Thursday, 21 February 2019

भुसावळ शहरातील 5 हजार बेघर नागरीकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोफत घरे देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस















·         जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या मेगारिचार्ज प्रकल्पाचा 6 हजार कोटीचा डीपीआर केंद्राला सादर
            जळगाव, दि. 21 - भुसावळ शहरातील 5 हजार बेघर नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लवकरच मोफत घरे उपलब्ध करून देणार असून स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षीपर्यंत देशात एकही पात्र लाभार्थी बेघर राहू नये. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
            भुसावळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पटांगणावर आयोजित विविध विकास कामांचे भुमीपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील, खासदार रक्षाताई खडसे, महापौर सिमाताई भोळे, माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, हरीभाऊ जावळे, सुरेश भोळे, चैनसुख संचेती,  नगराध्यक्ष रमण भोळे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे आदि उपस्थित होते.
            यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 31 कोटी रुपये खर्चाचे सावदा, निंभोरा, बोदवड येथील रेल्वे क्रॉसिंग वरील उड्डाणपुलांचे भुमिपूजन, आयुष्यमान भारत योजनेच्या पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात ओळखपत्रांचे वाटप, 2 कोटी 54 लक्ष रुपये खर्चाच्या भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी  उद्यानाचे लोकार्पण, भुसावळ येथील प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण व आमदार संजय सावकारे यांच्या स्थानिक विकास निधीतून तयार करण्यात आलेल्या उद्यानाचे लोकार्पण अशा विविध विकास कामांचे रिमोटद्वारे उद्घाटन केले.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, राज्यातील प्रमुख रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंगवर 250 उड्डाण पुलांची निर्मिती करण्यात येणार असून त्यातील पहिल्या टप्प्यात भूसावळ शहारासह परिसरातील तीन पुलांचे लोकार्पण व भूमिपूजन आज संपन्न होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात रेल्वेचे अभूतपूर्व असे काम झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, खासदार रक्षा खडसे या गेल्या साडेचार वर्षात मतदार संघात 95 टक्के गावांत पोहचल्या असून त्या गावातील लोकांच्या समस्या जाणून घेवून त्या परिसरात अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे.  त्यांनी साडेचार वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर यावा यासाठी समर्पण कार्यवृत्तांत पुस्तिकेचे प्रकाशन  करतांना विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
            ते पुढे म्हणाले की, मेगा रिचार्ज प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. यासाठी 6 हजार कोटी रुपयांचा डीपीआर सादर करण्यात आला असून तो लवकरात लवकर मंजूर होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून देशातील 50 कोटी नागरीकांना 5 लाख रुपयापर्यंतचा उपचार मोफत देण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला. ही जगातील सर्वात मोठी ऐतिहासिक योजना असून या योजनेचा 19 लाख रुग्णांनी आतापर्यत लाभ घेतला आहे. जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी राहुरी कृषी विद्यापीठाच्या धर्तीवर जळगांव जिल्हयात एक कृषी विद्यापीठाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, तसेच भुसावळ शहारातील राज्य राखीव पोलीस दल प्रशिक्षणाचे अपूर्ण कामाबाबत तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, राज्यातील 12 कोटी असंघटीत कामगारांसाठी योजना तयार करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून असंघटीत कामगारांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांच्या कल्याणासाठी 75 हजार कोटी रुपयांची प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना कार्यान्वीत केली आहे. यापुढे देशातील प्रत्येक पात्र शेतक-यांच्या बँक खात्यावर 6 हजार रुपये जमा करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुलवामा येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे  जवान शहीद झाले असून त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतला जाणार असून त्यासाठी प्रधानमंत्र्यांनी सैन्यदलाला आवश्यक त्या सुचना दिल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे म्हणाले की, खासदार रक्षा खडसे रावेर मतदार संघात चांगले काम करत असून एक गृहणी ते सामाजिक कार्यकर्त्या या सर्व जबाबदा-या पार पाडत आहेत. ते पुढे म्हणाले की, देशात घडलेल्या घटनेमुळे सगळया देशात आक्रोश असून सैनिकांच्या बलीदानाचा बदला निश्चितपणे घेतला जाणार असून यासाठी देशातील 125 कोटी जनता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व सैनिकांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्या प्रस्ताविकात खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, गेल्या साडेचार वर्षात विविध योजनांच्या अंमलबाजवणीसाठी जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याची संधी मिळाली असून प्रधानमंत्र्यांनी सांगितलेले सबका साथ, सबका विकास या ध्येयधोरणावर काम करीत असून मी केलेल्या कामाची जनतेला माहिती व्हावी. यासाठी समर्पण पुस्तिकेच्या माध्यमातून जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, भुसावळ शहारातील रेल्वे प्रकल्पामुळे अनेक लोक बेघर झाले असून अशा सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सर्वाना मोफत घरे मिळावे अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली असून त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रलंबीत प्रकल्पांना चालना देण्यासाठी मोठया प्रमाणात निधी उपलबध करुन द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार संजय सावकारे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पुलवामा येथील हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सुनिल नेवे यांनी केले आभार आ. संजय सावकारे यांनी मानले.
कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमदार संजय सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.                                                   0000

No comments:

Post a Comment