा त्वरीत संबधित तालुकास्थित दुय्यम निबंधक कार्यालयाशी किंवा मुद्रांक जिल्हाधिकारी, जळगाव कार्यालयाशी समक्ष संपर्क साधून करावा. असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
मुद्रांक जिल्हाधिकारी, जळगाव कार्यालयाने केलेल्या महसूल वसूली प्रमाणपत्र (R.R.C) तसेच मिळकतीवरील मुद्रांक शुल्काचा बोजा यास प्रतिसाद न देणा-या व महसुलाचा शासकीय भरणा न करणा-या थकबाकीदार यांची यादी वर्तमान पत्रामध्ये प्रसिध्द करण्यात येणार आहे. महसुलाचा भरणा न करणा-या व नोटीस न स्विकारणा-या थकबाकीदार यांच्याबाबत एकतर्फी कठोर कार्यवाही (जसे त्यांच्या मालमत्ता जप्ती बाबतची कार्यवाही) करण्यात येईल. व याची सर्वस्वी जबाबदारी ही संबधीत थकबाकीदार यांचीच राहील. याची सर्व थकबाकीदार यांनी नोंद घ्यावी. व या कार्यालयास सहकार्य करावे. असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी, जळगाव  श्री. व्ही. एस. भालेराव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीची नोंदणी करणे आवश्यक



        जळगाव, दि 22:- प्राणी क्लेष प्रतिबंधक अधिनियम 1960 च्या कलम 4 अन्वये स्थापन केलेल्या भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या संमतीने राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी (एस.पी.सी.ए) स्थापित करण्यात आलेल्या आहेत. स्थापित केलेल्या सोसायट्यांवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीस शासनाकडून मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
         त्यानुसार जिल्ह्यात स्थापन झालेल्या सोसायटीची भारतीय जीवजंतू कल्याण मंडळाकडे नोंदणी साठीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आहेत. तरी सोसायटी नोंदणीबाबतचे प्रस्ताव बोर्डास सादर करण्यासाठी या सोसायटीची नोंदणी संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत जिल्ह्यातील सहाय्यक संस्था निबंधक व सहाय्यक आयुक्त यांचेकडे करणे आवश्यक असल्याचे जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

27 फेब्रुवारी रोजी होणार जंतनाशक गोळ्याचे वाटप



             जळगाव, दि 22:- जंतनाशकाचे उच्चाटन करण्याच्या व्यापक दृष्टिकोणातून जिल्हयातील ग्रामीण भागात 27 फेब्रुवारी, 2019 रोजी मॉप-अप दिन (जतंनाशक गोळ्या वाटप) मोहिम राबविण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

जिल्ह्यात सण व उत्सवादरम्यान रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धनाचे दिवस जाहिर


        जळगाव, दि 22:- जिल्ह्यात सन 2019 मध्ये सण उत्सवादरम्यान सकाळी सहा ते रात्री बारा या वेळेत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यात खालील तारखांना सुट जाहिर केली आहे.
दिनांक 19 फेब्रुवारी शासकीय शिवजयंती, 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे महाराष्ट्र दिवस, 6 सप्टेंबर गणेशोत्सव पाचवा दिवस, 8 सप्टेंबर गणेशोत्सव सातवा दिवस, 12 सप्टेंबर गणेशोत्सव शेवटचा दिवस, 6 ऑक्टोबर नवरात्रौत्सव अष्टमी, 7 ऑक्टोंबर नवमी, 27 ऑक्टोबर दिपावली, 10 नोव्हेंबर ईद-ए-मिलाद, 25 डिसेंबर ख्रिसमस, 31 डिसेंबर वर्षअखेर याखेरीज तीन दिवस राखीव ठेवण्यात आले आहे.
तथापि, मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदुषणासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे. व मा. न्यायालयाकडील आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. असे जिल्हाधिकारी, जळगाव यांनी म्हटले आहे.
       
