Monday, 4 February 2019

वाहन चालविताना नियमांचे पालन केल्यास सुरक्षा अबाधित - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर








       जळगाव, दि. 4- वाहन चालवितांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास स्वत:बरोबरच आपल्या कुटूंबाचीही सुरक्षा अबाधित राहिल ही जाणीव ठेवून वाहनचालकांनी वाहने चालवावी. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी  व्यक्त केले.
     30 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन आणि सडक सुरक्षा, जीवनरक्षा सारथी या सुरक्षित ड्रायव्हिंग मार्गदर्शिकेचे विमोचन येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
           कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक श्री. राजेंद्र देवरे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे श्री. सिन्हा, विविध स्वयंसेवी संस्था, ड्रायव्हिंग स्कूल, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधीसह नागरिक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर पुढे म्हणाले की, रस्ता सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करताना अनेक अडथळे येतात त्यात प्रामुख्याने पार्किेग प्रश्न, नो एन्ट्रीच्या ठिकाणी वाहने उभी करणे, चुकीच्या पध्दतीने वाहने पार्क करणे. यामुळे रस्ता वाहतुकीला अडचणी येतात. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी शक्यतो रात्रीचे प्रवास त्यातच रात्री 2 ते सकाळी 5 वाजेपर्यंतचा प्रवास टाळावा. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच रात्रीचा प्रवास केल्यास रस्ते अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होईल. त्याचबरोबर वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी परिवहन विभागाने शाळा, महाविद्यालयांमधून प्रचार व प्रसार होण्यासाठी शिबिरांचे तसेच कार्यशाळांचे आयेाजन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.
     जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरक्षा अभियान हे केवळ विशिष्ट कालावधीचा कालबध्द कार्यक्रम न होता ती जनचळवळ व्हायला हवी. अपघातानंतर अनेक जण अपघाताचे भ्रमणध्वनीवरून चित्रीकरण करून ती माहिती सोशल मिडीयावर पाठविण्यात धन्यता मानता. त्याऐवजी अपघातग्रस्ताला तात्काळ प्रथमोपचारासाठी नजिकच्या दवाखान्यात कसे दाखल करता येईल. याचा सामाजिक भावनेतून विचार करावा. असेही श्री. शिंदे यांनी शेवटी सांगितले.
             जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी रस्ते वाहतूक नियमांचे पालन करून सुध्दा दुर्देवाने अपघात झाल्यास अपघातग्रस्त व्यक्तीला वाचविणे हे आपले कर्तव्य मानले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने सामाजिक भावनेतून 108 क्रमांकावर कॉल करून रुग्णवाहिका बोलवणे, अपघातग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबियांना तसेच नातेवाईकांना कळविणे अशा प्राथमिक परंतु आवश्यक गोष्टी कराव्यात. अपघातात जेव्हा एक व्यक्ती दगावते तेव्हा दगावणाऱ्या व्यक्ती बरोबरच त्याचे कुटुंबाचेही मोठया प्रमाणात नुकसान होते याची जाणीव ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
              कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. जयंत पाटील यांनी देशातील, राज्यातील तसेच जिल्ह्यातील रस्ते अपघाताची वास्तवता विषद केली.  नागरीकांनी रस्ते अपघाताकडे केवळ एक अपघात म्हणून न बघता त्याच्याकडे एक सामाजिक आपत्ती म्हणून पाहिल्यास अशा अपघातांना आळा घालणे किंबहुना कमी करणे निश्चितच शक्य होईल. रत्यांवरील आपला प्रवास सुखकर होण्यासाठी प्रशासनातील विविध यंत्रणाना सहकार्य करण्याचे आवाहन केले. अपघातांवर नियंत्रणाचा एक भाग म्हणून विशेष तपासणी मोहिम, बैलगाड्या, ट्रॅक्टर, मॅटॅडोर अशा वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्याचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
     शेवटी सहाय्यक परिवहन अधिकारी श्री. किरण मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
                                                                             000

No comments:

Post a Comment