                                                                     ००००००

Thursday, 21 February 2019

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्राच्या आराखड्याला मंजुरी -देवेंद्र फडणवीस



















            जळगाव दि.21:- धरणगाव येथे उभारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतीकेंद्रासाठी तयार करण्यात आलेल्या 15 कोटीच्या आराखड्यास मंजुरी देण्यात येत असून या केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्यात यावी. सुशिक्षित आणि सक्षम युवापिढी घडविण्यासाठी क्रांतिकारी आणि प्रेरणादायी विचार समाजापर्यंत पोहोचविले जावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र  फडणवीस यांनी केले.
            धरणगाव येथे क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतीसंस्थेतर्फे आयोजित जनजाती मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबाराव पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक सह कार्यवाहक भैयाजी जोशी, श्री. नायराणस्वामी, संस्थेचे अध्यक्ष श्री. भाईदास सोनवणे आदी उपस्थित होते.
            श्री. फडणवीस म्हणाले, क्रांतीकारी खाज्याजी नाईक यांनी इंग्रजांचा अफूचा व्यापार उध्वस्त करुन  त्यांना सळो की पळो करुन सोडले.  या व्यापारातून निर्माण झालेली इंग्रजांची संपत्ती भारतीयांवर अत्याचार करण्यासाठी वापरण्यात येवू नये असा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या स्मृतीत आदिवासी बांधवांसाठी लोकोपयोगी केंद्र उभे रहावे ही सर्वांसाठी गौरवाची बाब आहे.
              जनजाती समाजाचा  इतिहास गौरवशाली आहे. जल, जमीन आणि जंगल रक्षणाचे कार्य या समाजाने केले. अनेक संस्थांच्या माध्यमातून समाजाला उपयुक्त असणारे कार्य करताना पारतंत्र्यात  इंग्रजांविरुद्ध जोमाने लढा दिला. बाबुराव शडमाके आणि भिमा नाईक यासारख्या क्रांतिकारकांचे कार्य उल्लेखनीय आहे. 
आदिवासी कल्याणासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. वनपट्यांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे. 50 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी
  नामांकीत शाळेत शिकण्याची संधी मिळाली आहे. पेसामधील आदिवासी गावांना 5 टक्के निधी थेट देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या निधीमुळे आदिवासी गांवाच्या विकासाला गती मिळेल. वनावर आदिवासींचा हक्क असावा यासाठी शासनाचे प्रयत्न असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले. 
            श्री. जोशी म्हणाले, सर्व भारतीय एक असून देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी केलेले बलिदान देशासाठी प्रेरणदायी आहे. समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी प्रयत्न होत असून शासनासोबत सामाजिक संस्थानी कर्तव्यभावनेने पुढे आले पाहिजे. क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्र विकासासाठी प्रेरक ठरेल असा विश्वास व्यक्त करून केंद्रासाठी तयार केलेल्या आरखाड्यास मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.
           यावेळे श्री.नारायणस्वामी यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला खा.ए.टी.पाटील, आमदार स्मिता वाघ, चंदूलाल पटेल, शिरीष चौधरी, सुरेश भोळे, उन्मेष पाटील, रा.स्व.संघाचे शरद ढोले, राजेश पाटील, चैत्राम पवार आदी उपस्थित होते.
           मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्राचे भूमिपूजन करणयात आले. मुख्यमंत्र्यांनी खाज्याजी नाईक समधीस्थळाचे दर्शन घेतले. तत्पूर्वी श्री.फडणवीस यांचे हेलिपॅडवर आगमन झाले. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार श्रीमती वाघ, अपर जिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी त्यांचे स्वागत केले.
0000000000

भुसावळ शहरातील 5 हजार बेघर नागरीकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोफत घरे देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस















·         जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या मेगारिचार्ज प्रकल्पाचा 6 हजार कोटीचा डीपीआर केंद्राला सादर
            जळगाव, दि. 21 - भुसावळ शहरातील 5 हजार बेघर नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लवकरच मोफत घरे उपलब्ध करून देणार असून स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षीपर्यंत देशात एकही पात्र लाभार्थी बेघर राहू नये. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
            भुसावळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पटांगणावर आयोजित विविध विकास कामांचे भुमीपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील, खासदार रक्षाताई खडसे, महापौर सिमाताई भोळे, माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, हरीभाऊ जावळे, सुरेश भोळे, चैनसुख संचेती,  नगराध्यक्ष रमण भोळे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे आदि उपस्थित होते.
            यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 31 कोटी रुपये खर्चाचे सावदा, निंभोरा, बोदवड येथील रेल्वे क्रॉसिंग वरील उड्डाणपुलांचे भुमिपूजन, आयुष्यमान भारत योजनेच्या पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात ओळखपत्रांचे वाटप, 2 कोटी 54 लक्ष रुपये खर्चाच्या भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी  उद्यानाचे लोकार्पण, भुसावळ येथील प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण व आमदार संजय सावकारे यांच्या स्थानिक विकास निधीतून तयार करण्यात आलेल्या उद्यानाचे लोकार्पण अशा विविध विकास कामांचे रिमोटद्वारे उद्घाटन केले.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, राज्यातील प्रमुख रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंगवर 250 उड्डाण पुलांची निर्मिती करण्यात येणार असून त्यातील पहिल्या टप्प्यात भूसावळ शहारासह परिसरातील तीन पुलांचे लोकार्पण व भूमिपूजन आज संपन्न होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात रेल्वेचे अभूतपूर्व असे काम झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, खासदार रक्षा खडसे या गेल्या साडेचार वर्षात मतदार संघात 95 टक्के गावांत पोहचल्या असून त्या गावातील लोकांच्या समस्या जाणून घेवून त्या परिसरात अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे.  त्यांनी साडेचार वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर यावा यासाठी समर्पण कार्यवृत्तांत पुस्तिकेचे प्रकाशन  करतांना विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
            ते पुढे म्हणाले की, मेगा रिचार्ज प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. यासाठी 6 हजार कोटी रुपयांचा डीपीआर सादर करण्यात आला असून तो लवकरात लवकर मंजूर होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून देशातील 50 कोटी नागरीकांना 5 लाख रुपयापर्यंतचा उपचार मोफत देण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला. ही जगातील सर्वात मोठी ऐतिहासिक योजना असून या योजनेचा 19 लाख रुग्णांनी आतापर्यत लाभ घेतला आहे. जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी राहुरी कृषी विद्यापीठाच्या धर्तीवर जळगांव जिल्हयात एक कृषी विद्यापीठाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, तसेच भुसावळ शहारातील राज्य राखीव पोलीस दल प्रशिक्षणाचे अपूर्ण कामाबाबत तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, राज्यातील 12 कोटी असंघटीत कामगारांसाठी योजना तयार करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून असंघटीत कामगारांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांच्या कल्याणासाठी 75 हजार कोटी रुपयांची प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना कार्यान्वीत केली आहे. यापुढे देशातील प्रत्येक पात्र शेतक-यांच्या बँक खात्यावर 6 हजार रुपये जमा करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुलवामा येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे  जवान शहीद झाले असून त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतला जाणार असून त्यासाठी प्रधानमंत्र्यांनी सैन्यदलाला आवश्यक त्या सुचना दिल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे म्हणाले की, खासदार रक्षा खडसे रावेर मतदार संघात चांगले काम करत असून एक गृहणी ते सामाजिक कार्यकर्त्या या सर्व जबाबदा-या पार पाडत आहेत. ते पुढे म्हणाले की, देशात घडलेल्या घटनेमुळे सगळया देशात आक्रोश असून सैनिकांच्या बलीदानाचा बदला निश्चितपणे घेतला जाणार असून यासाठी देशातील 125 कोटी जनता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व सैनिकांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्या प्रस्ताविकात खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, गेल्या साडेचार वर्षात विविध योजनांच्या अंमलबाजवणीसाठी जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याची संधी मिळाली असून प्रधानमंत्र्यांनी सांगितलेले सबका साथ, सबका विकास या ध्येयधोरणावर काम करीत असून मी केलेल्या कामाची जनतेला माहिती व्हावी. यासाठी समर्पण पुस्तिकेच्या माध्यमातून जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, भुसावळ शहारातील रेल्वे प्रकल्पामुळे अनेक लोक बेघर झाले असून अशा सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सर्वाना मोफत घरे मिळावे अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली असून त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रलंबीत प्रकल्पांना चालना देण्यासाठी मोठया प्रमाणात निधी उपलबध करुन द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार संजय सावकारे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पुलवामा येथील हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सुनिल नेवे यांनी केले आभार आ. संजय सावकारे यांनी मानले.
कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमदार संजय सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.                                                   0000